Monday, May 9, 2011

एका ध्यासाचा प्रवास...


एका ध्यासाचा प्रवास...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक, प्रॉडक्‍शन डिझायनर आणि निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांनी "बालगंधर्व' या भव्यदिव्य चित्रपटाचं नऊ महिन्यांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जातंय. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट भारतात आणि त्यानंतर विदेशातही प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला हा सर्वाधिक "बजेट' असलेला चित्रपट. तब्बल सहा कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाशी नितीन देसाईंव्यतिरिक्त नीता लुल्ला, विक्रम गायकवाड, रवी दिवाण, महेश लिमये, रवी जाधव, सुबोध भावे, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे अशी मोठी नावं जोडली आहेत. मराठी चित्रपट निर्मितीच्या साऱ्या चौकटी भेदून एक विलक्षण जिद्द, ध्यास, तळमळ आणि प्रचंड मेहनतीनं हा चित्रपट बनविला गेलाय. त्याचीच ही कहाणी.
-----------
विख्यात गायक-नायक बालगंधर्वांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, हे व्यक्तिमत्त्व ज्या "स्केल'द्वारे चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे, ते अपूर्व
म्हणावं लागेल. मराठी चित्रपट म्हटलं की काही निश्‍चित ठोकताळे आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु, हा चित्रपट साकारताना देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व "बाऊंड्रीज' पार केल्या आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवायचाय, या हेतूनं झपाटून जात चित्रपट पूर्ण केला. सर्वसाधारणपणे निर्मात्याला कथा ऐकविली की एक तर निर्मितीचा निर्णय त्वरीत घेतला जात नाही किंवा निर्मितीचं "बजेट' अधिकाधिक कमी कसं करता येईल, यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु, हा चित्रपट सुरूच झाला एका ध्यासानं. आजचा जमाना आहे एमटीव्ही, पॉप म्युझिकचा. या जमान्यातील तरुण पिढीच्या गळी शंभर वर्षांपूर्वीचं गाणं आणि घटनाक्रम उतरवणं, हे खरं तर सर्वात मोठं "चॅलेंज' होतं. परंतु, ते "चॅलेंज' अभिनेता सुबोध भावे आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर यांनी ठेवलं आणि ते काही मिनिटांमध्ये नितीन देसाईंनी स्वीकारलं आणि सुरू झालं एका विलक्षण चित्रपटनिर्मितीचं ध्यासपर्व !

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांची संख्या वाढली; परंतु गुणवत्तेचा विचार करायचा झाल्यास अगदी मोजक्‍या चित्रपटांचीच नावं घेता येतील. त्यामागचं कारण म्हणजे नियोजन, कल्पकतेचा अभाव. "बालगंधर्व'ची निर्मिती सुरू होण्यापूर्वी नियोजनावर मोठा भर दिला गेला आणि त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी येत गेलं. आपल्याकडे असे अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होतात की, प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं नाव ठाऊक होतं. परंतु, "बालगंधर्व' मुहूर्ताच्या आधीपासून ते त्याच्या संगीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होईपर्यंतच्या काळात विलक्षण चर्चेत राहिला. करायचं ते दणक्‍यात, हा नितीन देसाईंचा खाक्‍या. तो या चित्रपटाच्या मुहूर्तापासून पाहायला मिळाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात या चित्रपटाच्या "लॉंचिंग'चा जो भव्यदिव्य कार्यक्रम झाला, तो कायम लक्षात राहणारा ठरला. ऐतिहासिक चित्रपट साकारताना लेखक-निर्माता-दिग्दर्शकांनं केलेल्या अभ्यासाला, आपल्या कलाकृतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संदर्भांना, संशोधनाला खूप महत्त्व असतं. हे संदर्भ सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी अनेकांच्या भेटी घ्याव्या लागतात. अशा वेळी थोडी पूर्वपुण्याईदेखील कामाला यावी लागते. ते सर्व या चित्रपटाबाबत जुळून आलं.

या चित्रपटाच्या संशोधनासाठी अविरत प्रयत्न झाले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, वेशभूषाकारापासून ते चित्रपटामधील सर्व कलावंतांनी आपापल्या परीनं बालगंधर्व आणि त्यांच्या काळाबद्दल जी काही माहिती मिळाली, तिचा चित्रपटासाठी काही उपयोग होईल का, याचा विचार केला. बालगंधर्वांना पाहिलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेली जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यांचा शोध घेतला गेला. त्यांच्या दीर्घमुलाखती ध्वनिमुद्रित झाल्या. त्यांच्याकडील बालगंधर्वांचा ठेवा चित्रपटासाठी विनम्रपणे मागण्यात आला आणि शूटिंग झाल्यानंतर तो आस्थेपूर्वक परतही करण्यात आला. ज्याच्याकडे जे जे चांगलं मिळेल, ते ते घेऊन पटकथेची एक सुंदर लड गुंफण्यात आली. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेला बालगंधर्वांचा सहवास जाणून घेत त्यानुसार कथानकातील नाट्यनिर्मिती आणखी टोकदार करण्यात आली. रंगभूमीवर अदाकारी साकारीत असताना आपल्या रुपाकडे थोडंही दुर्लक्ष होऊ न देण्यासाठी बालगंधर्वांनी विंगेत आरशांची केलेली व्यवस्था, ही बाबासाहेबांनी सांगितलेली खास आठवण. या आठवणीला चित्रपटात नुसतंच स्थान मिळालेलं नाहीय तर कथानक त्यामुळे आणखी रंगतदार होईल, याची काळजी घेतली गेलीय. असे बरेच प्रसंग या चित्रपटात आहेत.

अवघ्या 33 दिवसांमध्ये हा चित्रपट पूर्ण झाला. तो काळ मंतरलेला होता, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या "टीम'शी जोडलेला प्रत्येक कलावंत-तंत्रज्ञ सांगतो. पुणे, भोर, कोल्हापूर या भागात हा चित्रपट चित्रीत झालाय. सकाळी सात ते मध्यरात्री 1-2 वाजेपर्यंतही बऱ्याचदा शूटिंग चालायचं. पण कोणाकडूनही कधी या काळात आपण थकल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही. नितीन देसाईंना या 33 दिवसांमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल, त्यांना निश्‍चितच या माणसाची "पॅशन' भावली असणार. एखाद्या युद्धात राजाची मैदानावरील थेट उपस्थिती सैनिकांसाठी उत्साहवर्धक असते. इथं तर नितीन देसाईंच्या रुपातला राजा अक्षरशः चौफेर चढाई करीत होता. या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखेला खूप महत्त्व आहे. या व्यक्तिरेखेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाल्यानंतर कोणीतरी नितीन देसाईंनाच ही भूमिका करण्याचा सल्ला दिला. वास्तविक तेच या चित्रपटाचे निर्माते असल्यानं ही भूमिका साकारण्याचा निर्णय त्यांना क्षणभरात घेता आला असता. परंतु, तसं न करता त्यांनी या मिनिटभराच्या भूमिकेसाठी आधी "स्क्रीन टेस्ट' दिली. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून टक्कल केलं. एखाद्या कलाकृतीसाठी सर्वस्व देणं म्हणजे नेमकं काय असतं, हे नितीन देसाईंशी या चित्रपटाबद्दल चर्चा केल्यानंतर अगदी छान समजतं.

बालगंधर्वांचं व्यक्तिमत्त्व एवढं जबरदस्त आहे की, त्यातलं काय पडद्यावर दाखवावं आणि काय नाही, असा प्रश्‍न "बालगंधर्व टीम'ला पडला होता. सर्वच गोष्टी दाखवायच्या म्हटलं तरी चित्रपटाची लांबी साडे तीन-चार तासांपर्यंत गेली असती. परंतु, आजच्या काळातील प्रेक्षकाची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन चित्रपटाची लांबी कोणत्याही स्थितीत दोन तासांच्या वर जाऊ न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही दृश्‍यांना कात्री लावावी लागली. बालगंधर्वांचे मायबाप म्हणजे रसिकप्रेक्षक. त्याच्या सेवेत खंड पडू न देण्याचा त्यांचा विडा शंभर वर्षांनी नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'नं उचलला आणि निर्मितीबाबत कसलीही तडजोड करण्यात आली नाही. तंत्रज्ञांनी ज्या काही गोष्टींची मागणी केली, त्याची पूर्तता झाली. या चित्रपटातील भव्यदिव्य सेट्‌स पाहताना एखादा "ऑपेरा' आपण पाहतोय की काय, असं वाटतं.

मराठी चित्रपट निर्मात्यांची "कॉमन' समस्या म्हणजे चित्रपट ऐन प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की त्यांच्याकडची पैशाची पुंजी संपते आणि प्रदर्शनापूर्वी आपला चित्रपट प्रसिद्धीबाबत "हाईप' करण्यात ते कमी पडतात. सुदैवानं या चित्रपटाबाबत तसं घडलेलं नाही. या चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळाही अत्यंत देखणा आणि भव्यदिव्य प्रमाणातच करण्यात आला. इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अलीकडच्या काळात "मिडीया'चं महत्त्व ओळखून त्याचा आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खूप चांगला उपयोग करण्यात अभिनेता आमिर खाननं यश मिळवलंय. त्याच्या यशावरून प्रेरणा घेत नितीन देसाईंनी या चित्रपटाचं "मिडीया कॅंपेन' थोडं वेगळ्या पद्धतीनं आखलं आणि त्याचा खूप चांगला "रिझल्ट' त्यांना आला. या चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते प्रदर्शनापर्यंत त्यांनी एवढे काही "इव्हेंट्‌स' आयोजित केले की, त्याचं वाहिन्यांना मिळालेलं "सॉफ्टवेअर'च काही तासाचं होतं.

नितीन देसाईंनी गेल्या 25 वर्षांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांबरोबर खूप काम केल्यानं त्यांच्या "व्हिजन'ला आकार आला. परंतु, "बालगंधर्व' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी दाखविलेल्या "पॅशन'शी जुळवून घेताना काही अडचणीदेखील आल्या. रुळ बदलताना जसा खडखडाट व्हावा, तसा खडखडाटही झाला. परंतु, त्याचा "रिझल्ट' चांगला आलाय. सर्व आघाड्यांवरचं "टॅलेण्ट' एकत्र येणं, हे जेवढं चांगलं, तेवढंच या "टॅलेण्ट'ला पुरेपूर न्याय मिळणंही महत्त्वाचं असतं. तो न्याय या चित्रपटाला मिळालाय. "बालगंधर्व'च्या "बजेट'चा आकडा समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे डोळे पांढरे झाले. "इतनी रिकव्हरी कहॉं से होगी?' असा प्रश्‍नही काहींनी विचारला. काहींनी एवढी "रिकव्हरी' होणं कठीण असल्याचं मत ताबडतोब व्यक्त करून "ये फिल्म नितीनने पैसे के लिए नहीं पॅशन के लिए बनाई है ।' असं "सेफ' ÷तरही दिल. त्यामुळे आता खरी परीक्षा नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'बरोबरच प्रेक्षकांचीही आहे. महाराष्ट्राचा अभिमान आणि मानबिंदू असलेल्या बालगंधर्वांवर प्रचंड कष्ट आणि सहा कोटी रुपये खर्चून बनलेला चित्रपट ते कसे स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
- मंदार जोशी

No comments: