Monday, May 23, 2011

लालफितीत अडकला "शो मन'


लालफितीत अडकला "शो मन'
---------
तब्बल 35 वर्षांची निर्माता-दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द आणि "व्हिसलिंग वूडस्‌'नं जागतिक स्तरावर मिळवलेली ख्याती या दोन गोष्टी सुभाष घईंचं मनोरंजन क्षेत्रामधील मोठेपण सिद्ध करणारी आहेत. "क्‍लास'-"मास'च्या आवडीची नाडी जाणणारा आणि राज कपूर यांच्यानंतर "शो मन' ही पदवी मिळविणारा हा दिग्गज दिग्दर्शक सध्या मात्र काही कारणांमुळे अडचणीत सापडलाय. ही कारणं आणि आपल्या कारकिर्दीबद्दल घई यांनी प्रथमच परखडपणे केलेली ही चर्चा.
-------------
मुलाखतीचा पहिलाच प्रश्‍न ऐकून समोरच्याची कळी खुलावी, असं खूप कमी वेळा घडतं. पण ज्यावेळी असं घडतं तेव्हा मग मुलाखतकाराच्या वाट्याला जबरदस्त असं काहीसं येतं. सुभाष घईंशी संवाद साधताना असंच काहीसं घडलं आणि घईंच्या मनात ठसठसत असलेलं दुःख पहिल्यांदाच तीव्र स्वरूपात बाहेर पडलं. "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बॉलीवूडमध्ये मिळालेल्या चांगल्या संधी आणि या संस्थेत विदेशी विद्यार्थ्यांचा वाढत असलेला ओघ याबाबत घईंना बोलतं करायचं होतं. त्यानिमित्तानं सात वर्षांपूर्वी या संस्थेच्या पायाभरणीच्या वेळी मनात असलेल्या योजना आणि प्रत्यक्षात साकारलेलं या योजनांचं रूप आशादायी आहे का ? हा प्रश्‍न ऐकून सुभाषजी खुलले आणि त्यांच्या मनातील दुःख "नॉनस्टॉप' बाहेर पडायला सुरुवात झाली.
"" "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये राज्य सरकारची जमीन लाटून सुभाष घईंनी स्टुडिओद्वारे फक्त आपलं हित साधलं, अशाप्रकारचं जे काही जनमत तयार केलं गेलं, ते मला प्रचंड खुपणारं आहे. असे आरोप ऐकले की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण, कोणाची जमीन लाटून पैसे कमवावे, ही माझी वृत्ती नाही. मी आजवर अनेक नवोदितांना माझ्या चित्रपटातून संधी दिली. पण, मुंबईत कामासाठी येणाऱ्यांचा ओघ खूप मोठा आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाची अशी तक्रार असायची की आम्ही फिल्मवाल्यांची मुलं नसल्यामुळे आम्हांला इथं संधी मिळत नाही. ही गोष्ट मला बोचली. कलाक्षेत्रात काहीतरी करण्याच्या इच्छेनं अनेक जण मुंबईत येतात आणि त्यानंतर ते "गुमराह' होतात. त्यांना योग्य रस्ता दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय तोडीची संस्था मला उभारायची होती. त्यामुळे 1993 मध्ये चित्रपट माध्यमाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं मी स्वप्न पाहिलं. परंतु, सरकारच्या पातळीवर त्याची दखल घेण्यासाठी पुढं आणखी दहा एक वर्षं गेली आणि या संस्थेची पायाभरणी झाली ती 2004मध्ये. ही संस्था उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोरेगावच्या फाळके चित्रनगरीचे तेव्हाचे संचालक गोविंद स्वरूप यांनी पुढाकार घेतला. सरकारशी मैत्री करणंही अनेकदा धोक्‍याचं असतं, हे मला ठाऊक होतं. परंतु, स्वरूप यांच्या आग्रहामुळे चित्रनगरीत चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. यावेळी सरकारच्या जमिनीवर शैक्षणिक संस्था उभारणे आणि या संस्थेच्या विकासासाठी स्टुडिओ चालवण्याचा आम्ही करार केला. या मध्ये ही जमीन आमच्या संस्थेला विकण्यात आली, हा कुठेही उल्लेख नव्हता किंवा तसा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. प्रारंभीच्या करारानुसार एकूण 20 कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. त्यापैकी 17 कोटी माझ्या संस्थेतर्फे भरले गेले आण
ि उरलेले तीन कोटी राज्य सरकारने भरावेत, असं ठरलं. अर्थात ती रक्कमही नंतर आमच्याच संस्थेनं भरली. सर्व काही ठरलं. भूमिपूजन झालं आणि इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेतील मुद्यांवर सरकारतर्फे व्यवस्थित उत्तरे द्यायला हवी होती. राज्य सरकारच्या जमिनीचा वापर एका चांगल्या शैक्षणिक संस्थेसाठी होणार आहे, हे न्यायालयासमोर आणायला हवं होतं. मात्र तसं घडलं नाही आणि तब्बल सात वर्षं या शैक्षणिक संस्थेची प्रगती रोखली गेली. ही संस्था प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी देश-विदेशातील तब्बल 42 संस्थांना भेटी देऊन तेथील कार्यभार पाहिला आणि प्रत्येकातील चांगल्या गोष्टी हेरून त्यांचा अंतर्भाव आमच्या संस्थेत केला.''
गेल्या काही वर्षांपासून घईंचा राज्य सरकारबरोबर सातत्यानं विविध माध्यमांद्वारे संवाद सुरू आहे. परंतु, त्यातून काहीच मार्ग निघालेला नाही. मंत्री, शासकीय अधिकारी फकत गोड गोड बोलतात आणि नवनवीन आश्‍वासनं देतात. परंतु, कृतीची वेळ आली की पाठ फिरवतात असा विदारक अनुभवही घई व्यक्त करतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीची वेळ मागून आता बरेच महिने झाले आहेत; परंतु त्यांनाही याबाबत मला भेटावंसं वाटत नाही, यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही, हे स्पष्ट करून घई पुढं म्हणतात, ""या संस्थेच्या उभारणीसाठी आता जवळपास 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. मुलांच्या "फी'मधून उत्पन्न मिळत असले तरी ते एवढ्या मोठ्या "स्केल'वरची संस्था चालविण्यास अपुरे आहे. सुरुवातीला 20 एकर जमिनीवर ही संस्था विकसित करायची असं ठरलं असतानाही अवघ्या चार एकर जागेवरच आम्हांला समाधान मानावं लागलं आहे. दरवर्षी आमच्या "बॅलन्स शीट'मध्ये सहा कोटींचा तोटा आढळत आहे. "मुक्ता आर्टस्‌'द्वारे चित्रपट निर्मिती करून तेथून मिळालेला पैसा या संस्थेच्या उभारण्यासाठी आम्ही वापरत आहोत. परंतु राज्य सरकारनं एकंदरीत आम्हांला पांढऱ्या हत्तीवर बसवून आता या प्रकरणात हात वर करण्याची भूमिका घेतली आहे. एवढी मोठी गुंतवणूक केल्यामुळे मला आता दुसरीकडे जाणंही शक्‍य नाही. परंतु, आणखी किती काळ वाट पाहायची यालाही काही मर्यादा आहेत. आता आमच्या अगदी नाकातोंडाशी पाणी आलंय. जीव गुदरमला जातोय. सरकारची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत, त्याला आम्ही कसे काय जबाबदार असू शकतो ? या प्रकल्पामध्ये राज्य सरकार आमचे भागीदार असल्यामुळे मी इतकी वर्षं गप्प राहिलो होतो. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळेच पुढील काही महिन्यांमध्ये याचा निर्णय न लागल्यास नाईलाजास्तव मला राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल. एक
ीकडे मनोरंजन विश्‍वासाठी बरंच काही करण्याच्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे आशियातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक मनोरंजन शिक्षण संस्थेच्या कामात अडथळे आणले जातात, हे काही योग्य नाही.''
एवढ्या सगळ्या विपरीत गोष्टी घडत असतानाही संस्थेच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घईंनी या काळात घेतली. या संस्थेत सध्या 400 मुलं प्रशिक्षण घेत असून त्यापैकी 70 मुलं ही युरोपीय देशांमधील आहेत. इथून बाहेर पडलेल्या 70 टक्के विद्यार्थ्यांना ग्लॅमर जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी या संस्थेत अध्यापनाचं काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घईंनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना फारसं यश मिळालेलं नाही. या अपयशाचं विश्‍लेषण करताना घई म्हणतात, ""आपलं मन स्थिर असेल तर आपल्या हातून चांगलं काम घडतं. एवढ्या विचित्र मनोवस्थेत चित्रपट दिग्दर्शित करणं खरोखरच शक्‍य नाही. "व्हिसलिंग वूडस्‌'च्या उभारणी प्रक्रियेत जे अडथळे आले त्याचा निश्‍चितच माझ्या "क्रिएटिव्हिटी'वर परिणाम झालाय. परंतु, एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यांमधला मी नाही. काहींना वाटतंय की, दिग्दर्शनाचा माझा फॉर्मच हरवलाय. परंतु, मला त्यात काही तथ्य वाटत नाही. दिवसातले 16 तास मी कार्यरत आहे. गेल्या चार दशकांमध्ये मी निर्मिलेल्या 18पैकी 14 चित्रपटांना यश आलंय. हा "रेशो' नक्कीच चांगला आहे. अपयशाला मी घाबरत नाही. कारण, कोणत्याही दिग्दर्शकाला प्रयोग हे करावेच लागतात. काही लोकांना असं वाटतंय की, घईंच्या स्टाईलचा सिनेमा आता "आऊटडेटेड' झालाय. परंतु, त्याच्याशीही मी सहमत नाही. कारण हे जर खरं मानायचं ठरवलं तर "दबंग'सारखा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला नसता. हा सिनेमा माझ्या "स्टाईल'शी अगदी मिळताजुळता आहे. खुद्द सलमाननं मला या चित्रपटाच्या "मेकिंग'दरम्यान ""हम "राम लखन' पॅटर्न की फिल्म बना रहे है ।' असं सांगितलं होतं. या चित्रपटाच्या यशामुळे माझा विश्‍वास वाढलाय. लवकरच माझं दिग्दर्शन असलेल्या नवीन चित्रपटाची मी घोषणा करीन. एकीकडे निव्वळ मनोरंज
न चित्रपटांची निर्मिती सुरू असताना काही वेगळ्या आशयघन चित्रपटांनाही आम्ही प्राधान्य दिलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जन्मतिथीचं निमित्त साधून आम्ही एक बंगाली चित्रपट "कश्‍मकश' या नावानं हिंदीत डब केलाय. मराठीतही खूप चांगलं साहित्य आहे, ज्याचा सिनेमा होऊ शकतो. त्यावरदेखील आमचं काम सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आमच्यासोबत पुढील कलाकृती करणार आहेत. ज्या लेखक-दिग्दर्शकांकडे खूप चांगल्या कल्पना आहेत, तेदेखील आमच्याशी संपर्क साधू शकतात.
- मंदार जोशी

No comments: