Monday, June 30, 2008

थोडा प्यार थोडा मॅजिक-review

सगळ्याच आघाड्यांवर थोडा...
चांगला सिनेमा बनायला केवळ "हट के' विषय असून चालत नाही. तो विषय दीड-दोन तासांमध्ये पुरावा आणि मुरावाही लागतो. तसं न झालं तर ते बूमरॅंग ठरण्याची भीती असते. कुणाल कोहली दिग्दर्शित "थोडा प्यार थोडा मॅजिक'बद्दल नेमका हाच घोळ झालाय. "हम तुम', "फना' या दोन सिनेमांचं दणदणीत यश पाठीशी असताना कुणालनं प्रेक्षकांना "इमोशनल डोस' देण्याचं धाडस दाखवलंय. मात्र दुर्दैवानं या डोसची मात्रा थोडी अधिक झाल्यानं हे धाडस अंगलट येण्याचीच दाट शक्‍यता आहे. सध्या समाजात सगळीकडं नकारात्मक घटना घडताहेत. त्याचा उबग येऊन कोहलींनी हा सिनेमा बनविणं समजण्यासारखं आहे. या सिनेमाची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली असून त्यांच्यावर अलीकडच्या काळात सतत "मिनिंगलेस' सिनेमे दिल्याचा आरोप होतोय. या पार्श्‍वभूमीवर कोहलींनी आपला "ट्रॅक' बदललाय. पण सकारात्मकता दाखविण्याच्या भरात आपला सिनेमा कंटाळवाणा होतोय, याकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासारखे दोन मुरब्बी कलाकार असूनही हा अवघा सव्वादोन तासांचा सिनेमा तीन-साडेतीन तासांचा सिनेमा पाहिल्याचा "फील' देतो. हा त्रास आणखी वाढलाय तो शंकर-एहसान-लॉय यांच्या हरवलेल्या जादूमुळं. त्यामुळेच या सिनेमातलं प्रेम ना आपलं हृदय जिंकतं ना जादू.
सैफ अली खान या सिनेमात एका उद्योजकाच्या रूपात पाहायला मिळतो. त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते ते एका अपघातामुळं. तो स्वतः चालवीत असलेल्या गाडीला अपघात होऊन त्यात एका जोडप्याचा मृत्यू होतो. त्यामुळं त्यांची मुलं उघड्यावर येतात. हे अपघात प्रकरण पुढं न्यायालयात जातं. यावेळी न्यायमूर्ती एक ऐतिहासिक निकाल देताना ही मुलं सज्ञान होईपर्यंत सैफनं त्यांचा सांभाळ करावा, असा आदेश देतात. न्यायालयाचा मान राखण्यासाठी सैफ या मुलांना आपल्या घरी आणतो. पण त्यांच्याशी जुळवून घेणं त्याला कठीण जातं. यावेळी सैफ आणि मुलं यांच्यातला दुवा बनण्याचं काम करण्यासाठी स्वर्गातली गीता (राणी मुखर्जी) पृथ्वीवर येते. तिला पृथ्वीवर येऊन या मुलांची मदत करण्याचा आदेश ऋषी कपूरनं साकारलेला एक देव देतो. कथानकातला हा भाग अगदीच सुमार पद्धतीनं चित्रीत करण्यात आलाय. राणीला जादूचं वरदान असल्यानं मग ती त्याद्वारे मुलं आणि सैफमधली दरी कमी करते.
"थोडा प्यार...'वर "मेरी पॉपीन्स' या हॉलीवुडपटाचा मोठा प्रभाव आहे. आपल्याकडं अपघात प्रकरणांचा निकाल लवकर न लागण्याची परंपरा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर "थोडा प्यार...'मधल्या न्यायाधीशांनी सैफला मुलांचा सांभाळ करण्याचा दिलेला आदेश या सिनेमाला वेगळा बनवितो. या आदेशाचं सुरुवातीला पालन करताना सैफचा नकारार्थी सूर, मुलांचा त्याच्यावरील खुन्नस आणि कालांतरानं राणी मुखर्जीनं या दोघांना एकत्र आणण्यासाठी केलेले प्रयत्न... हा भाग कागदावर चांगला वाटतो. पण त्याचं पडद्यावरचं रूपांतर फारसं जमलेलं नाही. या मुलांनी सैफला त्रास देण्यासाठी सुरुवातीला केलेल्या क्‍लृप्त्या अगदीच सुमार वाटतात. सैफची "गर्लफ्रेंड' म्हणून अमीषा पटेल जे काही करते, ते काहीच समजणारे नाही. तिची व्यक्तिरेखा कापली गेली असती तरी कथानकाला काहीच धक्का बसला नसता. राणीची व्यक्तिरेखा एखाद्या उपटसुंभासारखी सिनेमात अवतरलीय आणि तिचा सिनेमात वावरही तसाच आहे. दिग्दर्शकानं या व्यक्तिरेखेच्या पडद्यावरील "एन्ट्री'साठी थोडं डोकं लढवायला हवं होतं. सैफचं मुलांबद्दलचं मनःपरिवर्तनही असेच अचानक दाखविण्यात आलंय.
पटकथाच गडबडली असल्यानं सर्वच कलाकारांचा अभिनय गोंधळल्यासारखा वाटतो. सैफ अली खान सध्या ज्या पद्धतीनं वेगळ्या व्यक्तिरेखा साकारतोय, त्या पद्धतीची ही व्यक्तिरेखा नाही. राणी मुखर्जी चांगली दिसली असली तरी आपण या चित्रपटात आहोत, अशी "बॉडी लॅंग्वेज' तिच्या अभिनयातून जाणवत नाही. अमीषा पटेलच्या व्यक्तिरेखेचंच भजं झाल्यानं तिच्या अभिनयाबद्दल न सांगितलेलंच बरं. लहान मुलं चांगली असली तरी त्यातल्या कोणालाही आपली छान छाप उमटवता आलेली नाही. शंकर-एहसान-लॉय यांच्या बिघडलेल्या सुराचा मोठा फटका सिनेमाला बसलाय. कोहलींनी चित्रपटाचा "लूक' चोप्रांच्या बॅनरला साजेसा ठेवून प्रेक्षकांना हॉलीवुडची सैर घडवून आणलीय. पण विषयातला सैरभैरपणा टाळता न आल्यानं या सहलीला काहीच अर्थ उरत नाही.

Thursday, June 26, 2008

कुणाल कोहली "दिल से'

"थोडा प्यार थोडा मॅजिक' हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक कुणाल कोहलीसाठी दुहेरी दडपण आहे. पहिलं दडपण म्हणजे या सिनेमाचे सहनिर्माते "यशराज फिल्म्स'च्या वाट्याला सातत्यानं आलेलं अपयश आणि दुसरं दडपण म्हणजे कुणालचे लागोपाठ हीट ठरलेले दोन चित्रपट. या दोन दडपणांच्या पार्श्‍वभूमीवर हा सिनेमा उद्यापासून (ता.27) प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं कुणाल कोहली म्हणतोय, "मैं कॅल्क्‍युलेटरसे नहीं, दिल से फिल्में बनाता हूँ।'
---------------
कुणाल कोहलीला खरं तर नशीबवानच मानायला हवं. कारण, "मुझसे दोस्ती करोगे'सारखा सुमार चित्रपट दिल्यानंतर त्याला पुन्हा कोणी संधी देईल, असं वाटलं नव्हतं. पण आदित्य चोप्रानं त्याला एक अखेरची संधी दिली आणि त्यानं त्याचं सोनं केलं. "हम तुम' आणि "फना' असे दोन सुपरहिट चित्रपट आता कुणालच्या नावावर जमा होते. "थोडा प्यार थोडा मॅजिक'चा विषय आपल्याला योगायोगानं सुचला नसल्याचं स्पष्ट करून तो म्हणतो, ""सध्याचा काळ खूप धकाधकीचा आहे. सर्वसामान्यांचं आयुष्य खूप खडतर झालंय. रोज आपल्याकडं काही ना काही तरी वाईट घडतंय. एकीकडं महागाई वाढतेय; दुसरीकडं खून, आत्महत्या यांचेही प्रकार वाढलेत. आपण सर्व जण या नकारात्मक गोष्टींवरच चर्चा करतोय. परीक्षेत 90 टक्के मार्क्‍स मिळविणाऱ्या मुलांवर 95 टक्के मार्क्‍स मिळवण्यासाठी आणखी दबाव टाकतोय. ज्यांना चांगले मार्क्‍स मिळालेत, त्यांना आपल्याला फेमस कॉलेज मिळेल की नाही याची शंका आहे. एकंदरीत सर्वच जण कसल्या ना कसल्या दडपणाखाली आयुष्य जगत आहे. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ग्रॅंट रोडच्या "अप्सरा' मल्टिप्लेक्‍सबाहेर मी उभा होतो. तिथं एक कुटुंब आपल्या मुलांसमवेत आलं. त्यानं कुणाला तरी इथं कोणकोणते सिनेमे लागलेत, याबद्दल विचारणा केली. पाच-सहा सिनेमांची नावं ऐकल्यानंतर या कुटुंबाचा प्रमुख म्हणाला, ""चलो बच्चे, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हपर घुमने जाते है ।' त्याच्या या उत्तरात "थोडा प्यार थोडा मॅजिक'चा विषय दडला आहे. लहान मुलं, पालक, आजी-आजोबा या सगळ्यांनी एकत्र बसून पाहावा असा चित्रपट बऱ्याच काळात आपल्याकडं आलेला नाही. तशा प्रकारचं मनोरंजन देण्याचा प्रयत्न मी या सिनेमातून केलाय.''
1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मिस्टर इंडिया'चा या सिनेमावर खूप प्रभाव आहे. हा प्रभाव मान्य करीत कुणाल सांगतो, "" "मिस्टर इंडिया'मध्ये वास्तव होतं, फॅंटसी होती, मोगॅम्बोसारखा व्हिलन होता. तो एक परिपूर्ण मनोरंजक सिनेमा होता. "मुझसे दोस्ती करोगे'चा अपवाद वगळल्यास मी नेहमीच माझ्या पद्धतीचा सिनेमा बनवलाय. या सिनेमातनं आयुष्याकडं "पॉझिटिव्ह ऍटिट्यूड'नं पाहण्याचा संदेश मी दिलाय. नातेसंबंध हे जन्माद्वारे नाही; तर प्रेमातून बनतात, ही गोष्टसुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मी त्यातून छान काव्य सादर केलं आहे. यातल्या गाण्यात चांगलं काव्य आहे. अर्थात, माझ्या एका चित्रपटामुळं पुन्हा "साफसुथऱ्या' कॅटेगरीतील चित्रपटांचा दौर सुरू होईल, असा माझा दावा नाही. पण त्या पद्धतीची प्रोसेस तरी सुरू होईल, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. माझ्या पूर्वीच्या तीन सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा बनविणं, हे खूप कठीण काम होतं. कारण यात हसता हसता डोळ्यातून पाणी आणण्याचं आव्हान मी स्वीकारलंय. प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता त्यातून एखादा "सोशल मेसेज' देणं हे खूप अवघड काम आहे. या सिनेमाद्वारे मी हे काम केलंय.''
कुणालच्या पहिल्या तीन चित्रपटांची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली होती. पण या सिनेमाद्वारे तो आता निर्माताही झालाय. यापूर्वीच्या दोन चित्रपटांनी केलेला जबरदस्त व्यवसाय लक्षात घेऊन निर्माता होण्याचा निर्णय घेतलास का? साहजिक आपल्या मनात येणाऱ्या या प्रश्‍नावर कुणाल म्हणतो, ""एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढलोय. माझे आई-वडील दोघंही नोकरी करायचे. मी जेव्हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला, तेव्हाच खरं तर मला दिग्दर्शक बनायचं होतं. त्यावेळी माझ्याकडं भरपूर पैसे असते तर मी कधीच निर्माता बनलो असतो. निर्माता बनण्यामागं माझी थोडी वेगळी कारणं आहेत. सिनेमाबाबत मी खूप "पॅशनेट' आहे. मैं मेरी फिल्म कॅल्क्‍युलेटरसे नहीं, दिल से बनाता हूँ। त्यामुळेच या सिनेमाची "ओनरशिप' आपल्याकडेच राहावी, असं मला वाटतं. याचा अर्थ असा नाही की, "यशराज'ची निर्मिती असेल तर मला आपलं नाव घेतलं जाईल की नाही, याबद्दल असुरक्षितता वाटते. किंबहुना "हम तुम' आणि "फना'चं नाव घेतलं की "यशराज फिल्म्स'च्या ऐवजी माझंच नाव घेतलं जातं. स्वतःचं बॅनर सुरू करण्यामागची आणखी एक भावना म्हणजे चित्रपट बनविणाऱ्या प्रत्येक घटकाचा योग्य सन्मान करणं. आपल्याकडे सिनेमा बनला की, कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकाचा गौरव होतो. पण स्पॉटबॉय, लाईटमन, एक्‍स्ट्रा कलाकार यांच्याकडं दुर्लक्ष होतं. या दुर्लक्षित कलाकारांना मला मान मिळवून द्यायचाय. ही मंडळी शूटिंग करताना प्रत्येक सीन चित्रीत होताना पाहतात. पण सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यांना तो पाहा, असं कोणीच म्हणत नाही. म्हणूनच मी "थोडा प्यार...' प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा माझ्या बॅनरसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना दाखवलाय. ही मंडळी सलग गेले चार सिनेमे माझ्यासोबत होती. त्यांच्यासाठी मी एका विशेष "ट्रायल शो'चं आयोजन केलं होतं.''
कुणालला नेहमीच स्टार कलावंतांचं साह्य मिळालंय. याची त्यालाही कल्पना आहे. याबद्दल तो सांगतो, ""या सिनेमाच्या कथानकासाठी माझ्या डोक्‍यात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि अमिषा पटेल या तिघांची नावं होती. विशेष म्हणजे हे तिघेही कलाकार मला मिळाले. सैफला अभिनयात तुम्ही काही तरी वेगळे चॅलेंजेस दिले की तो खुलतो, असा आजवरचा अनुभव आहे. मी नेमकं तेच केलंय. हा पूर्ण सिनेमाभर तो टायसुटात वावरलाय. अमिषा पटेलचा तिच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम "रोल' ठरावा. प्रथितयश कलाकारांचा होकार मिळविण्यापेक्षा त्यांच्याकडून सर्वोत्तम अभिनय करवून घेणं, ही खूप अवघड कला आहे. कारण हे सर्व चांगले कलाकार आहेतच.''
"यशराज फिल्म्स'च्या यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांचे आपल्यावरचे ऋण कुणालला मान्य आहेत. त्यांनी चान्स दिला नसता तर आज आपण कुठं असतो, ही कल्पनाही तो करू शकत नाही. यश चोप्रांना तो आदर्श मानतो. चाळीस वर्षं निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आदर मिळविणं ही सोपी गोष्ट नाही, हे तो आवर्जून सांगतो. म्हणूनच त्यानं आपल्या सहायकांनाही आता संधी देण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या तीन असिस्टंट दिग्दर्शकांना त्यानं पटकथा लिहिण्यास सांगितलीय. ज्याची पटकथा प्रथम तयार होईल, त्याला तो स्वतंत्रपणे आपल्या बॅनरसाठी दिग्दर्शनाची संधी देणार आहे. चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनाव्यतिरिक्त आपल्याला कशाचीही आवड नसल्याचं कुणाल म्हणतो. पेज थ्री पार्ट्यांमध्ये जाणं त्याला पसंत नाही. त्याला पैसा कमवायचाय. पण शेवटी तो शेअरबाजारात न गुंतवता अधिकाधिक चांगल्या फिल्म्स करणं, हेच त्याचं स्वप्न आणि महत्त्वाकांक्षाही आहे.

Monday, June 23, 2008

सनई चौघडे - review

हा खरा धक्का!
मराठी सिनेमांमधले वेगवेगळे विषय आणि त्याचा "लूक' हा गेल्या काही वर्षांमधला चर्चेचा विषय आहे. तरीदेखील भाषेच्या दृष्टीनं आपला सिनेमा अजूनपर्यंत पुस्तकी भाषेतच अडकला होता. आजच्या तरुणाईच्या भाषेची नस त्याला काही केल्या सापडत नव्हती. हे अवघड काम साध्य करण्यात निर्माते श्रेयस-दीप्ती तळपदे आणि दिग्दर्शक राजीव पाटील यांना यश आलंय. या सिनेमातली काही दृश्‍यं वाजवीपेक्षा भडक दाखविली गेली असली तरी खऱ्या अर्थानं हा आजच्या पिढीचा सिनेमा आहे. "मॅरेज ब्युरो'च्या नावाखाली लग्नाचा मांडलेला बाजार आणि कुमारी मातृत्वाची समस्या या चित्रपटात खूप वेगळ्या आणि प्रभावीपणे मांडण्यात आलीय. संजय पवार यांच्या लेखणीनं तरुणाईची नेमकी भाषा अधोरेखित केलीय; मात्र काही प्रसंगांमध्ये त्यांची लेखणी अनावश्‍यक धारदार झालीय. सई ताम्हणकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर या त्रिकुटाचा जमलेला अभिनय, अवधूत गुप्तेचं संगीत आणि उत्तम निर्मिती मूल्यांच्या जोरावर हा सिनेमा चांगला जमलाय.
हा सिनेमा म्हणजे सईच्या (सई ताम्हणकर) आयुष्यातली अनेक वेडीवाकडी वळणं आहेत. वडील नसल्यामुळं सईची आईच तिला बेळगावसारख्या ठिकाणी वाढवते. कॉलेजमध्ये असताना सईला तिच्या स्वप्नातला राजकुमार (श्रेयस तळपदे) भेटतो; मात्र त्याची साथ तिला फार काळ लाभत नाही. आईच्या मृत्यूमुळे सई आपल्या पुण्यातल्या लग्न झालेल्या बहिणीकडे (शिल्पा तुळसकर) राहायला येते; मात्र तिच्या जिजाजींना अमेरिकेतली नोकरी मिळाल्यामुळे सईच्या लग्नासाठी घाई सुरू होते. अत्यंत आधुनिक पद्धतीनं लग्न जमविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या "कांदे पोहे' या संस्थेत तिचं नाव नोंदविलं जातं. इथं तिला हवा तसा मुलगा (संतोष जुवेकर) सापडतो. मात्र या निर्णायक क्षणी ती आपल्याला लग्नापूर्वीच मूल झाल्याचं सांगून खळबळ उडवून देते. तिच्या या घोषणेमुळं लग्न जुळविण्यात शंभर टक्के माहिर असलेल्या "कांदे पोहे' संस्थेचा संचालक असलेल्या आदित्यचेही (सुबोध भावे) काही क्षण धाबे दणाणते. सईच्या पूर्वायुष्यात डोकावून तो तिचे आणि संतोषचे नाते जोडण्याचा प्रयत्न करतो; मात्र ते न जमल्यानंतर त्याला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो.
"सनई चौघडे' या शीर्षकावरून हा सिनेमा "फील गुड' पद्धतीचा असल्याची शंका येते; परंतु हा सिनेमा सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला एकापाठोपाठ एक धक्के देण्याचे काम करतो. चित्रपटाची सुरुवात फारशी झोकदार झालेली नाही. सईच्या आईचा मृत्यू आणि मृत्यूसमयीची दृश्‍यं अगदी "फिल्मी' वाटतात. त्यानंतर सईचं "मॅरेज ब्युरो'त दाखलं होणं, पाच जोड्यांची परीक्षा सुरू होणं... इथपर्यंतचा प्रवास आस्ते आस्तेच झालाय. सई एकीकडं आपलं लग्न जुळवीत असताना दुसरीकडं तिच्या पूर्वायुष्यातला "ट्रॅक' दाखवून दिग्दर्शकानं भविष्यातल्या वादळाची कल्पना दिलीय; पण हे वादळ ती कुमारी माता असण्याइतकं भयानक असेल याची कल्पना येत नाही. इथून या सिनेमानं गती घेतलीय. आपल्या नायिकेला विवाहापूर्वीच आई बनवून लेखक-दिग्दर्शकानं मग थेट आपल्या संस्कृती-परंपरेचा लेखाजोखा घेऊन त्याची आजच्या काळाशी सांगड घातलीय; पण ही सांगड घालताना हा सर्व संवाद आजचा वाटेल, याचीही काळजी घेण्यात आलीय. पूर्वी विवाहबाह्य संबंधातून होणारी गडबड "मैं तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हूँ' या संवादावर येऊन थांबे. हा सिनेमा त्याच्या एक पाऊल पुढं गेलाय. यातली नायिका आपल्या नायकाला हा गुळगुळीत संवाद न ऐकवता "माझे पिरीयडस्‌ चुकलेत' असं म्हणताना दाखविलीय. हे एक उदाहरण असून असे आणखी काही संवाद या सिनेमाला आजच्या काळाशी "रीलेट' करण्यात यशस्वी ठरलेत. या जमेच्या बाजू असताना काही त्रुटीही राहून गेल्यात. सुबोध भावेच्या व्यक्तिरेखेचा प्रवास ज्या दिशेनं दाखविण्यात आलाय, त्या दिशेचा शेवट सईच्या आयुष्यापाशी येऊन थांबणार, याची आधीच कल्पना आलेली असते. त्यामुळे त्यानं "क्‍लायमॅक्‍स'ला दिलेला "जोर का धक्का' पाहणाऱ्याला "धीरे से' लागण्याची शक्‍यता आहे.
या सिनेमाची मजबूत बाजू म्हणजे कलाकारांचे अभिनय. सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि संतोष जुवेकर यांच्या जमलेल्या अभिनयामागचं कारण म्हणजे त्यांच्या वाट्याला आलेल्या दमदार व्यक्तिरेखा. सुबोध या सिनेमात खूप छान दिसलाय आणि मस्त वावरलाय. तीच गोष्ट संतोषचीही म्हणावी लागेल. नवोदित सई ताम्हणकर कॅमेऱ्याला खूप सराईतपणानं सामोरी गेलीय. मुख्य म्हणजे तिघांनीही परस्परांना अभिनयात "कॉम्प्लिमेंट' केल्यानं त्याचा परिणाम अधिक जाणवतो. श्रेयस तळपदे "गेस्ट ऍपियरन्स'मध्ये चांगला भाव खाऊन गेलाय. तुषार दळवी ठीकठाक. मात्र शिल्पा तुळसकर आणि भारती आचरेकर यांच्याबाबत असं म्हणता येत नाही. शिल्पा एक तर खूप थकलेली आणि "एजेड' वाटते. भारती आचरेकर यांचा "कॉमेडी' ट्रॅक जमलेला नाही. अवधूत गुप्तेंचं संगीत "कॅची' आहे. चित्रपटाला "फ्रेश' आणि आकर्षक "लूक' देण्यात दिग्दर्शक राजीव पाटील यांना चांगलंच यश आलंय. एकंदरीत चकचकीत "कॅपसूल'मधून दिलेली ही कडू गोळी चांगलीच पचनी पडणारी आहे.

Monday, June 16, 2008

तुमच्या-आमच्यातला "सरकार'

तुमच्या-आमच्यातला "सरकार'

"Power can not be given, it needs to be taken.` सध्या विशेष चर्चेत असलेल्या "सरकार राज' या चित्रपटाची ही "टॅगलाईन'. "पॉवर' हा शब्द राजकारणाशी अधिक जवळचा असला तरी इतर क्षेत्रांमध्येही तो अगदी सहजपणे रूजला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी "शिवा', "सत्या', "सरकार', "कंपनी'... आदी चित्रपटांमधून या "पॉवर'चीच वेगवेगळी रुपं दाखविली आहेत. त्यानिमित्तानं वर्मांनी शब्दबद्ध केलेली ही "पॉवर'मागील "पॉवर'.
-------------
टेक वन ः स्थळ ः भारतामधली कोणतीही एक शाळा. दोन मुलं एका पेन्सिलीसाठी भांडताहेत. वादावादीतूनही या पेन्सिलीचा ताबा न मिळाल्यानं ही दोन्ही शेवटी हाणामारीपर्यंत जाऊन पोचतात.
(या दृश्‍याचा शेवट या दोन मुलांमधला शक्तिशाली मुलगा पेन्सिल मिळवतो किंवा शाळेतील शिक्षक मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवतात आणि पेन्सिल कोणालाही देत नाहीत, असा असू शकतो.)
टेक टू ः स्थळ ः नवी दिल्ली. भारत-पाकिस्तानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली शिखर बैठक. विषय अर्थातच काश्‍मीर. दोन्ही बाजूकडचे अधिकारी तावातावानं आपली बाजू मांडतात.
(ही बैठक कोणताही निष्कर्ष न निघता संपते आणि भविष्यातील आणखी एका शिखर बैठकीची तयारी सुरू होते.)
तसं पाहायला गेलं तर हे दोन प्रसंग अगदी टोकाचे आहेत, असं पटकन कोणीही म्हणेल. पण, मला तसं वाटत नाही. मला त्यांच्यात कमालीचं साम्य वाटतं. पहिला प्रसंग अगदी आपल्या दररोजच्या पाहण्यातला आहे. म्हणूनच आपण या मुलांच्या भांडणाकडे "एका पेन्सिलीसाठी काय भांडताय !' असं म्हणून जातो. मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या नजरेतून पाहिल्यास ते ज्या पेन्सिलीसाठी भांडताहेत, ती पेन्सिल म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं-तिसरं काही नसून काश्‍मीरच आहे. फक्त त्यांच्यामधल्या वादाचं माध्यम आणि त्याच्या व्यापकतेत फरक आहे.
"पॉवर' हा असा प्रकार आहे की, ज्याच्यातून कोणीही सुटलेला नाही. वर उल्लेखिलेल्याप्रमाणे या "पॉवर'कडे आकर्षित होण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. पण, त्याचं "टार्गेट' एकच असतं. "मला इतरांच्यावर सत्ता गाजवायचीय !' अनेक जण मला म्हणतात, की तुमच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही दृष्टीनं पराकोटीला गेलेल्या व्यक्तिरेखा अधिक पाहायला मिळतात. हे पराकोटीला जाणं म्हणजे नक्की काय असतं ? त्याचा "पॉवर'शी काही संबंध असतो का ? "मला जे योग्य वाटतं, ते मी करतो !' माझ्या दृष्टीनं "पॉवर'ची ही सोपी व्याख्या आहे. त्यापुढं जाऊन मी असं म्हणेन की, जी व्यक्ती माझं लक्ष वेधून घेते आणि बराच काळ त्या व्यक्तीचा माझ्यावर प्रभाव असेल, तर तिला मी "पॉवरफुल' व्यक्ती मानतो. अशा व्यक्तिरेखांचं मूळ आपल्या घरापासून शोधता येईल. घरातील पत्नी, मुलं माझ्या मताला मान देत असतील, तर घरात माझा आदर केला जातो. त्यापुढं जाऊन इतर माणसं माझ्या विचारांशी सहमत असतील तर मग मी लगेचच नगरसेवक बनतो. अल्पावधीत अगदी आमदार-खासदार बनण्यापर्यंतही माझी मजल जाते. एक दिग्दर्शक म्हणून विचार करताना उच्च पदापर्यंत जाताना कोण कुठले मार्ग वापरतो, याला माझं फारसं महत्त्व नसतं. या रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चेहरे आणि त्यांची "मोडस ऑपरेंडी' टिपण्याकडं माझा अधिक कल असतो. त्यांच्या कृती योग्य की अयोग्य, हे ठरवायला मला आवडत नाही. ते मी प्रेक्षकावर सोपवून टाकतो.
"शिवा' चित्रपटामध्ये मी दिशा हरवलेल्या कॉलेजमधल्या तरुणांचा विषय हाताळला होता. आपल्या देशामधली ही एक "पॉवर'च आहे. "सत्या'मध्ये त्याचं पुढचं "एक्‍स्टेंशन' दाखवण्यात आलंय. मुंबईत दररोज हजारो नोकरी-धंद्यानिमित्त आपल्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊन येतात. त्या पूर्ण न झाल्या की, मग त्यांना वेगळं जग खुणावू लागतं. त्याचंच प्रतिबिंब "सत्या', "कंपनी'मध्ये पडलं होतं. मुंबईच्या समुद्रातील एका खडकावर भिकू म्हात्रे जेव्हा आपले हात फैलावतो, तेव्हा त्याच्या मनात कुठंतरी आलं असतं की, हे सगळं आता माझंच आहे. सत्तास्थान गाठलं की मग ते टिकवण्यासाठी धडपड सुरू होते. काही लोकांकडे पैसा असतो, ताकद असते. तरीदेखील त्यांना म्हणावे तेवढं यश मिळत नाही. त्यामागचं कारण म्हणजे सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना मिळत नाही. तेव्हा लोकांचं प्रेम ही सुद्धा एक "पॉवर'च आहे. मध्यमवर्गीय समाज म्हणजे "ना इधर का ना उधर का'. पण, त्याचीही एक ताकद असते. ही ताकद माझ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. "पॉवर'च्या आणखी काही "शेडस्‌' बघितल्या तर ती एकप्रकारची पशूप्रवृत्ती असल्याचं जाणवेल. आपण आणखी एक अगदी साधं उदाहरण घेऊ. गल्लीत कुत्र्यांना भांडताना आपण नेहमीच पाहतो. या कुत्र्यांमध्ये जो कुत्रा अधिक ताकदवान असतो, तो आपल्या टोळक्‍यावर वर्चस्व गाजवतो. सत्तास्थानाकडे वाटचाल करणं, ही आपल्या समाजाची सहज प्रवृत्तीच आहे.
समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही "पॉवर' आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वांच्या परिचयाच्या एकता कपूरच्या मालिकांचं सूत्रही या "पॉवर'भोवतीच फिरतं. राजकारणाचा "पॉवर'शी अधिक जवळचा संबंध आहे, हे खरंय. पण, मला स्वतःला राजकारणात फारसा रस नाही. मला विलक्षण आकर्षण आहे ते समाजावर प्रभाव असलेल्या व्यक्तिरेखांचे. नावच घ्यायचं झालं तर मी अमिताभ बच्चन, राज ठाकरे आणि मल्लिका शेरावत यांचा उल्लेख करीन. तिसऱ्या नावाबद्दल अनेकांना कदाचित आश्‍चर्यही वाटेल. पण, ते खरं आहे. तिच्या "आयटेम सॉंग्ज'चा प्रभाव तुम्ही नाकारू शकत नाही. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयानं भारावून जाणाऱ्यांमधल्या लक्षावधी रसिकांपैकी मीसुद्धा एक आहे. बच्चन म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून अभिनयातलं सत्तास्थानच आहे. एक दिग्दर्शक या नात्यानं मी या सत्तास्थानाला माझ्या चित्रपटातून थोड्या वेगळ्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल तसेच त्यांच्या भूमिकेबद्दलही मला फारसे ठाऊक नाही. ते जाणून घेण्यातही मला विशेष रस नाही. पण, त्यांना भाषण करताना पाहिलं की, माझी नजर टीव्हीवरून हलत नाही. ते आपल्या स्टाईलनं पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात. हे खिळवून ठेवणं म्हणजेसुद्धा एकप्रकारची "पॉवर'च आहे. ती लाखातल्या काही थोड्या लोकांच्याच वाट्याला येते. माझ्या चित्रपटात मी नेहमीच समाजाच्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तींना स्थान देतो. मात्र, त्यांच्या कृतीचं जसंच्या तसं चित्रण मी करीत नाही. "जंगल'मध्ये वीरप्पनच्या जवळ जाणारी व्यक्तिरेखा होती. हा चित्रपट करूनही या व्यक्तिरेखेबद्दलचं माझं कुतूहल शमलं नाही. तेव्हा मी आता नव्यानं वीरप्पनवर एक चित्रपट करतोय.
"पॉवर'च्या प्रभावामागची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातला आत्मविश्‍वास. याबद्दल माझंच एक उदाहरण देतो. वयाच्या सातव्या वर्षापासून मी सिनेमामुळं झपाटलोय. लहानपणी घरच्यांना न सांगता मी अनेक सिनेमे बघितलेत. त्यापायी आईचा बराच मारही खाल्लाय. इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतली तेव्हाही माझं सिनेमाचं वेड काही कमी झालं नव्हतं. केवळ "डिग्री' हवी म्हणून शिकलो. लेन्सेस म्हणजे काय असतात, कॅमेरा हा काय प्रकार असतो, हे माहिती नसूनही मी दिग्दर्शक झालो. दिग्दर्शक बनण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात होती, त्यामुळेच इथवरचा प्रवास झाला. मात्र, माझ्याप्रमाणे सर्वांनाच दिग्दर्शक बनायचं नसतं. काहींना आपल्या कंपनीचा "सीईओ' बनायचं असतं, काहींना मालक, तर काहींना राजकारणात जाऊन मोठी पदं भूषवायची असतात. त्यासाठी मग सुरू होतो संघर्ष. हा संघर्ष म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. त्याला आपण "पॉवर वे'सुद्धा म्हणू शकतो.
(शब्दांकन ः मंदार जोशी)

Monday, June 9, 2008

"रामू ईस्टाईल' रोमांचक खेळ!

"सरकार राज' चित्रपट म्हणजे राजकीय सारीपटावरचा एक रोमांचक खेळ आहे. सर्वसाधारणपणे गाजलेल्या चित्रपटांचे पुढचे भाग क्वचितच रंगतदार ठरतात, पण "सरकार राज' हा चित्रपट मूळ "सरकार'पेक्षाही अधिक थरारक झालाय.
हा खेळ रंगलाय "टाइट क्‍लोजअप्स'च्या अनोख्या छायाचित्रणानं, अमर मोहिले यांच्या वेगवान पार्श्‍वसंगीतानं आणि बच्चन कुटुंबीयांच्या अभिनयातील करिश्‍म्यामुळं, पण या खेळाची सर्व सूत्रं हातात ठेवलीयत ती दिग्दर्शक रामगोपाल वर्मांनी. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वर्मांनी दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट सुमार दर्जाचे होते. त्यामुळेच वर्मांच्या विश्‍वासार्हतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं होतं. या वेळी वर्मांनी कसलेही प्रयोग न करता ज्या पद्धतीच्या सिनेमाचा "फॉर्म' आपणास चांगला समजतो, त्याच "फॉर्म'चा "सरकार राज'साठी उपयोग केलाय. त्यामुळेच हा चित्रपट जमून गेलाय. कथा-पटकथा तसेच संवादाच्या आघाडीवर खूप मोठी मजल मारता आलेली नाही; मात्र या त्रुटी झाकण्यात वर्मांची "स्टायलिश' हाताळणी कामास आलीय. प्रतिभावंत तरीही एका वाट चुकलेल्या दिग्दर्शकाला पुन्हा रस्ता सापडणं, हीच या सिनेमाची सर्वात मोठी कमाई आहे.
"सरकार राज' हा कागदावर "सरकार'चा दुसरा भाग आहे; मात्र वर्मांनी मूळ व्यक्तिरेखांचे मुखवटे कायम ठेवून त्यांना या वेळी वेगळी कामगिरी करायला लावलीय. गुन्हेगारी आणि सत्तेच्या राजकारणातील हेव्यादाव्यांचा विषय असला की, वर्मांमधला दिग्दर्शक खुलतो हा यापूर्वीचा अनुभव होता. "आग', "डार्लिंग', "निशब्द'सारखे प्रयोग करून झाल्यानंतर वर्मांनी या वेळी कसलाही धोका पत्करलेला नाही. म्हणूनच हा सिनेमा रंगतदार बनलाय. सुभाष नांगरे (अमिताभ बच्चन), शंकर नांगरे (अभिषेक बच्चन) यांचं राजकीय वजन एव्हाना चांगलंच वाढलंय. विशेषतः महाराष्ट्रासाठी काहीतरी भरीव करण्याची कळकळ या वेळी शंकर नांगरेच्या वक्तव्यातून जाणवते. याच वेळी विदेशी नागरिक असलेली ऐश्‍वर्या राय एका वीजप्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन नांगरेंकडं येते. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी दोन तास चाललेला शह-काटशहाचा खेळ म्हणजे "सरकार राज'. शिवसेना सरकार राज्यात सत्तेत असताना एन्‍रॉन प्रकल्पाचं नाव प्रथम चर्चेत आलं होतं. दिग्दर्शकानं वास्तव आणि कल्पिताचं झकास मिश्रण यात केलंय. सत्तेसाठी केला जाणारा रक्तरंजित खेळ आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलाय. हाच खेळ वर्मांनी आपल्या पद्धतीनं मांडलाय. या चित्रपटात ऐश्‍वर्या राय आणि दिलीप प्रभावळकर या दोन व्यक्तिरेखा नव्यानं आल्यात. वर्मांनी कथानकाच्या तपशिलात फार न शिरता सर्व घटना खूप वेगानं दाखविल्यात. या वेळी त्यांनी संवादाला "बॅक सीट'ला ठेवून छायाचित्रणाच्या खेळावर बाजी मारलीय. या चित्रपटातले कलाकारांचे "टाइट क्‍लोजअप्स' हा प्रेक्षकांना सुखद धक्का देणारा प्रकार आहे. पूर्वार्धात विसविशीत वाटणाऱ्या कथानकाला दिग्दर्शकानं शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये प्रचंड गती दिलीय. त्यामुळेच चित्रपटाचा शेवट खिळवून ठेवतो.
"सरकार राज' हा दिग्दर्शकाचा सिनेमा असल्यानं अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांचा अभिनय वेगळ्या धाटणीचा वाटतो. अमिताभ बच्चन यांचे बरेचसे संवाद तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे वाटतात, पण हा प्रकार बहुधा जाणीवपूर्वक केलेला असावा. ऐश्‍वर्या राय हे या चित्रपटाचे "सरप्राईज पॅकेज' आहे. ऐश्‍वर्याच्या "लूक'मधला बदल चांगला वाटतो. अमिताभप्रमाणेच तिच्याही व्यक्तिरेखेच्या वाट्याला कमी संवाद असूनही ती प्रभाव पाडण्यात यशस्वी झालीय. "सरकार'प्रमाणेच अतुल काळेनं "सरकार राज'वरही आपली छाप उमटवलीय. गोविंद नामदेव, दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे यांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या निभावल्यात. "गोविंदा गोविंदा'च्या सुरावटीवर अमर मोहिलेंनी पार्श्‍वसंगीतामधून केलेली करामत दीर्घकाळ लक्षात राहणारी आहे.

Friday, June 6, 2008

"शोले'चा "रिमेक' पुन्हा करेन...


रामगोपाल वर्मा हे नाव उच्चारलं तरी दचकावं अशी सध्या स्थिती आहे. "आग'च्या माध्यमातून वर्मांनी "शोले'च्या "रिमेक'बाबत जो काही खेळ केला, तो विसरावा म्हटलं तरी विसरणं कठीण आहे. खुद्द वर्मांनाही त्याची कल्पना आहे. म्हणूनच आपल्या अपयशाबद्दल ते सहजपणे मन मोकळं करून टाकतात. "आग'चं अपयश आणि उद्या रिलीज होणाऱ्या "सरकार राज'बद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
----
ः शिवसेनेतील घडामोडींवर "सरकार राज' आधारलाय का?
ः राजकारणात मला फारसा रस नाही. राजकारणापेक्षा मला रस असतो तो राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये. "सरकार' हा सिनेमा जिथं संपलाय, तिथून "सरकार राज' सुरू झालाय. "सरकार'चा शेवट केल्यानंतर त्यातल्या व्यक्तिरेखा पुढं कशा पद्धतीनं वागतील, या विचारातून "सरकार राज' बनलाय.

ः "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी तुम्ही "सरकार राज' बनवलात, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे. त्याबद्दल काय सांगाल?
ः "आग'च्या अपयशावर प्रेक्षकांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आल्या, की मला स्वतःलाच आपण गब्बर झालो असं वाटलं. "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी मी "सरकार राज' बनविलेला नाही किंवा माझा एखादा चित्रपट "फ्लॉप' ठरला तर त्याचं अपयश धुऊन काढावं, असं मला वाटत नाही. माझ्यात जेवढी गुणवत्ता आहे, त्याच दर्जाचा मी सिनेमा बनवू शकतो.

ः "आग' चित्रपट आवडला नाही असं सांगणारे हजारो प्रेक्षक सापडतील, पण हा चित्रपट आवडला अशा काही प्रतिक्रिया तुमच्याकडं आल्या का?
ः (हसत) एकही नाही. कदाचित कोणाला हा चित्रपट आवडला असेल तर ते मला सांगण्याची हिंमत झाली नसावी. माझी आई माझ्या चित्रपटांची "फॅन' आहे. "आग'पूर्वी मी बनविलेले सर्व चित्रपट तिला आवडले होते, परंतु "आग' पाहिल्यानंतर तिनं मला साधा एक फोनसुद्धा केला नाही.

ः या सिनेमाच्या अपयशाचं "डिसेक्‍शन' केलंयत का?
ः मी माझ्या कोणत्याही सिनेमाच्या यश-अपयशात रमत नाही. माझ्या दृष्टीनं सतत कार्यरत राहणं महत्त्वाचं असतं. कोणीही "चलो, एक फ्लॉप फिल्म बनाते हैं।' या उद्देशानं सिनेमा करीत नाहीत. अर्थात, "आग'चं चित्रीकरण झाल्यानंतर मला तो जमला नसल्याची कल्पना आली होती.

ः "आग'च्या पटकथेवर आपण अधिक मेहनत घ्यायला हवी होती, असं तुम्हाला आता वाटतं का?
ः फक्त "आग'च का, आतापर्यंत मी स्वतः दिग्दर्शित केलेल्या एकाही चित्रपटाच्या पटकथेवर मेहनत केलेली नाही. "सत्या' हा एक "कल्ट' सिनेमा मानला जातो, पण त्या सिनेमाचीसुद्धा पटकथा लिहिली गेली नव्हती. माझ्या मते कोणताही सिनेमा हा "आयडिया'वर बनतो. "स्क्रीप्ट इज अ किंग' असं म्हटलं जातं; मात्र पटकथेवर तीनचार वर्षं मेहनत घेऊनही ते सिनेमे रद्दड निघाल्याची अनेक उदाहरणं सापडतील. "सरकार', "रंगीला', "कंपनी' या चित्रपटांच्या पटकथेवर मी दोनतीन दिवसांपेक्षा अधिक काम केलेलं नव्हतं.

ः "आग' नेमका कुठं फसला असं वाटतं?
ः "शोले'चा "रिमेक' हा मूळ चित्रपटापेक्षा चांगला करायचा, या उद्धटपणातून मी हा चित्रपट बनविला आणि तिथंच मी फसलो. कोणताही "रिमेक' करताना तुमचा हेतू चांगला असावा लागतो. त्यात गडबड असता कामा नये. "कितने आदमी थे...' असं "शोले'तील गब्बर म्हणतो, तर "आग'मधला बब्बन फक्त "कितने...' म्हणतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं मी "इंटरप्रिटेशन' करीत गेलो, पण त्यांच्यात भावनिक नातं जोडण्यात मात्र मला अपयश आलं. म्हणूनच प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला असावा.

ः "रिमेक'वरच तुमचा नेहमी भर का असतो?
ः कारण कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' आहे असं मला वाटत नाही. प्रभावित होण्याची गोष्ट फक्त सिनेमापुरतीच मर्यादित नाही. एखादी घडलेली घटना, कोणाचा तरी वास्तवातील अनुभव, वर्तमानपत्रातील "कव्हरेज'... यावरून जर एखादा सिनेमा बनला असेल तर त्याला "रिमेक'च म्हणावं लागेल. म्हणूनच माझी कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' नाही, असं मी म्हणू शकतो.

ः "आग' प्रदर्शित झाल्यानंतर "शोले'फेम रमेश सिप्पी यांनीही बरीच नाराजी व्यक्त केली होती...
ः (हसत) "आग' खूप वाईट बनल्यानं खरं तर सिप्पींना आनंद व्हायला हवा.

ः संधी मिळाली तर "शोले'चा रिमेक पुन्हा करायला आवडेल का?
ः का नाही? जरूर करीन. फक्त प्रेक्षकांची हा "रिमेक' पाहण्याची तयारी असावी.

ः नवीन कोणते सिनेमे करताय?
ः "कॉन्ट्रॅक्‍ट' नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केलाय. मुंबईतल्या गुन्हेगारीवर हा सिनेमा आधारलाय. येत्या जुलैमध्ये तो प्रदर्शित होईल. त्याचबरोबर चंदनतस्कर वीरप्पनवरही मी एका सिनेमाची निर्मिती करतोय.

Wednesday, June 4, 2008

तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा

"आयपीएल' स्पर्धेला मिळालेल्या घवघवीत यशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतेय, पण या स्पर्धेच्या आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. "सेट मॅक्‍स' वाहिनीने उत्कृष्ट प्रक्षेपण करून या स्पर्धेच्या यशात मोठा वाटा उचलला. "सोनी' वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल दासगुप्ता यांच्याशी या स्पर्धेने मिळविलेले यश; तसेच पुढील आव्हानांबद्दल केलेली चर्चा.
......................
: "आयपीएल'च्या आयोजनामध्ये एक प्रक्षेपक या नात्यानं तुमचा नेमका सहभाग कसा होता?
: "आयपीएल'च्या आयोजनामागची "बीसीसीआय'ची भूमिका मला खूप आवडली. क्रिकेटवर आधारलेला तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा, अशी "थीम' घेऊन ते आमच्याकडे आले होते. "सेट मॅक्‍स' ही एक सिनेमाविषयक वाहिनी असल्यानं या "थीम'वर काम करायला मला आवडले. "बीसीसीआय'नं 2007 च्या मध्यावधीत या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी निविदा मागविल्या होत्या. "निम्बस', "इएसपीएन' तसेच "सेट मॅक्‍स' हे तीनच स्पर्धक या शर्यतीमध्ये उतरले होते. जागतिक स्तरावरील प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेला कसे "प्रमोट' कराल? यावर त्यांचा अधिक भर होता. यावर आम्ही केलेले सादरीकरण त्यांना खूप आवडले आणि आमच्या वाहिनीला पाच वर्षांच्या प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले. सामन्यांचं नियोजन करताना ते "प्राईम टाईम' या वेळेत होतील याची आम्ही काळजी घेतली. शाळकरी मुलं हा आमचा "टार्गेट' प्रेक्षक असल्यानं आम्ही देशभरातील सर्व शाळांच्या परीक्षा संपल्याची खात्री करूनच या स्पर्धेला सुरुवात केली.
: "आयपीएल'ला एवढं मोठं यश मिळेल, असं तुम्हाला वाटलं होतं का?
: आता ज्याप्रमाणावर या स्पर्धेला यश मिळालंय, त्यापेक्षा अधिक यशाची आम्ही अपेक्षा करीत होतो. आतापर्यंत मिळालेल्या यशावर आम्ही आनंदी आहोत, पण आपण कुठं कमी पडलो, याचीही आम्हाला जाणीव आहे. "टीआरपी'च्या आकड्यांनुसार छोट्या शहरांमध्ये आम्हाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा यशस्वी करण्याचं आव्हान आता आमच्यापुढं आहे.
: "आयपीएल'च्या यशात सर्वाधिक वाटा कोणाचा आहे, असं तुम्हाला वाटतं?
: अर्थातच "बीसीसीआय'चे ललित मोदी आणि पर्यायानं या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचा. "बीसीसीआय'नं अत्यंत काळजीपूर्वकपणे या स्पर्धेचं खासगीकरण केलं. कलावंत, उद्योजक; तसेच समाजातील इतर दिग्गजांना एकत्र आणण्याची त्यांनी किमया केली. एकमेकांसमोर उभं राहूनही त्यांचे "इगो' दुखावले जाणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. "आयपीएल'चं आयोजन करताना पवारांनी खूप मोठा धोका पत्करला होता, कारण ही स्पर्धा अपयशी ठरली असती; तर पवार त्याचे धनी ठरले असते. धोका हा शब्द मी अशासाठी वापरलाय, की "झी नेटवर्क'ने काही महिन्यांपूर्वीच आयोजित केलेल्या "आयसीएल' स्पर्धेकडे रसिकांनी पाठ फिरविली होती. खुद्द "बीसीसीआय'मधील काही वरिष्ठ मंडळींना "आयपीएल'च्या यशाची खात्री नव्हती. "टीम इंडिया' जोपर्यंत खेळत नाही, तोपर्यंत प्रेक्षक हा "फॉर्म्यट' स्वीकारणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं होतं. हा विरोध डावलून पवारांनी "आयपीएल'चं आयोजन केलं. फक्त त्यापुरतंच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला त्यांची मदत झाली. योग्य जागी योग्य माणसांची त्यांनी निवड केली.
: "आयपीएल'चं वर्षातून दोन वेळा आयोजन करणं शक्‍य आहे, असं तुम्हाला वाटतं?
: पुढील काही वर्षे तरी "आयपीएल'चं आयोजन वर्षातून एक वेळाच व्हावं, असं मला वाटतं, कारण यश मिळालंय म्हणून अधिक पदरात पाडण्याची हाव बाळगणं चुकीचं ठरेल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी तयारी करावी लागते. या वेळच्या स्पर्धेतला प्रत्येक सामना वेळेत सुरू झाला. अनेक शहरांमध्ये सामने खेळले जाऊनही खेळाडू "प्रॅक्‍टिस'साठी किंवा प्रत्यक्ष सामन्याच्या स्थळी उशिरा पोहोचल्याची तक्रार आली नाही. कोणत्याही संघातल्या खेळाडूंचं विमान चुकलं नाही. नियोजन उत्तम असल्यानं असे प्रकार घडले नाहीत. एकाच वर्षी दोन वेळा ही स्पर्धा आयोजित करायची असेल; तर संघांची संख्या वाढवावी लागेल. या स्पर्धेत रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, मॅकलमसारखे खेळाडू स्पर्धेच्या पूर्वार्धात; तर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फक्त उत्तरार्धातच खेळले. प्रचंड गुणवत्ता असलेले विदेशी खेळाडू आम्हाला पूर्ण स्पर्धेत खेळवायचे आहेत. त्यामुळे सध्या तरी वर्षातून एकदाच ही स्पर्धा आयोजित करणं योग्य ठरेल.
: "आयपीएल'च्या यशामुळं "सेट मॅक्‍स'चा नेमका किती फायदा झालाय, असं तुम्हाला वाटतं?
: गेले चार आठवडे "सेट मॅक्‍स' वाहिनी लोकप्रियतेच्या तक्‍त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोणत्याही "नेटवर्क'चा कारभार पाहिल्यास त्यांच्याकडे एक अत्यंत यशस्वी वाहिनी आणि त्याच्या छायेखाली असणाऱ्या इतर वाहिन्या असल्याचं आढळते, पण "आयपीएल'च्या यशामुळं "सोनी' आणि "सेट मॅक्‍स' या एकाच समूहाच्या दोन प्रबळ वाहिन्या उभ्या करण्यात आम्हाला यश आलंय.