Sunday, July 29, 2012

पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू...

-------- पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू... ------- संत रामदासांच्या ‘दासबोधा’त एक सुंदर श्‍लोक आहे... ...मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे... या श्‍लोकाची आता आठवण होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईतल्या पहिल्या मल्टिप्लेक्सनं गेल्या आठवड्यात मान टाकली. अंधेरी भागामधील ‘सिटी मॉल’मधल्या फेम-ऍडलॅब्स मल्टिप्लेक्सची सेवा आता खंडित झाली आहे. या मल्टिप्लेक्सच्या चालकांनी काही महिन्यांनी पुन्हा आपण सेवेत रुजू होऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. परंतु, चित्रपटसृष्टीतील सूत्रांच्या माहितीनुसार हे मल्टिप्लेक्स आता इतिहासजमा झालं आहे. एक काळ असा होता की देशभरातील ‘सिंगल स्क्रीन थिएटर्स’ एकापाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड जात होती आणि त्यांच्या जागी आलिशान मल्टिप्लेक्स उदयाला येत होती. ‘सिंगल स्क्रीन’चा र्‍हास काही पाहवत नव्हता. मल्टिप्लेक्सचं चकचकीत वातावरण, त्यातल्या आरामदायी खुर्च्या, वातानुकूलित सेवा, स्वच्छ खाद्यपदार्थ... ही सेवा पाहून मल्टिप्लेक्स इथं दीर्घ काळ राज्य करतील असं वाटलं होतं. परंतु तसं घडलं नाही. ‘सिंगल स्क्रीन’ना श्रद्धांजली वाहणार्‍यांना एवढ्या लवकर मल्टिप्लेक्सलाही श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. ‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू काही साधासुधा नाही. त्याला अनेक पदर आहेत. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली. ‘फेम’चे श्रॉफ बंधू आणि ‘ऍडलॅब्स’च्या मनमोहन शेट्टींनी एकत्र येऊन मल्टिप्लेक्सच्या क्रांतीला सुरुवात केली. मॉलमध्ये मल्टिप्लेक्स ही कल्पना तेव्हापासून यशस्वीपणे राबविली गेली. या मल्टिप्लेक्सच्या उदयानंतर काही काळात देशभरात मल्टिप्लेक्सचं पेव फुटलं. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. विपुल शहा दिग्दर्शित ‘आँखे’ चित्रपटापासून हे मल्टिप्लेक्स कार्यरत झालं होतं. या मल्टिप्लेक्सचा तेव्हाचा थाट पाहून अनेक जण चक्रावले होते. आपण विदेशात तर नाही ना, अशीही शंका अनेकांना आली होती. कारण तत्पूर्वी अशापद्धतीचा थाटमाट ‘सिंगल स्क्रीन’मध्ये पाहायला मिळाला नव्हता. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या उपस्थितीत या मल्टिप्लेक्सचा शुभारंभ झाला होता. यावेळी श्री. बच्चन यांनी आपल्या भाषणामध्ये ‘फेम’चा गौरव केला होता. परंतु, अवघ्या दशकभरात या मल्टिप्लेक्सच्या वाट्याला मरण आलं. त्यामागच्या काही घडामोडींवर नजर टाकल्यास बर्‍याच गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतं. जानेवारी २०१२ मध्ये ‘फेम इंडिया’चं ‘आयनॉक्स लिजर लि.’मध्ये विलीनीकरण झालं. तेव्हापासून ‘आयनॉक्स’ आणि ‘फेम’च्या मालकांमध्ये खटके उडायला लागले. ‘आयनॉक्स’नं ‘लिव्ह अँड लायसन्स’चं नूतनीकरण न करण्यामागे आपल्याला भाडे परवडत नसल्याचं कारण पुढं केलंय. गेल्या काही वर्षांपासून या मल्टिप्लेक्सचा कारभार रडतखडतच चालला होता. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली तेव्हा अंधेरीच्या पश्‍चिम भागामध्ये एकही चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे या मल्टिप्लेक्सवर सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. मात्र नंतर या भागात ‘सिनेमॅक्स’ आणि ‘फन रिपब्लिक’ ही आणखी दोन आलिशान मल्टिप्लेक्सेस सुरू झाली. अवघ्या शंभर मीटरच्या अंतरात सुमारे १५ ‘स्क्रीन्स’ सुरू झाले. एवढ्या ‘स्क्रीन्स’ना सामावण्याइतकी लोकसंख्या अंधेरी भागात नाही. त्यामुळे आसनखुर्च्या अधिक आणि प्रेक्षकांची वानवा हा मोठा प्रश्‍न उभा राहिला. ‘फेम’चं काळाबरोबर न राहणंही त्यांना महागात पडलं. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांमध्ये अनेक बिगबजेट चित्रपटांचे ‘प्रीमियर शोज’ फेम-ऍडलॅब्जझाले झाले. परंतु, ‘सिनेमॅक्स’च्या आगमनानंतर सगळा लाईमलाईट त्यांच्यावर स्थिरावला. प्रीमियर शोज, पार्ट्या, सीडी प्रकाशन सोहळे यांचा ‘फेम’मधील ओघ आटला आणि सगळं ग्लॅमर ‘सिनेमॅक्स’वर स्थिरावलं. अलीकडच्या काळात एकही मोठा इव्हेंट ‘फेम-ऍडलॅब्स’मध्ये झाला नाही. त्याचा विपरीत परिणाम या मल्टिप्लेक्समधील तिकीटविक्रीवर झाला. ‘फेम-ऍडलॅब्स’ची जी वाताहत झाली, तशी वाताहत देशभरातील आणखी अनेक मल्टिप्लेक्सची नजिकच्या काळात होणार आहे. अनेक शहरांमध्ये गरज नसतानाही भरपूर ‘स्क्रीन्स’ची मल्टिप्लेक्सेस उभारली गेली आहेत. प्रेक्षकांअभावी चित्रपटांचे ‘शोज’ रद्द करण्याचे प्रकारही वरचेवर वाढताहेत. मल्टिप्लेकमधील तिकीट दर आणि खाद्यपदार्थांचे दर हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवाक्यातले नाहीत. सर्वसाधारणपणे सिनेमाचा मुख्य प्रेक्षकवर्ग हा मध्यमवर्गीय असतो. चार जणांच्या एका कुटुंबानं मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर किमान एक हजार रुपयांची नोट खर्चावी लागते. म्हणूनच बहुतेक सर्व मल्टिप्लेक्सचा कारभार हा तोट्यात आहे आणि आज ना उद्या त्यांच्यावर ‘फेम-ऍडलॅब्स’सारखी वेळ येणार आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असला की मल्टिप्लेक्सचे दर वाढवले जातात. प्रेक्षकांना ही नाडण्याची कृती अखेर मल्टिप्लेक्सचालकांच्या अंगाशी येऊ लागली आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यानेही मल्टिप्लेक्सचालकांनी तिकीट दरात कपात करणं आवश्यक असल्याचं सुचवलंय. मात्र अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. ‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू हा इतर मल्टिप्लेक्सचालकांसाठी धोक्याची सूचना आहे. त्यातून धडा घेत तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. अन्यथा आणखी काही मल्टिप्लेक्सेस बंद झाली तर आश्‍चर्य वाटू नये. - मंदार जोशी --------------

Wednesday, July 4, 2012

‘काकस्पर्श’च्या स्पर्शामागचं ‘लॉजिक’

यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या द्विशतकी टप्पा गाठणार आहे. प्रेक्षक, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि कलाकारांसाठीही हा एक मोठा धक्का आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीतील आलेली सध्याची ‘बूम’ पाहता हा आकडा अगदीच फसवा नसल्याचं जाणवतं. हल्ली कोणालाही मराठी चित्रपट बनवायचाय. त्यामागचं कारण म्हणजे एक तर मराठी चित्रपट हिंदीच्या तुलनेत खूप कमी किमतीत बनतो आणि त्यामध्ये केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची कागदावरील परतफेड अगदी सुखकर आहे. तरीदेखील मराठी चित्रपटांच्या यशाचं प्रमाण हे अगदीच नगण्य आहे. अगदी संख्याच मांडायची झाल्यास दर शंभरी अवघे पाच चित्रपट यशस्वी झाल्याचं निदर्शनास येतं. यंदाच्या वर्षीचं चित्र तर खूपच निराशाजनक आहे. ‘काकस्पर्श’चा अपवाद वगळता एकाही मराठी चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिस’वर दणदणीत यश मिळवता आलेलं नाही. ‘काकस्पर्श’च्या यशाबद्दल लिहायचं झाल्यास गुणवत्ता, नशीब आणि मेहनत या तीनही गोष्टींचा संगम या चित्रपटात झाल्याचं आढळतं. मराठीत चांगले चित्रपट येत नाहीत असं नाही. परंतु, प्रत्येक चित्रपटच ‘काकस्पर्श’एवढा यशस्वी ठरलेला नाही. म्हणूनच या चित्रपटाच्या यशाचं मोल अधिक आहे. एखाद्या चित्रपटाची ‘सक्सेस पार्टी’ आयोजित केली की त्यामध्ये संबंधित चित्रपटाची मंडळी उपस्थित होतात. परंतु, ‘काकस्पर्श’च्या यशाची पार्टी त्यास अपवाद ठरली. या पार्टीस या चित्रपटाशी संबंधित नसलेली बरीच मंडळी होती. विशेष म्हणजे ‘काकस्पर्श’ ज्या चित्रपटगृहांमध्ये धो धो चालला त्या चित्रपटगृहांचे व्यवस्थापक आणि मालकांना आवर्जून बोलाविण्यात आलं होतं. मराठी चित्रपटाच्या यशाची ताकद यापूर्वी ‘नटरंग’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांबाबत अनुभवायला आली होती. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत या दोन्ही चित्रपटांचं यश अगदी उठून दिसलं होतं. मराठी चित्रपटांना चांगले ‘शो टायमिंग्ज’ मिळत नसल्याची खंत नेहमीच व्यक्त केली जाते. परंतु, त्यात तथ्य दिसत नाही. ‘काकस्पर्श’ला प्रेक्षकांनी कौल दिल्याचं लक्षात आल्यानंतर दुसर्‍या आठवड्यापासून या चित्रपटाला महाराष्ट्रातील सगळी चांगली चित्रपटगृहं आणि चांगले ‘टायमिंग्ज’ मिळाले. व्यावसायिक हिंदी चित्रपट दाखवून चित्रपटगृह रिकामं ठेवण्यापेक्षा चालणारा मराठी सिनेमा आपल्या चित्रपटगृहामध्ये कोण लावणार नाही ? परंतु, हल्ली नकारार्थी विचार करण्याकडेच आपला कल वाढला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणमीमांसा करताना एक हक्काचं कारण म्हणून चित्रपटगृहांच्या ‘टायमिंग’चं कारण पुढं केलं जातं. परंतु, ते किती खोटं आहे हे ‘काकस्पर्श’च्या यशानं सिद्ध झालं आहे. ‘काकस्पर्श’च्या यशामागचं आणखी एक ठळक कारण म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीनं या चित्रपटाला दिलेला पाठिंबा. मालिका आणि ‘रिऍलिटी शोज’मधील रेटिंगमध्ये भले ही वाहिनी आपल्या स्पर्धकांच्या थोडी मागं पडली असेल. परंतु, या वाहिनीनं आपली सगळी ताकद ‘काकस्पर्श’च्या मागं उभी केली. आपली एकही मालिका किंवा ‘रिऍलिटी शो’ या वाहिनीनं सोडला नाही की ज्यावर या चित्रपटाची प्रसिद्धी झाली नाही. मुळात ‘काकस्पर्श’ हा काही ‘गोलमाल सिरीज’ किंवा आमिर खानचा नवीन चित्रपट नव्हता की प्रेक्षकांनी प्रदर्शनाच्या दिवशीच त्याच्यावर उड्या टाकाव्यात. तसेच चित्रपटाच्या शीर्षकामध्येही नकारात्मकता अगदी स्पष्ट दिसत होती. कोणत्याही चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये ‘लॉंग इनिंग’ खेळायची असेल तर त्याची ‘माऊथपब्लिसिटी’ चांगली होणं खूप महत्त्वाची असते. ‘झी’नं नेमकं हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं. या चित्रपटाच्या ‘प्रोमोज’चा, जाहिरातींचा, त्यातील कलाकारांच्या वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर जाण्याचा एवढा मारा झाला की प्रेक्षकांना ‘काकस्पर्श’ आता बघण्यापासून दुसरा पर्याय नाही, असंच वाटायला लागलं. ‘काकस्पर्श’ प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचीही मानसिकता थोडी लक्षात घ्यायला हवी. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. मराठी तर जाऊदे पण चांगला हिंदी चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळाला नव्हता. ‘आयपीएल’च्या ‘ओव्हरडोस’नं प्रेक्षकही कंटाळले होते. थोडक्यात प्रेक्षकांना आपल्या खिशातले पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन काहीतरी चांगलं पाहायचं होतं. त्यामुळे एखाद्या कलाकृतीच्या यशामध्ये त्याच्या प्रदर्शनाचं ‘टायमिंग’देखील किती महत्त्वाचं असतं, ते या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘काकस्पर्श’च्या यशाला कारणीभूत असलेल्या या काही तांत्रिक गोष्टी. परंतु, प्रत्यक्ष कलावंतांची कामगिरीही तितकीच लक्षणीय होती. गिरीश जोशीसारखा चांगला लेखक या कलाकृतीमुळे झळाळून निघाला हे खूप चांगलं झालं. ज्या पटकथेसाठी सचिन खेडेकर आणि गिरीश जोशी यांनी निर्मात्यांचे उंबरठे झिजवले, तीच कलाकृती एवढी लोकप्रिय ठरली. ज्या चित्रपटाच्या पटकथेत गाणी कुठं आहेत, असा प्रश्‍न दिग्दर्शक महेश मांजरेकरांना पडला होता. त्याच मांजरेकरांना प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी त्याची ध्वनीफित प्रकाशित करावी लागली. खरोखरीच या चित्रपटसृष्टीत कसलेही आडाखे बांधता येत नाहीत. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर या दोन नावांशी आता विश्‍वासाचं नातं जोडलं गेलंय. या विश्‍वासाला ही जोडी जागल्यामुळे ही कलाकृती खरी बनली. ‘बॉक्स ऑफिस’साठी ओढून ताणून कराव्या लागणार्‍या क्लृप्त्या त्यात नव्हत्या. जे काही होतं ते प्रामाणिक होतं. ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ होतं. हीच गोष्ट कदाचित प्रेक्षकांना भावली असावी. अशा कलाकृती आता वारंवार बनाव्यात एवढीच अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे. - मंदार जोशी --------------

Saturday, June 16, 2012

‘स्टार्स’ जमीन पर...

‘पुढारी’च्या बहार पुरवणीमधील माझा ताजा लेख -------- ‘स्टार्स’ जमीन पर... ------- गेल्या आठवड्यात एक आक्रीत घडलं. दिबाकर बॅनर्जीच्या ‘शांघाय’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच समीक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अक्षरशः खिरापत वाटल्यासारखे ‘स्टार्स’ समीक्षकांकडून वाटले गेले. विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रांनी तर या चित्रपटावर अधिकच आपली कृपानजर केली. चार ‘स्टार्स’च्या खाली ‘स्टार’ देणे हा गुन्हा आहे, असं समजून सर्वांनी ‘स्टार्स’ वाटले. या चित्रपटाची परीक्षणं वाचताना अनेक वेळी दिबाकर बॅनर्जीला या मंडळींनी व्ही. शांताराम, सत्यजित रे, विजय आनंद यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रांगेतच नेऊन बसवलंय, त्याचा भास झाला. इम्रान हाश्मी या कलाकाराचा अभिनय किती ‘ग्रेट लेव्हल’ला गेलाय, अशी धक्कादायक मनोरंजक माहितीदेखील वाचायला मिळाली. सर्वसाधारणपणे समीक्षकही माणूस असल्यामुळे त्याच्याही आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे बहुतेक चित्रपटांबाबत समीक्षकांमध्ये कधीच एकमत आढळत नाही. कोण दोन स्टार देतो, तर कोण तीन... पण ‘शांघाय’बाबत अतिरेकच घडला. आता एवढ्या तार्‍यांचा मारा झाला असताना ‘शांघाय’ किमान हिट तरी होणं आवश्यक होतं. पण झालं भरलंच. हा चित्रपट प्रदर्शनानंतर जेमतेम ३० टक्के व्यवसाय करू शकला आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिसवर’ १५ टक्क्यांचीही मजल मारता आलेली नाही. ‘शांघाय’ला या मिळालेल्या ‘स्टार्स’ची पान पान भरून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही करण्यात आली. परंतु, तरीदेखील त्याचा परिणाम काही प्रेक्षकांवर झाला नाही. एकीकडे ‘शांघाय’ला नाकारणार्‍या प्रेक्षकांनी अक्षयकुमारच्या ‘रावडी राठोड’वरील प्रेमात थोडीही कुचराई केली नाही. या चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. तेव्हा प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच हवंय, अशीही ओरड काहींनी केली. थोडं तटस्थपणे या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहायला गेल्याचं ठरवल्यास काही वेगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. इंग्रजी समीक्षकांची मानसिकताच अनेकदा समजत नाही. कोणत्याही इंग्रजी वर्तमानपत्रामधील समीक्षा वाचून संबंधित चित्रपटाचा कसलाच अंदाज प्रेक्षकाला बांधता येत नाही. दिबाकर बॅनर्जीचा ‘ओये लक्की लक्की ओये’ या साधारण चित्रपटालाही समीक्षकांनी यापूर्वी डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे ‘शांघाय’ हा चित्रपट मी या इंग्रजी समीक्षकांसमवेतच पाहिला आणि बर्‍याच दृश्यांमध्ये माझ्याकडून कसलीच प्रतिक्रिया येत नसताना ही इंग्रजी समीक्षक मंडळी टाळ्या वाजवत होती, अधूनमधून ओरडत होती. याच वेळी मला ‘शांघाय’वर ‘स्टार्स’चा वर्षाव होणार असल्याचा अंदाज आला होता आणि शेवटी तो खरा ठरला. ‘शांघाय’ हा निश्‍चितच एक वेगळा चित्रपट आहे. परंतु, तो सर्वसामान्य प्रेक्षकाच्या डोक्यावरून जातो, हे सत्य नाकारता येत नाही. अलीकडच्या काळात चित्रपट समीक्षेत कोणते मुद्दे मांडलेत यापेक्षा त्याला कोणी किती ‘स्टार्स’ दिलेत, याला अधिक महत्त्व आलंय. ‘स्टार्स’चं हे महत्त्व एवढं ठसलं गेलंय की हल्ली प्रेक्षकवर्गदेखील चित्रपटाची समीक्षा वाचण्याच्या फंदात पडत नाही. चित्रपटाला मिळालेले ‘स्टार्स’ पाहून तो ते वाचायचं की नाही, याचा निर्णय घेतो. चित्रपटसृष्टीतील मंडळीदेखील या ‘स्टार्स’च्या संख्येला अधिक महत्त्व देतात. आपल्या प्रतिस्पर्धी गटातील कलावंताच्या चित्रपटाला कमी स्टार्स मिळाले की ही मंडळी आनंदतात. परंतु, आपल्याही आयुष्यात एखादा शुक्रवार येणार आहे, याची आठवण त्यांना त्यावेळी तरी होत नाही. मराठीत अजूनपर्यंत समीक्षणाच्या ‘स्टार्स’ला तेवढं महत्त्व आलेलं नाही हे खरंय. परंतु, हा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. मराठीत हल्ली वर्तमानपत्रांपेक्षा मुंबईतील एका खासगी एफ.एम. केंद्रावरील समीक्षेला अधिक महत्त्व आलंय. त्यामागचं कारण म्हणजे या एफएम वाहिनीचा ‘आरजे’ आपलं रेटिंग किमान तीन या आकड्यापासून सुरू करतो. त्यामुळे हल्ली निर्माते मंडळींचा तो एक आधारस्तंभ बनल्याचं बोलंय जातं. त्याच्या आगमनाखेरीज ‘प्रेस शो’ सुरू केला जात नाही. गेल्या दोन एक वर्षातलं सर्वसाधारण ‘ऍव्हरेज’ काढायचं झालं तर या ‘आरजे’नं बहुतेक चित्रपटांना किमान तीन ते चार स्टार्स दिले आहेत आणि बहुतांशी चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे हे खरंय. परंतु, अशा पद्धतीनं चित्रपटांना पाठिंबा मिळणं हेदेखील गैर नाही का ? थोडक्यात ‘शांघाय’च्या निमित्तानं चित्रपट समीक्षा ही गांभीर्यानं घ्यावी का, याचा विचार करण्याची वेळ आलीय. त्यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे समीक्षकांच्या लेखनाचा दर्जा आणि अनुभव. वर्तमानपत्रामधील सर्वात दुर्लक्षित अंग म्हणजे चित्रपट पत्रकारिता आहे. अशाप्रकारच्या पत्रकारितेसाठी गुणवत्ता असावी लागते, याचा विसर माध्यमांनाच पडला आहे. त्यामुळे समीक्षकाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची गुणवत्ता तपासली जात नाही आणि मग नंतर अपघात घडतात. अनेकांच्या मते चित्रपट समीक्षा ही आता कालबाह्य गोष्ट झाली आहे. आताचा प्रेक्षक हुशार आणि सुजाण आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याचा संबंधित चित्रपट पाहावा की नाही, याबद्दल निर्णय झालेला असतो. एखादा प्रेक्षक जर सलमान खान आणि आमिर खानचा चाहता असेल तर त्याच्या दृष्टीनं समीक्षकाच्या समीक्षेला फारसं महत्त्व नसतं. समीक्षा नकारात्मक असली तरी तो चित्रपटगृहात जाऊन संबंधित चित्रपट पाहतोच. तसेच चित्रपट समीक्षेबद्दल चित्रपटसृष्टीमधील मंडळींकडून येणारा कौल हा सापेक्ष असतो. ज्याच्या चित्रपटाबद्दल चांगली समीक्षा प्रसिद्ध झाली असते, तेव्हा तो सातव्या अवकाशात असतो आणि समीक्षकांकडून टीकेचा भडिमार होतो तेव्हा माध्यमांमधून चित्रपट समीक्षा हा प्रकारच रद्द केला जावा, अशी मागणीही करायला तो मागेपुढे पहात नाही. - मंदार जोशी ----------

Saturday, December 3, 2011

जीवनातला आनंद गेला...


जीवनातला आनंद गेला...
देवसाहेबांच्या काही चांगल्या मुलाखती मला घेता आल्या. एक जबरदस्त कलाकार आणि माणूस म्हणजे देव आनंद. थोड्याच वेळात देवसाहेबांबरोबरचे माझे काही वेगळे अनुभव तुमच्याशी शेअर करतो.

क्रेझ ‘कोलावेरी डी’ची


-------
क्रेझ ‘कोलावेरी डी’ची
-------------
‘सातवे आसमान पे’ याचा खरा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल तर त्यानं तमीळ स्टार धनुषला जाऊन चेन्नईला भेटावं. हा धनुष काही दक्षिणेतला फार मोठा कलाकार नाही. २८ वर्षांच्या या कलाकारच्या नावावर काही जेमतेम बरे चित्रपट जमा आहेत. किंबहुना सुपरस्टार रजनीकांतचा जावई अशीच त्याची आजवरची ओळख आहे. परंतु, त्याची ही ओळख आता जुनी झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते अवघ्या पंधरवड्यापूर्वी आलेलं ‘कोलावेरी डी’ हे गाणं. एवढ्या कमी कालावधीत या गाण्याला ‘यू ट्यूब’वर सुमारे एक कोटी हिट्स मिळाल्या आहेत. हा आजवरचा उच्चांक मानला जातोय. फेसबुक, ट्विटरवरही हे गाणं सध्या फिरतंय. खासगी एफएम स्टेशन्सच्या आरजेंनी तर या गाण्याला उचलून धरलंय. दर तासाला प्रत्येक स्टेशनवर हे गाणं वाजवलं जातंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते खेडेगावातील एखादा अशिक्षितापर्यंतचा फॅनवर्ग या गाण्याला मिळालाय. असं भाग्य एखाद्याच गाण्याला किंवा गायकाला लाभतं.

आगामी ‘थ्री’ या तमीळ चित्रपटामधील हे गाणं आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्‍वर्या रजनीकांतनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते अनिरूद्ध रवीचंदर या नव्या दमाच्या संगीतकारानं. सध्या तरुणाईची ओढ ही स्थानिक भाषेऐवजी इंग्रजीकडे अधिक आहे. त्यामुळेच हल्लीच्या गाण्यांमध्ये इंग्रजीचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ‘हिंग्लिंश’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘मिंग्लिश’ (मराठी आणि इंग्रजी) हा प्रकार आजवर माहित होता. परंतु, या गाण्याच्या निमित्तानं ‘तंग्लिश’ (तमीळ आणि इंग्लिश) हा नवीन प्रकार रूढ झाला आहे. हे गाणं खुद्द धनुष यानं लिहिलं आणि गायलं आहे. एका प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या मनातील भावना या गाण्यात व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक धनुष हा काही ‘प्रोफेशनल’ गायक किंवा गीतकार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यानं स्वतःची ओळख बाथरूम सिंगर अशीच करून दिली आहे. तसेच अभिनेता हीच आपली खरी ओळख असून काव्यलेखन हे आपण फावल्या वेळेत करतो, असंही त्यानं म्हटलं आहे. परंतु, त्याच्या या फावल्या वेळातील कामगिरीनं त्याला अभूतपूर्व असं यश आणि स्टारडम मिळवून दिलं आहे. खुद्द धनुषला या गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे मोठा धक्का बसला आहे. परंतु, त्यानंही विनम्रपणे हे गाणं आपल्या हातून घडून गेल्याची कबुली दिलीय. या गाण्यातील शब्द हे रोजच्या वापरातील आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे गाणं आपलं वाटण्यासाठी एखादा ‘रॉ’ आवाज निर्माता-दिग्दर्शकाला हवा होता. त्यामुळेच गायनात फार मोठी मजल न मारलेल्या धनुषचा आवाज वापरण्यात आला.

या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं ते चेन्नईमध्ये. यावेळी धनुषसह त्याची पत्नी ऐश्‍वर्या, संगीतकार अनिरूद्ध रवीचंदर आणि या चित्रपटाची नायिका श्रृती हसन उपस्थित होती. त्यावेळी यापैकी कोणालाच हे गाणं लोकप्रियतेचा इतिहास घडवेल याची कल्पना आली नव्हती. ‘कोलावेरी डी’ची लोकप्रियता सध्या एवढी वाढलीय की त्याच्या व्यापारीकरणासही सुरुवात झाली आहे. ‘कोलावेरी डी’ हा शब्द असलेले टी शर्टस् लवकरच बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असला की निर्मात्यांतर्फे चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा एक भाग म्हणून अशाप्रकारच्या कल्पना लढविल्या जातात. परंतु, एखाद्या गाण्याला मिळालेलं यश पाहून बाजारधुरिणांकडूनच निर्मात्यांना अशाप्रकारचं ‘मर्चंडायजिंग’ करण्याची गळ घातली गेली आहे.

या गाण्याची चाल इतकी सहजसोपी आणि ‘कॅची’ आहे की अनेकांना ते ऐकताना त्यावर नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. ‘यू ट्यूब’वर या गाण्याचे मेकिंग ‘पोस्ट’ झाले आहे. प्रत्यक्षात चित्रपटामधील गाणं अजून कोणालाही पाहायला मिळालेलं नाही. परंतु, तरीदेखील काहींनी या गाण्यावर स्वतः नृत्य करीत त्याचे व्हिडीओज ‘यू ट्यूब’वर अपलोड केले आहेत आणि त्यालादेखील इंटरनेटवर भरपूर हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे चिनी, जपानी लोकांनाही हे गाणं खूप भावलं आहे. नायकानं गायलेली गाणी हिट होण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झालाय. अमिताभचं ‘मेरे अंगनेमें’ हे गाणं गाजलं आणि नायकांचा आवाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. अभिनेता आमिर खानच्या ‘आती क्या खंडाला’ (चित्रपट ः गुलाम) या गाण्यानंही साधारण १२-१३ वर्षांपूर्वी मोठी लोकप्रियता मिळवली. परंतु, अवघ्या १५ दिवसांमध्ये ‘कोलावेली डी’नं जो झंझावात घडवला, तो अभूतपूर्वच म्हणायला हवा. ‘कोलावेरी’चे शब्द आणि त्याला संगीतकारानं दिलेली चाल ही काही गीत-संगीताच्या दृष्टीनं ‘ग्रेट’ नाही. परंतु, रसिकांना कधी काय आवडेल, याचा भरवसा नसतो. ‘कोलावेरी डी’नं हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. आता पाहूया, प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं किती धमाल उडवून देतंय ते.
- मंदार जोशी
----------------

Tuesday, July 19, 2011

नटसम्राट


नटसम्राट
---------
"नटसम्राट' हे नाटक साकारण्याची प्रत्येक प्रतिभावंत कलावंताची इच्छा असते. परंतु, "नटसम्राट' न साकारताही नीळकंठ कृष्णाजी फुले नावाचा एक कलाकार "नटसम्राट' बनला. प्रेक्षकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं. एवढं की खलनायकी व्यक्तिरेखांमुळे स्त्रियांचा अनेकदा रोषही त्यांना पत्करावा लागला. भूमिका कोणतीही द्या, तिचं सोनं करण्याची खात्री देणारा हा कलावंत होता. पुढारी, पाटील, सावकार, बॅंक-साखर कारखाना चेअरमन... या भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. एका कलावंतामध्ये किती वेगवेगळी रूपं दडलेली असतात, याचं ते सर्वोत्तम उदाहरण होते.

निळूभाऊंचा जन्म म्हटला तर एका सामान्य कुटुंबातला आणि म्हटला तर एका असामान्य कुटुंबातला. कारण, त्यांच्या घराण्याचं मूळ थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी निगडीत. निळूभाऊंचं एकत्र कुटुंब. घरात सख्खी अकरा भावंडं. त्यांचं बालपण गेलं ते मध्यप्रदेश आणि विदर्भात. घरचं वातावरण स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल होतं. निळूभाऊंचे वडील भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक होते. चित्रपटाशी निळूभाऊंचा संबंध आला तो खामगावमध्ये. इथंच त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला चित्रपट पाहिला. परंतु, त्यावेळी त्यांना या क्षेत्रामध्ये आपली मोठी कारकीर्द घडेल, असं काही वाटलं नव्हतं. 1945 मध्ये निळूभाऊ पुण्यात आले. सेवादलाशी संलग्न असलेल्या बाबूराव जगताप यांचं मार्गदर्शन यावेळी त्यांना लाभलं आणि तिथून ते सेवादलाच्या कार्याशी निगडीत झाले. सुरुवात केली ती कलापथकापासून. कालांतरानं या पथकाचे ते प्रमुखही झाले. सेवादलातल्या भाऊसाहेब रानडे यांच्याकडून ते बरंच काही शिकले. ग. प्र. प्रधान यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. इथं काम करत असताना निळूभाऊंना पहिल्यांदा नट होण्याची इच्छा झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुढं शिकण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यांनी आर्मड्‌ फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात माळ्याची नोकरी स्वीकारली. ही नोकरी त्यांनी अवघ्या 80 रुपये मासिक पगारावर तब्बल दहा वर्षं केली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात निळूभाऊंनी "येरा गबाळ्याचे काम नोहे' या वगलेखनापासून केली. पु. ल. देशपांडे यांच्या "पुढारी पाहिजे'मधील त्यांनी साकारलेली रोंग्याची भूमिका खूप गाजली. या नाटकाचे सहा वर्षांत तब्बल सहाशे प्रयोग झाले. याचवेळी त्यांनी "बिनबियांचे झाड', "कुणाचा कुणाला मेळ नाही' यासारख्या नाटकांमधूनही कामं केली. मा
त्र, त्यांच्यात दडलेल्या उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडलं ते "कथा अकलेल्या कांद्याची' या वगनाट्यामधून. यातील भजनवल्ली अविचतरावांच्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. निळूभाऊंच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणास हेच वगनाट्य कारणीभूत ठरलं.

निळूभाऊंच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेलं वर्ष म्हणजे 1964. या काळात समाजवादी पक्षात दुफळी माजली. वाराणशीमधील अधिवेशनात बडबड झाल्यामुळे निळूभाऊ प्रचंड नाराज झाले. या अस्वस्थ मानसिकतेमधून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचं ठरविलं. पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेली चौकट त्यांना परिस्थितीमुळे मोडावी लागली. पुढे विख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी ही भूमिका पाहून "एक गाव बारा भानगडी'मधील झेलेअण्णांची व्यक्तिरेखा निळूभाऊंना दिली. या भूमिकेनं पुढं इतिहास घडविला आणि निळूभाऊंच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरली. अर्थात, ही भूमिका यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी तेवढेच कष्ट घेतले. भूमिकेत घुसण्याचं कसब त्यांना पहिल्यापासूनच साधलं होतं. "एक गाव...'चे लेखक शंकर पाटील यांची मदत घेत निळूभाऊंनी या व्यक्तिरेखेची तब्बल आठ-दहा वर्षं रंगीत तालीम केली. भूमिकेमधील इब्लिसपणा, संवादांमधील मोक्‍याच्या जागा, अचूक संवादफेक, चेहऱ्यावर सतत बदलत जाणाऱ्या हावभावांमुळे निळूभाऊ प्रत्येक भूमिकेवर स्वार झाले आणि प्रेक्षकांचं तब्बल चार दशके त्यांनी मनोरंजन केलं. या चार दशकांच्या प्रवासात त्यांनी जवळपास 140 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1970 ते 1990 ही दोन दशकं निळूभाऊंनी साकारलेल्या पाटीलकीनं गाजवली. "सामना', "सिंहासन', "चोरीचा मामला', "शापीत', "पुढचं पाऊल' या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. "सामना'मधील हिंदुराव धोंडो पाटील या भूमिकेनं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. "सूनबाई घर तुझंच आहे' हे नाटक करीत असताना निळूभाऊंची भेट रजनी मुथा यांच्याशी झाली आणि कालांतरानं त्या त्यांच्या जीवनसाथी झाल्या.

निळूभाऊंनी नाट्यसृष्टीसाठी दिलेलं योगदानही तेवढंच महत्त्वाचं आहे. "सखाराम बाईंडर', "सूर्यास्त', "बेबी' ही नाटकं त्यांनी गाजवली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्या काळात आलिशान गाड्या नव्हत्या. साध्या बसमधून प्रवास करावा लागायचा. निळूभाऊ असा प्रवास नेहमी करायचे. एवढा मोठा कलावंत असूनही बसमध्येच ते झोपायचे. बऱ्याचदा प्रवासात बस बंद पडे. मग त्यातून उतरून दुसऱ्या ट्रक-टेम्पोमधून प्रवास करण्यासही त्यांची तयारी असे. कधीकधी बंद पडलेल्या बसला धक्का देण्याचंही काम त्यांनी केलं आहे. "डाऊन टू अर्थ' प्रकारात मोडणारा हा अभिनेता होता. जेवणा-खाण्याचे कसलेही चोचले नसत. एखाद्या गावात शूटिंग असलं की कोणत्याही घरातली मीठभाकरी त्यांना चाले.

अभिनयाबरोबर निळूभाऊ रमले ते समाजकारणात. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी पक्षाचं त्यांनी मनापासून काम केलं. राजकारणात त्यांची स्वतःची अगदी ठाम मतं होती. राजकारणात गेलं की माणूस निगरगट्ट होतो, हे त्यांच्या मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं होतं. म्हणूनच कोणतंही पद न घेता ते आनंदानं तिसऱ्या फळीत राहायचे. निवडणुकांदरम्यान ते गावोगाव फिरायचे. उत्तम भाषणं करून सभा जिंकण्यात तर त्यांना खूपच आनंद मिळायचा. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली. परंतु, बोफोर्स प्रकरणात अमिताभचं नाव गोवलं गेल्यानंतर त्याच्याविरूद्ध निवडणुकीत प्रचार करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक समाज, हमाल पंचायत चळवळ, शेतमजूर, देवदासी आदींसाठी त्यांनी मदत केली. नाटकांच्या प्रयोगामधून मिळणारं उत्पन्न ते सामाजिक कृतज्ञता निधीत जमा करायचे आणि पुढे त्याचा उपयोग त्यांनी समाजपयोगी कामांसाठीच केला.

निळूभाऊंनी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर हिंदी चित्रपटांमधूनही काही भूमिका केल्या. बहुसंख्य कलाकार आपल्यातल्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु, निळूभाऊ त्यालाही अपवाद ठरले. "मला हिंदी नीट बोलता येत नाही,' असं प्रांजळ कथन त्यांनी केलं होतं. तरीदेखील त्यांना भरपूर हिंदी चित्रपट मिळाले. परंतु, या ग्लॅमर दुनियेत ते फारसे रमले नाहीत. मुंबईतल्या जुहू किंवा लोखंडवालासारख्या आलिशान वस्तीत त्यांना राहणं सहज शक्‍य होतं. परंतु, त्यांनी शहरातला आपला बाडबिस्तारा आवरून निसर्गरम्य अशा ठिकाणी आपलं वास्तव्य केलं. ज्या माळीकामापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ते माळीकाम आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सुरू ठेवलं. लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही त्यांच्या डोक्‍यात कधी हवा गेली नाही. त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते. एखाद्या कार्यक्रमाला गेले की रिक्षातून उतरल्यानंतर स्वतः ते सहजतेनं पैसे देत. निळूभाऊ नट म्हणून मोठे होते की माणूस म्हणून हा प्रश्‍न अनेकांना पडला. अर्थात त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही.
- मंदार जोशी
-----------------
निळू फुले जीवनपट...
जन्म ः 1930
मृत्यू ः 13 जुलै 2009
उल्लेखनीय चित्रपट ः एक गाव बारा भानगडी, सामना, सोबती, चोरीचा मामला, सहकार सम्राट, सासुरवाशीण, पिंजरा, शापीत
उल्लेखनीय नाटके ः सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, बेबी
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः बागकाम
आवडते कलाकार ः नसिरुद्दीन शाह, ओमपुरी

Monday, July 4, 2011

कधी जात्यात; कधी सुपात

कधी जात्यात; कधी सुपात

यशाच्या कैफात धुंद होऊन विजेत्यांना डोक्‍यावर घेण्याची आणि अपयशाचं चक्र आलं की पराभूतांचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आजही आपल्याकडे कायम आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग आला. यावेळी बहुतेकांनी मराठी चित्रपटांच्या वाट्याला सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मराठी चित्रपटसृष्टीचं आता काही खरं नाही, असा टोकाचा सूरही लावला. काही दिवस जातायत न्‌ जातायत तोच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याची बातमी आली आणि याच मंडळींचा बोलण्याचा सूर पुन्हा बदलला. मराठी चित्रपटसृष्टीची ही सर्वाधिक चांगली "फेज' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लगोलग कलाकारांचे सत्कार होऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीबद्दल चर्चासत्रंही आयोजित होऊ लागली. त्यापुढे मजल मारत काही बालकलाकारांना घरं मिळवून देण्यासाठी "मीडिया'नं पुढाकार घेतला आणि काही नगरपालिकांनी कागदोपत्री घोडे नाचवत, तशी घरं मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. थोडक्‍यात, मराठी चित्रपटसृष्टी कधी जात्यात; तर कधी सुपात असते. एवढ्या टोकाचा भाबडेपणा आपल्याकडे सातत्यानं पाहायला मिळतोय आणि तोच आपल्या प्रगतीला मारक ठरतोय.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मिळविलेलं यश हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे; परंतु त्या यशाचं कौतुक करताना इतर गोष्टींचं अवमूल्यन होता कामा नये, याची काळजी आपण सध्या घेताना दिसत नाही. मल्याळी, कानडी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांमधील मक्तेदारी आपण मोडून काढल्याचा आपल्याला अभिमान वाटतो; मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मल्याळी चित्रपटात कोणता विषय मांडलाय, हे जाणून घेण्यासही आपण इच्छुक नसतो. चित्रपट माध्यमावर मनापासून प्रेम करणारी मंडळीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतरांनी काम चमक दाखविलीय, याकडे लक्ष देत नाहीत. अर्थात, सरकारी यंत्रणाही त्याला तेवढीच जबाबदार आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट आपल्याकडे चित्रपटगृहांमधून क्वचितच प्रदर्शित केले जातात. "टीआरपी'च्या मागं लागलेल्या वाहिन्यादेखील अशा चित्रपटांना भीक घालत नाहीत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे आपल्याला समजतच नाही.

मराठी चित्रपटांपुढची आता सर्वात मोठी समस्या आहे ती वितरणाची आणि प्रसिद्धीची. अजूनही आपल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्‍स आणि "सिंगल स्क्रीन' चित्रपटागृहांमध्ये चांगला वेळांचे "शोज' मिळत नाहीत; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्याचे आघाडीचे मराठीमधील अभिनेते आपला चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की राजकीय पक्षांना हाताशी धरतात. आपल्या चित्रपटाला कसे चांगले "शोज' मिळाले नाहीत, याबद्दल ते वातावरण गरम करतात. परंतु प्रदर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्ये आपला चित्रपट "बॉक्‍स ऑफिस'वर नरम पडला की पुढचा चित्रपट येईपर्यंत हे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक शांत बसतात. अशानं मराठी चित्रपट कसा काय पुढं जाणार? मराठी चित्रपटांच्या योग्य प्रदर्शन आणि वितरणासाठी ना राज्य सरकारवर दबाव टाकला जातो ना वितरक, प्रदर्शकांवर. त्यामुळे चांगला चित्रपट असूनही त्याला योग्य वेळेचे "शोज' मिळत नसल्याची खंत आपल्याला प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. काही राजकीय पक्षांनी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत, असं म्हणतात; परंतु या प्रयत्नांचा वरील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपयोग झाल्याचं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले काही मराठी चित्रपट अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची वाट पाहताहेत. अशा चित्रपटांवर पुरस्कारांबरोबरच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्या दिवसाची आता आपण वाट पाहायला हवी.