Wednesday, July 23, 2008

"कॉन्ट्रॅक्‍ट' review

हुकमाचा एक्काही कामी !
"सरकार राज'ला बऱ्यापैकी आकार देण्यात रामगोपाल वर्मांना यश आल्यानं हा दिग्दर्शक पुन्हा माणसात येतोय, असं वाटत होतं. मात्र, "कॉन्ट्रॅक्‍ट' पाहिल्यानंतर तसं काही झालं नसल्याची खात्री पटते. गेल्या काही वर्षांमध्ये वर्मांनी आपल्या चित्रपटांमधून बरेच प्रयोग केले. "गॅंगवॉर'पट सोडले तर त्यांचे बहुतेक सर्व प्रयोग फसले. "सत्या', "कंपनी'नंतर वर्मांनी "कॉन्ट्रॅक्‍ट' बनवला तो गॅंगवॉरपटांची त्रिधारा पूर्ण करण्यासाठी. या विषयात त्यांची मातब्बरी असल्यानं "कॉन्ट्रॅक्‍ट'द्वारे ते निराश करणार नाहीत, असं वाटत होतं. पण, सूर हरवलेल्या वर्मांचा हुकमाचा एक्काही या सिनेमात चाललेला नाही. या सिनेमात त्यांनी "अंडरवर्ल्ड'चा दहशतवादाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, एवढा स्फोटक विषय हाताळण्यासाठी आवश्‍यक तेवढी मेहनत वर्मांनी घेतलेली नाही. "रॉ स्टॉक'मधली काही दृश्‍यं जोडून एखादा सिनेमा तयार व्हावा, असा "फील' हा चित्रपट पाहताना येतो. दहशतवादाच्या मुळाशी जाण्याऐवजी वर्मांनी दोन गॅंगमधला बटबटीत हिंसाचार चित्रपटभर दाखवलाय. एका प्रतिभाशाली दिग्दर्शकाची ही उतरती भाजणी खऱ्या सिनेमा शौकिनासाठी धक्कादायक आहे.
अमन (अध्मिक महाजन) हा लष्करातून बाहेर पडलेला एक तरुण. त्याचं सळसळतं रक्त पाहून अहमद हुसेन (प्रसाद पुरंदरे) हा पोलिस अधिकारी प्रभावित होतो. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं तो ठरवतो. "आरडी' नावाच्या दहशतवादाच्या टोळीत शिरून त्याचा बंदोबस्त करण्याची योजना तो त्याच्यापुढं ठेवतो. पण, अमनला शांततेत आयुष्य जगायचं असल्यानं तो हे काम करण्यास नकार देतो. काहीच दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात अमनची पत्नी आणि मुलीचा मृत्यू होतो. आपल्या घरापर्यंत पोचलेलं हे दहशतवादाचं लोण पाहून अमन हादरतो. अहमद हुसेन यांचा "प्लॅन' तो मान्य करतो आणि गुन्हेगार बनून "आरडी'च्या टोळीत सहभागी होतो. "आरडी'चा "नंबर वन' शत्रू असलेल्या गुंगाच्या (उपेंद्र लिमये) टोळीवर तो तुटून पडतो. मात्र, सरतेशेवटी या चक्रव्यूहातून बाहेर पडणं त्याला कठीण होतं.
वर्मांचा सूर साफ हरविल्याची लक्षणं संपूर्ण "कॉन्ट्रॅक्‍ट'मध्ये पाहायला मिळतात. टोळीयुद्धाचा दहशतवादाशी संबंध जोडताना वर्मांकडून अभ्यासपूर्ण हाताळणीची गरज होती. पण, दोन गॅंगमधला रक्तरंजित हिंसाचार एवढ्यापुरताच हा सिनेमा मर्यादित राहतो. चित्रपटाचा हीरो अमन लष्करातून बाहेर का पडतो, याचे सबळ कारण सिनेमात पाहायला मिळत नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याच्या इच्छेसाठी तो "आरडी' या दहशतवाद्याच्या टोळीत शिरायला तयार होतो, असं या सिनेमात दाखविण्यात आलंय. तसेच त्याचा या टोळीतील प्रवेश अगदी लुटूपुटूचा वाटतो. आरडीचा शत्रू गुंगाला कायम समुद्रातल्या बोटीवर दाखवून दिग्दर्शकानं त्याच्या अस्तिस्तावरही मर्यादा आणल्यात. बोटीवरचे सगळेच प्रसंग अगदीच बटबटीत झाले आहेत. वर्मांमधल्या दिग्दर्शकानं आपल्या सहाय्यकांकडून तांत्रिक कामं छान करवून घेतली आहेत. पण, चांगल्या सिनेमासाठी आवश्‍यक असलेल्या पटकथेबाबत त्यांनी डोळेझाक केलीय. या चित्रपटातले संवाद अगदीच कामचलाऊ आहेत. अमनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अध्मिक महाजनचा हा पहिला चित्रपट असून त्याचं नवखेपण जाणवत राहतं. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रसाद पुरंदरे यांनी आपली चांगलीच छाप उमटवली आहे. उपेंद्र लिमये यांची व्यक्तिरेखा सुरुवातीला चांगली वाटते. पण, नंतर या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकानं जे जे चाळे करायला लावलेत, त्यामुळं तिचा प्रभाव कमी झालाय. दिग्दर्शकाला ही व्यक्तिरेखा "सत्या'मध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या भिकू म्हात्रेच्या जवळपास नेण्याची इच्छा असावी. पण, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. अमृता सुभाष यांनी आपल्या वाट्याला आलेली "लाऊड' भूमिका आणखीनच "लाऊड' केलीय. अमृता खानविलकरची भूमिका खूपच छोटी आहे. अमर मोहिले यांचं संगीत त्यातल्या त्यात बरं आहे. एकंदरीत वर्मांमधल्या दिग्दर्शकाचा असा हरवलेल
ा सूर पाहणं, ही खरोखरीच खूप तापदायक गोष्ट आहे.

No comments: