Saturday, August 23, 2008

review-"मान गये मुघल-ए-आझम'

"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे.
"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्‍यता आहे; मात्र हा सिनेमा "मुघल-ए-आझम'शी नव्हे, तर "जाने भी दो यारो'शी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चटपटीत लिखाणात छेल यांनी चांगलं यश मिळवलं आहे, पण दहा-पंधरा चांगले संवाद आणि प्रसंगांमुळं सिनेमा बनत नाही, हे छेल यांना ठाऊक नसावं. एकाच कथानकातून त्यांनी देशभक्ती, प्रेम, रहस्य मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि अपेक्षेप्रमाणे एक ना धड... असा "फील' या सिनेमाला आलाय. परेश रावल, के. के. मेनन, राहुल बोस, मल्लिका शेरावत अशी चांगली "कास्ट' असूनही वेगळेपणाच्या हव्यासामुळं ती "वेस्ट' गेलीय.
या चित्रपटालाही बॉम्बस्फोटाचीच पार्श्‍वभूमी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची तयारी फेब्रुवारीत झाली. लेखकानं त्याचा संबंध आपल्या कथानकाशी जोडलाय. गोव्यातील एका नाटक कंपनीचा परेश रावल हा मुख्य अभिनेता. मल्लिका शेरावत ही त्याची पत्नी. "मान गये मुघल-ए-आझम' या नाटकात परेश अकबर बादशहाचा, तर मल्लिका अनारकलीची व्यक्तिरेखा साकारीत असते. राहुल बोस हा "रॉ'चा एक अधिकारी. तो गुन्हेगारांच्या शोधासाठी गोव्यात येतो आणि मल्लिकाच्या प्रेमात पडतो. तो आणि मल्लिका देशप्रेमाच्या नावाखाली परेश रावलचा वापर करून घेतात. चित्रपटाचा व्हिलन झालाय तो के. के. मेनननं साकारलेला एका गझल गायक. त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतात. मल्लिका आणि परेश रावळच्या मदतीनं राहुल बोस हे संबंध उघडकीस आणतो.
"जाने भी दो यारो'द्वारे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एक छान सामाजिक-राजकीय प्रहसन सादर केलं होतं. संजय छेल यांना या सिनेमातून असंच काहीतरी अपेक्षित होतं, पण कच्च्या लिखाणामुळं त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. छेल यांच्यातील लेखक एवढा कमी पडला आहे की, या चित्रपटाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत "ग्रीप' घेता आलेली नाही. दहा पाच-दहा मिनिटांनी एखाद-दुसरा चांगला संवाद, या गतीनं हा सिनेमा सुरू राहतो. परेश-मल्लिकाच्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्यात, पण राहुल बोस आणि के. के. मेनन यांच्याबद्दल तसं म्हणता येत नाही. या सिनेमात "मान गये...' हे नाटक बऱ्याचदा पाहायला मिळतं. या नाटकातली कलाकार मंडळी वारंवार आपले संवाद बदलतात, नको ती "ऍडिशन्स' घेतात, त्यांच्या अभिनयात कोणतंही गांभीर्य दिसत नाही... तरीसुद्धा हे नाटक पाहायला अनेकांनी गर्दी केल्याचं दिसतं.
मल्लिका आणि राहुल बोस यांचं खरोखरीच "अफेअर' असतं की राहुलच्या देशप्रेमाचा तो एक भाग असतो, याचा सिनेमा संपला तरी पत्ता लागत नाही. परेश रावल हे "सीझन्ड ऍक्‍टर' असल्यामुळे त्यांनी आपला भाग तयारीनं सादर केलाय. मल्लिकानंही आपल्या मर्यादा सांभाळून त्यांना चांगली साथ दिलीय. राहुल बोसची "इमेज' या सिनेमाद्वारे तोडण्यात आलीय. के. के. मेनन त्याच्या भूमिकेत अगदीच "मिसफिट' वाटलाय. अन्नू मलिक यांचं संगीत ऐकताना या चौघांचा गोंधळ बरा म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा सिनेमा संपल्यानंतर छेल यांना एखादं नवीन स्वप्न पडो, एवढीच काय ती शुभेच्छा द्यावीशी वाटते.

No comments: