Monday, May 19, 2008

ंएक डाव भूतनाथचा


"भूतनाथ' हा हॉररपट नाही की तो पूर्णतः बालपटही नाही. निर्माते रवी चोप्रा आणि दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजनाचा एक छान डाव मांडलाय आणि तो मस्त जमलाय. सात-आठ वर्षांचा एक निरागस मुलगा आणि एका भुताच्या मैत्रीवर हा चित्रपट आधारलाय. एखाद्या बऱ्यापैकी कल्पनेला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची जोड लाभल्याचा परिणाम म्हणजे "भूतनाथ'. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची आणखी एक दमदार अदाकारी आणि छोट्या अमन सिद्दिकीनं त्यांच्या तोडीस तोड केलेली कामगिरी, हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशय ही "बी. आर. फिल्म्स'ची खासियत. हा सिनेमा या चौकटीत अगदी "फिट' बसणारा आहे. मात्र सामाजिक आशय शोधताना लेखक मंडळींनी विनाकारण "बागबान' आणि "बाबुल'ची पुन्हा एकदा री ओढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे शेवटच्या काही रिळांमध्ये हा सिनेमा अगदी ढेपाळलाय. शेवटी रडा सूर लावण्याऐवजी भुताच्या आणखी काही गमतीजमती दाखविल्या असत्या तर धमाल आली असती. तरीदेखील तत्पूर्वीच्या चांगल्या कामगिरीसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.चित्रपटाचं कथानक गोव्यातील एका भूतबंगल्यात घडतं. हा बंगला कैलाशनाथांच्या (अमिताभ बच्चन) मालकीचा असतो. या बंगल्यात त्यांचा अतृप्त आत्मा वावरत असतो. मुलाची विदेशी स्थायिक होण्याची गोष्ट त्यांना पचलेली नसते. म्हणूनच या घरात राहायला येणाऱ्यांना सळो की पळो करून सोडणं एवढंच त्यांचं काम असतं, पण बंकू (अमन सिद्दिकी) हा आठ वर्षांचा मुलगा त्यांचं मन जिंकतो. मैत्रीचं नवं नातं फुलवून तो या भुताला आपल्या गतायुष्यात डोकवायला लावतो. पदार्पणाचा चित्रपट असूनही दिग्दर्शक विवेक शर्मा यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. मुख्य म्हणजे सुरुवातीपासून हा चित्रपट आपली घट्ट पकड निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय. कैलाशनाथ या भुत
ाभोवती पहिल्या काही रिळांमध्ये छान रहस्य निर्माण केलंय. त्यानंतर आपल्याला सारं जग घाबरतं आणि हा बंकू घाबरत नाही, म्हणजे काय? असा या भुताचा आविर्भाव चित्रपटात विनोदाचे रंग भरतो. त्यानंतर या भुतानं बंकूबरोबर शाळेत जाऊन केलेली धमाल मस्त जमलीय. दिग्दर्शकानं हाच "ट्रॅक' आणखी काही वेळ पुढं सुरू ठेवायला हरकत नव्हती, पण बहुधा याच वेळी निर्माते रवी चोप्रा यांना आपल्या बॅनरची परंपरा आठवली असावी. म्हणूनच सगळं काही छान सुरू असताना हा चित्रपट भुताच्या भूतकाळात डोकावतो. "बागबान'प्रमाणेच या सिनेमातही चोप्रांनी अमिताभच्या व्यक्तिरेखेला झुकतं माप देताना त्याच्या मुलांना काळ्या रंगात रंगवलंय. परंपरा, संस्कृतीला प्राधान्य देण्याच्या नादात श्राद्धासारखा प्रकारही चित्रपटात थोडा अधिकच विस्तारानं आलाय.पटकथा चांगली असली की अमिताभ बच्चन खुलतात असा आजवरचा अनुभव आहे. या चित्रपटात नेमकं हेच घडलंय. लेखकानं लावलेला "सा' जमल्यानं पुढची सरगम प्रभावीपणे पूर्ण करण्याचं काम या कलाकारानं केलंय. त्याला तेवढीच साथ छोट्या अमन सिद्दिकीनं केलीय. तो अत्यंत सफाईनं कॅमेऱ्याला सामोरा गेलाय. त्याची उत्स्फूर्तता आणि डोळ्यातील गहिरे भाव पाहण्यासारखे आहेत. या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे जुही चावला. विनोदी बाजाची भूमिका म्हणजे जुहीच्या हातचा मळ. यातली बंकूची आई तिनं छान रेखाटलीय. शाहरूख खानच्या वाट्यालाही चांगली 20-25 मिनिटं आलीत. फक्त राजपाल यादवच्या वाट्याला अगदीच दुय्यम भूमिका आलीय. या जमलेल्या मैफलीला धक्का लागलाय तो विशाल-शेखर यांच्यामुळं. अमिताभच्या आवाजातली दोन्ही गाणी फसली आहेत.

No comments: