Friday, July 4, 2008

हरमन बावेजा - interview

दिग्गजांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे...

इंट्रो...
"दिलवाले', "दिलजले', "कयामत' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा, ही हरमन बावेजाची खरी ओळख. हृतिक रोशनसारखं दिसणं, ही त्याची दुसरी ओळख. मात्र, "लव्हस्टोरी 2050' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक त्याच्यावर फिदा झालेत. आपल्या वाटचालीचा त्यानं घेतलेला हा मागोवा.
---------------
ः "लव्हस्टोरी 2050' हा त्याच्या नावाप्रमाणे खरोखरीच काळाच्या पुढचा सिनेमा आहे. प्रेमकहाणीच्या पार्श्‍वभूमीवर 2050 मध्ये मुंबई कशी बदलली आहे, त्याचं चित्र या सिनेमात पाहायला मिळेल. मुंबईकरांची रोजची पायाखालची ठिकाणं, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, फ्लोरा फाऊंटन यात आम्ही दाखवली आहेत. फक्‍त ही ठिकाणंच आधुनिक झालेली नाहीत, तर माणूसही आधुनिक झाला आहे. त्याची कामंही तो आधुनिक पद्धतीने करायला लागला आहे. मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी आपल्या पायांना एक अत्याधुनिक व्हॅक्‍युम क्‍लीनर लावून शहराची सफाई करीत असताना या चित्रपटात पाहायला मिळतील. 2050 मधला मुंबईतला गाडीवरचा चहावाला कसा दिसेल, याचाही आम्ही अंदाज केला आहे. या सिनेमात तब्बल 1200 स्पेशल इफेक्‍टस्‌ आहेत. निर्मिती खर्चाच्या दृष्टीनं हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट आहे.
ः लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती; मात्र 15-16 वर्षांचा झाल्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंटचं आकर्षण वाटू लागलं. स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. स्वप्नपूर्तीसाठी मी स्वित्झर्लंडला या शाखेचं शिक्षण घेण्यासाठी गेलो. ग्लास कसे सर्व्ह करायचे, हातात ट्रे कसा पकडायचा असतो, बाथरूममध्ये टॉवेल्स कसे लावले जातात, आदींचं मी शिक्षण घेतलं. वास्तविक, हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीनं या सर्व गोष्टी शिकणं, हे खूप आवश्‍यक आहे. तिथं पहिल्या वर्षी मला रौप्यपदकही मिळालं. पण त्या शिक्षणात मी फार काळ रमू शकलो नाही. एकदा भारतात आल्यानंतर मी माझ्या पापांना खरं काय ते सांगून टाकलं. माझ्या आई-वडिलांनी आपले निर्णय कधीही माझ्यावर लादले नाहीत. माझा हा निर्णयसुद्धा त्यांनी अत्यंत शांतपणे स्वीकारला. "तुम नहीं चाहते हो तो ठीक है।' असं म्हणत दुसऱ्या दिवसापासून पापांनी मला त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितलं.
ः त्यानंतरची सात-आठ वर्षं मी खूप मेहनत केली. मला या क्षेत्रातच "करियर' करायचं असल्यानं पापांनी माझ्याकडून थोडी जास्तच मेहनत करून घेतली. सिनेमा बनविण्याच्या प्रत्येक घटकाचं मी शिक्षण घेतलं. "दिन रात एक किया।' हा संवाद खरोखरीच माझ्या त्या काळातल्या आयुष्याला लागू होईल. या वेळी पापांना एकच गोष्ट सांगितली होती की केवळ तुमचा मुलगा म्हणून मला पदार्पणाची संधी देऊ नका. ज्या दिवशी खरोखरच तुम्हाला मी अभिनय करू शकतो हे जाणवेल, त्याच दिवशी संधी द्या. त्यामुळं, पापासुद्धा माझ्या पदार्पणासाठी कसलीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हते. "प्यार तो होना ही था', "नो एन्ट्री', "वेलकम'फेम दिग्दर्शक अनीस बज्मी एके दिवशी आमच्या घरी आले होते. "हरमनला तुम्ही ब्रेक दिला नाहीत तर मी देतो!' असं त्यांनी थेट सांगून टाकलं. बज्मींसारखा यशस्वी दिग्दर्शक आपल्या मुलाला "ब्रेक' देण्याची भाषा करतो, हे ऐकून पापांनी तातडीनं "लव्ह स्टोरी 2050' हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.
ः हा माझा पदार्पणातला सिनेमा असला तरी मला अनावश्‍यक "फुटेज' मिळालेलं नाही. उलट, माझ्यापेक्षा प्रियांका चोप्राला यात अधिक वाव आहे. एक वडील या नात्यानं पापा मला संधी देणारी अनेक दृश्‍यं या सिनेमात दाखवू शकले असते. या सिनेमात काम करणाऱ्या बमन इराणी यांनाही ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली होती. "इतना अनसेल्फिश डिरेक्‍टर मैं पहली बार देख रहा हूँ ।' असे त्यांचे उद्‌गार आहेत. फिल्म चांगली झाली तर साहजिकच हरमनही त्यात उठून दिसेल, एवढंच पापांचं "लॉजिक' आहे आणि मला ते अगदी योग्य वाटतं.
ः प्रियांका चोप्राबरोबर माझी पाच वर्षांची मैत्री आहे. तिनं या सिनेमासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय. आमच्या दोघांमधल्या चांगल्या मैत्रीमुळं सध्या बऱ्याच अफवा पसरल्यात, याची आम्हाला कल्पना आहे. या अफवांचेच आम्ही सध्या शिकार झालोत. मात्र त्याचं आम्ही काहीच करू शकत नाहीत. सध्या तरी मी माझ्या करिअरवरच लक्ष केंद्रित केलंय. संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांनी मला संधी दिलीय. अशी संधी एखाद्याच्याच वाट्याला येते; मात्र या दिग्गजांच्या अपेक्षांना आपण न्याय दिला पाहिजे, याचं दडपण माझ्यावर आहे.

No comments: