Wednesday, March 19, 2008

"मल्लिका ए हुस्न'ला पोस्टाची सलामी....


"मल्लिका ए हुस्न'ला पोस्टाची सलामी....
इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात पोस्ट खातं आपलं अस्तित्वच हरवून गेलंय. संपूर्ण जग बदललं. पण हे खातं काही आपली "लाइफस्टाईल' बदलायला तयार नाही. म्हणूनच मधुबालावर पोस्ट खातं विशेष तिकीट प्रकाशित करतंय, हे कळल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. टपाल खात्यानं 18 मार्चला मुंबईत एका विशेष कार्यक्रमात मधुबालावर तिकीट प्रकाशित करून या अभिनेत्रीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला सलाम केला. हा सोहळा खरोखरीच छान रंगला.
मधुबाला... जिच्या हसण्यानं निर्जीव सेट जिवंत व्हायचा. तिचं मूर्तिमंत सौंदर्य तरुणाईच्या काळजाचा ठोका चुकवायचं. जिचा सहज अभिनय लाखोंच्या हृदयाला हात घालायचा; पण नियतीचा खेळ असा अजब की अवघ्या 36 व्या वर्षीच तिला मृत्यूनं गाठलं. मात्र त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या दिग्गजांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी पसरलेली होती. म्हणूनच आपल्या भावनांना वाट करून देताना प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक मनोजकुमारना "सीनेमें सुलगते है अरमॉं, आँखोमें उदासी छायी है...' या गीताचा आधार घ्यावा लागला.
या सोहळ्याला मनोजकुमार यांच्यासह टपाल खात्याचे सचिव आय. एम. जी. खान, ज्येष्ठ दिग्दर्शक शक्ती सामंता, ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला, निमी, सोनाली कुलकर्णी, निवेदक अमिन सयानी आणि मधुबाला यांची बहीण मधुरभूषण उपस्थित होती. मधुबाला या आपल्या ज्येष्ठ भगिनी असल्या, तरी आईप्रमाणे त्यांनी आपला सांभाळ केल्याचं मधुरभूषण यांनी सांगितलं. "मुघल-ए-आझम' या चित्रपटानंतर मधुबाला यांनी काही चित्रपटांमध्ये काम केल्याचं बोललं जातं; पण त्यात तथ्य नसून 27 व्या वर्षीच या अभिनेत्रीनं काम थांबविल्याचंही मधुरभूषण यांनी सांगितलं. अभिनेत्री शशिकला यांनी मधुबाला यांच्या सेटवरील शिस्तीचे वर्णन केलं. मुंबईतल्या पावसाळ्यानं एके दिवशी चांगलाच जोर धरल्यानं बहुतेक कलाकारांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. मात्र मधुबाला ही एकमेव अभिनेत्री त्या दिवशी स्टुडिओतील सेटवर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत उपस्थित असल्याचेही शशिकला यांनी सांगितलं.
शक्ती सामंता यांनी मधुबाला यांच्यासमवेत "हावडा ब्रिज'सह एकूण तीन चित्रपट केले. चित्रीकरणाच्या वेळी सर्वाधिक आनंद मधुबाला यांच्याकडून मिळाल्याचे सामंता म्हणाले. मनोजकुमार यांनी मधुबाला यांच्यासमवेत आपणास प्रत्यक्ष काम करण्याची संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. टपाल खात्याने तिकिटाच्या निमित्तानं सन्मानित केलेलं मधुबाला हे एकंदरीत तिसावं व्यक्तिमत्त्व. मात्र चित्रपटसृष्टीत अजून अनेक रत्नं तिकिटाच्या प्रकाशनाची वाट पाहत असल्याचा उल्लेख मनोजकुमार यांनी केला.
---------------------------
मधुबाला यांना आपल्या मृत्यूची कल्पना आली होती. एके दिवशी त्यांनी शक्ती सामंता यांना आपल्या घरी बोलावून घेतलं. मधुबाला यांना "मेकअप'मध्ये पाहून सामंता चक्रावले. कारण आजारपणामुळे ही अभिनेत्री बराच काळ कॅमेऱ्यापासून दूर होती. आपल्या "मेकअप'चा खुलासा करताना मधुबाला म्हणाल्या, "दादा, आपने मुझे बेस्ट फॉर्ममें देखा है। आपके सामने बिना मेकअप मैं नही आ सकती ।'

1 comment:

HAREKRISHNAJI said...

खुप छान लिहीले आहात. मी सुध्दा या वर मोडकेटोडके लिहीले आहे. वाचाल का ?