Monday, May 23, 2011

लालफितीत अडकला "शो मन'


लालफितीत अडकला "शो मन'
---------
तब्बल 35 वर्षांची निर्माता-दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द आणि "व्हिसलिंग वूडस्‌'नं जागतिक स्तरावर मिळवलेली ख्याती या दोन गोष्टी सुभाष घईंचं मनोरंजन क्षेत्रामधील मोठेपण सिद्ध करणारी आहेत. "क्‍लास'-"मास'च्या आवडीची नाडी जाणणारा आणि राज कपूर यांच्यानंतर "शो मन' ही पदवी मिळविणारा हा दिग्गज दिग्दर्शक सध्या मात्र काही कारणांमुळे अडचणीत सापडलाय. ही कारणं आणि आपल्या कारकिर्दीबद्दल घई यांनी प्रथमच परखडपणे केलेली ही चर्चा.
-------------
मुलाखतीचा पहिलाच प्रश्‍न ऐकून समोरच्याची कळी खुलावी, असं खूप कमी वेळा घडतं. पण ज्यावेळी असं घडतं तेव्हा मग मुलाखतकाराच्या वाट्याला जबरदस्त असं काहीसं येतं. सुभाष घईंशी संवाद साधताना असंच काहीसं घडलं आणि घईंच्या मनात ठसठसत असलेलं दुःख पहिल्यांदाच तीव्र स्वरूपात बाहेर पडलं. "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बॉलीवूडमध्ये मिळालेल्या चांगल्या संधी आणि या संस्थेत विदेशी विद्यार्थ्यांचा वाढत असलेला ओघ याबाबत घईंना बोलतं करायचं होतं. त्यानिमित्तानं सात वर्षांपूर्वी या संस्थेच्या पायाभरणीच्या वेळी मनात असलेल्या योजना आणि प्रत्यक्षात साकारलेलं या योजनांचं रूप आशादायी आहे का ? हा प्रश्‍न ऐकून सुभाषजी खुलले आणि त्यांच्या मनातील दुःख "नॉनस्टॉप' बाहेर पडायला सुरुवात झाली.
"" "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये राज्य सरकारची जमीन लाटून सुभाष घईंनी स्टुडिओद्वारे फक्त आपलं हित साधलं, अशाप्रकारचं जे काही जनमत तयार केलं गेलं, ते मला प्रचंड खुपणारं आहे. असे आरोप ऐकले की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण, कोणाची जमीन लाटून पैसे कमवावे, ही माझी वृत्ती नाही. मी आजवर अनेक नवोदितांना माझ्या चित्रपटातून संधी दिली. पण, मुंबईत कामासाठी येणाऱ्यांचा ओघ खूप मोठा आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाची अशी तक्रार असायची की आम्ही फिल्मवाल्यांची मुलं नसल्यामुळे आम्हांला इथं संधी मिळत नाही. ही गोष्ट मला बोचली. कलाक्षेत्रात काहीतरी करण्याच्या इच्छेनं अनेक जण मुंबईत येतात आणि त्यानंतर ते "गुमराह' होतात. त्यांना योग्य रस्ता दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय तोडीची संस्था मला उभारायची होती. त्यामुळे 1993 मध्ये चित्रपट माध्यमाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं मी स्वप्न पाहिलं. परंतु, सरकारच्या पातळीवर त्याची दखल घेण्यासाठी पुढं आणखी दहा एक वर्षं गेली आणि या संस्थेची पायाभरणी झाली ती 2004मध्ये. ही संस्था उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोरेगावच्या फाळके चित्रनगरीचे तेव्हाचे संचालक गोविंद स्वरूप यांनी पुढाकार घेतला. सरकारशी मैत्री करणंही अनेकदा धोक्‍याचं असतं, हे मला ठाऊक होतं. परंतु, स्वरूप यांच्या आग्रहामुळे चित्रनगरीत चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. यावेळी सरकारच्या जमिनीवर शैक्षणिक संस्था उभारणे आणि या संस्थेच्या विकासासाठी स्टुडिओ चालवण्याचा आम्ही करार केला. या मध्ये ही जमीन आमच्या संस्थेला विकण्यात आली, हा कुठेही उल्लेख नव्हता किंवा तसा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. प्रारंभीच्या करारानुसार एकूण 20 कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. त्यापैकी 17 कोटी माझ्या संस्थेतर्फे भरले गेले आण
ि उरलेले तीन कोटी राज्य सरकारने भरावेत, असं ठरलं. अर्थात ती रक्कमही नंतर आमच्याच संस्थेनं भरली. सर्व काही ठरलं. भूमिपूजन झालं आणि इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेतील मुद्यांवर सरकारतर्फे व्यवस्थित उत्तरे द्यायला हवी होती. राज्य सरकारच्या जमिनीचा वापर एका चांगल्या शैक्षणिक संस्थेसाठी होणार आहे, हे न्यायालयासमोर आणायला हवं होतं. मात्र तसं घडलं नाही आणि तब्बल सात वर्षं या शैक्षणिक संस्थेची प्रगती रोखली गेली. ही संस्था प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी देश-विदेशातील तब्बल 42 संस्थांना भेटी देऊन तेथील कार्यभार पाहिला आणि प्रत्येकातील चांगल्या गोष्टी हेरून त्यांचा अंतर्भाव आमच्या संस्थेत केला.''
गेल्या काही वर्षांपासून घईंचा राज्य सरकारबरोबर सातत्यानं विविध माध्यमांद्वारे संवाद सुरू आहे. परंतु, त्यातून काहीच मार्ग निघालेला नाही. मंत्री, शासकीय अधिकारी फकत गोड गोड बोलतात आणि नवनवीन आश्‍वासनं देतात. परंतु, कृतीची वेळ आली की पाठ फिरवतात असा विदारक अनुभवही घई व्यक्त करतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीची वेळ मागून आता बरेच महिने झाले आहेत; परंतु त्यांनाही याबाबत मला भेटावंसं वाटत नाही, यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही, हे स्पष्ट करून घई पुढं म्हणतात, ""या संस्थेच्या उभारणीसाठी आता जवळपास 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. मुलांच्या "फी'मधून उत्पन्न मिळत असले तरी ते एवढ्या मोठ्या "स्केल'वरची संस्था चालविण्यास अपुरे आहे. सुरुवातीला 20 एकर जमिनीवर ही संस्था विकसित करायची असं ठरलं असतानाही अवघ्या चार एकर जागेवरच आम्हांला समाधान मानावं लागलं आहे. दरवर्षी आमच्या "बॅलन्स शीट'मध्ये सहा कोटींचा तोटा आढळत आहे. "मुक्ता आर्टस्‌'द्वारे चित्रपट निर्मिती करून तेथून मिळालेला पैसा या संस्थेच्या उभारण्यासाठी आम्ही वापरत आहोत. परंतु राज्य सरकारनं एकंदरीत आम्हांला पांढऱ्या हत्तीवर बसवून आता या प्रकरणात हात वर करण्याची भूमिका घेतली आहे. एवढी मोठी गुंतवणूक केल्यामुळे मला आता दुसरीकडे जाणंही शक्‍य नाही. परंतु, आणखी किती काळ वाट पाहायची यालाही काही मर्यादा आहेत. आता आमच्या अगदी नाकातोंडाशी पाणी आलंय. जीव गुदरमला जातोय. सरकारची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत, त्याला आम्ही कसे काय जबाबदार असू शकतो ? या प्रकल्पामध्ये राज्य सरकार आमचे भागीदार असल्यामुळे मी इतकी वर्षं गप्प राहिलो होतो. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळेच पुढील काही महिन्यांमध्ये याचा निर्णय न लागल्यास नाईलाजास्तव मला राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल. एक
ीकडे मनोरंजन विश्‍वासाठी बरंच काही करण्याच्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे आशियातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक मनोरंजन शिक्षण संस्थेच्या कामात अडथळे आणले जातात, हे काही योग्य नाही.''
एवढ्या सगळ्या विपरीत गोष्टी घडत असतानाही संस्थेच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घईंनी या काळात घेतली. या संस्थेत सध्या 400 मुलं प्रशिक्षण घेत असून त्यापैकी 70 मुलं ही युरोपीय देशांमधील आहेत. इथून बाहेर पडलेल्या 70 टक्के विद्यार्थ्यांना ग्लॅमर जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी या संस्थेत अध्यापनाचं काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घईंनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना फारसं यश मिळालेलं नाही. या अपयशाचं विश्‍लेषण करताना घई म्हणतात, ""आपलं मन स्थिर असेल तर आपल्या हातून चांगलं काम घडतं. एवढ्या विचित्र मनोवस्थेत चित्रपट दिग्दर्शित करणं खरोखरच शक्‍य नाही. "व्हिसलिंग वूडस्‌'च्या उभारणी प्रक्रियेत जे अडथळे आले त्याचा निश्‍चितच माझ्या "क्रिएटिव्हिटी'वर परिणाम झालाय. परंतु, एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यांमधला मी नाही. काहींना वाटतंय की, दिग्दर्शनाचा माझा फॉर्मच हरवलाय. परंतु, मला त्यात काही तथ्य वाटत नाही. दिवसातले 16 तास मी कार्यरत आहे. गेल्या चार दशकांमध्ये मी निर्मिलेल्या 18पैकी 14 चित्रपटांना यश आलंय. हा "रेशो' नक्कीच चांगला आहे. अपयशाला मी घाबरत नाही. कारण, कोणत्याही दिग्दर्शकाला प्रयोग हे करावेच लागतात. काही लोकांना असं वाटतंय की, घईंच्या स्टाईलचा सिनेमा आता "आऊटडेटेड' झालाय. परंतु, त्याच्याशीही मी सहमत नाही. कारण हे जर खरं मानायचं ठरवलं तर "दबंग'सारखा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला नसता. हा सिनेमा माझ्या "स्टाईल'शी अगदी मिळताजुळता आहे. खुद्द सलमाननं मला या चित्रपटाच्या "मेकिंग'दरम्यान ""हम "राम लखन' पॅटर्न की फिल्म बना रहे है ।' असं सांगितलं होतं. या चित्रपटाच्या यशामुळे माझा विश्‍वास वाढलाय. लवकरच माझं दिग्दर्शन असलेल्या नवीन चित्रपटाची मी घोषणा करीन. एकीकडे निव्वळ मनोरंज
न चित्रपटांची निर्मिती सुरू असताना काही वेगळ्या आशयघन चित्रपटांनाही आम्ही प्राधान्य दिलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जन्मतिथीचं निमित्त साधून आम्ही एक बंगाली चित्रपट "कश्‍मकश' या नावानं हिंदीत डब केलाय. मराठीतही खूप चांगलं साहित्य आहे, ज्याचा सिनेमा होऊ शकतो. त्यावरदेखील आमचं काम सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आमच्यासोबत पुढील कलाकृती करणार आहेत. ज्या लेखक-दिग्दर्शकांकडे खूप चांगल्या कल्पना आहेत, तेदेखील आमच्याशी संपर्क साधू शकतात.
- मंदार जोशी

Monday, May 16, 2011

अमोल गुप्तेंचा नवा डबा



"तारे जमीं पर'चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक अमोल गुप्ते तब्बल साडे तीन वर्षांनी "स्टॅन्ली का डब्बा' या चित्रपटाद्वारे आपला दुसरा डबा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. मनोरंजन आणि सामाजिक संदेशाचं आपलं धोरण त्यांनी या चित्रपटातही कायम ठेवलंय. या डब्यातील खाऊ आणि तो बनविताना घेतलेल्या कष्टांबद्दल अमोल गुप्ते यांच्याशी केलेली ही चर्चा.
------------
एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की मुलाखतींच्या निमित्तानं निर्माता-दिग्दर्शकांच्या भेटी होतच राहतात. मात्र, चित्रपटाचं भवितव्य एकदा स्पष्ट झालं की पुढच्या कलाकृतीपर्यंत तो दिग्दर्शक पुन्हा काही भेटत नाही. परंतु, काही दिग्दर्शक पहिल्याच भेटीत आपल्या मनावर ठसतात आणि मग त्यांच्या अनौपचारिक भेटी सुरू राहतात. अशा भेटींचा आनंद ज्या काही मोजक्‍या दिग्दर्शकांनी दिलाय त्यापैकी एक म्हणजे अमोल गुप्ते. "तारे जमीं पर' प्रदर्शित झाल्यापासून अमोल गुप्ते यांच्याशी नियमित संपर्कात राहण्याची संधी मला मिळालीय. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये या कलावंताला भेटल्यानंतर प्रत्येक वेळी चित्रपट माध्यमाबाबत काहीतरी वेगळी माहिती, वेगळे संदर्भ ऐकायला मिळालेत. इतर व्यावसायिक दिग्दर्शकांप्रमाणे काही हातचं राखून बोलणाऱ्यांमधला हा दिग्दर्शक नाही. त्याचा प्रत्यय यावेळच्या भेटीतही आला. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वांद्रे इथल्या जुन्या ऑफिसमध्ये आमची भेट झाली. इथं कधी "शिफ्ट' झालात ? अशा सहज विचारलेल्या प्रश्‍नाचं त्यांनी सुभाष घई आणि करण जोहर यांची कृपा असं सहजपणे उत्तर दिलं. "करण जोहरनं काही कामानिमित्त घईंचं ऑफिस भाड्यानं घेतलं आणि आपलं काम संपल्यानंतर त्यानं मला इथं "स्टॅन्ली का डब्बा'चं काम करू दिलं. पहिल्या काही महिन्यांचं भाडं स्वतः करणनं भरलं आणि नंतरच्या महिन्यांचं भाडं घईंनी मागितलेलं नाही,' अमोल गुप्ते मनमोकळेपणे ही माहिती देतात आणि "स्टॅन्ली का डब्बा'च्या अंतरंगात डोकावण्यापूर्वी किती जणांची आपल्याला मदत मिळालीय, याचा नेमका उल्लेख करतात.

"स्टॅन्ली का डब्बा' याचा विषय आणि शीर्षकाबद्दल वेगळी माहिती देताना गुप्ते म्हणतात, ""अंधेरीतील होली फॅमिली हायस्कूलमध्ये मी दुसरी ते सातवीदरम्यान शिकायला होतो. या शाळेत मला स्टॅन्ली नावाचा मित्र भेटला. त्याच्याबरोबर माझी मैत्री होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा "फोर टायर'चा टिफीन डबा. त्यात फार काही वेगळे खाद्यपदार्थ नसायचे बरं. पण साधाच बटाट्याचा रस्सा आणि काही पुऱ्यांचा स्वाद असा असायचा की अख्खा वर्ग त्याच्या प्रेमात पडायचा. चार ठिकाणी दणके खाल्लेला तो साधा ऍल्युमिनीयमचा डबा होता. त्यानं कुठल्या माळ्यावरून तो काढला, हे मलादेखील माहित नाही. तो डबा माझ्या इतकी वर्षं लक्षात राहिला आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट बनविण्यात आला. शाळेचा खाऊचा डबा हा प्रत्येक मुलगा आणि आईचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आईचं प्रेम प्रत्येक डब्यातील खाद्यपदार्थात उतरलेलं असतं. आमचा "स्टॅन्ली का डब्बा'सुद्धा असाच प्रेमाचा डबा आहे. तो प्रेक्षकांनी खाल्ला तर तो त्यांना निश्‍चितच आवडेल. मुलं एकमेकांकरीता कशी उभी राहतात, हेदेखील या चित्रपटामधून पाहायला मिळेल.''

"तारे जमीं पर'च्या यशानंतर प्रेक्षक अमोल गुप्तेंकडून लगेचच एखाद्या नवीन कलाकृतीची अपेक्षा करीत होते. परंतु, ती कलाकृती पडद्यावर येण्यामध्ये साडे तीन वर्षांचा काळ लोटला. याबद्दल गुप्ते सांगतात, ""साधारण दोन वर्षांपूर्वीच मी "सपनों को गिनते गिनते' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार होतो. या चित्रपटाची गाणीही तयार झाली होती. परंतु, मध्यंतरी अशा काही अडचणी आल्या की हा चित्रपट काही पुढेच सरकेना आणि मग स्वतःबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल विचार करताना मला स्टॅन्लीचा विषय सुचला. परंतु, हा काही मी ठरवून केलेला चित्रपट नाही. सर्वप्रथम मुलांची कार्यशाळा घेण्याचं मी ठरवलं. त्यात जवळपास पाचशे मुलांनी भाग घेतला. या मुलांचा वेळ मिळवण्यासाठी मी होली फॅमिली शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कपूर यांना भेटलो. दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कार्यशाळा घेण्याचं ठरलं. खाऊचा एक डबा मुलांनी आणावा आणि एक डबा माझ्याकडून देण्याचं मी सुचवलं आणि आमची कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळेच्या चार तासांपैकी एक तास डबा वाटण्यात आणि खाण्यात जायचा. उरलेल्या वेळात जे काही चित्रीत करता येईल तेवढं आम्ही केलं. असं करता करता दीड वर्षं गेलं आणि हा डबा तयार झाला. शूटिंगच्या वेळी आम्ही कसल्याही प्रकारचा तामझाम केलेला नाही. स्पॉटबॉय, मोठमोठे लाईट्‌स आणि प्रॉडक्‍शन मॅनेजरशिवाय हा चित्रपट बनलाय. आमचा छायालेखक अमोल गोळेनं खूप चांगलं काम केलंय. सत्तरचा कॅमेरा वापरून त्यानं हा चित्रपट शूट केलाय. मालिका, जाहिराती आणि चित्रपटांमध्ये लहान मुलांना दहा-बारा तास राबविलं जातं. तसं आम्ही या चित्रपटाबाबत घडू दिलेलं नाही. चार तासांच्या वर आमची कार्यशाळा कधी चालली नाही. आमच्या या चित्रपटात 500 मुलं आहेत. परंतु, शूटिंगमुळे एकाही मुलाची कधी शाळा बुडली नाही.''

"तारे जमीं पर'मध्ये आमिर खानसारखा मोठा स्टार होता. "स्टॅन्ली...'साठी एखाद्या नामांकीत स्टारचा विचार नाही केलात का, या प्रश्‍नावर गुप्ते म्हणाले, ""काय वाट्टेल ते झालं तरी चित्रपट करायचा, या इराद्यानं हा चित्रपट बनलेला नाही. एका छोट्या कार्यशाळेच्या माध्यमातून हा चित्रपट घडलाय. सलग दीड वर्ष शनिवारचे चार तास देणारे स्टार कलाकार आज आहेत का ? याचं निश्‍चित उत्तर नाही असंच आहे. कारण, हल्ली प्रत्येक स्टार आपल्या फायद्याचा विचार करतो. मात्र, तशा फायद्याची खात्री "स्टॅन्ली का डब्बा'द्वारे देण्याच्या स्थितीत तेव्हा तरी मी नव्हतो. त्यामुळे जे काही मित्र माझ्याबरोबर आले त्यांना सोबत घेऊन मी पुढं गेलो. दिव्या दत्ता, राजेशनाथ झुत्शी, अपूर्वा लाखिया... यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. संगीताच्या आघाडीवरही मला सुखविंदर, शंकर महादेवन, विशाल दादलानी यांची मदत झाली. या सर्वांना मी फक्त एक फोन केला आणि कसल्याही मानधनाशिवाय ते माझ्याकडे गायले. शंकरनं मला मानधन म्हणून हंडीभर मटण शिजविण्यास सांगितलं. असं प्रेम पाहायला मिळालं की खरंच आपण करीत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं. या चित्रपटाला संगीत दिलंय ते हितेश सोनिकनं. तो पूर्वी विशाल भारद्वाजचा मदत करायचा. मी लिहिलेल्या शब्दांचं वजन अचूक ओळखून त्यानं काम केलंय.''

या चित्रपटाच्या निर्मितीत गुप्तेंना सर्वाधिक मदत मिळाली ती त्यांची पत्नी दीपा भाटिया आणि मुलगा पार्थो यांच्याकडून. "स्टॅनली'ची मुख्य व्यक्तिरेखा पार्थोनंच साकारली आहे आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी करताहेत. हा विषय गुप्तेंकडे काढला असता ते शिताफीनं आपल्या मुलावरचा "फोकस' दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात आणि हसत ते म्हणतात, ""माझ्या कोणत्या मुलाबद्दल तुम्ही विचारताय ? स्टॅन्लीसारखीच आणखी 170 मुलं या चित्रपटात आहेत. "तारे जमीं पर'मधला दर्शिल सफारीसुद्धा माझाच मुलगा आहे. सगळेच माझ्याकडे खूप छान काम करतात. दीपाबद्दल विचाराल तर मी सांगेन की, ज्या वेळी मी कार्यशाळा घेत होतो, त्यावेळी ती "माय नेम इज खान' आणि "वुई आर फॅमिली'च्या संकलनात व्यस्त होती. या चित्रपटाचं काम संपल्यानंतर तिनं आम्ही केलेलं फुटेज "एडिट लाईन'वर घेतलं. तब्बल महिनाभर तिनं हे आमचं फुटेज व्यवस्थित पाहिलं आणि त्यात एक धमाल चित्रपट दडल्याचं तिलाही कळलं आणि अशाप्रकारे हा चित्रपट बनला. तो आता "फॉक्‍स स्टार'द्वारे प्रदर्शित होतोय. या संस्थेच्या पाठिंब्यामुळे आमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचेल, याची मला खात्री आहे. तरीपण या काळात विशाल भारद्वाज, करण जोहर या माझ्या मित्रांनी केलेलं सहकार्य मी विसरू शकणार नाही. करणच्या "एडिटिंग मशीन'वर हा चित्रपट संकलित झालाय. हा चित्रपट "फॉक्‍स'नं प्रदर्शित करावा यासाठी करणनंच पुढाकार घेतला. "तुझा चित्रपट कोणी नाही घेतला तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन,' असं आश्‍वासन विशालनं दिलं होतं. "तू एक छान बाळाला जन्म दिला आहेस. त्याचा आदर ठेव. कोणाचाही तू ऋणी होऊ नकोस. कारण "फॉक्‍स'ला तू जे दिलं आहेस आणि त्यांच्याकडून तुला जे मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू दिलेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे.''
"स्टॅन्ली का डब्बा'मध्ये अमोल गुप्तेंनी "खडूस' असं नाव असलेल्या शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारलीय. या चित्रपटापाठोपाठ "भेजा फ्राय 2' आणि संतोष सिवन दिग्दर्शित "उर्मी'मध्येही गुप्तेंच्या अभिनयातील कौशल्य पाहायला मिळणार आहे. "उर्मी' हा मल्याळम चित्रपट असून तो हिंदीत डब झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.
- मंदार जोशी

Monday, May 9, 2011

एका ध्यासाचा प्रवास...


एका ध्यासाचा प्रवास...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक, प्रॉडक्‍शन डिझायनर आणि निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांनी "बालगंधर्व' या भव्यदिव्य चित्रपटाचं नऊ महिन्यांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जातंय. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट भारतात आणि त्यानंतर विदेशातही प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला हा सर्वाधिक "बजेट' असलेला चित्रपट. तब्बल सहा कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाशी नितीन देसाईंव्यतिरिक्त नीता लुल्ला, विक्रम गायकवाड, रवी दिवाण, महेश लिमये, रवी जाधव, सुबोध भावे, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे अशी मोठी नावं जोडली आहेत. मराठी चित्रपट निर्मितीच्या साऱ्या चौकटी भेदून एक विलक्षण जिद्द, ध्यास, तळमळ आणि प्रचंड मेहनतीनं हा चित्रपट बनविला गेलाय. त्याचीच ही कहाणी.
-----------
विख्यात गायक-नायक बालगंधर्वांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, हे व्यक्तिमत्त्व ज्या "स्केल'द्वारे चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे, ते अपूर्व
म्हणावं लागेल. मराठी चित्रपट म्हटलं की काही निश्‍चित ठोकताळे आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु, हा चित्रपट साकारताना देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व "बाऊंड्रीज' पार केल्या आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवायचाय, या हेतूनं झपाटून जात चित्रपट पूर्ण केला. सर्वसाधारणपणे निर्मात्याला कथा ऐकविली की एक तर निर्मितीचा निर्णय त्वरीत घेतला जात नाही किंवा निर्मितीचं "बजेट' अधिकाधिक कमी कसं करता येईल, यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु, हा चित्रपट सुरूच झाला एका ध्यासानं. आजचा जमाना आहे एमटीव्ही, पॉप म्युझिकचा. या जमान्यातील तरुण पिढीच्या गळी शंभर वर्षांपूर्वीचं गाणं आणि घटनाक्रम उतरवणं, हे खरं तर सर्वात मोठं "चॅलेंज' होतं. परंतु, ते "चॅलेंज' अभिनेता सुबोध भावे आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर यांनी ठेवलं आणि ते काही मिनिटांमध्ये नितीन देसाईंनी स्वीकारलं आणि सुरू झालं एका विलक्षण चित्रपटनिर्मितीचं ध्यासपर्व !

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांची संख्या वाढली; परंतु गुणवत्तेचा विचार करायचा झाल्यास अगदी मोजक्‍या चित्रपटांचीच नावं घेता येतील. त्यामागचं कारण म्हणजे नियोजन, कल्पकतेचा अभाव. "बालगंधर्व'ची निर्मिती सुरू होण्यापूर्वी नियोजनावर मोठा भर दिला गेला आणि त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी येत गेलं. आपल्याकडे असे अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होतात की, प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं नाव ठाऊक होतं. परंतु, "बालगंधर्व' मुहूर्ताच्या आधीपासून ते त्याच्या संगीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होईपर्यंतच्या काळात विलक्षण चर्चेत राहिला. करायचं ते दणक्‍यात, हा नितीन देसाईंचा खाक्‍या. तो या चित्रपटाच्या मुहूर्तापासून पाहायला मिळाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात या चित्रपटाच्या "लॉंचिंग'चा जो भव्यदिव्य कार्यक्रम झाला, तो कायम लक्षात राहणारा ठरला. ऐतिहासिक चित्रपट साकारताना लेखक-निर्माता-दिग्दर्शकांनं केलेल्या अभ्यासाला, आपल्या कलाकृतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संदर्भांना, संशोधनाला खूप महत्त्व असतं. हे संदर्भ सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी अनेकांच्या भेटी घ्याव्या लागतात. अशा वेळी थोडी पूर्वपुण्याईदेखील कामाला यावी लागते. ते सर्व या चित्रपटाबाबत जुळून आलं.

या चित्रपटाच्या संशोधनासाठी अविरत प्रयत्न झाले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, वेशभूषाकारापासून ते चित्रपटामधील सर्व कलावंतांनी आपापल्या परीनं बालगंधर्व आणि त्यांच्या काळाबद्दल जी काही माहिती मिळाली, तिचा चित्रपटासाठी काही उपयोग होईल का, याचा विचार केला. बालगंधर्वांना पाहिलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेली जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यांचा शोध घेतला गेला. त्यांच्या दीर्घमुलाखती ध्वनिमुद्रित झाल्या. त्यांच्याकडील बालगंधर्वांचा ठेवा चित्रपटासाठी विनम्रपणे मागण्यात आला आणि शूटिंग झाल्यानंतर तो आस्थेपूर्वक परतही करण्यात आला. ज्याच्याकडे जे जे चांगलं मिळेल, ते ते घेऊन पटकथेची एक सुंदर लड गुंफण्यात आली. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेला बालगंधर्वांचा सहवास जाणून घेत त्यानुसार कथानकातील नाट्यनिर्मिती आणखी टोकदार करण्यात आली. रंगभूमीवर अदाकारी साकारीत असताना आपल्या रुपाकडे थोडंही दुर्लक्ष होऊ न देण्यासाठी बालगंधर्वांनी विंगेत आरशांची केलेली व्यवस्था, ही बाबासाहेबांनी सांगितलेली खास आठवण. या आठवणीला चित्रपटात नुसतंच स्थान मिळालेलं नाहीय तर कथानक त्यामुळे आणखी रंगतदार होईल, याची काळजी घेतली गेलीय. असे बरेच प्रसंग या चित्रपटात आहेत.

अवघ्या 33 दिवसांमध्ये हा चित्रपट पूर्ण झाला. तो काळ मंतरलेला होता, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या "टीम'शी जोडलेला प्रत्येक कलावंत-तंत्रज्ञ सांगतो. पुणे, भोर, कोल्हापूर या भागात हा चित्रपट चित्रीत झालाय. सकाळी सात ते मध्यरात्री 1-2 वाजेपर्यंतही बऱ्याचदा शूटिंग चालायचं. पण कोणाकडूनही कधी या काळात आपण थकल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही. नितीन देसाईंना या 33 दिवसांमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल, त्यांना निश्‍चितच या माणसाची "पॅशन' भावली असणार. एखाद्या युद्धात राजाची मैदानावरील थेट उपस्थिती सैनिकांसाठी उत्साहवर्धक असते. इथं तर नितीन देसाईंच्या रुपातला राजा अक्षरशः चौफेर चढाई करीत होता. या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखेला खूप महत्त्व आहे. या व्यक्तिरेखेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाल्यानंतर कोणीतरी नितीन देसाईंनाच ही भूमिका करण्याचा सल्ला दिला. वास्तविक तेच या चित्रपटाचे निर्माते असल्यानं ही भूमिका साकारण्याचा निर्णय त्यांना क्षणभरात घेता आला असता. परंतु, तसं न करता त्यांनी या मिनिटभराच्या भूमिकेसाठी आधी "स्क्रीन टेस्ट' दिली. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून टक्कल केलं. एखाद्या कलाकृतीसाठी सर्वस्व देणं म्हणजे नेमकं काय असतं, हे नितीन देसाईंशी या चित्रपटाबद्दल चर्चा केल्यानंतर अगदी छान समजतं.

बालगंधर्वांचं व्यक्तिमत्त्व एवढं जबरदस्त आहे की, त्यातलं काय पडद्यावर दाखवावं आणि काय नाही, असा प्रश्‍न "बालगंधर्व टीम'ला पडला होता. सर्वच गोष्टी दाखवायच्या म्हटलं तरी चित्रपटाची लांबी साडे तीन-चार तासांपर्यंत गेली असती. परंतु, आजच्या काळातील प्रेक्षकाची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन चित्रपटाची लांबी कोणत्याही स्थितीत दोन तासांच्या वर जाऊ न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही दृश्‍यांना कात्री लावावी लागली. बालगंधर्वांचे मायबाप म्हणजे रसिकप्रेक्षक. त्याच्या सेवेत खंड पडू न देण्याचा त्यांचा विडा शंभर वर्षांनी नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'नं उचलला आणि निर्मितीबाबत कसलीही तडजोड करण्यात आली नाही. तंत्रज्ञांनी ज्या काही गोष्टींची मागणी केली, त्याची पूर्तता झाली. या चित्रपटातील भव्यदिव्य सेट्‌स पाहताना एखादा "ऑपेरा' आपण पाहतोय की काय, असं वाटतं.

मराठी चित्रपट निर्मात्यांची "कॉमन' समस्या म्हणजे चित्रपट ऐन प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की त्यांच्याकडची पैशाची पुंजी संपते आणि प्रदर्शनापूर्वी आपला चित्रपट प्रसिद्धीबाबत "हाईप' करण्यात ते कमी पडतात. सुदैवानं या चित्रपटाबाबत तसं घडलेलं नाही. या चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळाही अत्यंत देखणा आणि भव्यदिव्य प्रमाणातच करण्यात आला. इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अलीकडच्या काळात "मिडीया'चं महत्त्व ओळखून त्याचा आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खूप चांगला उपयोग करण्यात अभिनेता आमिर खाननं यश मिळवलंय. त्याच्या यशावरून प्रेरणा घेत नितीन देसाईंनी या चित्रपटाचं "मिडीया कॅंपेन' थोडं वेगळ्या पद्धतीनं आखलं आणि त्याचा खूप चांगला "रिझल्ट' त्यांना आला. या चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते प्रदर्शनापर्यंत त्यांनी एवढे काही "इव्हेंट्‌स' आयोजित केले की, त्याचं वाहिन्यांना मिळालेलं "सॉफ्टवेअर'च काही तासाचं होतं.

नितीन देसाईंनी गेल्या 25 वर्षांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांबरोबर खूप काम केल्यानं त्यांच्या "व्हिजन'ला आकार आला. परंतु, "बालगंधर्व' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी दाखविलेल्या "पॅशन'शी जुळवून घेताना काही अडचणीदेखील आल्या. रुळ बदलताना जसा खडखडाट व्हावा, तसा खडखडाटही झाला. परंतु, त्याचा "रिझल्ट' चांगला आलाय. सर्व आघाड्यांवरचं "टॅलेण्ट' एकत्र येणं, हे जेवढं चांगलं, तेवढंच या "टॅलेण्ट'ला पुरेपूर न्याय मिळणंही महत्त्वाचं असतं. तो न्याय या चित्रपटाला मिळालाय. "बालगंधर्व'च्या "बजेट'चा आकडा समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे डोळे पांढरे झाले. "इतनी रिकव्हरी कहॉं से होगी?' असा प्रश्‍नही काहींनी विचारला. काहींनी एवढी "रिकव्हरी' होणं कठीण असल्याचं मत ताबडतोब व्यक्त करून "ये फिल्म नितीनने पैसे के लिए नहीं पॅशन के लिए बनाई है ।' असं "सेफ' ÷तरही दिल. त्यामुळे आता खरी परीक्षा नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'बरोबरच प्रेक्षकांचीही आहे. महाराष्ट्राचा अभिमान आणि मानबिंदू असलेल्या बालगंधर्वांवर प्रचंड कष्ट आणि सहा कोटी रुपये खर्चून बनलेला चित्रपट ते कसे स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
- मंदार जोशी

Friday, April 29, 2011

हार आणि प्रहार

हार आणि प्रहार
------------
कलावंतांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी पाठीवर दिली जाणारी थाप म्हणजे पुरस्कार. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचं जे पीक आलंय, त्यामध्ये कलावंतांचं कौतुक होण्याऐवजी त्यांची बदनामीच अधिक होत असल्याचं चित्र प्रकर्षानं समोर आलं आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यानं "झी मराठी' वाहिनीविरूद्ध नुकतीच जी तोफ डागली आणि त्यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्यानंतर या विषयाचं महत्त्व लक्षात येतं. "झी'च्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या चारित्र्याचं हनन केल्याचं प्रसादचं म्हणणं आहे. अर्थात, प्रसादसारखा अनुभव यापूर्वीही अनेक कलावंतांच्या वाट्याला वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये आलाय. फक्त मराठी चित्रपट पुरस्कारांपुरताच हा विषय मर्यादित नसून विविध संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्येही असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर-साजीद खान यांच्यातील शेरेबाजीही अशीच बराच काळ वादग्रस्त ठरली होती. परंतु, पूर्वीच्या कटू प्रकारांमधून काही धडा न घेता पुरस्कारांचं आयोजन करणारी मंडळी आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करीत आहेत.

पुरस्कार सोहळ्यांची संख्या वाढल्यानं हल्ली प्रत्येक वाहिनी आपला सोहळा इतरांपेक्षा कसा वेगळा आणि "हट के' होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे. परंतु, "हट के' करण्याच्या नादात आपल्याकडून होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात येत नाहीत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वाहिन्यांवर कलाकारांची बदनामी केल्याचा आरोप आहे, त्या आणि संबंधित कलाकारांचे तत्पूर्वी अतिशय चांगले संबंध असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कलावंतांच्या बदनामीचे प्रकार नक्की कोणत्या कारणामुळे घडतात, हा खरोखरीच एक शोधाचा विषय बनलाय. असा एखादा प्रकार घडला की संबंधित वाहिनी सोहळ्याचे आयोजन आणि "स्क्रीप्ट' लेखकांना झालेल्या चुकीबद्दल जबाबदार धरतात. परंतु, अशी जबाबदारी निश्‍चित झाल्यानंतरही कोणावर कसलीही कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. तसेच ज्या वाहिन्या कलावंतांचा "अजिंक्‍यतारा' नावानं गौरव करतात, तसेच त्यांना आपले "ब्रॅंड ऍम्बेसेडर' बनवितात, त्या वाहिन्यांनी अपघातानं का होईना कलावंतांची बदनामी झाली तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवित नाहीत.

या सगळ्या प्रकारामध्ये कलावंतांकडून होणाऱ्या चुकांना माफ करता येणार नाही. सूत्रसंचालकाकडून भलतंच वक्तव्य केलं गेलं की तो त्यासंबंधीची जबाबदारी स्वतःवर न घेता "स्क्रीप्टरायवर'वर टाकून मोकळा होतो. आपल्या तोंडी असलेलं वक्तव्य जर आपल्याच परिवारातील एखाद्या सहकाऱ्याशी संबंधित असेल तर ते न म्हणण्याचं धाडस सूत्रसंचालक का दाखवीत नाहीत ? तसेच एखाद्या कलाकाराची बदनामी झाल्याचं सर्वांना समजत असूनही संबंधित वाहिनीविरुद्ध कधी कोणी एकत्रितपणे आवाजही उठवीत नाहीत. त्यामागचं कारण म्हणजे प्रत्येकाला लोकप्रिय वाहिनीबरोबरचे आपले हितसंबंध जपायचे असतात. त्यामुळेच वाहिन्यांकडून चूक झाल्याचं समजत असूनही त्याविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याचं कोणाला उमजत नाही. तसेच ज्या कलाकाराची वाहिन्यांकडून कथित बदनामी झाली आहे, त्या कलाकारांची भूमिकादेखील तळ्यात-मळ्यात असते. संबंधित वाहिनीविरुद्ध भविष्यात आपण काम करणार नाही, अशी भूमिका घेण्याचं धाडस ते का दाखवीत नाहीत ?

सर्वसामान्यांच्या दृष्टीकोणातून या घडामोडींचा विचार केल्यास त्यात त्यांना फारसं काही खटकत नाही. कारण, टीव्हीवरील कार्यक्रम असतात ते मनोरंजनासाठी. पुरस्कार सोहळे हे कधीच गांभीर्यानं घ्यायचे नसतात, असा समज रुढ झालाय. त्यामुळे अशाप्रकारची थट्टा-मस्करी त्यात चालतेच, असं प्रेक्षकांनीच आता गृहित धरलंय. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करणाऱ्यांनी आपली विश्‍वासार्हता तपासायला हवीय तसेच कलावंतांनीही निव्वळ प्रसिद्धी मिळतेय, यावर आनंद न मानता आपण कोणत्या सोहळ्यात सहभागी होतोय, याचीही काळजी घ्यायला हवी. तसं घडलं तरच अशा अपघातांची संख्या कमी होईल.

प्रीमियर' मासिक

Tuesday, March 31, 2009

review - बारह आना

वेगळ्या वाटेचा भन्नाट सिनेमा
"बारह आना' हा खूप इंटेलिजिएण्ट सिनेमा आहे. तो एकाचवेळी आपल्याला हसवतो, कोड्यात टाकतो आणि काही प्रमाणात अंतर्मुखही करायला लावतो. सध्याच्या मल्टिप्लेक्‍स कल्चरमधला एक अत्यंत प्रभावी चित्रपट म्हणून त्याची नोंद करावी लागेल. शोफर, वॉचमन आणि वेटर... या समाजातल्या तशा तीन उपेक्षित व्यक्तिरेखा. त्यांच्यावर एखादा हिंदी चित्रपट बनू शकतो, असा विचारही कधी आपल्या मनात येऊ शकणार नाही. पण दिग्दर्शक राजा मेनन यांनी या तीन व्यक्तिरेखांचा खूप सुरेख मेळ घालून एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन दिलंय.
नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे शोफर. ते धनाढ्य व्यक्तीच्या गाडीवर शोफर म्हणून काम करीत असतात. मात्र, आपल्या मालकिणीकडून सतत त्यांना हिडीसफिडीस पद्धतीची वागणूक मिळत असते. विजय राज हा वॉचमन असतो. बिल्डिंगवर लक्ष ठेवण्याऐवजी त्याला तिच्यात राहणाऱ्यांचीच अधिक कामं करावी लागत असतात. उत्पन्न कमी आणि गावाकडे राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचा खर्च या कात्रीत तो अडकलेला असतो. तिसरा असतो वेटर अर्जुन माथूर. एका चांगल्या हॉटेलमध्ये तो वेटरची नोकरी करीत असतो. तिथं येणाऱ्या एका विदेशी तरुणीलाच तो आपलं हृदय देऊन बसतो. या तिघांच्या कथानकांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे त्यांचं निवासाचं स्थान. एका चाळीतल्या खोलीत हे तिघं एकत्र राहत असतात. आपापल्या परिस्थितीला दोष देत आयुष्य कंठण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. मात्र एकेदिवशी विपरीत घडतं. वॉचमनच्या हातून एका व्यक्तीला नकळत थप्पड बसते आणि सुरू होतं अपहरणाचं सत्र. त्यातून मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांसमोर येतात.
दिग्दर्शक राजा मेनन यांनी हा सगळा घटनाक्रम अतिशय छानरीत्या चित्रित केलाय. समाजातल्या उपेक्षित घटकांचं दुःख त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीला टिपलंय आणि मध्यांतरानंतर त्याला त्यांनी वेगळीच फोडणी दिलीय. छोट्या-छोट्या प्रसंगांमधून त्यांनी संपूर्ण चित्रपट खुलवलाय. हा चित्रपट विलक्षण उंचीवर गेलाय तो कलाकारांच्या अभिनयामुळे. वॉचमनची भूमिका करणाऱ्या विजय राजनं या चित्रपटातील अभिनयाद्वारे आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवलीय. वॉचमनच्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक गोष्टी त्यानं आपल्यात इतक्‍या सफाईनं मुरवल्यात की आपल्याला खरा विजय राज आठवतच नाही. नसिरुद्दीन शाह हा कलावंत एवढ्या उंचीवर का पोचलाय, हे जाणून घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. संपूर्ण चित्रपटात हा कलाकार फक्त क्‍लायमॅक्‍समध्ये काही वाक्‍य बोललाय, पण त्यांचं न बोलणंही बरंच काही बोलून गेलंय. फक्त आपल्या "स्क्रीन प्रेझन्स'द्वारे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. अशाप्रकारची अदाकारी आपल्याला नवीन आहे. वेटरची भूमिका करणाऱ्या अर्जुन माथूर यानेही छान काम केलंय. चित्रपटात एकही गाणं नाही ही सर्वात चांगली गोष्ट. हिंदी सिनेमा सध्या खूप चांगल्या वळणावर आहे. "बारह आना' हा त्याच वळणावरचा एक चित्रपट आहे.

Saturday, August 23, 2008

review-"मान गये मुघल-ए-आझम'

"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे.
"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्‍यता आहे; मात्र हा सिनेमा "मुघल-ए-आझम'शी नव्हे, तर "जाने भी दो यारो'शी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चटपटीत लिखाणात छेल यांनी चांगलं यश मिळवलं आहे, पण दहा-पंधरा चांगले संवाद आणि प्रसंगांमुळं सिनेमा बनत नाही, हे छेल यांना ठाऊक नसावं. एकाच कथानकातून त्यांनी देशभक्ती, प्रेम, रहस्य मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि अपेक्षेप्रमाणे एक ना धड... असा "फील' या सिनेमाला आलाय. परेश रावल, के. के. मेनन, राहुल बोस, मल्लिका शेरावत अशी चांगली "कास्ट' असूनही वेगळेपणाच्या हव्यासामुळं ती "वेस्ट' गेलीय.
या चित्रपटालाही बॉम्बस्फोटाचीच पार्श्‍वभूमी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची तयारी फेब्रुवारीत झाली. लेखकानं त्याचा संबंध आपल्या कथानकाशी जोडलाय. गोव्यातील एका नाटक कंपनीचा परेश रावल हा मुख्य अभिनेता. मल्लिका शेरावत ही त्याची पत्नी. "मान गये मुघल-ए-आझम' या नाटकात परेश अकबर बादशहाचा, तर मल्लिका अनारकलीची व्यक्तिरेखा साकारीत असते. राहुल बोस हा "रॉ'चा एक अधिकारी. तो गुन्हेगारांच्या शोधासाठी गोव्यात येतो आणि मल्लिकाच्या प्रेमात पडतो. तो आणि मल्लिका देशप्रेमाच्या नावाखाली परेश रावलचा वापर करून घेतात. चित्रपटाचा व्हिलन झालाय तो के. के. मेनननं साकारलेला एका गझल गायक. त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतात. मल्लिका आणि परेश रावळच्या मदतीनं राहुल बोस हे संबंध उघडकीस आणतो.
"जाने भी दो यारो'द्वारे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एक छान सामाजिक-राजकीय प्रहसन सादर केलं होतं. संजय छेल यांना या सिनेमातून असंच काहीतरी अपेक्षित होतं, पण कच्च्या लिखाणामुळं त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. छेल यांच्यातील लेखक एवढा कमी पडला आहे की, या चित्रपटाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत "ग्रीप' घेता आलेली नाही. दहा पाच-दहा मिनिटांनी एखाद-दुसरा चांगला संवाद, या गतीनं हा सिनेमा सुरू राहतो. परेश-मल्लिकाच्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्यात, पण राहुल बोस आणि के. के. मेनन यांच्याबद्दल तसं म्हणता येत नाही. या सिनेमात "मान गये...' हे नाटक बऱ्याचदा पाहायला मिळतं. या नाटकातली कलाकार मंडळी वारंवार आपले संवाद बदलतात, नको ती "ऍडिशन्स' घेतात, त्यांच्या अभिनयात कोणतंही गांभीर्य दिसत नाही... तरीसुद्धा हे नाटक पाहायला अनेकांनी गर्दी केल्याचं दिसतं.
मल्लिका आणि राहुल बोस यांचं खरोखरीच "अफेअर' असतं की राहुलच्या देशप्रेमाचा तो एक भाग असतो, याचा सिनेमा संपला तरी पत्ता लागत नाही. परेश रावल हे "सीझन्ड ऍक्‍टर' असल्यामुळे त्यांनी आपला भाग तयारीनं सादर केलाय. मल्लिकानंही आपल्या मर्यादा सांभाळून त्यांना चांगली साथ दिलीय. राहुल बोसची "इमेज' या सिनेमाद्वारे तोडण्यात आलीय. के. के. मेनन त्याच्या भूमिकेत अगदीच "मिसफिट' वाटलाय. अन्नू मलिक यांचं संगीत ऐकताना या चौघांचा गोंधळ बरा म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा सिनेमा संपल्यानंतर छेल यांना एखादं नवीन स्वप्न पडो, एवढीच काय ती शुभेच्छा द्यावीशी वाटते.

review-मुंबई मेरी जान

मुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे अपवादानेच आपल्यासमोर आलाय. ही कसर निशिकांत कामत यांच्या "मुंबई मेरी जान' या सिनेमानं भरून काढलीय. मुंबईत 2006 च्या जुलैत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्‍वभूमी निवडत कामत यांनी मुंबईच्या "स्पिरिट'ला एक आगळावेगळा सलाम ठोकलाय. तो आपण स्वीकारलाच पाहिजे. बॉम्बस्फोट का घडला, कोणी घडविला, त्याचे धागेदोरे कसे मिळाले... या "रिसर्च'मध्ये गुंतून न पडता दिग्दर्शकानं आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य मुंबईकरांवर ठेवलाय. त्यामुळेच हा सिनेमा पाहणाऱ्याच्या हृदयाला भिडतो, त्याला अनेकदा अस्वस्थ करतो आणि मुंबईकरांच्या उपजत "ह्युमर'ला दाद देण्यास भाग पाडतो. "युटीव्ही'ची दर्जेदार निर्मिती, कसदार लेखन, संजय जाधव यांचं अप्रतिम कॅमेरावर्क आणि कामत यांच्या "पॉलिश्‍ड' दिग्दर्शनामुळं हा सिनेमा वेगळ्या वाटेचा असूनही अत्यंत परिणामकारक ठरलाय.
बॉम्बस्फोट होण्याआधी; तसेच तो झाल्यानंतर सहा व्यक्तींच्या आयुष्यावर दिग्दर्शकानं आपला "फोकस' ठेवलाय. परेश रावल हे पोलिस दलातील एक वरिष्ठ कॉन्स्टेबल दाखवलेत. अवघ्या दहा दिवसांनंतर ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार असतात. विजय मौर्या हा त्यांचा तरुण सहकारी. या दोन व्यक्तिरेखांमधील संवादांद्वारे दिग्दर्शकानं अख्ख्या पोलिस दलाचं "आरपार' चित्र उभं केलंय. हिंदी चित्रपटांमधील पोलिस हा नेहमीच विनोदाचा विषय झालाय. हा सिनेमा त्याला छेद देऊन गेलाय. सोहा अली खान ही एका चॅनेलमधील तरुण, तडफदार पत्रकार. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिच्यातली पत्रकार जागी होते, मात्र आपला पती बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं तिला समजतं. या वेळी बातमी शोधायला गेलेली सोहा आपल्याच चॅनेलची एक "ब्रेकिंग न्यूज' ठरते आणि तिचा "बाईट' घेण्यापर्यंत मजल जाते.
या सिनेमातलं चौथं व्यक्तिमत्त्व आहे ते इरफान खान. दक्षिणेतल्या कोणत्यातरी खेडेगावातून आलेली ही व्यक्ती मुंबईत सायकलवरून चहा-कॉफी विकत असते. बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच त्याची भेट परेश रावल आणि विजय मौर्याशी होते आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळतं. आपला काही गुन्हा नसताना पोलिस त्रास देत असल्यामुळे इरफान त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं सूड उगवतो. कधी मॉलमध्ये खोटा बॉम्ब ठेवल्याचा फोन कर; तर कधी रेल्वेस्थानकामध्ये, मात्र त्याच्या एका खोट्या फोनमुळं एका व्यक्तीला "हार्टऍटॅक' येतो. या वेळी इरफानचं झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर त्याची कृती या सिनेमाला हळूहळू उंचीवर नेऊ लागते. माधवन हा कट्टर देशभक्त. प्रदूषणाचं प्रमाण रोखण्यासाठी तो स्वतः ऐपत असूनही चारचाकीमधून न फिरता लोकलमधूनच प्रवास करीत असतो, मात्र बॉम्बस्फोटाचा "आँखो देखा हाल' पाहिल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं. के. के. मेनन हा सुशिक्षित बेरोजगार. कॉम्प्युटर इंजिनियर असूनही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग काय, रिकाम्या मनात सैतानाचं भूत अवतरणारच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मुस्लिमांकडे तो ते दहशतवादीच आहेत, या नजरेतून बघत असतो आणि आपल्या मित्रांचेही कान भरत असतो, मात्र बॉम्बस्फोटानंतर अशा काही घटना घडतात, की त्याचे डोळे उघडतात.
योगेश विनायक जोशी आणि उपेंद्र सिधये यांनी या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलीय. या सहा व्यक्तींचे पाच "ट्रॅक' परस्परांमध्ये मिसळणं हे खूप अवघड काम होतं, पण लोकलचा एका "ट्रॅक'वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना जो खडखडाट होतो, तसा खडखडाट लेखक-दिग्दर्शकानं होऊ दिलेला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. परेश रावल आणि विजय मौर्याचा "ट्रॅक' सर्वाधिक परिणामकारक आहे. सोहा आणि माधवनचा "ट्रॅक' ठीकठाक असून, इरफानचा खूप वेगळा वाटतो. तुकाराम पाटील या व्यक्तिरेखेत परेश रावल यांनी कमाल केलीय. या कलाकाराला कोणताही "रोल' द्या, त्यात त्याचं भिडणं विलक्षण असतं. रावल यांच्या कारकिर्दीतील काही भन्नाट भूमिकांपैकी ही भूमिका एक ठरावी. विजय मौर्या यांनी रावल यांना खूप छान साथ दिलीय. चांगला दिग्दर्शक असेल; तर सोहा अली खानचा प्रभाव जाणवतो, हे यापूर्वीही दिसून आलं होतं. या सिनेमात नेमकं तेच पाहायला मिळतं. इरफान खान, माधवन आणि के. के. मेनन हे तिघेही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना अगदी "टॉप फॉर्म'मध्ये वाटतात. सिनेमाच्या शेवटी "ये दिल है मुश्‍किल...' हे गाणं "बॅकग्राऊंड'वर ऐकविण्याची कल्पनाही भन्नाट आहे. "डोंबिवली फास्ट'मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कामत यांना यश आलंय. हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी आणखी एक मराठी दिग्दर्शक सज्ज होतोय. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.