Saturday, December 3, 2011

जीवनातला आनंद गेला...


जीवनातला आनंद गेला...
देवसाहेबांच्या काही चांगल्या मुलाखती मला घेता आल्या. एक जबरदस्त कलाकार आणि माणूस म्हणजे देव आनंद. थोड्याच वेळात देवसाहेबांबरोबरचे माझे काही वेगळे अनुभव तुमच्याशी शेअर करतो.

क्रेझ ‘कोलावेरी डी’ची


-------
क्रेझ ‘कोलावेरी डी’ची
-------------
‘सातवे आसमान पे’ याचा खरा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल तर त्यानं तमीळ स्टार धनुषला जाऊन चेन्नईला भेटावं. हा धनुष काही दक्षिणेतला फार मोठा कलाकार नाही. २८ वर्षांच्या या कलाकारच्या नावावर काही जेमतेम बरे चित्रपट जमा आहेत. किंबहुना सुपरस्टार रजनीकांतचा जावई अशीच त्याची आजवरची ओळख आहे. परंतु, त्याची ही ओळख आता जुनी झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते अवघ्या पंधरवड्यापूर्वी आलेलं ‘कोलावेरी डी’ हे गाणं. एवढ्या कमी कालावधीत या गाण्याला ‘यू ट्यूब’वर सुमारे एक कोटी हिट्स मिळाल्या आहेत. हा आजवरचा उच्चांक मानला जातोय. फेसबुक, ट्विटरवरही हे गाणं सध्या फिरतंय. खासगी एफएम स्टेशन्सच्या आरजेंनी तर या गाण्याला उचलून धरलंय. दर तासाला प्रत्येक स्टेशनवर हे गाणं वाजवलं जातंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते खेडेगावातील एखादा अशिक्षितापर्यंतचा फॅनवर्ग या गाण्याला मिळालाय. असं भाग्य एखाद्याच गाण्याला किंवा गायकाला लाभतं.

आगामी ‘थ्री’ या तमीळ चित्रपटामधील हे गाणं आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्‍वर्या रजनीकांतनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते अनिरूद्ध रवीचंदर या नव्या दमाच्या संगीतकारानं. सध्या तरुणाईची ओढ ही स्थानिक भाषेऐवजी इंग्रजीकडे अधिक आहे. त्यामुळेच हल्लीच्या गाण्यांमध्ये इंग्रजीचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ‘हिंग्लिंश’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘मिंग्लिश’ (मराठी आणि इंग्रजी) हा प्रकार आजवर माहित होता. परंतु, या गाण्याच्या निमित्तानं ‘तंग्लिश’ (तमीळ आणि इंग्लिश) हा नवीन प्रकार रूढ झाला आहे. हे गाणं खुद्द धनुष यानं लिहिलं आणि गायलं आहे. एका प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या मनातील भावना या गाण्यात व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक धनुष हा काही ‘प्रोफेशनल’ गायक किंवा गीतकार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यानं स्वतःची ओळख बाथरूम सिंगर अशीच करून दिली आहे. तसेच अभिनेता हीच आपली खरी ओळख असून काव्यलेखन हे आपण फावल्या वेळेत करतो, असंही त्यानं म्हटलं आहे. परंतु, त्याच्या या फावल्या वेळातील कामगिरीनं त्याला अभूतपूर्व असं यश आणि स्टारडम मिळवून दिलं आहे. खुद्द धनुषला या गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे मोठा धक्का बसला आहे. परंतु, त्यानंही विनम्रपणे हे गाणं आपल्या हातून घडून गेल्याची कबुली दिलीय. या गाण्यातील शब्द हे रोजच्या वापरातील आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे गाणं आपलं वाटण्यासाठी एखादा ‘रॉ’ आवाज निर्माता-दिग्दर्शकाला हवा होता. त्यामुळेच गायनात फार मोठी मजल न मारलेल्या धनुषचा आवाज वापरण्यात आला.

या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं ते चेन्नईमध्ये. यावेळी धनुषसह त्याची पत्नी ऐश्‍वर्या, संगीतकार अनिरूद्ध रवीचंदर आणि या चित्रपटाची नायिका श्रृती हसन उपस्थित होती. त्यावेळी यापैकी कोणालाच हे गाणं लोकप्रियतेचा इतिहास घडवेल याची कल्पना आली नव्हती. ‘कोलावेरी डी’ची लोकप्रियता सध्या एवढी वाढलीय की त्याच्या व्यापारीकरणासही सुरुवात झाली आहे. ‘कोलावेरी डी’ हा शब्द असलेले टी शर्टस् लवकरच बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असला की निर्मात्यांतर्फे चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा एक भाग म्हणून अशाप्रकारच्या कल्पना लढविल्या जातात. परंतु, एखाद्या गाण्याला मिळालेलं यश पाहून बाजारधुरिणांकडूनच निर्मात्यांना अशाप्रकारचं ‘मर्चंडायजिंग’ करण्याची गळ घातली गेली आहे.

या गाण्याची चाल इतकी सहजसोपी आणि ‘कॅची’ आहे की अनेकांना ते ऐकताना त्यावर नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. ‘यू ट्यूब’वर या गाण्याचे मेकिंग ‘पोस्ट’ झाले आहे. प्रत्यक्षात चित्रपटामधील गाणं अजून कोणालाही पाहायला मिळालेलं नाही. परंतु, तरीदेखील काहींनी या गाण्यावर स्वतः नृत्य करीत त्याचे व्हिडीओज ‘यू ट्यूब’वर अपलोड केले आहेत आणि त्यालादेखील इंटरनेटवर भरपूर हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे चिनी, जपानी लोकांनाही हे गाणं खूप भावलं आहे. नायकानं गायलेली गाणी हिट होण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झालाय. अमिताभचं ‘मेरे अंगनेमें’ हे गाणं गाजलं आणि नायकांचा आवाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. अभिनेता आमिर खानच्या ‘आती क्या खंडाला’ (चित्रपट ः गुलाम) या गाण्यानंही साधारण १२-१३ वर्षांपूर्वी मोठी लोकप्रियता मिळवली. परंतु, अवघ्या १५ दिवसांमध्ये ‘कोलावेली डी’नं जो झंझावात घडवला, तो अभूतपूर्वच म्हणायला हवा. ‘कोलावेरी’चे शब्द आणि त्याला संगीतकारानं दिलेली चाल ही काही गीत-संगीताच्या दृष्टीनं ‘ग्रेट’ नाही. परंतु, रसिकांना कधी काय आवडेल, याचा भरवसा नसतो. ‘कोलावेरी डी’नं हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. आता पाहूया, प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं किती धमाल उडवून देतंय ते.
- मंदार जोशी
----------------

Tuesday, July 19, 2011

नटसम्राट


नटसम्राट
---------
"नटसम्राट' हे नाटक साकारण्याची प्रत्येक प्रतिभावंत कलावंताची इच्छा असते. परंतु, "नटसम्राट' न साकारताही नीळकंठ कृष्णाजी फुले नावाचा एक कलाकार "नटसम्राट' बनला. प्रेक्षकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं. एवढं की खलनायकी व्यक्तिरेखांमुळे स्त्रियांचा अनेकदा रोषही त्यांना पत्करावा लागला. भूमिका कोणतीही द्या, तिचं सोनं करण्याची खात्री देणारा हा कलावंत होता. पुढारी, पाटील, सावकार, बॅंक-साखर कारखाना चेअरमन... या भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. एका कलावंतामध्ये किती वेगवेगळी रूपं दडलेली असतात, याचं ते सर्वोत्तम उदाहरण होते.

निळूभाऊंचा जन्म म्हटला तर एका सामान्य कुटुंबातला आणि म्हटला तर एका असामान्य कुटुंबातला. कारण, त्यांच्या घराण्याचं मूळ थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी निगडीत. निळूभाऊंचं एकत्र कुटुंब. घरात सख्खी अकरा भावंडं. त्यांचं बालपण गेलं ते मध्यप्रदेश आणि विदर्भात. घरचं वातावरण स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल होतं. निळूभाऊंचे वडील भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक होते. चित्रपटाशी निळूभाऊंचा संबंध आला तो खामगावमध्ये. इथंच त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला चित्रपट पाहिला. परंतु, त्यावेळी त्यांना या क्षेत्रामध्ये आपली मोठी कारकीर्द घडेल, असं काही वाटलं नव्हतं. 1945 मध्ये निळूभाऊ पुण्यात आले. सेवादलाशी संलग्न असलेल्या बाबूराव जगताप यांचं मार्गदर्शन यावेळी त्यांना लाभलं आणि तिथून ते सेवादलाच्या कार्याशी निगडीत झाले. सुरुवात केली ती कलापथकापासून. कालांतरानं या पथकाचे ते प्रमुखही झाले. सेवादलातल्या भाऊसाहेब रानडे यांच्याकडून ते बरंच काही शिकले. ग. प्र. प्रधान यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. इथं काम करत असताना निळूभाऊंना पहिल्यांदा नट होण्याची इच्छा झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुढं शिकण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यांनी आर्मड्‌ फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात माळ्याची नोकरी स्वीकारली. ही नोकरी त्यांनी अवघ्या 80 रुपये मासिक पगारावर तब्बल दहा वर्षं केली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात निळूभाऊंनी "येरा गबाळ्याचे काम नोहे' या वगलेखनापासून केली. पु. ल. देशपांडे यांच्या "पुढारी पाहिजे'मधील त्यांनी साकारलेली रोंग्याची भूमिका खूप गाजली. या नाटकाचे सहा वर्षांत तब्बल सहाशे प्रयोग झाले. याचवेळी त्यांनी "बिनबियांचे झाड', "कुणाचा कुणाला मेळ नाही' यासारख्या नाटकांमधूनही कामं केली. मा
त्र, त्यांच्यात दडलेल्या उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडलं ते "कथा अकलेल्या कांद्याची' या वगनाट्यामधून. यातील भजनवल्ली अविचतरावांच्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. निळूभाऊंच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणास हेच वगनाट्य कारणीभूत ठरलं.

निळूभाऊंच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेलं वर्ष म्हणजे 1964. या काळात समाजवादी पक्षात दुफळी माजली. वाराणशीमधील अधिवेशनात बडबड झाल्यामुळे निळूभाऊ प्रचंड नाराज झाले. या अस्वस्थ मानसिकतेमधून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचं ठरविलं. पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेली चौकट त्यांना परिस्थितीमुळे मोडावी लागली. पुढे विख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी ही भूमिका पाहून "एक गाव बारा भानगडी'मधील झेलेअण्णांची व्यक्तिरेखा निळूभाऊंना दिली. या भूमिकेनं पुढं इतिहास घडविला आणि निळूभाऊंच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरली. अर्थात, ही भूमिका यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी तेवढेच कष्ट घेतले. भूमिकेत घुसण्याचं कसब त्यांना पहिल्यापासूनच साधलं होतं. "एक गाव...'चे लेखक शंकर पाटील यांची मदत घेत निळूभाऊंनी या व्यक्तिरेखेची तब्बल आठ-दहा वर्षं रंगीत तालीम केली. भूमिकेमधील इब्लिसपणा, संवादांमधील मोक्‍याच्या जागा, अचूक संवादफेक, चेहऱ्यावर सतत बदलत जाणाऱ्या हावभावांमुळे निळूभाऊ प्रत्येक भूमिकेवर स्वार झाले आणि प्रेक्षकांचं तब्बल चार दशके त्यांनी मनोरंजन केलं. या चार दशकांच्या प्रवासात त्यांनी जवळपास 140 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1970 ते 1990 ही दोन दशकं निळूभाऊंनी साकारलेल्या पाटीलकीनं गाजवली. "सामना', "सिंहासन', "चोरीचा मामला', "शापीत', "पुढचं पाऊल' या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. "सामना'मधील हिंदुराव धोंडो पाटील या भूमिकेनं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. "सूनबाई घर तुझंच आहे' हे नाटक करीत असताना निळूभाऊंची भेट रजनी मुथा यांच्याशी झाली आणि कालांतरानं त्या त्यांच्या जीवनसाथी झाल्या.

निळूभाऊंनी नाट्यसृष्टीसाठी दिलेलं योगदानही तेवढंच महत्त्वाचं आहे. "सखाराम बाईंडर', "सूर्यास्त', "बेबी' ही नाटकं त्यांनी गाजवली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्या काळात आलिशान गाड्या नव्हत्या. साध्या बसमधून प्रवास करावा लागायचा. निळूभाऊ असा प्रवास नेहमी करायचे. एवढा मोठा कलावंत असूनही बसमध्येच ते झोपायचे. बऱ्याचदा प्रवासात बस बंद पडे. मग त्यातून उतरून दुसऱ्या ट्रक-टेम्पोमधून प्रवास करण्यासही त्यांची तयारी असे. कधीकधी बंद पडलेल्या बसला धक्का देण्याचंही काम त्यांनी केलं आहे. "डाऊन टू अर्थ' प्रकारात मोडणारा हा अभिनेता होता. जेवणा-खाण्याचे कसलेही चोचले नसत. एखाद्या गावात शूटिंग असलं की कोणत्याही घरातली मीठभाकरी त्यांना चाले.

अभिनयाबरोबर निळूभाऊ रमले ते समाजकारणात. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी पक्षाचं त्यांनी मनापासून काम केलं. राजकारणात त्यांची स्वतःची अगदी ठाम मतं होती. राजकारणात गेलं की माणूस निगरगट्ट होतो, हे त्यांच्या मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं होतं. म्हणूनच कोणतंही पद न घेता ते आनंदानं तिसऱ्या फळीत राहायचे. निवडणुकांदरम्यान ते गावोगाव फिरायचे. उत्तम भाषणं करून सभा जिंकण्यात तर त्यांना खूपच आनंद मिळायचा. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली. परंतु, बोफोर्स प्रकरणात अमिताभचं नाव गोवलं गेल्यानंतर त्याच्याविरूद्ध निवडणुकीत प्रचार करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक समाज, हमाल पंचायत चळवळ, शेतमजूर, देवदासी आदींसाठी त्यांनी मदत केली. नाटकांच्या प्रयोगामधून मिळणारं उत्पन्न ते सामाजिक कृतज्ञता निधीत जमा करायचे आणि पुढे त्याचा उपयोग त्यांनी समाजपयोगी कामांसाठीच केला.

निळूभाऊंनी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर हिंदी चित्रपटांमधूनही काही भूमिका केल्या. बहुसंख्य कलाकार आपल्यातल्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु, निळूभाऊ त्यालाही अपवाद ठरले. "मला हिंदी नीट बोलता येत नाही,' असं प्रांजळ कथन त्यांनी केलं होतं. तरीदेखील त्यांना भरपूर हिंदी चित्रपट मिळाले. परंतु, या ग्लॅमर दुनियेत ते फारसे रमले नाहीत. मुंबईतल्या जुहू किंवा लोखंडवालासारख्या आलिशान वस्तीत त्यांना राहणं सहज शक्‍य होतं. परंतु, त्यांनी शहरातला आपला बाडबिस्तारा आवरून निसर्गरम्य अशा ठिकाणी आपलं वास्तव्य केलं. ज्या माळीकामापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ते माळीकाम आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सुरू ठेवलं. लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही त्यांच्या डोक्‍यात कधी हवा गेली नाही. त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते. एखाद्या कार्यक्रमाला गेले की रिक्षातून उतरल्यानंतर स्वतः ते सहजतेनं पैसे देत. निळूभाऊ नट म्हणून मोठे होते की माणूस म्हणून हा प्रश्‍न अनेकांना पडला. अर्थात त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही.
- मंदार जोशी
-----------------
निळू फुले जीवनपट...
जन्म ः 1930
मृत्यू ः 13 जुलै 2009
उल्लेखनीय चित्रपट ः एक गाव बारा भानगडी, सामना, सोबती, चोरीचा मामला, सहकार सम्राट, सासुरवाशीण, पिंजरा, शापीत
उल्लेखनीय नाटके ः सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, बेबी
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः बागकाम
आवडते कलाकार ः नसिरुद्दीन शाह, ओमपुरी

Monday, July 4, 2011

कधी जात्यात; कधी सुपात

कधी जात्यात; कधी सुपात

यशाच्या कैफात धुंद होऊन विजेत्यांना डोक्‍यावर घेण्याची आणि अपयशाचं चक्र आलं की पराभूतांचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आजही आपल्याकडे कायम आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग आला. यावेळी बहुतेकांनी मराठी चित्रपटांच्या वाट्याला सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मराठी चित्रपटसृष्टीचं आता काही खरं नाही, असा टोकाचा सूरही लावला. काही दिवस जातायत न्‌ जातायत तोच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याची बातमी आली आणि याच मंडळींचा बोलण्याचा सूर पुन्हा बदलला. मराठी चित्रपटसृष्टीची ही सर्वाधिक चांगली "फेज' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लगोलग कलाकारांचे सत्कार होऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीबद्दल चर्चासत्रंही आयोजित होऊ लागली. त्यापुढे मजल मारत काही बालकलाकारांना घरं मिळवून देण्यासाठी "मीडिया'नं पुढाकार घेतला आणि काही नगरपालिकांनी कागदोपत्री घोडे नाचवत, तशी घरं मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. थोडक्‍यात, मराठी चित्रपटसृष्टी कधी जात्यात; तर कधी सुपात असते. एवढ्या टोकाचा भाबडेपणा आपल्याकडे सातत्यानं पाहायला मिळतोय आणि तोच आपल्या प्रगतीला मारक ठरतोय.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मिळविलेलं यश हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे; परंतु त्या यशाचं कौतुक करताना इतर गोष्टींचं अवमूल्यन होता कामा नये, याची काळजी आपण सध्या घेताना दिसत नाही. मल्याळी, कानडी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांमधील मक्तेदारी आपण मोडून काढल्याचा आपल्याला अभिमान वाटतो; मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मल्याळी चित्रपटात कोणता विषय मांडलाय, हे जाणून घेण्यासही आपण इच्छुक नसतो. चित्रपट माध्यमावर मनापासून प्रेम करणारी मंडळीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतरांनी काम चमक दाखविलीय, याकडे लक्ष देत नाहीत. अर्थात, सरकारी यंत्रणाही त्याला तेवढीच जबाबदार आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट आपल्याकडे चित्रपटगृहांमधून क्वचितच प्रदर्शित केले जातात. "टीआरपी'च्या मागं लागलेल्या वाहिन्यादेखील अशा चित्रपटांना भीक घालत नाहीत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे आपल्याला समजतच नाही.

मराठी चित्रपटांपुढची आता सर्वात मोठी समस्या आहे ती वितरणाची आणि प्रसिद्धीची. अजूनही आपल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्‍स आणि "सिंगल स्क्रीन' चित्रपटागृहांमध्ये चांगला वेळांचे "शोज' मिळत नाहीत; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्याचे आघाडीचे मराठीमधील अभिनेते आपला चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की राजकीय पक्षांना हाताशी धरतात. आपल्या चित्रपटाला कसे चांगले "शोज' मिळाले नाहीत, याबद्दल ते वातावरण गरम करतात. परंतु प्रदर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्ये आपला चित्रपट "बॉक्‍स ऑफिस'वर नरम पडला की पुढचा चित्रपट येईपर्यंत हे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक शांत बसतात. अशानं मराठी चित्रपट कसा काय पुढं जाणार? मराठी चित्रपटांच्या योग्य प्रदर्शन आणि वितरणासाठी ना राज्य सरकारवर दबाव टाकला जातो ना वितरक, प्रदर्शकांवर. त्यामुळे चांगला चित्रपट असूनही त्याला योग्य वेळेचे "शोज' मिळत नसल्याची खंत आपल्याला प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. काही राजकीय पक्षांनी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत, असं म्हणतात; परंतु या प्रयत्नांचा वरील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपयोग झाल्याचं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले काही मराठी चित्रपट अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची वाट पाहताहेत. अशा चित्रपटांवर पुरस्कारांबरोबरच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्या दिवसाची आता आपण वाट पाहायला हवी.

Tuesday, June 28, 2011


पौर्णिमेतलं शीतल चंद्रबिंब
----------
दिवंगत चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचं आयुष्य म्हणजे पौर्णिमेतल्या शीतल चंद्रासारखं होतं. आपल्या चित्रकला-अभिनय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीच्या शीतल छायेनं तब्बल आठ दशकं रसिकांना न्हाऊ घातलं. अर्थात चंद्राप्रमाणे ते परप्रकाशी नव्हते. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि कलासृष्टी तर उजळवून टाकलीत. त्याशिवाय त्यांच्या सान्निध्यात जी जी माणसं आली, त्यांचं आयुष्यही उजवळून टाकण्यात ते यशस्वी ठरले.

काय योगायोग आहे पाहा. कोल्हापुरातल्या शनिवार पेठेतल्या ज्या मातीच्या घरात चंद्रकांत यांचा जन्म झाला, ते घरदेखील चंद्रमौळी होतं. त्यांचं मूळ नाव गोपाळ मांडरे. चित्रकला आणि अभिनय त्याच्या रक्तातच होता. शाळेच्या दिवसांमध्ये हा गोपाळ खेडूत, वैदू, वासुदेवाच्या नकला करायचा. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे मॅट्रिकच्या पुढे काही त्याला जाता आलं नाही. हे दिवस प्रेमात पडण्याचे. गोपाळ या काळात प्रेमात पडला तो तालमीतल्या लाल मातीच्या. व्यायाम करून त्यानं शरीर कमावलं. तेच पुढं आयुष्यभर त्याच्या कामी आलं. गोपाळच्या वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त गोपाळचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या "गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. गोपाळच्या वडिलांमुळेच त्याला बाबूराव पेंटर आणि बाबा गजबर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली. बाबा गजबरांकडे गोपाळनं सुरुवातीला चित्रकलेचे धडे घेतले. 1931-32मध्ये सांगलीत "बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम गोपाळला मिळालं. पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे गोपाळची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या मा. दीनानाथांनी गोपाळचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं.

विसाव्या वर्षी गोपाळला पोस्टर विभागातून बाहेर आणलं ते बाबूराव पेंटरांनी. त्याच्या डोक्‍यावरचा भरगच्च केशसंभार त्यांनी उतरवला आणि झिरो कट मारला. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील गोपाळ यांचा अभिनय. गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.

"जयमल्हार' चित्रपटातल्या भूमिकेसाठी बैलाच्या देखभालीपासून गाडी जुंपण्यापर्यंत सगळं काही ते शिकले. "थोरांताची कमळा' या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही. शांताराम यांनी "शेजारी' चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्‍टिस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. "छत्रपती शिवाजी' चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौड करायला लावली. त्यामुळे या चित्रपटातील चंद्रकांत यांचा शिवाजी ताठ कण्याचा आणि रूबाबदार वाटतो. डमी वापरण्यात कमीपणा वाटत असल्यामुळे धाडसाची कामं त्यांनी स्वतःच केली.

व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्‍यावर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगडवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट

चंद्रकांत नुसता अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. "भरतभेट' चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता. मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. दादा गुंजाळ, दादासाहेब तोरणे, मा. विनायक, अंबपकर, शोभना समर्थ, लीलाबाई, रत्नमाला, सुलोचना, उषा मंत्री, कमला कोटणीस... अशा विविध मान्यवर कलावंतांचा सहवास त्यांना लाभला. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही. निसर्ग हाच श्‍वास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली.

चंद्रकांत नेहमी म्हणायचे, "आपण जन्माला येताना काही घेऊन येत नाही, मरताना काही घेऊन जात नाही. जगताना लोकांसाठी, समाजासाठी करतो तीच आपली कमाई.' हे तत्त्वज्ञान चंद्रकांत अक्षरशः जगले. स्वतः चित्रीत केलेली 350 ते 400 चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी 1984 मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत 30 लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे "चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया'ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो. चित्रकलेल्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्‍मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला. कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं.

आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी "राम-लक्ष्मण' नावानं ओळखली जायची. सूर्यकांत यांचं आपल्या आधी निधन झाल्याचा चंद्रकांतना खूप मोठा धक्का बसला होता. "आयुष्यभर आम्ही राम-लक्ष्मणाप्रमाणे राहिलो. मला कमीपणा येईल, असे तो आयुष्यात कधी वागला नाही. पण रामाच्या आधी लक्ष्मणाने निघून जावे, हा कुठल्या नशिबाचा खेळ म्हणायचा?' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत यांनी व्यक्त केली होती. आयुष्यभर पैशाचा विचार न करता चांगल्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. त्या वेळी न मिळालेले पैसे त्यांना पुढे विविध पुरस्कारांच्या रुपाने मिळाले. स्वच्छ मनानं, निष्ठेनं केलेल्या कामाचं फळ निश्‍चित मिळतं, यावर त्यांचा विश्वास होता. हाच विश्वास या कलावंताला सदैव रसिकांच्या हृदयात घर करून देण्यास कारणीभूत ठरला.

-----------------
चंद्रकांत मांडरे जीवनपट...
जन्म ः 13 ऑगस्ट 1913
मृत्यू ः 17 फेब्रुवारी 2001
कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1936
उल्लेखनीय चित्रपट ः युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
भाग्योदय ठरलेला चित्रपट ः सावकारी पाश
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः चित्रकला
आवडता खाद्यपदार्थ ः कोल्हापुरी मटण
आवडता चित्रपट ः सावकारी पाश
अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाची उभारणी.


- मंदार जोशी

Saturday, June 18, 2011

रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय...


रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय...
----------
चित्रपटसृष्टी ही अस्सल कलावंतांची खाण असल्याचं म्हटलं जातं. बहुतांशी ते खरंही आहे. परंतु, या खाणीतील हिऱ्यांचा देखणेपणा आणि रुबाबदारपणाबद्दल आपल्याकडे बऱ्याचदा चर्चा होते. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता.
लहान अरुणच्या घरातच कला होती. अरुणचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग अरुणला या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुणनं पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. संगीताची हीच आवड अरुणला कलाक्षेत्रातील दारं उघडण्यास उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यानं पदवीही मिळवली. तसेच थेट कलाक्षेत्रात उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिलं. परंतु, तिथं त्याचा जीव काही रमला नाही. याच सुमारास मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्‍यात "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुणनं साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुणचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं. परंतु, मातीत पडलेलं सोनं फार काळ दृष्टीभेद करू शकत नाही. या सोन्यावर प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांची नजर गेली आणि त्यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुणला एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा "वरदक्षिणा' आणि दत्ता धर्माधिकारी यांचा "विठू माझा लेकुरवाळा' हा चित्रपटही अरुणला मिळाला. परंतु, हे तिन्ही चित्रपट फार काही मोठं यश मिळवू शकले नाहीत. एक देखणा, रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार, अशी भीतीही निर्माण झाली. परंतु, त्यानंतर आलेल्या "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुणचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलो
अर' मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं.
प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसविणं सहजासहजी शक्‍य नसतं. कारण, त्याच्यापुढे त्या काळातील मोठमोठी आव्हानं उभी असतात. सरनाईकांचा अरुणोदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यासारख्या अभिनेत्यांची कारकीर्द विशेष फॉर्मात होती. त्यामुळे सरनाईकांची डाळ शिजणं हे थोडं कठीण काम होतं. परंतु, बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला. त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता. "पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन'मधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकीर्दीमध्ये सरताज ठरली. मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्‍यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कद
म. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्‍वगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. सरनाईकांचं अभिनयातील कर्तृत्व पाहता ते हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांना ताकदीच्या भूमिका मिळायल्या हव्या होत्या. परंतु, मराठी चित्रपट आणि नाटकांमधील व्यस्ततेमुळे ही संधी काही त्यांना मिळाली नाही. अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेला छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथं खऱ्या अर्थानं ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळं, खाऊ देताना त्यांचा चेहरा आनंदानं ओसंडून वाहायचा.
सुमारे साडे तीन दशकांच्या कारकीर्दीत सर्व काही मिळवल्यानंतर सरनाईकांना वेध लागले होते ते निवृत्तीचे. शक्‍यतो कलाकार कधीच निवृत्त होत नसतो. मात्र, इतरांपासून वेगळा असणारा हा कलाकार गावी जाऊन शेती करण्याचे मनसुबे बांधत होता. आयुष्यभर धावपळ, दगदग झाल्यानंतर गावी घर बांधून तिथं थोडी विश्रांती घेण्याचाही त्यांचा विचार होता. परंतु, तो नियतीला काही मंजूर नव्हता. 21 जून 1984च्या पहाटे "पंढरीची वारी' या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून कोल्हापूर-पुणे असा आपल्या कुटुंबियांसमवेत प्रवास करीत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि हा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यावेळी सरनाईकांचं वय पन्नाशीच्या आसपास होतं. वयानं आणखी काही वर्षं साथ दिली असती तर कदाचित या कलावंताकडून आणखी काही उत्कृष्ट कलाकृती आपल्याला पाहायल्या मिळाल्या असत्या.

----------
अरुण सरनाईक जीवनपट...
जन्म ः 4 ऑक्‍टोबर 1935
ृत्यू ः 21 जून 1984
कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1956
उल्लेखनीय चित्रपट ः रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, सिंहासन, मुंबईचा जावई, घरकुल
उल्लेखनीय नाटके ः अपराध मीच केला, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गोष्ट जन्मांतरीची, गुडबाय डॉक्‍टर, लवंगी मिरची कोल्हापूरची
भाग्योदय ठरलेला चित्रपट ः रंगल्या रात्री अशा
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः तबलावादन, पेटीवादन, गायन.
अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः "आनंदग्राम' या संस्थेत कुष्ठरुग्णांची सेवा.
-----------
- मंदार जोशी

Monday, May 23, 2011

लालफितीत अडकला "शो मन'


लालफितीत अडकला "शो मन'
---------
तब्बल 35 वर्षांची निर्माता-दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द आणि "व्हिसलिंग वूडस्‌'नं जागतिक स्तरावर मिळवलेली ख्याती या दोन गोष्टी सुभाष घईंचं मनोरंजन क्षेत्रामधील मोठेपण सिद्ध करणारी आहेत. "क्‍लास'-"मास'च्या आवडीची नाडी जाणणारा आणि राज कपूर यांच्यानंतर "शो मन' ही पदवी मिळविणारा हा दिग्गज दिग्दर्शक सध्या मात्र काही कारणांमुळे अडचणीत सापडलाय. ही कारणं आणि आपल्या कारकिर्दीबद्दल घई यांनी प्रथमच परखडपणे केलेली ही चर्चा.
-------------
मुलाखतीचा पहिलाच प्रश्‍न ऐकून समोरच्याची कळी खुलावी, असं खूप कमी वेळा घडतं. पण ज्यावेळी असं घडतं तेव्हा मग मुलाखतकाराच्या वाट्याला जबरदस्त असं काहीसं येतं. सुभाष घईंशी संवाद साधताना असंच काहीसं घडलं आणि घईंच्या मनात ठसठसत असलेलं दुःख पहिल्यांदाच तीव्र स्वरूपात बाहेर पडलं. "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बॉलीवूडमध्ये मिळालेल्या चांगल्या संधी आणि या संस्थेत विदेशी विद्यार्थ्यांचा वाढत असलेला ओघ याबाबत घईंना बोलतं करायचं होतं. त्यानिमित्तानं सात वर्षांपूर्वी या संस्थेच्या पायाभरणीच्या वेळी मनात असलेल्या योजना आणि प्रत्यक्षात साकारलेलं या योजनांचं रूप आशादायी आहे का ? हा प्रश्‍न ऐकून सुभाषजी खुलले आणि त्यांच्या मनातील दुःख "नॉनस्टॉप' बाहेर पडायला सुरुवात झाली.
"" "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये राज्य सरकारची जमीन लाटून सुभाष घईंनी स्टुडिओद्वारे फक्त आपलं हित साधलं, अशाप्रकारचं जे काही जनमत तयार केलं गेलं, ते मला प्रचंड खुपणारं आहे. असे आरोप ऐकले की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण, कोणाची जमीन लाटून पैसे कमवावे, ही माझी वृत्ती नाही. मी आजवर अनेक नवोदितांना माझ्या चित्रपटातून संधी दिली. पण, मुंबईत कामासाठी येणाऱ्यांचा ओघ खूप मोठा आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाची अशी तक्रार असायची की आम्ही फिल्मवाल्यांची मुलं नसल्यामुळे आम्हांला इथं संधी मिळत नाही. ही गोष्ट मला बोचली. कलाक्षेत्रात काहीतरी करण्याच्या इच्छेनं अनेक जण मुंबईत येतात आणि त्यानंतर ते "गुमराह' होतात. त्यांना योग्य रस्ता दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय तोडीची संस्था मला उभारायची होती. त्यामुळे 1993 मध्ये चित्रपट माध्यमाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं मी स्वप्न पाहिलं. परंतु, सरकारच्या पातळीवर त्याची दखल घेण्यासाठी पुढं आणखी दहा एक वर्षं गेली आणि या संस्थेची पायाभरणी झाली ती 2004मध्ये. ही संस्था उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोरेगावच्या फाळके चित्रनगरीचे तेव्हाचे संचालक गोविंद स्वरूप यांनी पुढाकार घेतला. सरकारशी मैत्री करणंही अनेकदा धोक्‍याचं असतं, हे मला ठाऊक होतं. परंतु, स्वरूप यांच्या आग्रहामुळे चित्रनगरीत चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. यावेळी सरकारच्या जमिनीवर शैक्षणिक संस्था उभारणे आणि या संस्थेच्या विकासासाठी स्टुडिओ चालवण्याचा आम्ही करार केला. या मध्ये ही जमीन आमच्या संस्थेला विकण्यात आली, हा कुठेही उल्लेख नव्हता किंवा तसा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. प्रारंभीच्या करारानुसार एकूण 20 कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. त्यापैकी 17 कोटी माझ्या संस्थेतर्फे भरले गेले आण
ि उरलेले तीन कोटी राज्य सरकारने भरावेत, असं ठरलं. अर्थात ती रक्कमही नंतर आमच्याच संस्थेनं भरली. सर्व काही ठरलं. भूमिपूजन झालं आणि इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेतील मुद्यांवर सरकारतर्फे व्यवस्थित उत्तरे द्यायला हवी होती. राज्य सरकारच्या जमिनीचा वापर एका चांगल्या शैक्षणिक संस्थेसाठी होणार आहे, हे न्यायालयासमोर आणायला हवं होतं. मात्र तसं घडलं नाही आणि तब्बल सात वर्षं या शैक्षणिक संस्थेची प्रगती रोखली गेली. ही संस्था प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी देश-विदेशातील तब्बल 42 संस्थांना भेटी देऊन तेथील कार्यभार पाहिला आणि प्रत्येकातील चांगल्या गोष्टी हेरून त्यांचा अंतर्भाव आमच्या संस्थेत केला.''
गेल्या काही वर्षांपासून घईंचा राज्य सरकारबरोबर सातत्यानं विविध माध्यमांद्वारे संवाद सुरू आहे. परंतु, त्यातून काहीच मार्ग निघालेला नाही. मंत्री, शासकीय अधिकारी फकत गोड गोड बोलतात आणि नवनवीन आश्‍वासनं देतात. परंतु, कृतीची वेळ आली की पाठ फिरवतात असा विदारक अनुभवही घई व्यक्त करतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीची वेळ मागून आता बरेच महिने झाले आहेत; परंतु त्यांनाही याबाबत मला भेटावंसं वाटत नाही, यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही, हे स्पष्ट करून घई पुढं म्हणतात, ""या संस्थेच्या उभारणीसाठी आता जवळपास 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. मुलांच्या "फी'मधून उत्पन्न मिळत असले तरी ते एवढ्या मोठ्या "स्केल'वरची संस्था चालविण्यास अपुरे आहे. सुरुवातीला 20 एकर जमिनीवर ही संस्था विकसित करायची असं ठरलं असतानाही अवघ्या चार एकर जागेवरच आम्हांला समाधान मानावं लागलं आहे. दरवर्षी आमच्या "बॅलन्स शीट'मध्ये सहा कोटींचा तोटा आढळत आहे. "मुक्ता आर्टस्‌'द्वारे चित्रपट निर्मिती करून तेथून मिळालेला पैसा या संस्थेच्या उभारण्यासाठी आम्ही वापरत आहोत. परंतु राज्य सरकारनं एकंदरीत आम्हांला पांढऱ्या हत्तीवर बसवून आता या प्रकरणात हात वर करण्याची भूमिका घेतली आहे. एवढी मोठी गुंतवणूक केल्यामुळे मला आता दुसरीकडे जाणंही शक्‍य नाही. परंतु, आणखी किती काळ वाट पाहायची यालाही काही मर्यादा आहेत. आता आमच्या अगदी नाकातोंडाशी पाणी आलंय. जीव गुदरमला जातोय. सरकारची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत, त्याला आम्ही कसे काय जबाबदार असू शकतो ? या प्रकल्पामध्ये राज्य सरकार आमचे भागीदार असल्यामुळे मी इतकी वर्षं गप्प राहिलो होतो. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळेच पुढील काही महिन्यांमध्ये याचा निर्णय न लागल्यास नाईलाजास्तव मला राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल. एक
ीकडे मनोरंजन विश्‍वासाठी बरंच काही करण्याच्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे आशियातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक मनोरंजन शिक्षण संस्थेच्या कामात अडथळे आणले जातात, हे काही योग्य नाही.''
एवढ्या सगळ्या विपरीत गोष्टी घडत असतानाही संस्थेच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घईंनी या काळात घेतली. या संस्थेत सध्या 400 मुलं प्रशिक्षण घेत असून त्यापैकी 70 मुलं ही युरोपीय देशांमधील आहेत. इथून बाहेर पडलेल्या 70 टक्के विद्यार्थ्यांना ग्लॅमर जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी या संस्थेत अध्यापनाचं काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घईंनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना फारसं यश मिळालेलं नाही. या अपयशाचं विश्‍लेषण करताना घई म्हणतात, ""आपलं मन स्थिर असेल तर आपल्या हातून चांगलं काम घडतं. एवढ्या विचित्र मनोवस्थेत चित्रपट दिग्दर्शित करणं खरोखरच शक्‍य नाही. "व्हिसलिंग वूडस्‌'च्या उभारणी प्रक्रियेत जे अडथळे आले त्याचा निश्‍चितच माझ्या "क्रिएटिव्हिटी'वर परिणाम झालाय. परंतु, एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यांमधला मी नाही. काहींना वाटतंय की, दिग्दर्शनाचा माझा फॉर्मच हरवलाय. परंतु, मला त्यात काही तथ्य वाटत नाही. दिवसातले 16 तास मी कार्यरत आहे. गेल्या चार दशकांमध्ये मी निर्मिलेल्या 18पैकी 14 चित्रपटांना यश आलंय. हा "रेशो' नक्कीच चांगला आहे. अपयशाला मी घाबरत नाही. कारण, कोणत्याही दिग्दर्शकाला प्रयोग हे करावेच लागतात. काही लोकांना असं वाटतंय की, घईंच्या स्टाईलचा सिनेमा आता "आऊटडेटेड' झालाय. परंतु, त्याच्याशीही मी सहमत नाही. कारण हे जर खरं मानायचं ठरवलं तर "दबंग'सारखा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला नसता. हा सिनेमा माझ्या "स्टाईल'शी अगदी मिळताजुळता आहे. खुद्द सलमाननं मला या चित्रपटाच्या "मेकिंग'दरम्यान ""हम "राम लखन' पॅटर्न की फिल्म बना रहे है ।' असं सांगितलं होतं. या चित्रपटाच्या यशामुळे माझा विश्‍वास वाढलाय. लवकरच माझं दिग्दर्शन असलेल्या नवीन चित्रपटाची मी घोषणा करीन. एकीकडे निव्वळ मनोरंज
न चित्रपटांची निर्मिती सुरू असताना काही वेगळ्या आशयघन चित्रपटांनाही आम्ही प्राधान्य दिलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जन्मतिथीचं निमित्त साधून आम्ही एक बंगाली चित्रपट "कश्‍मकश' या नावानं हिंदीत डब केलाय. मराठीतही खूप चांगलं साहित्य आहे, ज्याचा सिनेमा होऊ शकतो. त्यावरदेखील आमचं काम सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आमच्यासोबत पुढील कलाकृती करणार आहेत. ज्या लेखक-दिग्दर्शकांकडे खूप चांगल्या कल्पना आहेत, तेदेखील आमच्याशी संपर्क साधू शकतात.
- मंदार जोशी

Monday, May 16, 2011

अमोल गुप्तेंचा नवा डबा



"तारे जमीं पर'चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक अमोल गुप्ते तब्बल साडे तीन वर्षांनी "स्टॅन्ली का डब्बा' या चित्रपटाद्वारे आपला दुसरा डबा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. मनोरंजन आणि सामाजिक संदेशाचं आपलं धोरण त्यांनी या चित्रपटातही कायम ठेवलंय. या डब्यातील खाऊ आणि तो बनविताना घेतलेल्या कष्टांबद्दल अमोल गुप्ते यांच्याशी केलेली ही चर्चा.
------------
एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की मुलाखतींच्या निमित्तानं निर्माता-दिग्दर्शकांच्या भेटी होतच राहतात. मात्र, चित्रपटाचं भवितव्य एकदा स्पष्ट झालं की पुढच्या कलाकृतीपर्यंत तो दिग्दर्शक पुन्हा काही भेटत नाही. परंतु, काही दिग्दर्शक पहिल्याच भेटीत आपल्या मनावर ठसतात आणि मग त्यांच्या अनौपचारिक भेटी सुरू राहतात. अशा भेटींचा आनंद ज्या काही मोजक्‍या दिग्दर्शकांनी दिलाय त्यापैकी एक म्हणजे अमोल गुप्ते. "तारे जमीं पर' प्रदर्शित झाल्यापासून अमोल गुप्ते यांच्याशी नियमित संपर्कात राहण्याची संधी मला मिळालीय. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये या कलावंताला भेटल्यानंतर प्रत्येक वेळी चित्रपट माध्यमाबाबत काहीतरी वेगळी माहिती, वेगळे संदर्भ ऐकायला मिळालेत. इतर व्यावसायिक दिग्दर्शकांप्रमाणे काही हातचं राखून बोलणाऱ्यांमधला हा दिग्दर्शक नाही. त्याचा प्रत्यय यावेळच्या भेटीतही आला. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वांद्रे इथल्या जुन्या ऑफिसमध्ये आमची भेट झाली. इथं कधी "शिफ्ट' झालात ? अशा सहज विचारलेल्या प्रश्‍नाचं त्यांनी सुभाष घई आणि करण जोहर यांची कृपा असं सहजपणे उत्तर दिलं. "करण जोहरनं काही कामानिमित्त घईंचं ऑफिस भाड्यानं घेतलं आणि आपलं काम संपल्यानंतर त्यानं मला इथं "स्टॅन्ली का डब्बा'चं काम करू दिलं. पहिल्या काही महिन्यांचं भाडं स्वतः करणनं भरलं आणि नंतरच्या महिन्यांचं भाडं घईंनी मागितलेलं नाही,' अमोल गुप्ते मनमोकळेपणे ही माहिती देतात आणि "स्टॅन्ली का डब्बा'च्या अंतरंगात डोकावण्यापूर्वी किती जणांची आपल्याला मदत मिळालीय, याचा नेमका उल्लेख करतात.

"स्टॅन्ली का डब्बा' याचा विषय आणि शीर्षकाबद्दल वेगळी माहिती देताना गुप्ते म्हणतात, ""अंधेरीतील होली फॅमिली हायस्कूलमध्ये मी दुसरी ते सातवीदरम्यान शिकायला होतो. या शाळेत मला स्टॅन्ली नावाचा मित्र भेटला. त्याच्याबरोबर माझी मैत्री होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा "फोर टायर'चा टिफीन डबा. त्यात फार काही वेगळे खाद्यपदार्थ नसायचे बरं. पण साधाच बटाट्याचा रस्सा आणि काही पुऱ्यांचा स्वाद असा असायचा की अख्खा वर्ग त्याच्या प्रेमात पडायचा. चार ठिकाणी दणके खाल्लेला तो साधा ऍल्युमिनीयमचा डबा होता. त्यानं कुठल्या माळ्यावरून तो काढला, हे मलादेखील माहित नाही. तो डबा माझ्या इतकी वर्षं लक्षात राहिला आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट बनविण्यात आला. शाळेचा खाऊचा डबा हा प्रत्येक मुलगा आणि आईचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आईचं प्रेम प्रत्येक डब्यातील खाद्यपदार्थात उतरलेलं असतं. आमचा "स्टॅन्ली का डब्बा'सुद्धा असाच प्रेमाचा डबा आहे. तो प्रेक्षकांनी खाल्ला तर तो त्यांना निश्‍चितच आवडेल. मुलं एकमेकांकरीता कशी उभी राहतात, हेदेखील या चित्रपटामधून पाहायला मिळेल.''

"तारे जमीं पर'च्या यशानंतर प्रेक्षक अमोल गुप्तेंकडून लगेचच एखाद्या नवीन कलाकृतीची अपेक्षा करीत होते. परंतु, ती कलाकृती पडद्यावर येण्यामध्ये साडे तीन वर्षांचा काळ लोटला. याबद्दल गुप्ते सांगतात, ""साधारण दोन वर्षांपूर्वीच मी "सपनों को गिनते गिनते' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार होतो. या चित्रपटाची गाणीही तयार झाली होती. परंतु, मध्यंतरी अशा काही अडचणी आल्या की हा चित्रपट काही पुढेच सरकेना आणि मग स्वतःबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल विचार करताना मला स्टॅन्लीचा विषय सुचला. परंतु, हा काही मी ठरवून केलेला चित्रपट नाही. सर्वप्रथम मुलांची कार्यशाळा घेण्याचं मी ठरवलं. त्यात जवळपास पाचशे मुलांनी भाग घेतला. या मुलांचा वेळ मिळवण्यासाठी मी होली फॅमिली शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कपूर यांना भेटलो. दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कार्यशाळा घेण्याचं ठरलं. खाऊचा एक डबा मुलांनी आणावा आणि एक डबा माझ्याकडून देण्याचं मी सुचवलं आणि आमची कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळेच्या चार तासांपैकी एक तास डबा वाटण्यात आणि खाण्यात जायचा. उरलेल्या वेळात जे काही चित्रीत करता येईल तेवढं आम्ही केलं. असं करता करता दीड वर्षं गेलं आणि हा डबा तयार झाला. शूटिंगच्या वेळी आम्ही कसल्याही प्रकारचा तामझाम केलेला नाही. स्पॉटबॉय, मोठमोठे लाईट्‌स आणि प्रॉडक्‍शन मॅनेजरशिवाय हा चित्रपट बनलाय. आमचा छायालेखक अमोल गोळेनं खूप चांगलं काम केलंय. सत्तरचा कॅमेरा वापरून त्यानं हा चित्रपट शूट केलाय. मालिका, जाहिराती आणि चित्रपटांमध्ये लहान मुलांना दहा-बारा तास राबविलं जातं. तसं आम्ही या चित्रपटाबाबत घडू दिलेलं नाही. चार तासांच्या वर आमची कार्यशाळा कधी चालली नाही. आमच्या या चित्रपटात 500 मुलं आहेत. परंतु, शूटिंगमुळे एकाही मुलाची कधी शाळा बुडली नाही.''

"तारे जमीं पर'मध्ये आमिर खानसारखा मोठा स्टार होता. "स्टॅन्ली...'साठी एखाद्या नामांकीत स्टारचा विचार नाही केलात का, या प्रश्‍नावर गुप्ते म्हणाले, ""काय वाट्टेल ते झालं तरी चित्रपट करायचा, या इराद्यानं हा चित्रपट बनलेला नाही. एका छोट्या कार्यशाळेच्या माध्यमातून हा चित्रपट घडलाय. सलग दीड वर्ष शनिवारचे चार तास देणारे स्टार कलाकार आज आहेत का ? याचं निश्‍चित उत्तर नाही असंच आहे. कारण, हल्ली प्रत्येक स्टार आपल्या फायद्याचा विचार करतो. मात्र, तशा फायद्याची खात्री "स्टॅन्ली का डब्बा'द्वारे देण्याच्या स्थितीत तेव्हा तरी मी नव्हतो. त्यामुळे जे काही मित्र माझ्याबरोबर आले त्यांना सोबत घेऊन मी पुढं गेलो. दिव्या दत्ता, राजेशनाथ झुत्शी, अपूर्वा लाखिया... यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. संगीताच्या आघाडीवरही मला सुखविंदर, शंकर महादेवन, विशाल दादलानी यांची मदत झाली. या सर्वांना मी फक्त एक फोन केला आणि कसल्याही मानधनाशिवाय ते माझ्याकडे गायले. शंकरनं मला मानधन म्हणून हंडीभर मटण शिजविण्यास सांगितलं. असं प्रेम पाहायला मिळालं की खरंच आपण करीत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं. या चित्रपटाला संगीत दिलंय ते हितेश सोनिकनं. तो पूर्वी विशाल भारद्वाजचा मदत करायचा. मी लिहिलेल्या शब्दांचं वजन अचूक ओळखून त्यानं काम केलंय.''

या चित्रपटाच्या निर्मितीत गुप्तेंना सर्वाधिक मदत मिळाली ती त्यांची पत्नी दीपा भाटिया आणि मुलगा पार्थो यांच्याकडून. "स्टॅनली'ची मुख्य व्यक्तिरेखा पार्थोनंच साकारली आहे आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी करताहेत. हा विषय गुप्तेंकडे काढला असता ते शिताफीनं आपल्या मुलावरचा "फोकस' दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात आणि हसत ते म्हणतात, ""माझ्या कोणत्या मुलाबद्दल तुम्ही विचारताय ? स्टॅन्लीसारखीच आणखी 170 मुलं या चित्रपटात आहेत. "तारे जमीं पर'मधला दर्शिल सफारीसुद्धा माझाच मुलगा आहे. सगळेच माझ्याकडे खूप छान काम करतात. दीपाबद्दल विचाराल तर मी सांगेन की, ज्या वेळी मी कार्यशाळा घेत होतो, त्यावेळी ती "माय नेम इज खान' आणि "वुई आर फॅमिली'च्या संकलनात व्यस्त होती. या चित्रपटाचं काम संपल्यानंतर तिनं आम्ही केलेलं फुटेज "एडिट लाईन'वर घेतलं. तब्बल महिनाभर तिनं हे आमचं फुटेज व्यवस्थित पाहिलं आणि त्यात एक धमाल चित्रपट दडल्याचं तिलाही कळलं आणि अशाप्रकारे हा चित्रपट बनला. तो आता "फॉक्‍स स्टार'द्वारे प्रदर्शित होतोय. या संस्थेच्या पाठिंब्यामुळे आमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचेल, याची मला खात्री आहे. तरीपण या काळात विशाल भारद्वाज, करण जोहर या माझ्या मित्रांनी केलेलं सहकार्य मी विसरू शकणार नाही. करणच्या "एडिटिंग मशीन'वर हा चित्रपट संकलित झालाय. हा चित्रपट "फॉक्‍स'नं प्रदर्शित करावा यासाठी करणनंच पुढाकार घेतला. "तुझा चित्रपट कोणी नाही घेतला तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन,' असं आश्‍वासन विशालनं दिलं होतं. "तू एक छान बाळाला जन्म दिला आहेस. त्याचा आदर ठेव. कोणाचाही तू ऋणी होऊ नकोस. कारण "फॉक्‍स'ला तू जे दिलं आहेस आणि त्यांच्याकडून तुला जे मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू दिलेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे.''
"स्टॅन्ली का डब्बा'मध्ये अमोल गुप्तेंनी "खडूस' असं नाव असलेल्या शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारलीय. या चित्रपटापाठोपाठ "भेजा फ्राय 2' आणि संतोष सिवन दिग्दर्शित "उर्मी'मध्येही गुप्तेंच्या अभिनयातील कौशल्य पाहायला मिळणार आहे. "उर्मी' हा मल्याळम चित्रपट असून तो हिंदीत डब झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.
- मंदार जोशी

Monday, May 9, 2011

एका ध्यासाचा प्रवास...


एका ध्यासाचा प्रवास...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक, प्रॉडक्‍शन डिझायनर आणि निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांनी "बालगंधर्व' या भव्यदिव्य चित्रपटाचं नऊ महिन्यांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जातंय. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट भारतात आणि त्यानंतर विदेशातही प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला हा सर्वाधिक "बजेट' असलेला चित्रपट. तब्बल सहा कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाशी नितीन देसाईंव्यतिरिक्त नीता लुल्ला, विक्रम गायकवाड, रवी दिवाण, महेश लिमये, रवी जाधव, सुबोध भावे, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे अशी मोठी नावं जोडली आहेत. मराठी चित्रपट निर्मितीच्या साऱ्या चौकटी भेदून एक विलक्षण जिद्द, ध्यास, तळमळ आणि प्रचंड मेहनतीनं हा चित्रपट बनविला गेलाय. त्याचीच ही कहाणी.
-----------
विख्यात गायक-नायक बालगंधर्वांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, हे व्यक्तिमत्त्व ज्या "स्केल'द्वारे चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे, ते अपूर्व
म्हणावं लागेल. मराठी चित्रपट म्हटलं की काही निश्‍चित ठोकताळे आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु, हा चित्रपट साकारताना देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व "बाऊंड्रीज' पार केल्या आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवायचाय, या हेतूनं झपाटून जात चित्रपट पूर्ण केला. सर्वसाधारणपणे निर्मात्याला कथा ऐकविली की एक तर निर्मितीचा निर्णय त्वरीत घेतला जात नाही किंवा निर्मितीचं "बजेट' अधिकाधिक कमी कसं करता येईल, यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु, हा चित्रपट सुरूच झाला एका ध्यासानं. आजचा जमाना आहे एमटीव्ही, पॉप म्युझिकचा. या जमान्यातील तरुण पिढीच्या गळी शंभर वर्षांपूर्वीचं गाणं आणि घटनाक्रम उतरवणं, हे खरं तर सर्वात मोठं "चॅलेंज' होतं. परंतु, ते "चॅलेंज' अभिनेता सुबोध भावे आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर यांनी ठेवलं आणि ते काही मिनिटांमध्ये नितीन देसाईंनी स्वीकारलं आणि सुरू झालं एका विलक्षण चित्रपटनिर्मितीचं ध्यासपर्व !

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांची संख्या वाढली; परंतु गुणवत्तेचा विचार करायचा झाल्यास अगदी मोजक्‍या चित्रपटांचीच नावं घेता येतील. त्यामागचं कारण म्हणजे नियोजन, कल्पकतेचा अभाव. "बालगंधर्व'ची निर्मिती सुरू होण्यापूर्वी नियोजनावर मोठा भर दिला गेला आणि त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी येत गेलं. आपल्याकडे असे अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होतात की, प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं नाव ठाऊक होतं. परंतु, "बालगंधर्व' मुहूर्ताच्या आधीपासून ते त्याच्या संगीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होईपर्यंतच्या काळात विलक्षण चर्चेत राहिला. करायचं ते दणक्‍यात, हा नितीन देसाईंचा खाक्‍या. तो या चित्रपटाच्या मुहूर्तापासून पाहायला मिळाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात या चित्रपटाच्या "लॉंचिंग'चा जो भव्यदिव्य कार्यक्रम झाला, तो कायम लक्षात राहणारा ठरला. ऐतिहासिक चित्रपट साकारताना लेखक-निर्माता-दिग्दर्शकांनं केलेल्या अभ्यासाला, आपल्या कलाकृतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संदर्भांना, संशोधनाला खूप महत्त्व असतं. हे संदर्भ सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी अनेकांच्या भेटी घ्याव्या लागतात. अशा वेळी थोडी पूर्वपुण्याईदेखील कामाला यावी लागते. ते सर्व या चित्रपटाबाबत जुळून आलं.

या चित्रपटाच्या संशोधनासाठी अविरत प्रयत्न झाले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, वेशभूषाकारापासून ते चित्रपटामधील सर्व कलावंतांनी आपापल्या परीनं बालगंधर्व आणि त्यांच्या काळाबद्दल जी काही माहिती मिळाली, तिचा चित्रपटासाठी काही उपयोग होईल का, याचा विचार केला. बालगंधर्वांना पाहिलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेली जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यांचा शोध घेतला गेला. त्यांच्या दीर्घमुलाखती ध्वनिमुद्रित झाल्या. त्यांच्याकडील बालगंधर्वांचा ठेवा चित्रपटासाठी विनम्रपणे मागण्यात आला आणि शूटिंग झाल्यानंतर तो आस्थेपूर्वक परतही करण्यात आला. ज्याच्याकडे जे जे चांगलं मिळेल, ते ते घेऊन पटकथेची एक सुंदर लड गुंफण्यात आली. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेला बालगंधर्वांचा सहवास जाणून घेत त्यानुसार कथानकातील नाट्यनिर्मिती आणखी टोकदार करण्यात आली. रंगभूमीवर अदाकारी साकारीत असताना आपल्या रुपाकडे थोडंही दुर्लक्ष होऊ न देण्यासाठी बालगंधर्वांनी विंगेत आरशांची केलेली व्यवस्था, ही बाबासाहेबांनी सांगितलेली खास आठवण. या आठवणीला चित्रपटात नुसतंच स्थान मिळालेलं नाहीय तर कथानक त्यामुळे आणखी रंगतदार होईल, याची काळजी घेतली गेलीय. असे बरेच प्रसंग या चित्रपटात आहेत.

अवघ्या 33 दिवसांमध्ये हा चित्रपट पूर्ण झाला. तो काळ मंतरलेला होता, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या "टीम'शी जोडलेला प्रत्येक कलावंत-तंत्रज्ञ सांगतो. पुणे, भोर, कोल्हापूर या भागात हा चित्रपट चित्रीत झालाय. सकाळी सात ते मध्यरात्री 1-2 वाजेपर्यंतही बऱ्याचदा शूटिंग चालायचं. पण कोणाकडूनही कधी या काळात आपण थकल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही. नितीन देसाईंना या 33 दिवसांमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल, त्यांना निश्‍चितच या माणसाची "पॅशन' भावली असणार. एखाद्या युद्धात राजाची मैदानावरील थेट उपस्थिती सैनिकांसाठी उत्साहवर्धक असते. इथं तर नितीन देसाईंच्या रुपातला राजा अक्षरशः चौफेर चढाई करीत होता. या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखेला खूप महत्त्व आहे. या व्यक्तिरेखेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाल्यानंतर कोणीतरी नितीन देसाईंनाच ही भूमिका करण्याचा सल्ला दिला. वास्तविक तेच या चित्रपटाचे निर्माते असल्यानं ही भूमिका साकारण्याचा निर्णय त्यांना क्षणभरात घेता आला असता. परंतु, तसं न करता त्यांनी या मिनिटभराच्या भूमिकेसाठी आधी "स्क्रीन टेस्ट' दिली. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून टक्कल केलं. एखाद्या कलाकृतीसाठी सर्वस्व देणं म्हणजे नेमकं काय असतं, हे नितीन देसाईंशी या चित्रपटाबद्दल चर्चा केल्यानंतर अगदी छान समजतं.

बालगंधर्वांचं व्यक्तिमत्त्व एवढं जबरदस्त आहे की, त्यातलं काय पडद्यावर दाखवावं आणि काय नाही, असा प्रश्‍न "बालगंधर्व टीम'ला पडला होता. सर्वच गोष्टी दाखवायच्या म्हटलं तरी चित्रपटाची लांबी साडे तीन-चार तासांपर्यंत गेली असती. परंतु, आजच्या काळातील प्रेक्षकाची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन चित्रपटाची लांबी कोणत्याही स्थितीत दोन तासांच्या वर जाऊ न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही दृश्‍यांना कात्री लावावी लागली. बालगंधर्वांचे मायबाप म्हणजे रसिकप्रेक्षक. त्याच्या सेवेत खंड पडू न देण्याचा त्यांचा विडा शंभर वर्षांनी नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'नं उचलला आणि निर्मितीबाबत कसलीही तडजोड करण्यात आली नाही. तंत्रज्ञांनी ज्या काही गोष्टींची मागणी केली, त्याची पूर्तता झाली. या चित्रपटातील भव्यदिव्य सेट्‌स पाहताना एखादा "ऑपेरा' आपण पाहतोय की काय, असं वाटतं.

मराठी चित्रपट निर्मात्यांची "कॉमन' समस्या म्हणजे चित्रपट ऐन प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की त्यांच्याकडची पैशाची पुंजी संपते आणि प्रदर्शनापूर्वी आपला चित्रपट प्रसिद्धीबाबत "हाईप' करण्यात ते कमी पडतात. सुदैवानं या चित्रपटाबाबत तसं घडलेलं नाही. या चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळाही अत्यंत देखणा आणि भव्यदिव्य प्रमाणातच करण्यात आला. इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अलीकडच्या काळात "मिडीया'चं महत्त्व ओळखून त्याचा आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खूप चांगला उपयोग करण्यात अभिनेता आमिर खाननं यश मिळवलंय. त्याच्या यशावरून प्रेरणा घेत नितीन देसाईंनी या चित्रपटाचं "मिडीया कॅंपेन' थोडं वेगळ्या पद्धतीनं आखलं आणि त्याचा खूप चांगला "रिझल्ट' त्यांना आला. या चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते प्रदर्शनापर्यंत त्यांनी एवढे काही "इव्हेंट्‌स' आयोजित केले की, त्याचं वाहिन्यांना मिळालेलं "सॉफ्टवेअर'च काही तासाचं होतं.

नितीन देसाईंनी गेल्या 25 वर्षांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांबरोबर खूप काम केल्यानं त्यांच्या "व्हिजन'ला आकार आला. परंतु, "बालगंधर्व' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी दाखविलेल्या "पॅशन'शी जुळवून घेताना काही अडचणीदेखील आल्या. रुळ बदलताना जसा खडखडाट व्हावा, तसा खडखडाटही झाला. परंतु, त्याचा "रिझल्ट' चांगला आलाय. सर्व आघाड्यांवरचं "टॅलेण्ट' एकत्र येणं, हे जेवढं चांगलं, तेवढंच या "टॅलेण्ट'ला पुरेपूर न्याय मिळणंही महत्त्वाचं असतं. तो न्याय या चित्रपटाला मिळालाय. "बालगंधर्व'च्या "बजेट'चा आकडा समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे डोळे पांढरे झाले. "इतनी रिकव्हरी कहॉं से होगी?' असा प्रश्‍नही काहींनी विचारला. काहींनी एवढी "रिकव्हरी' होणं कठीण असल्याचं मत ताबडतोब व्यक्त करून "ये फिल्म नितीनने पैसे के लिए नहीं पॅशन के लिए बनाई है ।' असं "सेफ' ÷तरही दिल. त्यामुळे आता खरी परीक्षा नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'बरोबरच प्रेक्षकांचीही आहे. महाराष्ट्राचा अभिमान आणि मानबिंदू असलेल्या बालगंधर्वांवर प्रचंड कष्ट आणि सहा कोटी रुपये खर्चून बनलेला चित्रपट ते कसे स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
- मंदार जोशी

Friday, April 29, 2011

हार आणि प्रहार

हार आणि प्रहार
------------
कलावंतांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी पाठीवर दिली जाणारी थाप म्हणजे पुरस्कार. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचं जे पीक आलंय, त्यामध्ये कलावंतांचं कौतुक होण्याऐवजी त्यांची बदनामीच अधिक होत असल्याचं चित्र प्रकर्षानं समोर आलं आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यानं "झी मराठी' वाहिनीविरूद्ध नुकतीच जी तोफ डागली आणि त्यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्यानंतर या विषयाचं महत्त्व लक्षात येतं. "झी'च्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या चारित्र्याचं हनन केल्याचं प्रसादचं म्हणणं आहे. अर्थात, प्रसादसारखा अनुभव यापूर्वीही अनेक कलावंतांच्या वाट्याला वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये आलाय. फक्त मराठी चित्रपट पुरस्कारांपुरताच हा विषय मर्यादित नसून विविध संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्येही असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर-साजीद खान यांच्यातील शेरेबाजीही अशीच बराच काळ वादग्रस्त ठरली होती. परंतु, पूर्वीच्या कटू प्रकारांमधून काही धडा न घेता पुरस्कारांचं आयोजन करणारी मंडळी आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करीत आहेत.

पुरस्कार सोहळ्यांची संख्या वाढल्यानं हल्ली प्रत्येक वाहिनी आपला सोहळा इतरांपेक्षा कसा वेगळा आणि "हट के' होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे. परंतु, "हट के' करण्याच्या नादात आपल्याकडून होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात येत नाहीत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वाहिन्यांवर कलाकारांची बदनामी केल्याचा आरोप आहे, त्या आणि संबंधित कलाकारांचे तत्पूर्वी अतिशय चांगले संबंध असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कलावंतांच्या बदनामीचे प्रकार नक्की कोणत्या कारणामुळे घडतात, हा खरोखरीच एक शोधाचा विषय बनलाय. असा एखादा प्रकार घडला की संबंधित वाहिनी सोहळ्याचे आयोजन आणि "स्क्रीप्ट' लेखकांना झालेल्या चुकीबद्दल जबाबदार धरतात. परंतु, अशी जबाबदारी निश्‍चित झाल्यानंतरही कोणावर कसलीही कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. तसेच ज्या वाहिन्या कलावंतांचा "अजिंक्‍यतारा' नावानं गौरव करतात, तसेच त्यांना आपले "ब्रॅंड ऍम्बेसेडर' बनवितात, त्या वाहिन्यांनी अपघातानं का होईना कलावंतांची बदनामी झाली तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवित नाहीत.

या सगळ्या प्रकारामध्ये कलावंतांकडून होणाऱ्या चुकांना माफ करता येणार नाही. सूत्रसंचालकाकडून भलतंच वक्तव्य केलं गेलं की तो त्यासंबंधीची जबाबदारी स्वतःवर न घेता "स्क्रीप्टरायवर'वर टाकून मोकळा होतो. आपल्या तोंडी असलेलं वक्तव्य जर आपल्याच परिवारातील एखाद्या सहकाऱ्याशी संबंधित असेल तर ते न म्हणण्याचं धाडस सूत्रसंचालक का दाखवीत नाहीत ? तसेच एखाद्या कलाकाराची बदनामी झाल्याचं सर्वांना समजत असूनही संबंधित वाहिनीविरुद्ध कधी कोणी एकत्रितपणे आवाजही उठवीत नाहीत. त्यामागचं कारण म्हणजे प्रत्येकाला लोकप्रिय वाहिनीबरोबरचे आपले हितसंबंध जपायचे असतात. त्यामुळेच वाहिन्यांकडून चूक झाल्याचं समजत असूनही त्याविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याचं कोणाला उमजत नाही. तसेच ज्या कलाकाराची वाहिन्यांकडून कथित बदनामी झाली आहे, त्या कलाकारांची भूमिकादेखील तळ्यात-मळ्यात असते. संबंधित वाहिनीविरुद्ध भविष्यात आपण काम करणार नाही, अशी भूमिका घेण्याचं धाडस ते का दाखवीत नाहीत ?

सर्वसामान्यांच्या दृष्टीकोणातून या घडामोडींचा विचार केल्यास त्यात त्यांना फारसं काही खटकत नाही. कारण, टीव्हीवरील कार्यक्रम असतात ते मनोरंजनासाठी. पुरस्कार सोहळे हे कधीच गांभीर्यानं घ्यायचे नसतात, असा समज रुढ झालाय. त्यामुळे अशाप्रकारची थट्टा-मस्करी त्यात चालतेच, असं प्रेक्षकांनीच आता गृहित धरलंय. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करणाऱ्यांनी आपली विश्‍वासार्हता तपासायला हवीय तसेच कलावंतांनीही निव्वळ प्रसिद्धी मिळतेय, यावर आनंद न मानता आपण कोणत्या सोहळ्यात सहभागी होतोय, याचीही काळजी घ्यायला हवी. तसं घडलं तरच अशा अपघातांची संख्या कमी होईल.

प्रीमियर' मासिक