Thursday, July 3, 2008

इम्रान खान interview

अभिनेता आमीर खानचा भाचा या एका ओळखीमुळं इम्रानबद्दल अनेकांना मोठ्या आशा आहेत. आमीरची चुलत बहीण नुझत खान यांचा तो मुलगा आहे. "जाने तू या जाने ना' प्रदर्शित होण्यापूर्वीच इम्रानला आणखी दोन सिनेमे मिळाले आहेत. चित्रपट माध्यमाबद्दलची आपली मतं, आमीर आणि आपल्या करियरबद्दलची त्याची ही निरीक्षणं.
-------------
ः "जाने तू...'मध्ये जयसिंग राठोड असं नाव असलेल्या तरुणाचा "रोल' मी साकारतोय. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्याचा विश्‍वास आहे. "टिपिकल' हिंदी चित्रपटांमधला तो "हीरो' नाही. तो एखाद्या उद्योजकाचा मुलगा नाही. मध्यमवर्गात तो वाढलेला असतो. फॅन्सी कपडे घालण्याची त्याला आवड नाही की त्याच्याजवळ बाईकही नाही. त्याचं हे सीधंसाधं असणं मला फार आवडलं. चित्रपटसृष्टीत मी आलो ते दिग्दर्शक बनायला. कारण "हीरो'साठी आवश्‍यक असलेली "मसल पॉवर' माझ्याकडं नाही. पण अब्बास टायरवालानं या सिनेमातली जयसिंगची व्यक्तिरेखा ऐकवल्यानंतर मी अभिनय करण्याचा मोह आवरू शकलो नाही. तारुण्य हा या सिनेमाचा "यूएसपी' आहे. विशी-पंचविशीच्या घरातल्या आम्ही मंडळींनी एकत्र येऊन हा सिनेमा केलाय. "फॉर यंग पीपल, बाय यंग पीपल' असंच मी म्हणेन. "कयामत से कयामत तक' हा सिनेमासुद्धा दोन दशकांपूर्वी तरुण टीमनंच केला होता आणि तो प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यामुळं तशा प्रकारच्या यशाची पुनरावृत्ती व्हावी, अशी आशा मी बाळगून आहे.
ः "जाने तू...'च्या सुरुवातीला आमीरमामू (आमीर खान) त्याची निर्मिती करीत नव्हते. काही कारणांमुळं हा सिनेमा रखडला. त्या वेळी मी आणि या सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास टायरवाला मोठ्या टेन्शनमध्ये होतो. अर्थात, सिनेमा रखडणे हा प्रकार काही आम्हाला नवीन नव्हता. इथे कोणतीच गोष्ट वेळेत होत नाही. कागदावर सर्व काही ठरवलेलं असतं; पण अचानक पाऊस येणं, सेटवर अपघात होणं, कलाकारांच्या एकत्रित "डेटस्‌' न मिळणं... अशा काही गोष्टी असतात की, त्याला कोणी काहीच करू शकत नाही.
ः अशी विपरीत स्थिती असतानाही माझा अब्बासवर आणि त्याचा माझ्यावर पूर्ण विश्‍वास होता. आम्हा दोघांनाही कसल्याही परिस्थितीत हा सिनेमा पूर्ण करायचा होता. आमीरमामूंनी मला चित्रपटसृष्टीत "ब्रेक' देण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केली, अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे. मात्र ती साफ खोटी आहे. कारण आमीरमामू कधीच "इमोशनली' निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडं जेव्हा आम्ही या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी प्रथम "स्क्रीप्ट' ऐकव असं सांगितलं. आमच्या सुदैवानं त्यांना ही "स्क्रीप्ट' खूप आवडली. या वेळी त्यांनी मला दोन प्रश्‍न विचारले. एक होता, इम्रान, तुला ही "स्क्रीप्ट' आवडली आहे का? आणि दुसरा होता, या पटकथेवर अब्बास एक चांगला सिनेमा बनवू शकेल, याची तुला स्वतःला खात्री आहे? या दोन प्रश्‍नांची माझ्याकडून होकारार्थी उत्तरं ऐकल्यानंतर त्यांनी "आमीर खान प्रॉडक्‍शन'तर्फे हा सिनेमा बनविण्यास होकार दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुन्हा माझी "ऑडिशन' घेतली. त्यात मी चांगला वाटल्यानंतरच त्यांनी हा सिनेमा सुरू केला.
ः आमीरमामूंना जेव्हा मी क्षेत्रात येत आहे, असं सांगितलं तेव्हा माझ्या सांगण्यावर प्रथम त्यांचा मुळीच विश्‍वास बसला नाही. एक अभिनेता बनण्यासाठी जे गुण लागतात, ते माझ्यात नाहीत, असं त्यांचं मत होतं; पण काही दिवसांनी त्यांना जाणवलं की, त्यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं तेव्हासुद्धा लोक त्यांच्याबद्दल असंच निगेटिव्ह बोलायचे. आमीरमामूंनी मला कधीही अंधारात ठेवलेलं नाही. मला त्यांनी आजपर्यंत कसल्याही "टिप्स' दिलेल्या नाहीत. "तुझा रस्ता तुलाच ठरवायचाय,' हे त्यांचं सांगणं आहे. "यशस्वी झालास तर त्याचं क्रेडिट तू स्वतःच घे आणि अपयशी ठरलास तरी तूच त्याला सामोरं जा, असं त्यांचं सांगणं असतं. त्यांच्या दृष्टीनं हा सिनेमा यशस्वी ठरणं अधिक महत्त्वाचं आहे. सिनेमा यशस्वी ठरला तर मी आपोआपच लोकांना आवडेन, हे त्यामागचं "लॉजिक' असावं.
ः "जाने तू...' प्रदर्शित होण्यापूर्वीच मला "किडनॅप' आणि "लक' हे दोन सिनेमे मिळाले आहेत. कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन ही "लक'मध्ये माझी हिरोईन आहे. "लव्ह स्टोरी 2050' या सिनेमातून हरमन पदार्पण करीत असल्यामुळं त्याच्याबरोबर माझी स्पर्धा असल्याचं चित्र सध्या "मीडिया'तून रंगवलं जातंय. पण तसं करणं योग्य ठरणार नाही. कारण आम्ही दोघं काही शंभर मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतलेला नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेत फक्त एकच विजेता असतो. आमच्याकडे मात्र सगळ्यांना संधी आहे. भविष्यात मला दिग्दर्शक बनायचं असलं तरी सध्या अभिनयावरच मी लक्ष केंद्रित केलंय.

No comments: