Saturday, August 23, 2008

review-"मान गये मुघल-ए-आझम'

"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे.
"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्‍यता आहे; मात्र हा सिनेमा "मुघल-ए-आझम'शी नव्हे, तर "जाने भी दो यारो'शी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चटपटीत लिखाणात छेल यांनी चांगलं यश मिळवलं आहे, पण दहा-पंधरा चांगले संवाद आणि प्रसंगांमुळं सिनेमा बनत नाही, हे छेल यांना ठाऊक नसावं. एकाच कथानकातून त्यांनी देशभक्ती, प्रेम, रहस्य मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि अपेक्षेप्रमाणे एक ना धड... असा "फील' या सिनेमाला आलाय. परेश रावल, के. के. मेनन, राहुल बोस, मल्लिका शेरावत अशी चांगली "कास्ट' असूनही वेगळेपणाच्या हव्यासामुळं ती "वेस्ट' गेलीय.
या चित्रपटालाही बॉम्बस्फोटाचीच पार्श्‍वभूमी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची तयारी फेब्रुवारीत झाली. लेखकानं त्याचा संबंध आपल्या कथानकाशी जोडलाय. गोव्यातील एका नाटक कंपनीचा परेश रावल हा मुख्य अभिनेता. मल्लिका शेरावत ही त्याची पत्नी. "मान गये मुघल-ए-आझम' या नाटकात परेश अकबर बादशहाचा, तर मल्लिका अनारकलीची व्यक्तिरेखा साकारीत असते. राहुल बोस हा "रॉ'चा एक अधिकारी. तो गुन्हेगारांच्या शोधासाठी गोव्यात येतो आणि मल्लिकाच्या प्रेमात पडतो. तो आणि मल्लिका देशप्रेमाच्या नावाखाली परेश रावलचा वापर करून घेतात. चित्रपटाचा व्हिलन झालाय तो के. के. मेनननं साकारलेला एका गझल गायक. त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतात. मल्लिका आणि परेश रावळच्या मदतीनं राहुल बोस हे संबंध उघडकीस आणतो.
"जाने भी दो यारो'द्वारे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एक छान सामाजिक-राजकीय प्रहसन सादर केलं होतं. संजय छेल यांना या सिनेमातून असंच काहीतरी अपेक्षित होतं, पण कच्च्या लिखाणामुळं त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. छेल यांच्यातील लेखक एवढा कमी पडला आहे की, या चित्रपटाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत "ग्रीप' घेता आलेली नाही. दहा पाच-दहा मिनिटांनी एखाद-दुसरा चांगला संवाद, या गतीनं हा सिनेमा सुरू राहतो. परेश-मल्लिकाच्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्यात, पण राहुल बोस आणि के. के. मेनन यांच्याबद्दल तसं म्हणता येत नाही. या सिनेमात "मान गये...' हे नाटक बऱ्याचदा पाहायला मिळतं. या नाटकातली कलाकार मंडळी वारंवार आपले संवाद बदलतात, नको ती "ऍडिशन्स' घेतात, त्यांच्या अभिनयात कोणतंही गांभीर्य दिसत नाही... तरीसुद्धा हे नाटक पाहायला अनेकांनी गर्दी केल्याचं दिसतं.
मल्लिका आणि राहुल बोस यांचं खरोखरीच "अफेअर' असतं की राहुलच्या देशप्रेमाचा तो एक भाग असतो, याचा सिनेमा संपला तरी पत्ता लागत नाही. परेश रावल हे "सीझन्ड ऍक्‍टर' असल्यामुळे त्यांनी आपला भाग तयारीनं सादर केलाय. मल्लिकानंही आपल्या मर्यादा सांभाळून त्यांना चांगली साथ दिलीय. राहुल बोसची "इमेज' या सिनेमाद्वारे तोडण्यात आलीय. के. के. मेनन त्याच्या भूमिकेत अगदीच "मिसफिट' वाटलाय. अन्नू मलिक यांचं संगीत ऐकताना या चौघांचा गोंधळ बरा म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा सिनेमा संपल्यानंतर छेल यांना एखादं नवीन स्वप्न पडो, एवढीच काय ती शुभेच्छा द्यावीशी वाटते.

review-मुंबई मेरी जान

मुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे अपवादानेच आपल्यासमोर आलाय. ही कसर निशिकांत कामत यांच्या "मुंबई मेरी जान' या सिनेमानं भरून काढलीय. मुंबईत 2006 च्या जुलैत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्‍वभूमी निवडत कामत यांनी मुंबईच्या "स्पिरिट'ला एक आगळावेगळा सलाम ठोकलाय. तो आपण स्वीकारलाच पाहिजे. बॉम्बस्फोट का घडला, कोणी घडविला, त्याचे धागेदोरे कसे मिळाले... या "रिसर्च'मध्ये गुंतून न पडता दिग्दर्शकानं आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य मुंबईकरांवर ठेवलाय. त्यामुळेच हा सिनेमा पाहणाऱ्याच्या हृदयाला भिडतो, त्याला अनेकदा अस्वस्थ करतो आणि मुंबईकरांच्या उपजत "ह्युमर'ला दाद देण्यास भाग पाडतो. "युटीव्ही'ची दर्जेदार निर्मिती, कसदार लेखन, संजय जाधव यांचं अप्रतिम कॅमेरावर्क आणि कामत यांच्या "पॉलिश्‍ड' दिग्दर्शनामुळं हा सिनेमा वेगळ्या वाटेचा असूनही अत्यंत परिणामकारक ठरलाय.
बॉम्बस्फोट होण्याआधी; तसेच तो झाल्यानंतर सहा व्यक्तींच्या आयुष्यावर दिग्दर्शकानं आपला "फोकस' ठेवलाय. परेश रावल हे पोलिस दलातील एक वरिष्ठ कॉन्स्टेबल दाखवलेत. अवघ्या दहा दिवसांनंतर ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार असतात. विजय मौर्या हा त्यांचा तरुण सहकारी. या दोन व्यक्तिरेखांमधील संवादांद्वारे दिग्दर्शकानं अख्ख्या पोलिस दलाचं "आरपार' चित्र उभं केलंय. हिंदी चित्रपटांमधील पोलिस हा नेहमीच विनोदाचा विषय झालाय. हा सिनेमा त्याला छेद देऊन गेलाय. सोहा अली खान ही एका चॅनेलमधील तरुण, तडफदार पत्रकार. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिच्यातली पत्रकार जागी होते, मात्र आपला पती बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं तिला समजतं. या वेळी बातमी शोधायला गेलेली सोहा आपल्याच चॅनेलची एक "ब्रेकिंग न्यूज' ठरते आणि तिचा "बाईट' घेण्यापर्यंत मजल जाते.
या सिनेमातलं चौथं व्यक्तिमत्त्व आहे ते इरफान खान. दक्षिणेतल्या कोणत्यातरी खेडेगावातून आलेली ही व्यक्ती मुंबईत सायकलवरून चहा-कॉफी विकत असते. बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच त्याची भेट परेश रावल आणि विजय मौर्याशी होते आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळतं. आपला काही गुन्हा नसताना पोलिस त्रास देत असल्यामुळे इरफान त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं सूड उगवतो. कधी मॉलमध्ये खोटा बॉम्ब ठेवल्याचा फोन कर; तर कधी रेल्वेस्थानकामध्ये, मात्र त्याच्या एका खोट्या फोनमुळं एका व्यक्तीला "हार्टऍटॅक' येतो. या वेळी इरफानचं झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर त्याची कृती या सिनेमाला हळूहळू उंचीवर नेऊ लागते. माधवन हा कट्टर देशभक्त. प्रदूषणाचं प्रमाण रोखण्यासाठी तो स्वतः ऐपत असूनही चारचाकीमधून न फिरता लोकलमधूनच प्रवास करीत असतो, मात्र बॉम्बस्फोटाचा "आँखो देखा हाल' पाहिल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं. के. के. मेनन हा सुशिक्षित बेरोजगार. कॉम्प्युटर इंजिनियर असूनही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग काय, रिकाम्या मनात सैतानाचं भूत अवतरणारच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मुस्लिमांकडे तो ते दहशतवादीच आहेत, या नजरेतून बघत असतो आणि आपल्या मित्रांचेही कान भरत असतो, मात्र बॉम्बस्फोटानंतर अशा काही घटना घडतात, की त्याचे डोळे उघडतात.
योगेश विनायक जोशी आणि उपेंद्र सिधये यांनी या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलीय. या सहा व्यक्तींचे पाच "ट्रॅक' परस्परांमध्ये मिसळणं हे खूप अवघड काम होतं, पण लोकलचा एका "ट्रॅक'वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना जो खडखडाट होतो, तसा खडखडाट लेखक-दिग्दर्शकानं होऊ दिलेला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. परेश रावल आणि विजय मौर्याचा "ट्रॅक' सर्वाधिक परिणामकारक आहे. सोहा आणि माधवनचा "ट्रॅक' ठीकठाक असून, इरफानचा खूप वेगळा वाटतो. तुकाराम पाटील या व्यक्तिरेखेत परेश रावल यांनी कमाल केलीय. या कलाकाराला कोणताही "रोल' द्या, त्यात त्याचं भिडणं विलक्षण असतं. रावल यांच्या कारकिर्दीतील काही भन्नाट भूमिकांपैकी ही भूमिका एक ठरावी. विजय मौर्या यांनी रावल यांना खूप छान साथ दिलीय. चांगला दिग्दर्शक असेल; तर सोहा अली खानचा प्रभाव जाणवतो, हे यापूर्वीही दिसून आलं होतं. या सिनेमात नेमकं तेच पाहायला मिळतं. इरफान खान, माधवन आणि के. के. मेनन हे तिघेही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना अगदी "टॉप फॉर्म'मध्ये वाटतात. सिनेमाच्या शेवटी "ये दिल है मुश्‍किल...' हे गाणं "बॅकग्राऊंड'वर ऐकविण्याची कल्पनाही भन्नाट आहे. "डोंबिवली फास्ट'मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कामत यांना यश आलंय. हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी आणखी एक मराठी दिग्दर्शक सज्ज होतोय. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.

Wednesday, July 23, 2008

"कॉन्ट्रॅक्‍ट' review

हुकमाचा एक्काही कामी !
"सरकार राज'ला बऱ्यापैकी आकार देण्यात रामगोपाल वर्मांना यश आल्यानं हा दिग्दर्शक पुन्हा माणसात येतोय, असं वाटत होतं. मात्र, "कॉन्ट्रॅक्‍ट' पाहिल्यानंतर तसं काही झालं नसल्याची खात्री पटते. गेल्या काही वर्षांमध्ये वर्मांनी आपल्या चित्रपटांमधून बरेच प्रयोग केले. "गॅंगवॉर'पट सोडले तर त्यांचे बहुतेक सर्व प्रयोग फसले. "सत्या', "कंपनी'नंतर वर्मांनी "कॉन्ट्रॅक्‍ट' बनवला तो गॅंगवॉरपटांची त्रिधारा पूर्ण करण्यासाठी. या विषयात त्यांची मातब्बरी असल्यानं "कॉन्ट्रॅक्‍ट'द्वारे ते निराश करणार नाहीत, असं वाटत होतं. पण, सूर हरवलेल्या वर्मांचा हुकमाचा एक्काही या सिनेमात चाललेला नाही. या सिनेमात त्यांनी "अंडरवर्ल्ड'चा दहशतवादाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, एवढा स्फोटक विषय हाताळण्यासाठी आवश्‍यक तेवढी मेहनत वर्मांनी घेतलेली नाही. "रॉ स्टॉक'मधली काही दृश्‍यं जोडून एखादा सिनेमा तयार व्हावा, असा "फील' हा चित्रपट पाहताना येतो. दहशतवादाच्या मुळाशी जाण्याऐवजी वर्मांनी दोन गॅंगमधला बटबटीत हिंसाचार चित्रपटभर दाखवलाय. एका प्रतिभाशाली दिग्दर्शकाची ही उतरती भाजणी खऱ्या सिनेमा शौकिनासाठी धक्कादायक आहे.
अमन (अध्मिक महाजन) हा लष्करातून बाहेर पडलेला एक तरुण. त्याचं सळसळतं रक्त पाहून अहमद हुसेन (प्रसाद पुरंदरे) हा पोलिस अधिकारी प्रभावित होतो. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं तो ठरवतो. "आरडी' नावाच्या दहशतवादाच्या टोळीत शिरून त्याचा बंदोबस्त करण्याची योजना तो त्याच्यापुढं ठेवतो. पण, अमनला शांततेत आयुष्य जगायचं असल्यानं तो हे काम करण्यास नकार देतो. काहीच दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात अमनची पत्नी आणि मुलीचा मृत्यू होतो. आपल्या घरापर्यंत पोचलेलं हे दहशतवादाचं लोण पाहून अमन हादरतो. अहमद हुसेन यांचा "प्लॅन' तो मान्य करतो आणि गुन्हेगार बनून "आरडी'च्या टोळीत सहभागी होतो. "आरडी'चा "नंबर वन' शत्रू असलेल्या गुंगाच्या (उपेंद्र लिमये) टोळीवर तो तुटून पडतो. मात्र, सरतेशेवटी या चक्रव्यूहातून बाहेर पडणं त्याला कठीण होतं.
वर्मांचा सूर साफ हरविल्याची लक्षणं संपूर्ण "कॉन्ट्रॅक्‍ट'मध्ये पाहायला मिळतात. टोळीयुद्धाचा दहशतवादाशी संबंध जोडताना वर्मांकडून अभ्यासपूर्ण हाताळणीची गरज होती. पण, दोन गॅंगमधला रक्तरंजित हिंसाचार एवढ्यापुरताच हा सिनेमा मर्यादित राहतो. चित्रपटाचा हीरो अमन लष्करातून बाहेर का पडतो, याचे सबळ कारण सिनेमात पाहायला मिळत नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याच्या इच्छेसाठी तो "आरडी' या दहशतवाद्याच्या टोळीत शिरायला तयार होतो, असं या सिनेमात दाखविण्यात आलंय. तसेच त्याचा या टोळीतील प्रवेश अगदी लुटूपुटूचा वाटतो. आरडीचा शत्रू गुंगाला कायम समुद्रातल्या बोटीवर दाखवून दिग्दर्शकानं त्याच्या अस्तिस्तावरही मर्यादा आणल्यात. बोटीवरचे सगळेच प्रसंग अगदीच बटबटीत झाले आहेत. वर्मांमधल्या दिग्दर्शकानं आपल्या सहाय्यकांकडून तांत्रिक कामं छान करवून घेतली आहेत. पण, चांगल्या सिनेमासाठी आवश्‍यक असलेल्या पटकथेबाबत त्यांनी डोळेझाक केलीय. या चित्रपटातले संवाद अगदीच कामचलाऊ आहेत. अमनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अध्मिक महाजनचा हा पहिला चित्रपट असून त्याचं नवखेपण जाणवत राहतं. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रसाद पुरंदरे यांनी आपली चांगलीच छाप उमटवली आहे. उपेंद्र लिमये यांची व्यक्तिरेखा सुरुवातीला चांगली वाटते. पण, नंतर या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकानं जे जे चाळे करायला लावलेत, त्यामुळं तिचा प्रभाव कमी झालाय. दिग्दर्शकाला ही व्यक्तिरेखा "सत्या'मध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या भिकू म्हात्रेच्या जवळपास नेण्याची इच्छा असावी. पण, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. अमृता सुभाष यांनी आपल्या वाट्याला आलेली "लाऊड' भूमिका आणखीनच "लाऊड' केलीय. अमृता खानविलकरची भूमिका खूपच छोटी आहे. अमर मोहिले यांचं संगीत त्यातल्या त्यात बरं आहे. एकंदरीत वर्मांमधल्या दिग्दर्शकाचा असा हरवलेल
ा सूर पाहणं, ही खरोखरीच खूप तापदायक गोष्ट आहे.

Tuesday, July 22, 2008

किस्मत कनेक्‍शन review

"लूज' कनेक्‍शन !
दिग्दर्शक अजिज मिर्झांची ओळख म्हणजे "राजू बन गया जंटलमन', "येस बॉस', "चलते चलते' हे चित्रपट. हलकेफुलके विषय आणि त्याची तितकीच हलकीफुलकी हाताळणी, हे त्यांच्या सिनेमाचं ठळक वैशिष्ट्य. "चलते चलते'च्या यशानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी "किस्मत कनेक्‍शन' हा सिनेमा बनवलाय. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमा खूप बदललाय. त्यांची ही विश्रांती सिनेमातही जाणवते. यावेळी मिर्झांनी आपल्या सिनेमातून मनोरंजनाबरोबरच "सोशल मेसेज' देण्याचा प्रयत्न केलाय. पण या दोन्ही गोष्टींचं करण्यात आलेलं "कनेक्‍शन' चांगलंच "लूज' झालंय आणि इथंच हा सिनेमा गडबडलाय. काही "पॅचेस'मध्ये हा सिनेमा चांगला वाटतो. मात्र, तेवढ्यासाठी तो संपूर्ण पाहणं तापदायक ठरेल. "जब वुई मेट' आणि "लगे रहो मुन्नाभाई' असं भिन्न पद्धतीचं मनोरंजन दिग्दर्शकाच्या डोक्‍यात होतं. ते प्रत्यक्षात पडद्यावर भलत्याच रूपात उतरलंय.
हिंदी सिनेमातल्या हीरोचं चावून चोथा झालेलं नाव म्हणजे राज मल्होत्रा. मिर्झांनी आपल्या हीरोला नेमकं हेच नाव दिलंय. शिक्षणात त्यानं मोठी मजल मारलेली असते. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन पाच वर्षें उलटली तरी त्याला नोकरी-व्यवसायात जम बसवता आलेला नसतो. त्याचं नशीब उघडतं ते प्रियाच्या (विद्या बालन) आगमनानंतर. दोन-चार प्रसंगात या दोघांची अपघातानं भेट होते आणि प्रत्येक वेळी ही भेट राजला फायदेशीर ठरते. प्रिया एक वृद्धाश्रम (मिर्झांनी त्याला "कम्युनिटी सेंटर' असं गोंडस नाव दिलंय) चालवीत असते. या वृद्धाश्रमाच्या जागेवर एक मॉल उभारण्यात येणार असतो. या मॉलचं काम मिळवण्यासाठी राजची धडपड सुरू असते. वृद्धाश्रम सुरू ठेवून तिथं आपण मॉल बांधण्याचा बिल्डरवर दबाव आणू, असं चित्र तो प्रियासमोर उभं करतो. प्रियाला ते खरंच वाटतं. या प्रवासादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण मॉल उभारण्याचा निर्णय होऊन तिथं वृद्धाश्रम बांधलं जाणार नसल्याचं स्पष्ट होतं तेव्हा प्रियाचे डोळे उघडतात. अखेरीस राजसुद्धा प्रियाच्या प्रेमासाठी आपला "प्रॅक्‍टिकल ऍप्रोच' दूर ठेवतो आणि एक प्रेमकहाणी यशस्वी होते.
संजय छेल या यशस्वी पटकथा लेखकानं हा सिनेमा लिहिलाय. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मनोरंजन आणि "सोशल मेसेज' यांचा सांधा त्यांना जोडता आलेला नाही. छेल आणि मिर्झा बऱ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेत. एक तर त्यांना शाहिद कपूर आणि विद्या बालन यांच्यातली प्रेमकहाणीसुद्धा छानपणे रंगविता आलेली नाही. "जब वुई मेट'च्या "ट्रॅक'वर ही प्रेमकहाणी चालते खरी. मात्र, त्या चित्रपटातला फ्रेशनेस, त्याची ट्रीटमेंट इथं पाहायला मिळत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध "लगे रहो...'च्या वळणानं जातो. पण इथंही तीच चूक पुन्हा घडलीय. विद्या बालनचा ना वृद्धाश्रम खरा वाटतो, ना त्यातली वृद्ध मंडळी. सगळाच प्रकार अगदी बेगडी झालाय. संपूर्ण चित्रपट कॅनडामध्ये चित्रीत झालाय.
कलाकार कितीही चांगला असो, पटकथेत गडबड झाली की त्याची मात्रा चालत नाही. हा अनुभव शाहिद कपूरचा अभिनय पाहताना येतो. त्यानं अनेक दृश्‍यांमध्ये शाहरूख खान आणि दिलीपकुमार यांची नक्कल केलीय. मात्र, "जब वुई मेट'मध्ये दिसलेला खराखुरा शाहिद कपूर इथं अपवादानंच दिसतो. विद्या बालननं या सिनेमातून आपला "लूक' बदललाय. पण व्यक्तिरेखेनं तिला यावेळी हात दिलेला नाही. त्यामुळं या दोघांचं पडद्याबाहेरचं "कनेक्‍शन' सध्या गाजत असलं तरी प्रत्यक्ष चित्रपटात ते अपवादानंच पाहायला मिळतं. शाहिदच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या विशाल मल्होत्रानं केलेली धमाल त्यातल्या त्यात प्रेक्षकांची करमणूक करते. ओम पुरी यांनी साकारलेली बिल्डरची भूमिकाही चांगली आहे. प्रितम यांनी संगीतबद्ध केलेली एक-दोन गाणीच जमली आहेत.

Monday, July 14, 2008

किरण देवहन्स interview

कॅमेरामन से डायरेक्‍शन तक!
"कयामत से कयामत तक', "अक्‍स', "कभी खुशी कभी गम' आणि "जोधा अकबर' या परस्परभिन्न चित्रपटांचे छायादिग्दर्शक ही किरण देवहन्स यांची एक ठळक ओळख. जाहिरात क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली कामगिरी ही त्यांची दुसरी ठळक ओळख. त्यांच्या नावावर सध्या हजारहून अधिक जाहिराती जमा आहेत. चित्रपट तसेच जाहिरात क्षेत्रामधील करियरबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
किरण देवहन्स मूळचे पुण्याचे. कॅमेरामन, ऍडफिल्ममेकर म्हणून नाव कमावणारे देवहन्स चांगले चित्रकार आहेत. शालांत अभ्यासक्रमातील "एलिमेंटरी' परीक्षेत ते तीन दशकांपूर्वी राज्यातून पहिले आले होते. मात्र, त्या काळात कला क्षेत्राकडं चांगल्या नजरेनं पाहिलं जात नसल्यामुळं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं पदवी घेतल्यानंतर "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मध्ये (एफटीआयआय) त्यांनी प्रवेश घेतला. चित्रपट माध्यमातल्या सर्व शाखांचं तिथं शिक्षण दिलं जात असलं तरी देवहन्स यांना कॅमेरा या प्रकारातच अधिक गती होती. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षी ते आपल्या गटात सर्वोत्कृष्ट कॅमेरामन ठरले. मुंबईतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ते सांगतात, ""नदीम खान यांच्याकडे मी सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम केलं. "कसम पैदा करनेवालो की', "इल्जाम', "अलग अलग' यांसारखे अनेक चित्रपट मी त्या वेळी केले. त्या काळात छायादिग्दर्शकांना फारसे चांगले मानधन मिळत नसे. त्यामुळे त्यांना एका वेळी पाच-सहा चित्रपट करावे लागायचे. माझ्या नशिबानं खान यांच्याकडचे दोन सहाय्यक एकाच वेळी नोकरी सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्या पथ्यावर पडून काही चित्रपटांचं मला स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. "तारे जमीं पर'मुळे प्रकाशात आलेले अमोल गुप्ते माझे चांगले मित्र. त्यांच्यामुळं माझी मन्सूर खान यांच्याबरोबर ओळख झाली आणि मला "कयामत से कयामत तक' हा पहिला सिनेमा मिळाला. तत्पूर्वी मी त्याच्यासोबत दोन वर्षं जाहिरात क्षेत्रासाठी काम केलं होतं. या काळात मी त्याच्याबरोबर तब्बल 500 जाहिराती केल्या.''
सर्वसाधारणपणे कोणत्याही कलाकाराचा कारकिर्दीतला पहिला सिनेमा हिट गेला की त्याच्यावर नवीन चित्रपटांचा वर्षाव होतो. देवहन्स यांच्याबाबत नेमकं तसंच घडलं. शेखर कपूर, राहुल रवैल या मान्यवरांबरोबरच अनेकांनी देवहन्स यांना आपल्या चित्रपटासाठी छायादिग्दर्शक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण यापैकी एकही ऑफर न स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना देवहन्स म्हणतात, ""काही चित्रपटांची फोटोग्राफी करूनही मला चांगले मानधन मिळाले नव्हते. चार जणांच्या खोलीतील एक अशीच माझी मुंबईतील ओळख होती. बाहेरगावहून कोणी नातेवाईक मला भेटायला आला तर त्याची व्यवस्था कुठं करायची, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा जाहिरात क्षेत्र की सिनेमा या दोन्हीपैकी एकाची निवड करणं गरजेचं होतं. कारण, जाहिरात क्षेत्रात चांगलं नाव कमाविण्यासाठी प्रथम तिथं चार-पाच वर्षं घालवावी लागतात. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी जाहिरात क्षेत्राची निवड करून पुढची दहा वर्ष तरी सिनेमासाठी काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. आज जेव्हा मी तटस्थपणे विचार करतो तेव्हा माझा हा निर्णय योग्य होता, असं लक्षात येतं. कारण, जाहिरात क्षेत्रात त्या काळात फारसे चांगले कॅमेरामन नव्हते. त्यामुळं मी चित्रीत केलेल्या बहुतेक सर्व जाहिराती गाजल्या. कालांतरानं मी माझं स्वतःचं "कॅंडिड क्रिएशन्स' नावाचं "प्रॉडक्‍शन हाऊस' सुरू केलं. या कंपनीतर्फे शाहरूख खान, सचिन तेंडुलकर, जुही चावला यांच्यावर चित्रीत केलेल्या सर्व जाहिराती खूप गाजल्या.''
1988 ते 1998 या दहा वर्षांमध्ये देवहन्स यांनी जवळपास एक हजारहून अधिक जाहिराती केल्या. राकेश मेहरांच्या "अक्‍स'मुळं पुन्हा ते छायादिग्दर्शनाकडं वळले. या चित्रपटांचे "रशेस' पाहिल्यानंतर करण जोहरनं आपल्या "कभी खुशी कभी गम' चित्रपटासाठी त्यांना आमंत्रित केलं. "फाईव्ह स्टार' सोयीसुविधा पुरविणारा दिग्दर्शक असा ते करणचा उल्लेख करतात. आशुतोष गोवारीकर यांचा "स्वदेस' चित्रपट त्यांना इतर "कमिटमेंटस्‌'मुळं करता आला नाही, पण गोवारीकर "जोधा अकबर'ची तयारी करीत आहेत, हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपण या चित्रपटासाठी काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या चित्रपटातील देवहन्स यांचं कॅमेरावर्क वाखाणलं गेलं. जाहिरात क्षेत्रामधील अत्युच्च दर्जाचं काम आणि बिगबजेट चित्रपटांमुळं देवहन्स कमी बजेटमध्ये काम करायलाच तयार नाहीत, असा एक समज या काळात त्यांच्याबद्दल झाला. तो खोटा ठरविण्यासाठी ते आता अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या नवीन चित्रपटासाठी काम करणार आहेत. या चित्रपटापाठोपाठ एखाद्या बिगबजेट चित्रपटाचं छायादिग्दर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करायचाय. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाचं एक ना एक दिवस दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न असतं. देवहन्स यांचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास अगदी अंतिम टप्प्यात आहे.

Friday, July 4, 2008

हरमन बावेजा - interview

दिग्गजांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे...

इंट्रो...
"दिलवाले', "दिलजले', "कयामत' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा, ही हरमन बावेजाची खरी ओळख. हृतिक रोशनसारखं दिसणं, ही त्याची दुसरी ओळख. मात्र, "लव्हस्टोरी 2050' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक त्याच्यावर फिदा झालेत. आपल्या वाटचालीचा त्यानं घेतलेला हा मागोवा.
---------------
ः "लव्हस्टोरी 2050' हा त्याच्या नावाप्रमाणे खरोखरीच काळाच्या पुढचा सिनेमा आहे. प्रेमकहाणीच्या पार्श्‍वभूमीवर 2050 मध्ये मुंबई कशी बदलली आहे, त्याचं चित्र या सिनेमात पाहायला मिळेल. मुंबईकरांची रोजची पायाखालची ठिकाणं, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, फ्लोरा फाऊंटन यात आम्ही दाखवली आहेत. फक्‍त ही ठिकाणंच आधुनिक झालेली नाहीत, तर माणूसही आधुनिक झाला आहे. त्याची कामंही तो आधुनिक पद्धतीने करायला लागला आहे. मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी आपल्या पायांना एक अत्याधुनिक व्हॅक्‍युम क्‍लीनर लावून शहराची सफाई करीत असताना या चित्रपटात पाहायला मिळतील. 2050 मधला मुंबईतला गाडीवरचा चहावाला कसा दिसेल, याचाही आम्ही अंदाज केला आहे. या सिनेमात तब्बल 1200 स्पेशल इफेक्‍टस्‌ आहेत. निर्मिती खर्चाच्या दृष्टीनं हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट आहे.
ः लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती; मात्र 15-16 वर्षांचा झाल्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंटचं आकर्षण वाटू लागलं. स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. स्वप्नपूर्तीसाठी मी स्वित्झर्लंडला या शाखेचं शिक्षण घेण्यासाठी गेलो. ग्लास कसे सर्व्ह करायचे, हातात ट्रे कसा पकडायचा असतो, बाथरूममध्ये टॉवेल्स कसे लावले जातात, आदींचं मी शिक्षण घेतलं. वास्तविक, हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीनं या सर्व गोष्टी शिकणं, हे खूप आवश्‍यक आहे. तिथं पहिल्या वर्षी मला रौप्यपदकही मिळालं. पण त्या शिक्षणात मी फार काळ रमू शकलो नाही. एकदा भारतात आल्यानंतर मी माझ्या पापांना खरं काय ते सांगून टाकलं. माझ्या आई-वडिलांनी आपले निर्णय कधीही माझ्यावर लादले नाहीत. माझा हा निर्णयसुद्धा त्यांनी अत्यंत शांतपणे स्वीकारला. "तुम नहीं चाहते हो तो ठीक है।' असं म्हणत दुसऱ्या दिवसापासून पापांनी मला त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितलं.
ः त्यानंतरची सात-आठ वर्षं मी खूप मेहनत केली. मला या क्षेत्रातच "करियर' करायचं असल्यानं पापांनी माझ्याकडून थोडी जास्तच मेहनत करून घेतली. सिनेमा बनविण्याच्या प्रत्येक घटकाचं मी शिक्षण घेतलं. "दिन रात एक किया।' हा संवाद खरोखरीच माझ्या त्या काळातल्या आयुष्याला लागू होईल. या वेळी पापांना एकच गोष्ट सांगितली होती की केवळ तुमचा मुलगा म्हणून मला पदार्पणाची संधी देऊ नका. ज्या दिवशी खरोखरच तुम्हाला मी अभिनय करू शकतो हे जाणवेल, त्याच दिवशी संधी द्या. त्यामुळं, पापासुद्धा माझ्या पदार्पणासाठी कसलीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हते. "प्यार तो होना ही था', "नो एन्ट्री', "वेलकम'फेम दिग्दर्शक अनीस बज्मी एके दिवशी आमच्या घरी आले होते. "हरमनला तुम्ही ब्रेक दिला नाहीत तर मी देतो!' असं त्यांनी थेट सांगून टाकलं. बज्मींसारखा यशस्वी दिग्दर्शक आपल्या मुलाला "ब्रेक' देण्याची भाषा करतो, हे ऐकून पापांनी तातडीनं "लव्ह स्टोरी 2050' हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.
ः हा माझा पदार्पणातला सिनेमा असला तरी मला अनावश्‍यक "फुटेज' मिळालेलं नाही. उलट, माझ्यापेक्षा प्रियांका चोप्राला यात अधिक वाव आहे. एक वडील या नात्यानं पापा मला संधी देणारी अनेक दृश्‍यं या सिनेमात दाखवू शकले असते. या सिनेमात काम करणाऱ्या बमन इराणी यांनाही ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली होती. "इतना अनसेल्फिश डिरेक्‍टर मैं पहली बार देख रहा हूँ ।' असे त्यांचे उद्‌गार आहेत. फिल्म चांगली झाली तर साहजिकच हरमनही त्यात उठून दिसेल, एवढंच पापांचं "लॉजिक' आहे आणि मला ते अगदी योग्य वाटतं.
ः प्रियांका चोप्राबरोबर माझी पाच वर्षांची मैत्री आहे. तिनं या सिनेमासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय. आमच्या दोघांमधल्या चांगल्या मैत्रीमुळं सध्या बऱ्याच अफवा पसरल्यात, याची आम्हाला कल्पना आहे. या अफवांचेच आम्ही सध्या शिकार झालोत. मात्र त्याचं आम्ही काहीच करू शकत नाहीत. सध्या तरी मी माझ्या करिअरवरच लक्ष केंद्रित केलंय. संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांनी मला संधी दिलीय. अशी संधी एखाद्याच्याच वाट्याला येते; मात्र या दिग्गजांच्या अपेक्षांना आपण न्याय दिला पाहिजे, याचं दडपण माझ्यावर आहे.

Thursday, July 3, 2008

इम्रान खान interview

अभिनेता आमीर खानचा भाचा या एका ओळखीमुळं इम्रानबद्दल अनेकांना मोठ्या आशा आहेत. आमीरची चुलत बहीण नुझत खान यांचा तो मुलगा आहे. "जाने तू या जाने ना' प्रदर्शित होण्यापूर्वीच इम्रानला आणखी दोन सिनेमे मिळाले आहेत. चित्रपट माध्यमाबद्दलची आपली मतं, आमीर आणि आपल्या करियरबद्दलची त्याची ही निरीक्षणं.
-------------
ः "जाने तू...'मध्ये जयसिंग राठोड असं नाव असलेल्या तरुणाचा "रोल' मी साकारतोय. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्याचा विश्‍वास आहे. "टिपिकल' हिंदी चित्रपटांमधला तो "हीरो' नाही. तो एखाद्या उद्योजकाचा मुलगा नाही. मध्यमवर्गात तो वाढलेला असतो. फॅन्सी कपडे घालण्याची त्याला आवड नाही की त्याच्याजवळ बाईकही नाही. त्याचं हे सीधंसाधं असणं मला फार आवडलं. चित्रपटसृष्टीत मी आलो ते दिग्दर्शक बनायला. कारण "हीरो'साठी आवश्‍यक असलेली "मसल पॉवर' माझ्याकडं नाही. पण अब्बास टायरवालानं या सिनेमातली जयसिंगची व्यक्तिरेखा ऐकवल्यानंतर मी अभिनय करण्याचा मोह आवरू शकलो नाही. तारुण्य हा या सिनेमाचा "यूएसपी' आहे. विशी-पंचविशीच्या घरातल्या आम्ही मंडळींनी एकत्र येऊन हा सिनेमा केलाय. "फॉर यंग पीपल, बाय यंग पीपल' असंच मी म्हणेन. "कयामत से कयामत तक' हा सिनेमासुद्धा दोन दशकांपूर्वी तरुण टीमनंच केला होता आणि तो प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यामुळं तशा प्रकारच्या यशाची पुनरावृत्ती व्हावी, अशी आशा मी बाळगून आहे.
ः "जाने तू...'च्या सुरुवातीला आमीरमामू (आमीर खान) त्याची निर्मिती करीत नव्हते. काही कारणांमुळं हा सिनेमा रखडला. त्या वेळी मी आणि या सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास टायरवाला मोठ्या टेन्शनमध्ये होतो. अर्थात, सिनेमा रखडणे हा प्रकार काही आम्हाला नवीन नव्हता. इथे कोणतीच गोष्ट वेळेत होत नाही. कागदावर सर्व काही ठरवलेलं असतं; पण अचानक पाऊस येणं, सेटवर अपघात होणं, कलाकारांच्या एकत्रित "डेटस्‌' न मिळणं... अशा काही गोष्टी असतात की, त्याला कोणी काहीच करू शकत नाही.
ः अशी विपरीत स्थिती असतानाही माझा अब्बासवर आणि त्याचा माझ्यावर पूर्ण विश्‍वास होता. आम्हा दोघांनाही कसल्याही परिस्थितीत हा सिनेमा पूर्ण करायचा होता. आमीरमामूंनी मला चित्रपटसृष्टीत "ब्रेक' देण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केली, अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे. मात्र ती साफ खोटी आहे. कारण आमीरमामू कधीच "इमोशनली' निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडं जेव्हा आम्ही या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी प्रथम "स्क्रीप्ट' ऐकव असं सांगितलं. आमच्या सुदैवानं त्यांना ही "स्क्रीप्ट' खूप आवडली. या वेळी त्यांनी मला दोन प्रश्‍न विचारले. एक होता, इम्रान, तुला ही "स्क्रीप्ट' आवडली आहे का? आणि दुसरा होता, या पटकथेवर अब्बास एक चांगला सिनेमा बनवू शकेल, याची तुला स्वतःला खात्री आहे? या दोन प्रश्‍नांची माझ्याकडून होकारार्थी उत्तरं ऐकल्यानंतर त्यांनी "आमीर खान प्रॉडक्‍शन'तर्फे हा सिनेमा बनविण्यास होकार दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुन्हा माझी "ऑडिशन' घेतली. त्यात मी चांगला वाटल्यानंतरच त्यांनी हा सिनेमा सुरू केला.
ः आमीरमामूंना जेव्हा मी क्षेत्रात येत आहे, असं सांगितलं तेव्हा माझ्या सांगण्यावर प्रथम त्यांचा मुळीच विश्‍वास बसला नाही. एक अभिनेता बनण्यासाठी जे गुण लागतात, ते माझ्यात नाहीत, असं त्यांचं मत होतं; पण काही दिवसांनी त्यांना जाणवलं की, त्यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं तेव्हासुद्धा लोक त्यांच्याबद्दल असंच निगेटिव्ह बोलायचे. आमीरमामूंनी मला कधीही अंधारात ठेवलेलं नाही. मला त्यांनी आजपर्यंत कसल्याही "टिप्स' दिलेल्या नाहीत. "तुझा रस्ता तुलाच ठरवायचाय,' हे त्यांचं सांगणं आहे. "यशस्वी झालास तर त्याचं क्रेडिट तू स्वतःच घे आणि अपयशी ठरलास तरी तूच त्याला सामोरं जा, असं त्यांचं सांगणं असतं. त्यांच्या दृष्टीनं हा सिनेमा यशस्वी ठरणं अधिक महत्त्वाचं आहे. सिनेमा यशस्वी ठरला तर मी आपोआपच लोकांना आवडेन, हे त्यामागचं "लॉजिक' असावं.
ः "जाने तू...' प्रदर्शित होण्यापूर्वीच मला "किडनॅप' आणि "लक' हे दोन सिनेमे मिळाले आहेत. कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन ही "लक'मध्ये माझी हिरोईन आहे. "लव्ह स्टोरी 2050' या सिनेमातून हरमन पदार्पण करीत असल्यामुळं त्याच्याबरोबर माझी स्पर्धा असल्याचं चित्र सध्या "मीडिया'तून रंगवलं जातंय. पण तसं करणं योग्य ठरणार नाही. कारण आम्ही दोघं काही शंभर मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतलेला नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेत फक्त एकच विजेता असतो. आमच्याकडे मात्र सगळ्यांना संधी आहे. भविष्यात मला दिग्दर्शक बनायचं असलं तरी सध्या अभिनयावरच मी लक्ष केंद्रित केलंय.

Monday, June 30, 2008

थोडा प्यार थोडा मॅजिक-review

सगळ्याच आघाड्यांवर थोडा...
चांगला सिनेमा बनायला केवळ "हट के' विषय असून चालत नाही. तो विषय दीड-दोन तासांमध्ये पुरावा आणि मुरावाही लागतो. तसं न झालं तर ते बूमरॅंग ठरण्याची भीती असते. कुणाल कोहली दिग्दर्शित "थोडा प्यार थोडा मॅजिक'बद्दल नेमका हाच घोळ झालाय. "हम तुम', "फना' या दोन सिनेमांचं दणदणीत यश पाठीशी असताना कुणालनं प्रेक्षकांना "इमोशनल डोस' देण्याचं धाडस दाखवलंय. मात्र दुर्दैवानं या डोसची मात्रा थोडी अधिक झाल्यानं हे धाडस अंगलट येण्याचीच दाट शक्‍यता आहे. सध्या समाजात सगळीकडं नकारात्मक घटना घडताहेत. त्याचा उबग येऊन कोहलींनी हा सिनेमा बनविणं समजण्यासारखं आहे. या सिनेमाची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली असून त्यांच्यावर अलीकडच्या काळात सतत "मिनिंगलेस' सिनेमे दिल्याचा आरोप होतोय. या पार्श्‍वभूमीवर कोहलींनी आपला "ट्रॅक' बदललाय. पण सकारात्मकता दाखविण्याच्या भरात आपला सिनेमा कंटाळवाणा होतोय, याकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासारखे दोन मुरब्बी कलाकार असूनही हा अवघा सव्वादोन तासांचा सिनेमा तीन-साडेतीन तासांचा सिनेमा पाहिल्याचा "फील' देतो. हा त्रास आणखी वाढलाय तो शंकर-एहसान-लॉय यांच्या हरवलेल्या जादूमुळं. त्यामुळेच या सिनेमातलं प्रेम ना आपलं हृदय जिंकतं ना जादू.
सैफ अली खान या सिनेमात एका उद्योजकाच्या रूपात पाहायला मिळतो. त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते ते एका अपघातामुळं. तो स्वतः चालवीत असलेल्या गाडीला अपघात होऊन त्यात एका जोडप्याचा मृत्यू होतो. त्यामुळं त्यांची मुलं उघड्यावर येतात. हे अपघात प्रकरण पुढं न्यायालयात जातं. यावेळी न्यायमूर्ती एक ऐतिहासिक निकाल देताना ही मुलं सज्ञान होईपर्यंत सैफनं त्यांचा सांभाळ करावा, असा आदेश देतात. न्यायालयाचा मान राखण्यासाठी सैफ या मुलांना आपल्या घरी आणतो. पण त्यांच्याशी जुळवून घेणं त्याला कठीण जातं. यावेळी सैफ आणि मुलं यांच्यातला दुवा बनण्याचं काम करण्यासाठी स्वर्गातली गीता (राणी मुखर्जी) पृथ्वीवर येते. तिला पृथ्वीवर येऊन या मुलांची मदत करण्याचा आदेश ऋषी कपूरनं साकारलेला एक देव देतो. कथानकातला हा भाग अगदीच सुमार पद्धतीनं चित्रीत करण्यात आलाय. राणीला जादूचं वरदान असल्यानं मग ती त्याद्वारे मुलं आणि सैफमधली दरी कमी करते.
"थोडा प्यार...'वर "मेरी पॉपीन्स' या हॉलीवुडपटाचा मोठा प्रभाव आहे. आपल्याकडं अपघात प्रकरणांचा निकाल लवकर न लागण्याची परंपरा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर "थोडा प्यार...'मधल्या न्यायाधीशांनी सैफला मुलांचा सांभाळ करण्याचा दिलेला आदेश या सिनेमाला वेगळा बनवितो. या आदेशाचं सुरुवातीला पालन करताना सैफचा नकारार्थी सूर, मुलांचा त्याच्यावरील खुन्नस आणि कालांतरानं राणी मुखर्जीनं या दोघांना एकत्र आणण्यासाठी केलेले प्रयत्न... हा भाग कागदावर चांगला वाटतो. पण त्याचं पडद्यावरचं रूपांतर फारसं जमलेलं नाही. या मुलांनी सैफला त्रास देण्यासाठी सुरुवातीला केलेल्या क्‍लृप्त्या अगदीच सुमार वाटतात. सैफची "गर्लफ्रेंड' म्हणून अमीषा पटेल जे काही करते, ते काहीच समजणारे नाही. तिची व्यक्तिरेखा कापली गेली असती तरी कथानकाला काहीच धक्का बसला नसता. राणीची व्यक्तिरेखा एखाद्या उपटसुंभासारखी सिनेमात अवतरलीय आणि तिचा सिनेमात वावरही तसाच आहे. दिग्दर्शकानं या व्यक्तिरेखेच्या पडद्यावरील "एन्ट्री'साठी थोडं डोकं लढवायला हवं होतं. सैफचं मुलांबद्दलचं मनःपरिवर्तनही असेच अचानक दाखविण्यात आलंय.
पटकथाच गडबडली असल्यानं सर्वच कलाकारांचा अभिनय गोंधळल्यासारखा वाटतो. सैफ अली खान सध्या ज्या पद्धतीनं वेगळ्या व्यक्तिरेखा साकारतोय, त्या पद्धतीची ही व्यक्तिरेखा नाही. राणी मुखर्जी चांगली दिसली असली तरी आपण या चित्रपटात आहोत, अशी "बॉडी लॅंग्वेज' तिच्या अभिनयातून जाणवत नाही. अमीषा पटेलच्या व्यक्तिरेखेचंच भजं झाल्यानं तिच्या अभिनयाबद्दल न सांगितलेलंच बरं. लहान मुलं चांगली असली तरी त्यातल्या कोणालाही आपली छान छाप उमटवता आलेली नाही. शंकर-एहसान-लॉय यांच्या बिघडलेल्या सुराचा मोठा फटका सिनेमाला बसलाय. कोहलींनी चित्रपटाचा "लूक' चोप्रांच्या बॅनरला साजेसा ठेवून प्रेक्षकांना हॉलीवुडची सैर घडवून आणलीय. पण विषयातला सैरभैरपणा टाळता न आल्यानं या सहलीला काहीच अर्थ उरत नाही.

Thursday, June 26, 2008

कुणाल कोहली "दिल से'

"थोडा प्यार थोडा मॅजिक' हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक कुणाल कोहलीसाठी दुहेरी दडपण आहे. पहिलं दडपण म्हणजे या सिनेमाचे सहनिर्माते "यशराज फिल्म्स'च्या वाट्याला सातत्यानं आलेलं अपयश आणि दुसरं दडपण म्हणजे कुणालचे लागोपाठ हीट ठरलेले दोन चित्रपट. या दोन दडपणांच्या पार्श्‍वभूमीवर हा सिनेमा उद्यापासून (ता.27) प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं कुणाल कोहली म्हणतोय, "मैं कॅल्क्‍युलेटरसे नहीं, दिल से फिल्में बनाता हूँ।'
---------------
कुणाल कोहलीला खरं तर नशीबवानच मानायला हवं. कारण, "मुझसे दोस्ती करोगे'सारखा सुमार चित्रपट दिल्यानंतर त्याला पुन्हा कोणी संधी देईल, असं वाटलं नव्हतं. पण आदित्य चोप्रानं त्याला एक अखेरची संधी दिली आणि त्यानं त्याचं सोनं केलं. "हम तुम' आणि "फना' असे दोन सुपरहिट चित्रपट आता कुणालच्या नावावर जमा होते. "थोडा प्यार थोडा मॅजिक'चा विषय आपल्याला योगायोगानं सुचला नसल्याचं स्पष्ट करून तो म्हणतो, ""सध्याचा काळ खूप धकाधकीचा आहे. सर्वसामान्यांचं आयुष्य खूप खडतर झालंय. रोज आपल्याकडं काही ना काही तरी वाईट घडतंय. एकीकडं महागाई वाढतेय; दुसरीकडं खून, आत्महत्या यांचेही प्रकार वाढलेत. आपण सर्व जण या नकारात्मक गोष्टींवरच चर्चा करतोय. परीक्षेत 90 टक्के मार्क्‍स मिळविणाऱ्या मुलांवर 95 टक्के मार्क्‍स मिळवण्यासाठी आणखी दबाव टाकतोय. ज्यांना चांगले मार्क्‍स मिळालेत, त्यांना आपल्याला फेमस कॉलेज मिळेल की नाही याची शंका आहे. एकंदरीत सर्वच जण कसल्या ना कसल्या दडपणाखाली आयुष्य जगत आहे. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ग्रॅंट रोडच्या "अप्सरा' मल्टिप्लेक्‍सबाहेर मी उभा होतो. तिथं एक कुटुंब आपल्या मुलांसमवेत आलं. त्यानं कुणाला तरी इथं कोणकोणते सिनेमे लागलेत, याबद्दल विचारणा केली. पाच-सहा सिनेमांची नावं ऐकल्यानंतर या कुटुंबाचा प्रमुख म्हणाला, ""चलो बच्चे, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हपर घुमने जाते है ।' त्याच्या या उत्तरात "थोडा प्यार थोडा मॅजिक'चा विषय दडला आहे. लहान मुलं, पालक, आजी-आजोबा या सगळ्यांनी एकत्र बसून पाहावा असा चित्रपट बऱ्याच काळात आपल्याकडं आलेला नाही. तशा प्रकारचं मनोरंजन देण्याचा प्रयत्न मी या सिनेमातून केलाय.''
1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मिस्टर इंडिया'चा या सिनेमावर खूप प्रभाव आहे. हा प्रभाव मान्य करीत कुणाल सांगतो, "" "मिस्टर इंडिया'मध्ये वास्तव होतं, फॅंटसी होती, मोगॅम्बोसारखा व्हिलन होता. तो एक परिपूर्ण मनोरंजक सिनेमा होता. "मुझसे दोस्ती करोगे'चा अपवाद वगळल्यास मी नेहमीच माझ्या पद्धतीचा सिनेमा बनवलाय. या सिनेमातनं आयुष्याकडं "पॉझिटिव्ह ऍटिट्यूड'नं पाहण्याचा संदेश मी दिलाय. नातेसंबंध हे जन्माद्वारे नाही; तर प्रेमातून बनतात, ही गोष्टसुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मी त्यातून छान काव्य सादर केलं आहे. यातल्या गाण्यात चांगलं काव्य आहे. अर्थात, माझ्या एका चित्रपटामुळं पुन्हा "साफसुथऱ्या' कॅटेगरीतील चित्रपटांचा दौर सुरू होईल, असा माझा दावा नाही. पण त्या पद्धतीची प्रोसेस तरी सुरू होईल, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. माझ्या पूर्वीच्या तीन सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा बनविणं, हे खूप कठीण काम होतं. कारण यात हसता हसता डोळ्यातून पाणी आणण्याचं आव्हान मी स्वीकारलंय. प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता त्यातून एखादा "सोशल मेसेज' देणं हे खूप अवघड काम आहे. या सिनेमाद्वारे मी हे काम केलंय.''
कुणालच्या पहिल्या तीन चित्रपटांची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली होती. पण या सिनेमाद्वारे तो आता निर्माताही झालाय. यापूर्वीच्या दोन चित्रपटांनी केलेला जबरदस्त व्यवसाय लक्षात घेऊन निर्माता होण्याचा निर्णय घेतलास का? साहजिक आपल्या मनात येणाऱ्या या प्रश्‍नावर कुणाल म्हणतो, ""एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढलोय. माझे आई-वडील दोघंही नोकरी करायचे. मी जेव्हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला, तेव्हाच खरं तर मला दिग्दर्शक बनायचं होतं. त्यावेळी माझ्याकडं भरपूर पैसे असते तर मी कधीच निर्माता बनलो असतो. निर्माता बनण्यामागं माझी थोडी वेगळी कारणं आहेत. सिनेमाबाबत मी खूप "पॅशनेट' आहे. मैं मेरी फिल्म कॅल्क्‍युलेटरसे नहीं, दिल से बनाता हूँ। त्यामुळेच या सिनेमाची "ओनरशिप' आपल्याकडेच राहावी, असं मला वाटतं. याचा अर्थ असा नाही की, "यशराज'ची निर्मिती असेल तर मला आपलं नाव घेतलं जाईल की नाही, याबद्दल असुरक्षितता वाटते. किंबहुना "हम तुम' आणि "फना'चं नाव घेतलं की "यशराज फिल्म्स'च्या ऐवजी माझंच नाव घेतलं जातं. स्वतःचं बॅनर सुरू करण्यामागची आणखी एक भावना म्हणजे चित्रपट बनविणाऱ्या प्रत्येक घटकाचा योग्य सन्मान करणं. आपल्याकडे सिनेमा बनला की, कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकाचा गौरव होतो. पण स्पॉटबॉय, लाईटमन, एक्‍स्ट्रा कलाकार यांच्याकडं दुर्लक्ष होतं. या दुर्लक्षित कलाकारांना मला मान मिळवून द्यायचाय. ही मंडळी शूटिंग करताना प्रत्येक सीन चित्रीत होताना पाहतात. पण सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यांना तो पाहा, असं कोणीच म्हणत नाही. म्हणूनच मी "थोडा प्यार...' प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा माझ्या बॅनरसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना दाखवलाय. ही मंडळी सलग गेले चार सिनेमे माझ्यासोबत होती. त्यांच्यासाठी मी एका विशेष "ट्रायल शो'चं आयोजन केलं होतं.''
कुणालला नेहमीच स्टार कलावंतांचं साह्य मिळालंय. याची त्यालाही कल्पना आहे. याबद्दल तो सांगतो, ""या सिनेमाच्या कथानकासाठी माझ्या डोक्‍यात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि अमिषा पटेल या तिघांची नावं होती. विशेष म्हणजे हे तिघेही कलाकार मला मिळाले. सैफला अभिनयात तुम्ही काही तरी वेगळे चॅलेंजेस दिले की तो खुलतो, असा आजवरचा अनुभव आहे. मी नेमकं तेच केलंय. हा पूर्ण सिनेमाभर तो टायसुटात वावरलाय. अमिषा पटेलचा तिच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम "रोल' ठरावा. प्रथितयश कलाकारांचा होकार मिळविण्यापेक्षा त्यांच्याकडून सर्वोत्तम अभिनय करवून घेणं, ही खूप अवघड कला आहे. कारण हे सर्व चांगले कलाकार आहेतच.''
"यशराज फिल्म्स'च्या यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांचे आपल्यावरचे ऋण कुणालला मान्य आहेत. त्यांनी चान्स दिला नसता तर आज आपण कुठं असतो, ही कल्पनाही तो करू शकत नाही. यश चोप्रांना तो आदर्श मानतो. चाळीस वर्षं निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आदर मिळविणं ही सोपी गोष्ट नाही, हे तो आवर्जून सांगतो. म्हणूनच त्यानं आपल्या सहायकांनाही आता संधी देण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या तीन असिस्टंट दिग्दर्शकांना त्यानं पटकथा लिहिण्यास सांगितलीय. ज्याची पटकथा प्रथम तयार होईल, त्याला तो स्वतंत्रपणे आपल्या बॅनरसाठी दिग्दर्शनाची संधी देणार आहे. चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनाव्यतिरिक्त आपल्याला कशाचीही आवड नसल्याचं कुणाल म्हणतो. पेज थ्री पार्ट्यांमध्ये जाणं त्याला पसंत नाही. त्याला पैसा कमवायचाय. पण शेवटी तो शेअरबाजारात न गुंतवता अधिकाधिक चांगल्या फिल्म्स करणं, हेच त्याचं स्वप्न आणि महत्त्वाकांक्षाही आहे.

Monday, June 23, 2008

सनई चौघडे - review

हा खरा धक्का!
मराठी सिनेमांमधले वेगवेगळे विषय आणि त्याचा "लूक' हा गेल्या काही वर्षांमधला चर्चेचा विषय आहे. तरीदेखील भाषेच्या दृष्टीनं आपला सिनेमा अजूनपर्यंत पुस्तकी भाषेतच अडकला होता. आजच्या तरुणाईच्या भाषेची नस त्याला काही केल्या सापडत नव्हती. हे अवघड काम साध्य करण्यात निर्माते श्रेयस-दीप्ती तळपदे आणि दिग्दर्शक राजीव पाटील यांना यश आलंय. या सिनेमातली काही दृश्‍यं वाजवीपेक्षा भडक दाखविली गेली असली तरी खऱ्या अर्थानं हा आजच्या पिढीचा सिनेमा आहे. "मॅरेज ब्युरो'च्या नावाखाली लग्नाचा मांडलेला बाजार आणि कुमारी मातृत्वाची समस्या या चित्रपटात खूप वेगळ्या आणि प्रभावीपणे मांडण्यात आलीय. संजय पवार यांच्या लेखणीनं तरुणाईची नेमकी भाषा अधोरेखित केलीय; मात्र काही प्रसंगांमध्ये त्यांची लेखणी अनावश्‍यक धारदार झालीय. सई ताम्हणकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर या त्रिकुटाचा जमलेला अभिनय, अवधूत गुप्तेचं संगीत आणि उत्तम निर्मिती मूल्यांच्या जोरावर हा सिनेमा चांगला जमलाय.
हा सिनेमा म्हणजे सईच्या (सई ताम्हणकर) आयुष्यातली अनेक वेडीवाकडी वळणं आहेत. वडील नसल्यामुळं सईची आईच तिला बेळगावसारख्या ठिकाणी वाढवते. कॉलेजमध्ये असताना सईला तिच्या स्वप्नातला राजकुमार (श्रेयस तळपदे) भेटतो; मात्र त्याची साथ तिला फार काळ लाभत नाही. आईच्या मृत्यूमुळे सई आपल्या पुण्यातल्या लग्न झालेल्या बहिणीकडे (शिल्पा तुळसकर) राहायला येते; मात्र तिच्या जिजाजींना अमेरिकेतली नोकरी मिळाल्यामुळे सईच्या लग्नासाठी घाई सुरू होते. अत्यंत आधुनिक पद्धतीनं लग्न जमविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या "कांदे पोहे' या संस्थेत तिचं नाव नोंदविलं जातं. इथं तिला हवा तसा मुलगा (संतोष जुवेकर) सापडतो. मात्र या निर्णायक क्षणी ती आपल्याला लग्नापूर्वीच मूल झाल्याचं सांगून खळबळ उडवून देते. तिच्या या घोषणेमुळं लग्न जुळविण्यात शंभर टक्के माहिर असलेल्या "कांदे पोहे' संस्थेचा संचालक असलेल्या आदित्यचेही (सुबोध भावे) काही क्षण धाबे दणाणते. सईच्या पूर्वायुष्यात डोकावून तो तिचे आणि संतोषचे नाते जोडण्याचा प्रयत्न करतो; मात्र ते न जमल्यानंतर त्याला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो.
"सनई चौघडे' या शीर्षकावरून हा सिनेमा "फील गुड' पद्धतीचा असल्याची शंका येते; परंतु हा सिनेमा सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला एकापाठोपाठ एक धक्के देण्याचे काम करतो. चित्रपटाची सुरुवात फारशी झोकदार झालेली नाही. सईच्या आईचा मृत्यू आणि मृत्यूसमयीची दृश्‍यं अगदी "फिल्मी' वाटतात. त्यानंतर सईचं "मॅरेज ब्युरो'त दाखलं होणं, पाच जोड्यांची परीक्षा सुरू होणं... इथपर्यंतचा प्रवास आस्ते आस्तेच झालाय. सई एकीकडं आपलं लग्न जुळवीत असताना दुसरीकडं तिच्या पूर्वायुष्यातला "ट्रॅक' दाखवून दिग्दर्शकानं भविष्यातल्या वादळाची कल्पना दिलीय; पण हे वादळ ती कुमारी माता असण्याइतकं भयानक असेल याची कल्पना येत नाही. इथून या सिनेमानं गती घेतलीय. आपल्या नायिकेला विवाहापूर्वीच आई बनवून लेखक-दिग्दर्शकानं मग थेट आपल्या संस्कृती-परंपरेचा लेखाजोखा घेऊन त्याची आजच्या काळाशी सांगड घातलीय; पण ही सांगड घालताना हा सर्व संवाद आजचा वाटेल, याचीही काळजी घेण्यात आलीय. पूर्वी विवाहबाह्य संबंधातून होणारी गडबड "मैं तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हूँ' या संवादावर येऊन थांबे. हा सिनेमा त्याच्या एक पाऊल पुढं गेलाय. यातली नायिका आपल्या नायकाला हा गुळगुळीत संवाद न ऐकवता "माझे पिरीयडस्‌ चुकलेत' असं म्हणताना दाखविलीय. हे एक उदाहरण असून असे आणखी काही संवाद या सिनेमाला आजच्या काळाशी "रीलेट' करण्यात यशस्वी ठरलेत. या जमेच्या बाजू असताना काही त्रुटीही राहून गेल्यात. सुबोध भावेच्या व्यक्तिरेखेचा प्रवास ज्या दिशेनं दाखविण्यात आलाय, त्या दिशेचा शेवट सईच्या आयुष्यापाशी येऊन थांबणार, याची आधीच कल्पना आलेली असते. त्यामुळे त्यानं "क्‍लायमॅक्‍स'ला दिलेला "जोर का धक्का' पाहणाऱ्याला "धीरे से' लागण्याची शक्‍यता आहे.
या सिनेमाची मजबूत बाजू म्हणजे कलाकारांचे अभिनय. सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि संतोष जुवेकर यांच्या जमलेल्या अभिनयामागचं कारण म्हणजे त्यांच्या वाट्याला आलेल्या दमदार व्यक्तिरेखा. सुबोध या सिनेमात खूप छान दिसलाय आणि मस्त वावरलाय. तीच गोष्ट संतोषचीही म्हणावी लागेल. नवोदित सई ताम्हणकर कॅमेऱ्याला खूप सराईतपणानं सामोरी गेलीय. मुख्य म्हणजे तिघांनीही परस्परांना अभिनयात "कॉम्प्लिमेंट' केल्यानं त्याचा परिणाम अधिक जाणवतो. श्रेयस तळपदे "गेस्ट ऍपियरन्स'मध्ये चांगला भाव खाऊन गेलाय. तुषार दळवी ठीकठाक. मात्र शिल्पा तुळसकर आणि भारती आचरेकर यांच्याबाबत असं म्हणता येत नाही. शिल्पा एक तर खूप थकलेली आणि "एजेड' वाटते. भारती आचरेकर यांचा "कॉमेडी' ट्रॅक जमलेला नाही. अवधूत गुप्तेंचं संगीत "कॅची' आहे. चित्रपटाला "फ्रेश' आणि आकर्षक "लूक' देण्यात दिग्दर्शक राजीव पाटील यांना चांगलंच यश आलंय. एकंदरीत चकचकीत "कॅपसूल'मधून दिलेली ही कडू गोळी चांगलीच पचनी पडणारी आहे.

Monday, June 16, 2008

तुमच्या-आमच्यातला "सरकार'

तुमच्या-आमच्यातला "सरकार'

"Power can not be given, it needs to be taken.` सध्या विशेष चर्चेत असलेल्या "सरकार राज' या चित्रपटाची ही "टॅगलाईन'. "पॉवर' हा शब्द राजकारणाशी अधिक जवळचा असला तरी इतर क्षेत्रांमध्येही तो अगदी सहजपणे रूजला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी "शिवा', "सत्या', "सरकार', "कंपनी'... आदी चित्रपटांमधून या "पॉवर'चीच वेगवेगळी रुपं दाखविली आहेत. त्यानिमित्तानं वर्मांनी शब्दबद्ध केलेली ही "पॉवर'मागील "पॉवर'.
-------------
टेक वन ः स्थळ ः भारतामधली कोणतीही एक शाळा. दोन मुलं एका पेन्सिलीसाठी भांडताहेत. वादावादीतूनही या पेन्सिलीचा ताबा न मिळाल्यानं ही दोन्ही शेवटी हाणामारीपर्यंत जाऊन पोचतात.
(या दृश्‍याचा शेवट या दोन मुलांमधला शक्तिशाली मुलगा पेन्सिल मिळवतो किंवा शाळेतील शिक्षक मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवतात आणि पेन्सिल कोणालाही देत नाहीत, असा असू शकतो.)
टेक टू ः स्थळ ः नवी दिल्ली. भारत-पाकिस्तानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली शिखर बैठक. विषय अर्थातच काश्‍मीर. दोन्ही बाजूकडचे अधिकारी तावातावानं आपली बाजू मांडतात.
(ही बैठक कोणताही निष्कर्ष न निघता संपते आणि भविष्यातील आणखी एका शिखर बैठकीची तयारी सुरू होते.)
तसं पाहायला गेलं तर हे दोन प्रसंग अगदी टोकाचे आहेत, असं पटकन कोणीही म्हणेल. पण, मला तसं वाटत नाही. मला त्यांच्यात कमालीचं साम्य वाटतं. पहिला प्रसंग अगदी आपल्या दररोजच्या पाहण्यातला आहे. म्हणूनच आपण या मुलांच्या भांडणाकडे "एका पेन्सिलीसाठी काय भांडताय !' असं म्हणून जातो. मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या नजरेतून पाहिल्यास ते ज्या पेन्सिलीसाठी भांडताहेत, ती पेन्सिल म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं-तिसरं काही नसून काश्‍मीरच आहे. फक्त त्यांच्यामधल्या वादाचं माध्यम आणि त्याच्या व्यापकतेत फरक आहे.
"पॉवर' हा असा प्रकार आहे की, ज्याच्यातून कोणीही सुटलेला नाही. वर उल्लेखिलेल्याप्रमाणे या "पॉवर'कडे आकर्षित होण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. पण, त्याचं "टार्गेट' एकच असतं. "मला इतरांच्यावर सत्ता गाजवायचीय !' अनेक जण मला म्हणतात, की तुमच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही दृष्टीनं पराकोटीला गेलेल्या व्यक्तिरेखा अधिक पाहायला मिळतात. हे पराकोटीला जाणं म्हणजे नक्की काय असतं ? त्याचा "पॉवर'शी काही संबंध असतो का ? "मला जे योग्य वाटतं, ते मी करतो !' माझ्या दृष्टीनं "पॉवर'ची ही सोपी व्याख्या आहे. त्यापुढं जाऊन मी असं म्हणेन की, जी व्यक्ती माझं लक्ष वेधून घेते आणि बराच काळ त्या व्यक्तीचा माझ्यावर प्रभाव असेल, तर तिला मी "पॉवरफुल' व्यक्ती मानतो. अशा व्यक्तिरेखांचं मूळ आपल्या घरापासून शोधता येईल. घरातील पत्नी, मुलं माझ्या मताला मान देत असतील, तर घरात माझा आदर केला जातो. त्यापुढं जाऊन इतर माणसं माझ्या विचारांशी सहमत असतील तर मग मी लगेचच नगरसेवक बनतो. अल्पावधीत अगदी आमदार-खासदार बनण्यापर्यंतही माझी मजल जाते. एक दिग्दर्शक म्हणून विचार करताना उच्च पदापर्यंत जाताना कोण कुठले मार्ग वापरतो, याला माझं फारसं महत्त्व नसतं. या रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चेहरे आणि त्यांची "मोडस ऑपरेंडी' टिपण्याकडं माझा अधिक कल असतो. त्यांच्या कृती योग्य की अयोग्य, हे ठरवायला मला आवडत नाही. ते मी प्रेक्षकावर सोपवून टाकतो.
"शिवा' चित्रपटामध्ये मी दिशा हरवलेल्या कॉलेजमधल्या तरुणांचा विषय हाताळला होता. आपल्या देशामधली ही एक "पॉवर'च आहे. "सत्या'मध्ये त्याचं पुढचं "एक्‍स्टेंशन' दाखवण्यात आलंय. मुंबईत दररोज हजारो नोकरी-धंद्यानिमित्त आपल्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊन येतात. त्या पूर्ण न झाल्या की, मग त्यांना वेगळं जग खुणावू लागतं. त्याचंच प्रतिबिंब "सत्या', "कंपनी'मध्ये पडलं होतं. मुंबईच्या समुद्रातील एका खडकावर भिकू म्हात्रे जेव्हा आपले हात फैलावतो, तेव्हा त्याच्या मनात कुठंतरी आलं असतं की, हे सगळं आता माझंच आहे. सत्तास्थान गाठलं की मग ते टिकवण्यासाठी धडपड सुरू होते. काही लोकांकडे पैसा असतो, ताकद असते. तरीदेखील त्यांना म्हणावे तेवढं यश मिळत नाही. त्यामागचं कारण म्हणजे सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना मिळत नाही. तेव्हा लोकांचं प्रेम ही सुद्धा एक "पॉवर'च आहे. मध्यमवर्गीय समाज म्हणजे "ना इधर का ना उधर का'. पण, त्याचीही एक ताकद असते. ही ताकद माझ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. "पॉवर'च्या आणखी काही "शेडस्‌' बघितल्या तर ती एकप्रकारची पशूप्रवृत्ती असल्याचं जाणवेल. आपण आणखी एक अगदी साधं उदाहरण घेऊ. गल्लीत कुत्र्यांना भांडताना आपण नेहमीच पाहतो. या कुत्र्यांमध्ये जो कुत्रा अधिक ताकदवान असतो, तो आपल्या टोळक्‍यावर वर्चस्व गाजवतो. सत्तास्थानाकडे वाटचाल करणं, ही आपल्या समाजाची सहज प्रवृत्तीच आहे.
समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही "पॉवर' आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वांच्या परिचयाच्या एकता कपूरच्या मालिकांचं सूत्रही या "पॉवर'भोवतीच फिरतं. राजकारणाचा "पॉवर'शी अधिक जवळचा संबंध आहे, हे खरंय. पण, मला स्वतःला राजकारणात फारसा रस नाही. मला विलक्षण आकर्षण आहे ते समाजावर प्रभाव असलेल्या व्यक्तिरेखांचे. नावच घ्यायचं झालं तर मी अमिताभ बच्चन, राज ठाकरे आणि मल्लिका शेरावत यांचा उल्लेख करीन. तिसऱ्या नावाबद्दल अनेकांना कदाचित आश्‍चर्यही वाटेल. पण, ते खरं आहे. तिच्या "आयटेम सॉंग्ज'चा प्रभाव तुम्ही नाकारू शकत नाही. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयानं भारावून जाणाऱ्यांमधल्या लक्षावधी रसिकांपैकी मीसुद्धा एक आहे. बच्चन म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून अभिनयातलं सत्तास्थानच आहे. एक दिग्दर्शक या नात्यानं मी या सत्तास्थानाला माझ्या चित्रपटातून थोड्या वेगळ्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल तसेच त्यांच्या भूमिकेबद्दलही मला फारसे ठाऊक नाही. ते जाणून घेण्यातही मला विशेष रस नाही. पण, त्यांना भाषण करताना पाहिलं की, माझी नजर टीव्हीवरून हलत नाही. ते आपल्या स्टाईलनं पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात. हे खिळवून ठेवणं म्हणजेसुद्धा एकप्रकारची "पॉवर'च आहे. ती लाखातल्या काही थोड्या लोकांच्याच वाट्याला येते. माझ्या चित्रपटात मी नेहमीच समाजाच्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तींना स्थान देतो. मात्र, त्यांच्या कृतीचं जसंच्या तसं चित्रण मी करीत नाही. "जंगल'मध्ये वीरप्पनच्या जवळ जाणारी व्यक्तिरेखा होती. हा चित्रपट करूनही या व्यक्तिरेखेबद्दलचं माझं कुतूहल शमलं नाही. तेव्हा मी आता नव्यानं वीरप्पनवर एक चित्रपट करतोय.
"पॉवर'च्या प्रभावामागची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातला आत्मविश्‍वास. याबद्दल माझंच एक उदाहरण देतो. वयाच्या सातव्या वर्षापासून मी सिनेमामुळं झपाटलोय. लहानपणी घरच्यांना न सांगता मी अनेक सिनेमे बघितलेत. त्यापायी आईचा बराच मारही खाल्लाय. इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतली तेव्हाही माझं सिनेमाचं वेड काही कमी झालं नव्हतं. केवळ "डिग्री' हवी म्हणून शिकलो. लेन्सेस म्हणजे काय असतात, कॅमेरा हा काय प्रकार असतो, हे माहिती नसूनही मी दिग्दर्शक झालो. दिग्दर्शक बनण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात होती, त्यामुळेच इथवरचा प्रवास झाला. मात्र, माझ्याप्रमाणे सर्वांनाच दिग्दर्शक बनायचं नसतं. काहींना आपल्या कंपनीचा "सीईओ' बनायचं असतं, काहींना मालक, तर काहींना राजकारणात जाऊन मोठी पदं भूषवायची असतात. त्यासाठी मग सुरू होतो संघर्ष. हा संघर्ष म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. त्याला आपण "पॉवर वे'सुद्धा म्हणू शकतो.
(शब्दांकन ः मंदार जोशी)

Monday, June 9, 2008

"रामू ईस्टाईल' रोमांचक खेळ!

"सरकार राज' चित्रपट म्हणजे राजकीय सारीपटावरचा एक रोमांचक खेळ आहे. सर्वसाधारणपणे गाजलेल्या चित्रपटांचे पुढचे भाग क्वचितच रंगतदार ठरतात, पण "सरकार राज' हा चित्रपट मूळ "सरकार'पेक्षाही अधिक थरारक झालाय.
हा खेळ रंगलाय "टाइट क्‍लोजअप्स'च्या अनोख्या छायाचित्रणानं, अमर मोहिले यांच्या वेगवान पार्श्‍वसंगीतानं आणि बच्चन कुटुंबीयांच्या अभिनयातील करिश्‍म्यामुळं, पण या खेळाची सर्व सूत्रं हातात ठेवलीयत ती दिग्दर्शक रामगोपाल वर्मांनी. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वर्मांनी दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट सुमार दर्जाचे होते. त्यामुळेच वर्मांच्या विश्‍वासार्हतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं होतं. या वेळी वर्मांनी कसलेही प्रयोग न करता ज्या पद्धतीच्या सिनेमाचा "फॉर्म' आपणास चांगला समजतो, त्याच "फॉर्म'चा "सरकार राज'साठी उपयोग केलाय. त्यामुळेच हा चित्रपट जमून गेलाय. कथा-पटकथा तसेच संवादाच्या आघाडीवर खूप मोठी मजल मारता आलेली नाही; मात्र या त्रुटी झाकण्यात वर्मांची "स्टायलिश' हाताळणी कामास आलीय. प्रतिभावंत तरीही एका वाट चुकलेल्या दिग्दर्शकाला पुन्हा रस्ता सापडणं, हीच या सिनेमाची सर्वात मोठी कमाई आहे.
"सरकार राज' हा कागदावर "सरकार'चा दुसरा भाग आहे; मात्र वर्मांनी मूळ व्यक्तिरेखांचे मुखवटे कायम ठेवून त्यांना या वेळी वेगळी कामगिरी करायला लावलीय. गुन्हेगारी आणि सत्तेच्या राजकारणातील हेव्यादाव्यांचा विषय असला की, वर्मांमधला दिग्दर्शक खुलतो हा यापूर्वीचा अनुभव होता. "आग', "डार्लिंग', "निशब्द'सारखे प्रयोग करून झाल्यानंतर वर्मांनी या वेळी कसलाही धोका पत्करलेला नाही. म्हणूनच हा सिनेमा रंगतदार बनलाय. सुभाष नांगरे (अमिताभ बच्चन), शंकर नांगरे (अभिषेक बच्चन) यांचं राजकीय वजन एव्हाना चांगलंच वाढलंय. विशेषतः महाराष्ट्रासाठी काहीतरी भरीव करण्याची कळकळ या वेळी शंकर नांगरेच्या वक्तव्यातून जाणवते. याच वेळी विदेशी नागरिक असलेली ऐश्‍वर्या राय एका वीजप्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन नांगरेंकडं येते. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी दोन तास चाललेला शह-काटशहाचा खेळ म्हणजे "सरकार राज'. शिवसेना सरकार राज्यात सत्तेत असताना एन्‍रॉन प्रकल्पाचं नाव प्रथम चर्चेत आलं होतं. दिग्दर्शकानं वास्तव आणि कल्पिताचं झकास मिश्रण यात केलंय. सत्तेसाठी केला जाणारा रक्तरंजित खेळ आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलाय. हाच खेळ वर्मांनी आपल्या पद्धतीनं मांडलाय. या चित्रपटात ऐश्‍वर्या राय आणि दिलीप प्रभावळकर या दोन व्यक्तिरेखा नव्यानं आल्यात. वर्मांनी कथानकाच्या तपशिलात फार न शिरता सर्व घटना खूप वेगानं दाखविल्यात. या वेळी त्यांनी संवादाला "बॅक सीट'ला ठेवून छायाचित्रणाच्या खेळावर बाजी मारलीय. या चित्रपटातले कलाकारांचे "टाइट क्‍लोजअप्स' हा प्रेक्षकांना सुखद धक्का देणारा प्रकार आहे. पूर्वार्धात विसविशीत वाटणाऱ्या कथानकाला दिग्दर्शकानं शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये प्रचंड गती दिलीय. त्यामुळेच चित्रपटाचा शेवट खिळवून ठेवतो.
"सरकार राज' हा दिग्दर्शकाचा सिनेमा असल्यानं अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांचा अभिनय वेगळ्या धाटणीचा वाटतो. अमिताभ बच्चन यांचे बरेचसे संवाद तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे वाटतात, पण हा प्रकार बहुधा जाणीवपूर्वक केलेला असावा. ऐश्‍वर्या राय हे या चित्रपटाचे "सरप्राईज पॅकेज' आहे. ऐश्‍वर्याच्या "लूक'मधला बदल चांगला वाटतो. अमिताभप्रमाणेच तिच्याही व्यक्तिरेखेच्या वाट्याला कमी संवाद असूनही ती प्रभाव पाडण्यात यशस्वी झालीय. "सरकार'प्रमाणेच अतुल काळेनं "सरकार राज'वरही आपली छाप उमटवलीय. गोविंद नामदेव, दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे यांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या निभावल्यात. "गोविंदा गोविंदा'च्या सुरावटीवर अमर मोहिलेंनी पार्श्‍वसंगीतामधून केलेली करामत दीर्घकाळ लक्षात राहणारी आहे.

Friday, June 6, 2008

"शोले'चा "रिमेक' पुन्हा करेन...


रामगोपाल वर्मा हे नाव उच्चारलं तरी दचकावं अशी सध्या स्थिती आहे. "आग'च्या माध्यमातून वर्मांनी "शोले'च्या "रिमेक'बाबत जो काही खेळ केला, तो विसरावा म्हटलं तरी विसरणं कठीण आहे. खुद्द वर्मांनाही त्याची कल्पना आहे. म्हणूनच आपल्या अपयशाबद्दल ते सहजपणे मन मोकळं करून टाकतात. "आग'चं अपयश आणि उद्या रिलीज होणाऱ्या "सरकार राज'बद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
----
ः शिवसेनेतील घडामोडींवर "सरकार राज' आधारलाय का?
ः राजकारणात मला फारसा रस नाही. राजकारणापेक्षा मला रस असतो तो राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये. "सरकार' हा सिनेमा जिथं संपलाय, तिथून "सरकार राज' सुरू झालाय. "सरकार'चा शेवट केल्यानंतर त्यातल्या व्यक्तिरेखा पुढं कशा पद्धतीनं वागतील, या विचारातून "सरकार राज' बनलाय.

ः "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी तुम्ही "सरकार राज' बनवलात, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे. त्याबद्दल काय सांगाल?
ः "आग'च्या अपयशावर प्रेक्षकांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आल्या, की मला स्वतःलाच आपण गब्बर झालो असं वाटलं. "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी मी "सरकार राज' बनविलेला नाही किंवा माझा एखादा चित्रपट "फ्लॉप' ठरला तर त्याचं अपयश धुऊन काढावं, असं मला वाटत नाही. माझ्यात जेवढी गुणवत्ता आहे, त्याच दर्जाचा मी सिनेमा बनवू शकतो.

ः "आग' चित्रपट आवडला नाही असं सांगणारे हजारो प्रेक्षक सापडतील, पण हा चित्रपट आवडला अशा काही प्रतिक्रिया तुमच्याकडं आल्या का?
ः (हसत) एकही नाही. कदाचित कोणाला हा चित्रपट आवडला असेल तर ते मला सांगण्याची हिंमत झाली नसावी. माझी आई माझ्या चित्रपटांची "फॅन' आहे. "आग'पूर्वी मी बनविलेले सर्व चित्रपट तिला आवडले होते, परंतु "आग' पाहिल्यानंतर तिनं मला साधा एक फोनसुद्धा केला नाही.

ः या सिनेमाच्या अपयशाचं "डिसेक्‍शन' केलंयत का?
ः मी माझ्या कोणत्याही सिनेमाच्या यश-अपयशात रमत नाही. माझ्या दृष्टीनं सतत कार्यरत राहणं महत्त्वाचं असतं. कोणीही "चलो, एक फ्लॉप फिल्म बनाते हैं।' या उद्देशानं सिनेमा करीत नाहीत. अर्थात, "आग'चं चित्रीकरण झाल्यानंतर मला तो जमला नसल्याची कल्पना आली होती.

ः "आग'च्या पटकथेवर आपण अधिक मेहनत घ्यायला हवी होती, असं तुम्हाला आता वाटतं का?
ः फक्त "आग'च का, आतापर्यंत मी स्वतः दिग्दर्शित केलेल्या एकाही चित्रपटाच्या पटकथेवर मेहनत केलेली नाही. "सत्या' हा एक "कल्ट' सिनेमा मानला जातो, पण त्या सिनेमाचीसुद्धा पटकथा लिहिली गेली नव्हती. माझ्या मते कोणताही सिनेमा हा "आयडिया'वर बनतो. "स्क्रीप्ट इज अ किंग' असं म्हटलं जातं; मात्र पटकथेवर तीनचार वर्षं मेहनत घेऊनही ते सिनेमे रद्दड निघाल्याची अनेक उदाहरणं सापडतील. "सरकार', "रंगीला', "कंपनी' या चित्रपटांच्या पटकथेवर मी दोनतीन दिवसांपेक्षा अधिक काम केलेलं नव्हतं.

ः "आग' नेमका कुठं फसला असं वाटतं?
ः "शोले'चा "रिमेक' हा मूळ चित्रपटापेक्षा चांगला करायचा, या उद्धटपणातून मी हा चित्रपट बनविला आणि तिथंच मी फसलो. कोणताही "रिमेक' करताना तुमचा हेतू चांगला असावा लागतो. त्यात गडबड असता कामा नये. "कितने आदमी थे...' असं "शोले'तील गब्बर म्हणतो, तर "आग'मधला बब्बन फक्त "कितने...' म्हणतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं मी "इंटरप्रिटेशन' करीत गेलो, पण त्यांच्यात भावनिक नातं जोडण्यात मात्र मला अपयश आलं. म्हणूनच प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला असावा.

ः "रिमेक'वरच तुमचा नेहमी भर का असतो?
ः कारण कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' आहे असं मला वाटत नाही. प्रभावित होण्याची गोष्ट फक्त सिनेमापुरतीच मर्यादित नाही. एखादी घडलेली घटना, कोणाचा तरी वास्तवातील अनुभव, वर्तमानपत्रातील "कव्हरेज'... यावरून जर एखादा सिनेमा बनला असेल तर त्याला "रिमेक'च म्हणावं लागेल. म्हणूनच माझी कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' नाही, असं मी म्हणू शकतो.

ः "आग' प्रदर्शित झाल्यानंतर "शोले'फेम रमेश सिप्पी यांनीही बरीच नाराजी व्यक्त केली होती...
ः (हसत) "आग' खूप वाईट बनल्यानं खरं तर सिप्पींना आनंद व्हायला हवा.

ः संधी मिळाली तर "शोले'चा रिमेक पुन्हा करायला आवडेल का?
ः का नाही? जरूर करीन. फक्त प्रेक्षकांची हा "रिमेक' पाहण्याची तयारी असावी.

ः नवीन कोणते सिनेमे करताय?
ः "कॉन्ट्रॅक्‍ट' नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केलाय. मुंबईतल्या गुन्हेगारीवर हा सिनेमा आधारलाय. येत्या जुलैमध्ये तो प्रदर्शित होईल. त्याचबरोबर चंदनतस्कर वीरप्पनवरही मी एका सिनेमाची निर्मिती करतोय.

Wednesday, June 4, 2008

तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा

"आयपीएल' स्पर्धेला मिळालेल्या घवघवीत यशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतेय, पण या स्पर्धेच्या आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. "सेट मॅक्‍स' वाहिनीने उत्कृष्ट प्रक्षेपण करून या स्पर्धेच्या यशात मोठा वाटा उचलला. "सोनी' वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल दासगुप्ता यांच्याशी या स्पर्धेने मिळविलेले यश; तसेच पुढील आव्हानांबद्दल केलेली चर्चा.
......................
: "आयपीएल'च्या आयोजनामध्ये एक प्रक्षेपक या नात्यानं तुमचा नेमका सहभाग कसा होता?
: "आयपीएल'च्या आयोजनामागची "बीसीसीआय'ची भूमिका मला खूप आवडली. क्रिकेटवर आधारलेला तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा, अशी "थीम' घेऊन ते आमच्याकडे आले होते. "सेट मॅक्‍स' ही एक सिनेमाविषयक वाहिनी असल्यानं या "थीम'वर काम करायला मला आवडले. "बीसीसीआय'नं 2007 च्या मध्यावधीत या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी निविदा मागविल्या होत्या. "निम्बस', "इएसपीएन' तसेच "सेट मॅक्‍स' हे तीनच स्पर्धक या शर्यतीमध्ये उतरले होते. जागतिक स्तरावरील प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेला कसे "प्रमोट' कराल? यावर त्यांचा अधिक भर होता. यावर आम्ही केलेले सादरीकरण त्यांना खूप आवडले आणि आमच्या वाहिनीला पाच वर्षांच्या प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले. सामन्यांचं नियोजन करताना ते "प्राईम टाईम' या वेळेत होतील याची आम्ही काळजी घेतली. शाळकरी मुलं हा आमचा "टार्गेट' प्रेक्षक असल्यानं आम्ही देशभरातील सर्व शाळांच्या परीक्षा संपल्याची खात्री करूनच या स्पर्धेला सुरुवात केली.
: "आयपीएल'ला एवढं मोठं यश मिळेल, असं तुम्हाला वाटलं होतं का?
: आता ज्याप्रमाणावर या स्पर्धेला यश मिळालंय, त्यापेक्षा अधिक यशाची आम्ही अपेक्षा करीत होतो. आतापर्यंत मिळालेल्या यशावर आम्ही आनंदी आहोत, पण आपण कुठं कमी पडलो, याचीही आम्हाला जाणीव आहे. "टीआरपी'च्या आकड्यांनुसार छोट्या शहरांमध्ये आम्हाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा यशस्वी करण्याचं आव्हान आता आमच्यापुढं आहे.
: "आयपीएल'च्या यशात सर्वाधिक वाटा कोणाचा आहे, असं तुम्हाला वाटतं?
: अर्थातच "बीसीसीआय'चे ललित मोदी आणि पर्यायानं या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचा. "बीसीसीआय'नं अत्यंत काळजीपूर्वकपणे या स्पर्धेचं खासगीकरण केलं. कलावंत, उद्योजक; तसेच समाजातील इतर दिग्गजांना एकत्र आणण्याची त्यांनी किमया केली. एकमेकांसमोर उभं राहूनही त्यांचे "इगो' दुखावले जाणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. "आयपीएल'चं आयोजन करताना पवारांनी खूप मोठा धोका पत्करला होता, कारण ही स्पर्धा अपयशी ठरली असती; तर पवार त्याचे धनी ठरले असते. धोका हा शब्द मी अशासाठी वापरलाय, की "झी नेटवर्क'ने काही महिन्यांपूर्वीच आयोजित केलेल्या "आयसीएल' स्पर्धेकडे रसिकांनी पाठ फिरविली होती. खुद्द "बीसीसीआय'मधील काही वरिष्ठ मंडळींना "आयपीएल'च्या यशाची खात्री नव्हती. "टीम इंडिया' जोपर्यंत खेळत नाही, तोपर्यंत प्रेक्षक हा "फॉर्म्यट' स्वीकारणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं होतं. हा विरोध डावलून पवारांनी "आयपीएल'चं आयोजन केलं. फक्त त्यापुरतंच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला त्यांची मदत झाली. योग्य जागी योग्य माणसांची त्यांनी निवड केली.
: "आयपीएल'चं वर्षातून दोन वेळा आयोजन करणं शक्‍य आहे, असं तुम्हाला वाटतं?
: पुढील काही वर्षे तरी "आयपीएल'चं आयोजन वर्षातून एक वेळाच व्हावं, असं मला वाटतं, कारण यश मिळालंय म्हणून अधिक पदरात पाडण्याची हाव बाळगणं चुकीचं ठरेल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी तयारी करावी लागते. या वेळच्या स्पर्धेतला प्रत्येक सामना वेळेत सुरू झाला. अनेक शहरांमध्ये सामने खेळले जाऊनही खेळाडू "प्रॅक्‍टिस'साठी किंवा प्रत्यक्ष सामन्याच्या स्थळी उशिरा पोहोचल्याची तक्रार आली नाही. कोणत्याही संघातल्या खेळाडूंचं विमान चुकलं नाही. नियोजन उत्तम असल्यानं असे प्रकार घडले नाहीत. एकाच वर्षी दोन वेळा ही स्पर्धा आयोजित करायची असेल; तर संघांची संख्या वाढवावी लागेल. या स्पर्धेत रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, मॅकलमसारखे खेळाडू स्पर्धेच्या पूर्वार्धात; तर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फक्त उत्तरार्धातच खेळले. प्रचंड गुणवत्ता असलेले विदेशी खेळाडू आम्हाला पूर्ण स्पर्धेत खेळवायचे आहेत. त्यामुळे सध्या तरी वर्षातून एकदाच ही स्पर्धा आयोजित करणं योग्य ठरेल.
: "आयपीएल'च्या यशामुळं "सेट मॅक्‍स'चा नेमका किती फायदा झालाय, असं तुम्हाला वाटतं?
: गेले चार आठवडे "सेट मॅक्‍स' वाहिनी लोकप्रियतेच्या तक्‍त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोणत्याही "नेटवर्क'चा कारभार पाहिल्यास त्यांच्याकडे एक अत्यंत यशस्वी वाहिनी आणि त्याच्या छायेखाली असणाऱ्या इतर वाहिन्या असल्याचं आढळते, पण "आयपीएल'च्या यशामुळं "सोनी' आणि "सेट मॅक्‍स' या एकाच समूहाच्या दोन प्रबळ वाहिन्या उभ्या करण्यात आम्हाला यश आलंय.

Saturday, May 31, 2008

जेनेलिया

अभिनेता रितेश देशमुखच्या "तुझे मेरी कसम' या पहिल्या चित्रपटातील नायिका, एवढीच जेनेलियाची आतापर्यंतची हिंदी प्रेक्षकांना असलेली ओळख. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुपरस्टार बनण्यापर्यंत मजल मारलीय. "जाने तू या जाने ना' आणि "मेरे बाप पहले आप' या दोन चित्रपटांमधून ती हिंदी चित्रपटसृष्टीत परततेय.
---------------
ः मला कसलीही "फिल्मी बॅकग्राऊंड' नाही. लहानपणी फुटबॉलमध्ये मला खूप गती होती. आपण अभिनेत्री होऊ, असं मला कधीच वाटलं नव्हतं. या क्षेत्रात मी अगदी योगायोगानं आले. एका "फॅमिली फंक्‍शन'मध्ये आमच्या एका नातेवाईकानं माझ्याकडे माझे फोटो मागितले. मी त्याला माझे वाढदिवसाचे फोटो दिले. त्यानं मला अक्षरशः वेड्यात काढलं आणि माझा "पोर्टफोलिओ' बनवायला सांगितला. तो बनविल्यानंतर मी त्याच्या "कॉपीज' पाच एजन्सीकडे पाठविल्या. आश्‍चर्य म्हणजे पाचपैकी पाच जणांनी मला जाहिरातीसाठी मॉडेलिंग करण्याची "ऑफर' दिली. जाहिरातीत काम केल्यानंतर मग आपोआपच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अभिनयाचं मी कसलंही शिक्षण घेतलेलं नाही. कॅमेरा माझ्यावर थोडा जास्तच मेहरबान आहे, असं मी म्हणेन. या क्षेत्रात पाच वर्षं झाली असूनही मला अजून "न्यू कमर'च मानलं जातं.
ः हिंदी चित्रपटापासून माझी सुरुवात झाली असली तरी दक्षिणेनं मला स्टार बनविलं. गेल्या पाच वर्षांमध्ये मी एकूण 15 चित्रपटांमध्ये काम केलं असून बहुतेक सर्व सिनेमे हिट आहेत. दक्षिणेत जाण्याचा निर्णय मी काही ठरवून घेतला नव्हता. चांगली संधी मिळाली आणि मी तिकडेच रमले. आता हिंदीत माझं पुनरागमन होतंय. भविष्यात दोन्ही चित्रपटसृष्टीत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.
ः प्रियदर्शन यांच्याबरोबर गेल्या दोन वर्षांपासून काम करण्यासाठी माझी चर्चा सुरू होती. अखेर "मेरे बाप पहले आप'द्वारे एकत्र काम करण्याचा पहिल्यांदा योग येतोय. प्रियन सरांनी "ऑफर' दिली की ती नाकारण्याचा प्रश्‍नच नसतो. दक्षिणेत भरपूर काम केलं असल्यामुळं केरळला भेट देण्याची संधी मला अनेकदा मिळाली. पण प्रियन सरांनी केरळ बॅकवॉटर्सवर केलेलं शूटिंग अफलातून म्हणावं लागेल. शूटिंगचे ते 40 दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.
ः नसिरुद्दीन शाह, परेश रावल, प्रियन सर, अक्षय खन्ना... अशा दिग्गजांबरोबर एवढ्या कमी वयात काम करायला मिळण्यासारखं दुसरं नशीब नाही. अशी संधी अनेक वर्षं इथं काढल्यानंतरही इतरांना मिळत नाही. या कलाकारांचा अभिनय जवळून पाहणं, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. अर्थात, मध्यमवर्गीय आणि ग्लॅमर नसलेल्या कुटुंबातून न आल्याचा मला चांगलाच फायदा झाला. कसलंही दडपण, तसंच "इमेज' नसल्यामुळे मी कोणताही "रोल' करू शकते.
ः "जाने तू या जाने ना' या चित्रपटासाठी तब्बल दीड वर्षापूर्वी माझी "स्क्रीन टेस्ट' घेण्यात आली होती. दिग्दर्शक अब्बास टायरवाला आणि झामू सुगंध यांनी मला "कळवतो' एवढंच सांगितलं होतं. त्यानंतर पुढे काहीच हालचाल न झाल्यानं मी हा चित्रपट विसरूनही गेले होते; पण काही महिन्यांपूर्वी अचानक मला "आमीर खान प्रॉडक्‍शन'कडून बोलावणं आलं आणि या चित्रपटासाठी माझं शूटिंग सुरू झालं. मी स्वतःला खूप "लकी' मानते. कारण, पाच वर्षांनंतर मला दोन प्रतिष्ठित बॅनर्सबरोबर काम करायला मिळतंय. दक्षिणेतील लोकांमध्ये प्रचंड व्यावसायिकता असल्याचं बोललं जातं. ते खरंही आहे; पण या दोन चित्रपटांचा माझा अनुभव फारसा वेगळा नव्हता. दोन्ही बॅनर्सचा "सेटअप' खूपच "प्रोफेशनल' वाटला.
ः काजोल आणि माधुरी दीक्षित या दोघींची मी जबरदस्त "फॅन' आहे. त्यांचे सर्व चित्रपट मी पाहिलेत. भविष्यात त्यांच्या निम्म्याएवढी जरी कामगिरी केली तरी माझं "टार्गेट' साध्य होईल. सध्या चित्रपटसृष्टीत खूप नवनवीन "हिरोईन्स' येताहेत; पण स्पर्धेची मला तयारी ठेवायलाच हवी. "वेलकम' आणि "नो एन्ट्री'फेम अनीस बज्मी यांचा एक नवीन चित्रपट मी स्वीकारलाय. हरमन बावेजा हा त्यात माझा "हीरो' आहे.

Monday, May 26, 2008

review - दे धक्का

धक्के खात गाडी मुक्कामाला
विनोदाच्या माध्यमातून नातेसंबंधांची उलगड करणं, ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे या दिग्दर्शक जोडीनं ही अवघड कामगिरी "दे धक्का'द्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला पूर्ण यश मिळालेलं नाही. झोकदार सुरुवात करणारा हा चित्रपट तासाभरानंतर चांगलाच गळपटलाय. नातेसंबंधांचे धागे कच्चे राहिले असून, केवळ विनोदाच्या जोरावर हा सिनेमा बऱ्यापैकी मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलाय. चित्रपटाच्या प्रारंभीच त्याचा शेवट पाहणाऱ्यास माहीत असतो. त्यामुळे वेगवान प्रारंभानंतर या सिनेमाची गाडी रटाळ धक्के खात खात अखेरीस मुक्कामाला पोहोचते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि शिवाजी साटम या तिघांच्या जबरदस्त "स्क्रीन प्रेझन्स'मुळं ही काहीशी बिघडलेली भट्टी सुसह्य वाटते.
मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे) हा पट्टणकोडोलीत राहणारा साधा गरीब मोटर मेकॅनिक. पेट्रोल-डिझेलची बचत करणारा एक "पार्ट' बनविण्याचं त्याचं स्वप्न असतं. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तो आपल्या वडिलांची (शिवाजी साटम) सहा एकरची जमीन फुंकून टाकतो. ते दुःख विसरण्यासाठी मकरंदचे वडील स्वतःला दारूच्या बाटलीत बुडवून टाकतात. त्यावरून या दोघांमध्ये सतत शिवराळ खटके उडत असतात. मकरंदला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी असते. मुलगा (कृष्णा) पैलवान बनणार असतो; तर मुलगी सायलीला नाचात गती असते. भुरट्या चोऱ्या करण्यात मकरंदच्या मेहुण्याचा (सिद्धार्थ जाधव) हात धरणारा दुसरा कोणी नसतो. चित्रपटाचा हा भाग अतिशय उत्तम जमलाय. मकरंद आणि शिवाजी साटम यांच्यातली शिवराळ बडबड सुरुवातीला छान मनोरंजन करते, पण कालांतरानं तिचा अतिरेक झालाय. चित्रपटाच्या कथानकाला धक्का बसलाय तो सायलीला मुंबईला नाचाचं आमंत्रण आल्यानंतर. खरं तर लेखक-दिग्दर्शकाला जाधव कुटुंबाच्या टमटममधून होणाऱ्या मुंबई-पट्टणकोडोली प्रवासात खूप धमाल करणं शक्‍य होतं, पण प्रत्यक्षात हा प्रवास अगदीच रटाळ आणि कंटाळवाणा झालाय. या प्रवासात मकरंदच्या वडिलांचं आणि मुलाचं अचानक उद्‌भवलेलं आजारपण चित्रपटाच्या कथानकाला रस्ता सोडायला भाग पाडतं. सायलीचा नृत्यस्पर्धेतील "परफॉर्मन्स' हा या सिनेमाचा परमोच्च क्षण आहे, पण इथंच हा चित्रपट कमी पडलाय. आरती अंकलीकर यांनी गायलेली "उगवली शुक्राची चांदणी' ही लावणी पाहण्यापेक्षा फक्त ऐकायलाच बरी वाटते.
"मातीच्या चुली' ही सरस कलाकृती देणाऱ्या अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांचा हा दुसरा चित्रपट. महेश मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांच्या सैरभैर पटकथेमुळं दिग्दर्शकांची चांगलीच पळापळ झालीय. मुळात चित्रपटाच्या कथानकाचा पायाच कमकुवत आहे. पेट्रोल-डिझेलची बचत करणारा एक छोटासा "पार्ट' बनविण्यासाठी मकरंदला सहा एकर जमीन आणि बायकोचं मंगळसूत्र खर्च करायला लागण्याची गोष्ट पटणारी नाही. वडील-मुलाच्या नात्यामध्ये उडणारे खटके कालांतरानं त्रासदायक ठरतात. शिवाजी साटम यांना ऑक्‍सिजनचा "मास्क' हातात घेऊन सातारा ते मुंबई हा प्रवास करायला लावण्याची कल्पकता सर्वात धक्कादायक आहे. एवढ्या त्रुटींची मालिका असूनही हा चित्रपट पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो तो त्यातल्या हृषिकेश जोशी यांच्या चुरचुरीत संवादांमुळं. दर तीन-चार मिनिटांनी कानावर पडणारे गावरान खुसखुशीत संवाद कथानकातील धक्के जाणवणार नाहीत, याची काळजी घेतात.
ग्रामीण ढंगाच्या व्यक्तिरेखा साकारणे मकरंद अनासपुरेचा हातखंडा आहे. "होम पीच'वर खेळताना एखाद्या बॅटस्‌मनची फलंदाजी जशी खुलावी, तसा मकरंद या चित्रपटात खुललाय. त्याला तेवढीच तोलामोलाची साथ सिद्धार्थ जाधवनं दिलीय. भुरट्या चोऱ्या करण्यातली आपली सफाई त्यानं अतिशय छान दाखवलीय. शिवाजी साटम यांची व्यक्तिरेखा थोडी एकसुरी असली तरी त्यांनी तिचा तोल आणखी बिघडवू दिलेला नाही. बालकलाकारांची कामं चांगली आहेत. अजय-अतुल यांचं संगीत चित्रपटाच्या "मूड'ला साजेसं असलं तरी त्यात नवीन काही नाही.

Thursday, May 22, 2008

नागेश कुकनूरचा "आशाएँ'

तरुण पिढीतला अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शक ही नागेश कुकनूरची ओळख. "हैदराबाद ब्ल्यूज', "इक्‍बाल', "डोर' अशा चढत्या भाजणीनं त्याचा प्रवास सुरू होता. या प्रवासाला धक्का बसला तो या वर्षीच्या सुरुवातीला आलेल्या "बॉम्बे टू बॅंकॉक' या चित्रपटानं. या चित्रपटामुळं नागेश काही अंशी प्रेक्षकांच्या दृष्टीनं "व्हिलन' बनला. मात्र, त्याचा फटका त्यानं आपल्या करियरला बसू दिलेला नाही. यश, अपयश तसंच आपल्या काही नवीन प्रोजेक्‍टस्‌बद्दल त्याची ही मनमोकळी मुलाखत.
----------------

नागेश कुकनूरचा "आशाएँ' चित्रपट लवकरच येतोय. त्यानिमित्तानं त्याच्याशी संवाद साधण्याचा योग आला. खरं तर "बॉम्बे टू बॅंकॉक' पाहिल्यानंतर लगेचच मला त्याला भेटायचं होतं. कारण हा चित्रपट पाहून त्याच्या इतर काही चाहत्यांप्रमाणे मलाही मोठा धक्का बसला होता. एवढा साधारण दर्जाचा चित्रपट नागेश कसा काय करू शकतो? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घ्यायचं होतं. "इक्‍बाल', "डोर'सारख्या कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकाचा "फॉर्म' असा एकाएकी कसा काय हरवू शकतो? या प्रश्‍नाचंही उत्तर सापडलं नव्हतं. म्हणूनच नागेशची भेट घेतल्यानंतर त्याच्यावर माझ्याकडून या प्रश्‍नांचा भडिमार होणं साहजिक होतं. पण या पठ्ठ्यानं दिलेल्या पहिल्याच उत्तरानं माझ्यावर गारद होण्याची वेळ आली. "" "बॉम्बे टू बॅंकॉक' हा चांगलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून माझं नाव नसतं तर तो चाललाही असता. "इक्‍बाल', "डोर'वर मी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मी "बॉम्बे टू बॅंकॉक'वर घेतली. त्यामुळे, या चित्रपटाचा मला अभिमान वाटतो.''
आपल्या फसलेल्या कलाकृतीचं एवढ्या ठामपणे समर्थन करणारा पहिलाच दिग्दर्शक माझ्या पाहण्यात आला होता. अर्थात, नागेशसाठी "बॉम्बे टू बॅंकॉक' हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याचे निर्माते सुभाष घई यांना वेगळा अनुभव आला होता. या चित्रपटाच्या अपयशानंतर त्यांनी नागेशच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. "बॉम्बे टू बॅंकॉक'च्या "मेकिंग'मध्ये नागेश पुरेसा "इन्व्हॉल्व्ह' नव्हता, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत नागेशला थेट विचारलं असता तो म्हणतो, ""कोणताही सिनेमा यशस्वी ठरला की, त्याचं कौतुक झेलण्यासाठी शंभर लोकं तुमच्या आजूबाजूला असतात आणि एखादी कलाकृती फसली की त्यावर बोटं दाखविणारे शंभर हात वर उठतात. ही गोष्ट आताची नाही. त्यामुळे घईंनी केलेल्या वक्तव्याचा मला धक्का बसला नाही. गेल्या वर्षी मी एकूण तीन चित्रपट केले. पहिल्यांदा "बॉम्बे टू बॅंकॉक' शूट केला. तो बाजूला ठेवून मग मी "आशाएँ'चं चित्रीकरण सुरू केलं. ते संपल्यानंतर लगेचच "तस्वीर'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. हे शूटिंग संपल्यानंतर मग मी एकापाठोपाठ एक या पद्धतीनं या तीन चित्रपटांचं "पोस्ट प्रॉडक्‍शन' केलं. त्यामुळे "बॉम्बे टू बॅंकॉक' हा चित्रपट काही अपघातानं बनला नव्हता, हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो. "व्हॅकी कॉमेडी'चा प्रकार या चित्रपटात मी हाताळला होता. आपण जे यापूर्वी केलेलं नाही, ते मला माझ्या प्रत्येक नवीन कलाकृतीमधून करायचं असतं. त्याचं प्रेक्षक कितपत स्वागत करतात, याची खात्री मी देऊ शकत नाही. गंमत म्हणजे, नवीन चित्रपट करताना याची स्पष्ट कल्पना मी माझ्या निर्मात्यांना करून देतो. माझं हे मत पटलं तरच आम्ही पुढं काम करतो. चित्रपट यशस्वी ठरला तरी फार हुरळून न जाता माझं उत्तर "थॅंक यू' एवढंच असतं आणि एखादा सिनेमा फसला तर मी त्यातल्या चुका काढत बसत नाही.''
"बॉम्बे टू बॅंकॉक'च्या अपयशावरून नागेशची गाडी "आशाएँ'वर आणायला थोडा वेळ गेला. "आशाएँ' हे "टायटल' उच्चारलं तरी पटकन नागेशच्या "इक्‍बाल'मधील "टायटल सॉंग'ची आठवण येते. त्या गाण्यावरूनच हा चित्रपट सुचला का ? असं विचारलं असता नागेश तत्काळ "हो' असं उत्तर देऊन जातो. आपणास "लकी' असणाऱ्या श्रेयस तळपदेऐवजी जॉन अब्राहमला "हीरो' म्हणून का निवडलंस ? या प्रश्‍नावर तो म्हणतो, ""प्रेक्षक काही कलाकारांकडं एका विशिष्ट नजरेनं पाहत असतो. मी नेमका त्याच्या विरुद्ध नजरेतून त्या कलाकाराकडं पाहून त्याला माझ्या चित्रपटात स्थान देतो. "डोर' साकारण्यापूर्वी आयेशा टाकियाची "इमेज' ग्लॅमर डॉल अशी होती. "डोर'मध्ये मी तिच्या इमेजच्या विरुद्ध जाणारा रोल तिला दिला. "आशाएँ'साठी श्रेयसचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. या चित्रपटातील "रोल'साठी एखादा तिशीतला कलाकार मला अपेक्षित होता. एकानं मला जॉनचं नाव सुचवलं तेव्हा मी त्याचा चित्रपट काय, अगदी "प्रोमो'सुद्धा पाहिला नव्हता. पण, त्याच्या चेहऱ्यातील प्रामाणिकपणा मला विलक्षण भावला. जॉनबरोबरच मला या चित्रपटासाठी आयेशा टाकिया हवी होती. पण या चित्रपटातील एक "किसींग सीन' करण्यास तिनं विरोध दर्शविल्यानं मला तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करावी लागली. एखाद्या चित्रपटाची पटकथा जेव्हा मी लिहितो, तेव्हा कलाकारानं त्यात काहीही बदल करू नये, अशी माझी अपेक्षा असते. म्हणूनच केवळ या एका गोष्टीसाठी आयेशा हा चित्रपट करू शकली नाही, याचा मलाही खेद वाटतो. पण, शेवटी पटकथेला माझ्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्व आहे.''
या चित्रपटाचा "हीरो' म्हणजे त्याचं कथानक. आपल्या मध्यमवर्गीय माणसांना एक वाईट खोड जडलीय. आपल्याला लहानपणापासून आयुष्यात स्थिर व्हायचे धडे दिले जातात. अभ्यास करा, नोकरी मिळवा, घर घ्या... पण, या चक्करमध्ये आयुष्याचा आनंद उपभोगण्याची गोष्टच आपण विसरून जातो. माझंच उदाहरण घ्या ना. केमिकल इंजिनियर बनून मी दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो. मला चांगल्या पगाराची नोकरी होती. राहायला आलिशान बंगला होता. स्पोर्टस्‌ कार होती. तरीही मी आयुष्यात सुखी नव्हतो. मला, "फिल्ममेकर' व्हायचं होतं. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मी अमेरिका सोडून भारतात आलो. अर्थात, पहिल्या काही वर्षांमध्ये मला खूप संघर्ष करावा लागला. पण आता मी इथं "सेटल' झालोय. सांगायचा मुद्दा हा की, एखादी गोष्ट करायची असेल तर ती लगेच करा. आपली स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी फार काळ वाट बघू नका. "लिव्ह लाईफ नाऊ', हा या चित्रपटाचा संदेश आहे.''
"आशाएँ'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. नागेशच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये गाणी होती. पण ती सर्व चित्रपटाच्या कथानकाच्या पार्श्‍वभूमीवर ऐकायला मिळाली होती. "आशाएँ'मधली गाणी या चित्रपटाचं कथानक पुढं नेण्यास कारणीभूत ठरतात, असा त्याचा दावा आहे. याबद्दल तो म्हणतो, ""पूर्वीच्या काळात असं घडायचं. लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक एकत्र बसून गीत-संगीताद्वारे कथानक पुढं न्यायचे. "आशाएँ'मधून मला नेमकं तेच साधायचंय. यापूर्वी गाण्यातून कथानक पुढं नेण्याचा मी प्रयत्न केला नव्हता.''
"आशाएँ'पाठोपाठ नागेशचा "एट बाय टेन' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य व्यक्तिरेखा साकारतोय. बॉलीवुडमधल्या एखाद्या सुपरस्टारनं त्याच्याबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाचं आतापर्यंत 75 टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे. त्यापुढचा चित्रपट कोणता? असं विचारलं असता तो "छे-सात स्क्रीप्ट तो तैय्यार है ।' असं उत्तर देऊन टाकतो.

Monday, May 19, 2008

ंएक डाव भूतनाथचा


"भूतनाथ' हा हॉररपट नाही की तो पूर्णतः बालपटही नाही. निर्माते रवी चोप्रा आणि दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजनाचा एक छान डाव मांडलाय आणि तो मस्त जमलाय. सात-आठ वर्षांचा एक निरागस मुलगा आणि एका भुताच्या मैत्रीवर हा चित्रपट आधारलाय. एखाद्या बऱ्यापैकी कल्पनेला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची जोड लाभल्याचा परिणाम म्हणजे "भूतनाथ'. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची आणखी एक दमदार अदाकारी आणि छोट्या अमन सिद्दिकीनं त्यांच्या तोडीस तोड केलेली कामगिरी, हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशय ही "बी. आर. फिल्म्स'ची खासियत. हा सिनेमा या चौकटीत अगदी "फिट' बसणारा आहे. मात्र सामाजिक आशय शोधताना लेखक मंडळींनी विनाकारण "बागबान' आणि "बाबुल'ची पुन्हा एकदा री ओढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे शेवटच्या काही रिळांमध्ये हा सिनेमा अगदी ढेपाळलाय. शेवटी रडा सूर लावण्याऐवजी भुताच्या आणखी काही गमतीजमती दाखविल्या असत्या तर धमाल आली असती. तरीदेखील तत्पूर्वीच्या चांगल्या कामगिरीसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.चित्रपटाचं कथानक गोव्यातील एका भूतबंगल्यात घडतं. हा बंगला कैलाशनाथांच्या (अमिताभ बच्चन) मालकीचा असतो. या बंगल्यात त्यांचा अतृप्त आत्मा वावरत असतो. मुलाची विदेशी स्थायिक होण्याची गोष्ट त्यांना पचलेली नसते. म्हणूनच या घरात राहायला येणाऱ्यांना सळो की पळो करून सोडणं एवढंच त्यांचं काम असतं, पण बंकू (अमन सिद्दिकी) हा आठ वर्षांचा मुलगा त्यांचं मन जिंकतो. मैत्रीचं नवं नातं फुलवून तो या भुताला आपल्या गतायुष्यात डोकवायला लावतो. पदार्पणाचा चित्रपट असूनही दिग्दर्शक विवेक शर्मा यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. मुख्य म्हणजे सुरुवातीपासून हा चित्रपट आपली घट्ट पकड निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय. कैलाशनाथ या भुत
ाभोवती पहिल्या काही रिळांमध्ये छान रहस्य निर्माण केलंय. त्यानंतर आपल्याला सारं जग घाबरतं आणि हा बंकू घाबरत नाही, म्हणजे काय? असा या भुताचा आविर्भाव चित्रपटात विनोदाचे रंग भरतो. त्यानंतर या भुतानं बंकूबरोबर शाळेत जाऊन केलेली धमाल मस्त जमलीय. दिग्दर्शकानं हाच "ट्रॅक' आणखी काही वेळ पुढं सुरू ठेवायला हरकत नव्हती, पण बहुधा याच वेळी निर्माते रवी चोप्रा यांना आपल्या बॅनरची परंपरा आठवली असावी. म्हणूनच सगळं काही छान सुरू असताना हा चित्रपट भुताच्या भूतकाळात डोकावतो. "बागबान'प्रमाणेच या सिनेमातही चोप्रांनी अमिताभच्या व्यक्तिरेखेला झुकतं माप देताना त्याच्या मुलांना काळ्या रंगात रंगवलंय. परंपरा, संस्कृतीला प्राधान्य देण्याच्या नादात श्राद्धासारखा प्रकारही चित्रपटात थोडा अधिकच विस्तारानं आलाय.पटकथा चांगली असली की अमिताभ बच्चन खुलतात असा आजवरचा अनुभव आहे. या चित्रपटात नेमकं हेच घडलंय. लेखकानं लावलेला "सा' जमल्यानं पुढची सरगम प्रभावीपणे पूर्ण करण्याचं काम या कलाकारानं केलंय. त्याला तेवढीच साथ छोट्या अमन सिद्दिकीनं केलीय. तो अत्यंत सफाईनं कॅमेऱ्याला सामोरा गेलाय. त्याची उत्स्फूर्तता आणि डोळ्यातील गहिरे भाव पाहण्यासारखे आहेत. या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे जुही चावला. विनोदी बाजाची भूमिका म्हणजे जुहीच्या हातचा मळ. यातली बंकूची आई तिनं छान रेखाटलीय. शाहरूख खानच्या वाट्यालाही चांगली 20-25 मिनिटं आलीत. फक्त राजपाल यादवच्या वाट्याला अगदीच दुय्यम भूमिका आलीय. या जमलेल्या मैफलीला धक्का लागलाय तो विशाल-शेखर यांच्यामुळं. अमिताभच्या आवाजातली दोन्ही गाणी फसली आहेत.

Saturday, May 3, 2008

"तुझ्या-माझ्यात' review


लिखाणातली ढिलाई भोवली
पडद्यावरचा घटस्फोट म्हटलं की, नजरेसमोर पहिल्यांदा येतात ती पती-पत्नीमधील भांडणं आणि नंतर ओघानं आलेली मुलांची फरपट. हा विषय अनेकदा येऊन गेल्यानं त्याचा अगदी चोथा झालाय. निर्माते शिवाजीराव चमकिरे आणि दिग्दर्शक प्रमोद जोशी यांनी "तुझ्या-माझ्यात' या चित्रपटाद्वारे घटस्फोटानंतरही काही चांगलं घडू शकतं, असा आशावाद जागविण्याचा प्रयत्न केलाय; पण या प्रयत्नाला धक्का बसलाय तो अत्यंत संथ पटकथा, लांबलचक संवाद आणि "रूटीन' पद्धतीच्या धक्‍क्‍यांमुळं. तंत्र आणि दिग्दर्शनात अत्यंत उजवा असूनही या त्रुटी "तुझ्या-माझ्यात'चा परिणाम हरविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. एक चांगला विषय कल्पक लिखाणाअभावी फसलाय.
अस्मिता (मृणाल कुलकर्णी) आणि शशांकचा (सचिन खेडेकर) संसार मोडतो तो परस्परांतील विसंवादामुळं. दोन मुलं असूनही अस्मिताची शंकेखोर वृत्ती या दोघांना घटस्फोटापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा शशांक पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी राधिकाशी (सुलेखा तळवलकर) विवाहबद्ध होतो. अस्मिताशी घटस्फोट घेताना शशांकने आठवड्यातून दोनदा मुलांचा सांभाळ करण्याचं ठरलं असतं; पण आपल्या कामाच्या व्यापात शशांककडून मुलांच्या देखभालीबाबत हेळसांड होते. शशांकच्या दुसऱ्या विवाहामुळं दुखावलेली अस्मिता नेमक्‍या याच मुद्द्याचा "इश्‍यू' करते. चित्रपटाचा इथपर्यंतचा भाग आचके खात प्रवास करतो. प्रमोद जोशी यांच्या कथानकात नावीन्य असलं तरी शेखर ढवळीकर यांच्यासमवेत पटकथा लिहिताना ते कमी पडले आहेत. काही दृश्‍यं चांगली जमली आहेत; तर काही एकदम सपाट झालीत. प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवण्याची ताकद त्यात निश्‍चितच नाही. चित्रपटाची सुरुवात अत्यंत चांगली असेल; तर ते पुढील घटनाक्रमासाठी फायदेशीर ठरतं. परंतु दिग्दर्शकाने एक अपरिणामकारक बालगीत सुरुवातीलाच टाकून संकट ओढवून घेतलंय.
अस्मिताने आपल्या "करिअर'साठी शशांककडे मुलांना जास्त वेळ सोपविण्याचा प्रसंग जमलाय; तसेच आपण मुंबईबाहेर आहोत असं तिचं सांगणं आणि नेमक्‍या त्याच वेळी शशांकच्या पत्नीनं तिला परपुरुषाबरोबर पाहणं, यातूनही कथानक थोडं वेगळ्या वाटेकडे चाललंय याची कल्पना येते; पण याच वेळी अस्मिताला कर्करोग झाल्याचं निदान दाखवून दिग्दर्शकानं घोटाळा केलाय. हे रहस्य मध्यंतरालाच उघड केल्यानं पुढं काय डाव मांडला जाणारेय, याची साधारण कल्पना येते. अर्थात, या कल्पनेसारखं जरी घडलं असतं तरी हा चित्रपट रस्ता चुकला नसता; पण मध्यंतरानंतर लिखाणाच्या बाबतीत चित्रपट आणखीनच घसरलाय. आपल्याला कर्करोग झाल्याचं निदान झाल्यानंतर खरं तर अस्मिताच्या वागण्यात कमालीचा बदल अपेक्षित आहे. शशांक आणि राधिकाबरोबरची तिची "तू तू मैं मैं' अखेरपर्यंत सुरूच राहते. अस्मिता-शशांकच्या मुलीतील आत्मविश्‍वास जागविण्यासाठी एका नृत्यस्पर्धेचा दृश्‍यक्रम दाखविण्यात आलाय. तो खूपच लांबल्यानं कंटाळवाणा झालाय. अस्मितानं मुलांच्या आयुष्यातली आपली जागा हसत खेळत पद्धतीने राधिकाला दिली असती; तर हा चित्रपट वेगळ्या पातळीवर गेला असता, पण शेवटच्या काही प्रसंगांमधील अस्मिताचा उद्वेग पटणारा नाही. चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये राधिकासह आपल्या सर्वांचा "ग्रुप' फोटो काढून घेण्याची अस्मिताची इच्छा चांगली आहे, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला आहे. प्रमोद जोशी यांची दिग्दर्शनातील कामगिरी चांगली आहे. "राजकारण' या चित्रपटाच्या प्रभावी हाताळणीमुळं त्यांच्याबाबतच्या आशा वाढल्या होत्या. परंतु लिखाणातील दोषांमुळं ते दोन पावलं मागे गेलेत. निर्माते शिवाजीराव चमकिरे यांनी तंत्राच्याबाबतीत चित्रपट चांगला दिसावा, याची पुरेपूर काळजी घेतलीय.
नातेसंबंधांवरील चित्रपटांमध्ये कलाकारांचा मोठा कस लागतो. त्या आघाडीवर हा चित्रपट चांगला जमलाय. मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर यांनी बाजी मारलीय. दोघांनीही आपापल्या भूमिका खूप समरसून केल्यात. सुलेखा तळवलकरच्या वाट्याला बऱ्यापैकी मोठी भूमिका आलीय आणि ती त्यात छान रमून गेलीय. मोहन जोशी यांच्यासारख्या मुरब्बी कलाकाराच्या वाट्याला अगदीच क्षुल्लक भूमिका आलीय. दोन मुलांमध्ये श्रेयस परांजपेचा अभिनय नैसर्गिक आहे, पण निशाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कौमुदी वालोकरच्या कपाळावरील कायमच्या आठ्या खटकतात. आशा भोसले यांनी गायलेलं आणि प्रवीण जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं "पाणी का डोळ्यात येते...' हे गाणं चांगलं जमलंय. त्याचा पार्श्‍वसंगीतासाठी उपयोग करण्याची कल्पना चांगली आहे.

Monday, April 28, 2008

कशाला घेताय ठसन !


यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्या "टेस्ट'ला नेमकं झालंय तरी काय ? "धूम' आणि "चक दे इंडिया'चा अपवाद वगळता या निर्माता पिता-पुत्रानं अलीकडच्या काळात साफ निराशा केलीय. त्याचीच पुनरावृत्ती "टशन'मध्ये झालीय. या चित्रपटाचं कथानक आणि त्याची हाताळणी अगदी "एटीज-नाईंटीज'मधल्या चित्रपटांना शोभणारी आहे.
वडिलांच्या खुनाचा बदला घेणारी नायिका, ही या चित्रपटाची अगदी सरधोपट मध्यवर्ती कल्पना. ही कल्पना मांडतानाही नवोदित दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी फारशी कल्पकता दाखविलेली नाही. नवीन दिग्दर्शकांना पदार्पणाची संधी देण्याची कल्पना चांगली आहे. परंतु ती प्रत्येक वेळीच व्यवहार्य नसते, ही गोष्ट आता चोप्रांना सांगण्याची वेळ आलीय. अक्षय कुमार, सैफ अली खान, करिना कपूर आणि अनिल कपूर अशी सणसणीत "स्टारकास्ट' या चित्रपटासाठी एकत्र आली होती. पण त्यांचा व्यवस्थित उपयोग न झाल्यानं या चित्रपटाशी "ठसन' न घेतलेलीच बरी.
भैय्याजी (अनिल कपूर) हा उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड. मुंबईत येऊन तो आपलं बस्तान बसवतो. पूजा सिंग (करिना कपूर) ही त्याची सहाय्यक. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी भैय्याजीला इंग्रजी संभाषणाची गरज भासू लागते. त्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या जिमी क्‍लिफची (सैफ अली खान) मदत घेतो. मात्र, भैय्याजीला इंग्रजी शिकवता शिकवता तो पूजाच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या दीड कोटींवरही हात मारतो. तेव्हा भैय्याजी त्याचा निकाल लावण्यासाठी बच्चन पांडेला (अक्षयकुमार) आमंत्रित करतो. तेव्हा या पांडेचीच मदत घेऊन भैय्याजीला शह देण्याची पूजा-जिमीची योजना असते. पण लहानपणीच्या पांडे-पूजाच्या प्रेमकहाणीचा "ट्रॅक' आणखीनच गोंधळ वाढवतो. सरतेशेवटी हेच प्रेम सरस ठरतं.
"टशन'ची अगदी सुरुवातीपासूनच गडबड झालीय. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा सर्व डोलारा उभा राहिलाय तो कच्च्या कथानकाच्या पायावर. चांगली "स्टार कास्ट' मिळालीय. मग लिहा त्यावर कथानक, यापद्धतीनं हा चित्रपट बनलाय. अनिल कपूरनं रंगविलेली "डॉन'ची व्यक्तिरेखा लिखाणात फसल्यानं पुढं सगळीच गडबड झालीय. अनिल कपूरला इंग्रजी संभाषणाचं ट्रेनिंग देणं आणि त्याचं हिंग्लिश बोलणं, यातून थोडीफार विनोदी निर्मिती झालीय. पण विनोदाचा तोच धागा पुढंही ताणल्यानं तो शेवटी तुटण्यापर्यंत मजल गेलीय. करिनाच्या व्यक्तिरेखेबद्दल सुरुवातीला चांगलं रहस्य निर्माण केलंय. अनिल कपूरनंच तिच्या वडिलांचा खून केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हा चित्रपट अगदीच "प्रेडिक्‍टेबल' झालाय. अक्षय कुमारनं साकारलेल्या व्यक्तिरेखेलाही कसलाही शेंडाबुडखा नाही. तो अचानक एका रामलीलेत घुसून काहीतरी वेडेवाकडे चाळे करायला लागतो. अक्षयला असलेल्या ग्लॅमरच्या जोरावर ही व्यक्तिरेखा पुढं तग धरून राहिलीय. त्याचा वापर करून अनिल कपूरवर मात करण्याची कल्पना चांगली होती. पण लेखक-दिग्दर्शकानं अचानक अक्षय आणि करिनाच्या बालपणीच्या प्रेमकहाणीचा "ट्रॅक' सुरू केलाय. तो अत्यंत कंटाळवाणा आहे. या "ट्रॅक'मुळे सैफ आणि करिनामधल्या नात्यामधली गंमत निघून गेलीय. अशा जीव हरवलेल्या अवस्थेत या चित्रपटाचा शेवटही उरकण्यात आलाय. अधेमधे लडाखमध्ये चित्रीत झालेली तीन-चार गाणी आहेत, पण तीसुद्धा प्रेक्षकाला पाय मोकळे करण्याचं स्वातंत्र्य देतात!
सैफ अली खानचा बदललेला "लूक' आणि त्याचा वावर छान वाटतो, पण अक्षयकुमारला झुकतं माप देण्याच्या नादात सैफच्या व्यक्तिरेखेची हत्या झालीय. अक्षयनं आपल्या अदाकारीनं भूमिका छान खुलवलीय. करिना कपूरचा अभिनयापेक्षा अंगप्रदर्शनावरच अधिक भर आहे. अनिल कपूरचा भय्याजी सुरुवातीला छान वाटतो. पण या व्यक्तिरेखेतील तोचतोपणा त्याला घातक ठरलाय. विशाल-शेखर जोडीचं संगीत फार काही मजल मारू शकलेलं नाही. यश चोप्रांची निर्मिती असल्यानं तंत्राच्या आघाडीवर काहीच त्रुटी दिसत नाहीत. या त्रुटी लेखनाच्या पातळीवर टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.

Saturday, April 26, 2008

हिंदीत "व्हिलन' साकारायचाय...


मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिका या तीनही क्षेत्रांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे अशोक शिंदे. सध्या एकीकडे या कलाकाराचे गावरान मराठी चित्रपट जत्रे-यात्रेत जोरदार व्यवसाय करताहेत, तर दुसरीकडे तो "एवढंसं आभाळ'सारखा चित्रपट आणि "असंभव'सारख्या मालिकेमधून "क्‍लास' प्रेक्षकवर्गालाही पसंत पडतोय. वयाची चाळिशी पार केल्यानंतर तो आता हिंदी चित्रपटात "मेन व्हिलन' साकारण्याचं स्वप्न पाहतोय.
--------------
"स्ट्रगल' या शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा असेल तर अशोक शिंदेची "करियर' त्यासाठी "बेस्ट' ठरावी. गेल्या दोन दशकांमध्ये या कलाकारानं अनेकदा पुनरागमन केलंय. शिक्षणानं बी. ई. इलेक्‍ट्रॉनिक्‍स असलेल्या या कलाकाराची अभिनयातील पहिली कामगिरी म्हणजे "अपराध मीच केला' हे नाटक. स्मिता तळवलकर आणि बाळ धुरी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या. अविनाश खर्शीकर याचीही या नाटकात प्रमुख भूमिका होती; मात्र ऐन प्रयोगावेळी तो आजारी पडल्यानं हा "रोल' अशोकच्या वाट्याला आला. अंगभूत गुणवत्तेच्या आधारावर अक्षरशः प्रयोगावेळच्या बस प्रवासात अशोकनं आपले संवाद पाठ केले आणि या नाटकाचे दहा प्रयोग यशस्वी करून दाखविले.
वास्तविक या क्षणी अशोक शिंदेच्या "करियर'नं भरारी घ्यायला हवी होती, परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही. याबद्दल तो म्हणतो, ""या नाटकामधलं माझं काम पाहून राम कदमांनी एका नवीन चित्रपटाची मला "ऑफर' दिली. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि काही काळानं हा चित्रपट रखडला. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची एके दिवशी भेट झाली. ते मला म्हणाले, "अशोक, सध्या किती चित्रपट करतोयस?' मी म्हटलं, "फक्त रामभाऊंचा चित्रपट करतोय!' त्यावर ते पुन्हा म्हणाले, "मग लगेच दुसरा चित्रपट कर. कारण रामभाऊंची ख्याती अशी आहे की, ज्यांना त्यांनी पदार्पणाची संधी दिली, त्यांचे चित्रपट अद्यापपर्यंत पडद्यावर आलेले नाहीत.' (यशवंत दत्त-"मीठ भाकर', नाना पाटेकर-"गड जेजुरी जेजुरी'). पाटेकरांचं बोलणं खरं ठरलं आणि रामभाऊंचा चित्रपट रखडला. त्यामुळे चित्रपटसृष्टीतल्या पदार्पणासाठी मला "रेशीमगाठी' चित्रपटाची वाट पाहावी लागली. हा प्रेमपट अपयशी ठरल्यानं माझी निराशा झाली. त्यानंतर "एकापेक्षा एक'मध्ये मला छोटासा "रोल' मिळाला. हा चित्रपट अपयशी ठरला, पण या चित्रपटात बरीच कलाकार मंडळी असल्यामुळं यशाचं "शेअरिंग' झालं.''
कधी कधी कलाकाराच्या दृष्टीनं त्याची "इमेज' बनणंही आवश्‍यक असतं, पण आपली कधी कसलीच "इमेज' न बनल्याची खंत अशोक व्यक्त करतो. याबद्दल तो सांगतो, ""माझा "स्ट्रगल' इतर कलाकारांसारखा नव्हता. काम मिळण्याचं मला कधीच "टेन्शन' नव्हतं. मला माझ्या मनाजोगतं काम मिळत नव्हतं. एका चित्रपटात मी "हीरो' असायचो, तर दुसऱ्यात "व्हिलन'. मला अजूनही आठवतं, पुण्यात "प्रभात' चित्रपटगृहात मी "हीरो' असलेला "सुखी संसाराची बारा सूत्रं' हा चित्रपट लागला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी माझ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली होती. "प्रभात'पासून काहीच अंतरावर असलेल्या "विजय' चित्रपटगृहात अशोक सराफ "हीरो', तर मी "व्हिलन'च्या भूमिकेत होतो. देवाच्या कृपेनं मला चांगले पैसे मिळत होते. पण काही केल्या माझं काम "रजिस्टर' होत नव्हतं. अशा मनस्थितीत काम करणं खूप अवघड असतं. विश्‍वास बसणार नाही, तब्बल 17-18 वर्षं मी कार्यरत होतो. फक्त एकाच आशेवर, एक दिवस माझा येईल.''
अशोक शिंदेच्या आयुष्यात तो दिवस अगदी अलीकडे आला. "एवढंसं आभाळ' हा चित्रपट आणि "असंभव' मालिकेमुळं या कलाकाराला चोखंदळ प्रेक्षकांकडून जी पसंती हवी होती, ती मिळाली. ""काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका खूप नाव असलेल्या हॉस्पिटलमध्ये माझं जाणं झालं. एक प्रथितयश डॉक्‍टर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "तुमचा भालचंद्र राव मला खूप आवडतो.' त्यांची ही प्रतिक्रिया मला क्षणभर खरीच वाटली नाही. या व्यक्तिरेखेमुळं मला जगभरातील प्रेक्षक मिळाला,' अशोक सांगतो. "" "एवढंसं आभाळ'मध्ये तर माझं मध्यांतरानंतर आगमन झालं. तरीदेखील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली. या दोन कलाकृतींनी माझं आयुष्यच बदलून गेलंय. मानसिंग पवारांनी मधे मला एका चित्रपटाची "ऑफर' दिली. त्यामध्ये एक 21 वर्षांची नायिका काम करीत आहे. तेव्हा तिच्यासोबत माझी जोडी पडद्यावर शोभेल का, असा प्रश्‍न मी त्यांना विचारला. त्यावर ते मला म्हणाले, की 44 वर्षांच्या शाहरूख खानबरोबर 21 वर्षांची दीपिका पदुकोण शोभून दिसते, मग तुला 21 वर्षांची नायिका "सूट' का नाही होणार? धंद्याच्या गणितात तू पडू नकोस. तेव्हापासून मी फक्त माझ्या व्यक्तिरेखेकडे लक्ष देतोय.''
गेल्या वर्षभरात अशोक शिंदेला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा "ऑफर' होत आहेत. याबद्दल तो म्हणतो, ""सुमित्रा भावे, "श्‍वास'फेम मोहन परब, महेश मांजरेकर माझ्यासोबत चित्रपट करण्यास इच्छुक आहेत. वर्षभरापूर्वी कोणी मला असं सांगितलं असतं, तर त्यावर माझा विश्‍वासच बसला नसता. एका मित्रानं तर मला थेट सांगूनच टाकलं की, अशोक, आता जत्रेत चालणारे चित्रपट करूच नकोस, पण खरं सांगू, मला आता वेगळं काम करायचं असलं तरी या चित्रपटांना मी नकार देऊ शकणार नाही. कारण "भक्ती हीच खरी शक्ती' या चित्रपटानं 90 लाखांचा व्यवसाय केला. "जय अठरा भुजा सप्तशृंगी माता' हा चित्रपट नाशिकमध्ये चार "शोज'मध्ये तब्बल 14 आठवडे चालला. "भाऊ माझा पाठीराखा' या चित्रपटानंही चांगली कमाई केलीय. मला आता काहीतरी वेगळं करायला मिळतंय म्हणून मी अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना परत पाठवणं अयोग्य ठरेल. मराठी चित्रपट, मालिकांमध्ये मला चांगलं यश मिळालंय. मला आता वेध लागलेत ते हिंदी चित्रपटाचे. यापूर्वी मी "यशवंत' या एकमेव हिंदी चित्रपटात अवघ्या एका दृश्‍यामध्ये पाहायला मिळालो होतो. पुढील काळात हिंदी चित्रपट मिळवण्याकडे माझा कल राहील. सध्या नामांकित हीरोंपुढं ताकदीनं उभा राहील असा "व्हिलन' दिसत नाही. ती "गॅप' मला भरून काढायचीय.''

Friday, April 25, 2008

प्रिय सचिन,

प्रिय सचिन,

सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
मी काही क्रिकेटचा अभ्यासक नाही. गल्ली-क्रिकेटच्या वरदेखील माझी मजल गेलेली नाही! पण गेली 20 वर्षं टीव्हीवर क्रिकेट पाहून जे काही उमगलंय, ते तुझ्या करियरशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतोय.
दीड-दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. ऑस्ट्रेलियातील तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तू "बॅक टू बॅक' दोन इनिंग्ज छान खेळला होतास. तेव्हा मला काही मित्रांचे "एसएमएस' आले होते. "इफ क्रिकेट इज ए रिलिजन, देन सचिन इज अवर गॉड...', "आता तरी कळलं का तुला सचिनचं मोठेपण?...', "मराठी माणसानंच सचिनला पाठिंबा देऊ नये, यासारखं दुसरं दुर्दैव नाही...' या आशयाचे ते "एसएमएस' होते. ते वाचून मला धक्काच बसला. सगळं जग एकीकडं तुझं कौतुक करीत असतानाच माझ्यासारखे काही मोजकेच लोक तुझे कसे आणि केव्हापासनं एवढे कट्टर विरोधक बनले? थोडा खोलात जाऊन विचार केला तेव्हा काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला.
"युवा सकाळ'मध्ये सहा-सात वर्षांपूर्वी मी तुझ्यावर "आहे महान तरीही...' या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तुझ्या दशकभराच्या करियरचा आढावा घेताना मी महत्त्वाचे सामने आणि अंतिम स्पर्धांमधील तुझ्या कामगिरीचा ताळेबंद मांडला होता. आकडे कधीही खोटं बोलत नसतात. त्याप्रमाणे या सामन्यांमधली तुझी कामगिरी निश्‍चितच तुझ्या "स्टॅंडर्ड'च्या जवळ जाणारी नव्हती. पण, हे वास्तव पचविणं जड होतं. तुझ्या अनेक चाहत्यांकडून तेव्हा मला हा लेख आवडला नसल्याची पत्रं आली होती. पण काही मोजक्‍या रसिकांनी, ही माहिती डोळे उघडायला लावणारी असल्याचंही म्हटलं होतं. तेव्हापासून मी तुझ्या कामगिरीवर बारकाईनं लक्ष ठेवून होतो. पण, याचा अर्थ असा नव्हे की, मी कधीच तुझ्या फलंदाजीवर प्रेम केलं नाही. इतरांप्रमाणेच मीसुद्धा तुझा विलक्षण फॅन आहे. तू आऊट झालास की, इतरांप्रमाणे मीसुद्धा चॅनेल बदलतो. पण, माझं तुझ्यावरील प्रेम आंधळं नाही. ते डोळस प्रकारात मोडणारं आहे.
अजूनही आठवतंय, पाकिस्तानच्या पहिल्याच दौऱ्यात तू ज्या धैर्यानं वासीम अक्रम, वकार युनूस या तोफखान्याला सामोरा गेलास, त्याला तोड नव्हती! "स्ट्रेट ड्राईव्ह' पाहावा तर तुझाच! ऑफ साईडला फ्रंट फूटवर जात तू मारलेले फटके कोणी विसरूच शकणार नाही. क्रीज सोडून पुढं नाचत येत तू लगावलेले सिक्‍सर डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. क्रिकेटच्या पुस्तकात असलेल्या प्रत्येक फटक्‍याला तू आपलंसं तर केलंस; पण पॅडल स्वीपसारखे काही नवीन "इनोव्हशन' तुझ्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. तुझ्या फलंदाजीत अशी काही नजाकत होती की, तू एखादी ओव्हर खेळून काढली तरी चॅनेल बदलण्याचा मोह व्हायचा नाही. 1998च्या मार्चमध्ये शारजाच्या वाळवंटात तुझ्या बॅटनं जे वादळ निर्माण केलं, ते आजही कोणी विसरू शकलेलं नाही. एवढं सगळं चांगलं असूनही नंतर काहीतरी बिनसत गेलं. तुझा "डिफेन्स' सहज भेदला जाऊ लागला. तू बोलरला वाजवीपेक्षा अधिक सन्मान देऊन स्वतःची विकेट बहाल करू लागलास. "क्‍लीन बोल्ड' झाल्यानंतरही तू उगाचच चेंडू खाली राहिल्यानं मी चकलो, अशी ऍक्‍शन करून आपल्या चाहत्यांची सहानुभूती मिळवू लागलास. तुझ्यात दडलेल्या एका श्रेष्ठ स्पिनरला तू कधीच "सिरीयसली' घेतलं नाहीस. वॉर्न, मुरलीधरनप्रमाणे तूसुद्धा अगदी हातभर चेंडू वळवू शकतोस. पण... तुझ्या फलंदाजीतील श्रेष्ठत्वापुढं तुझ्यातला गोलंदाज झाकोळला गेला.
अनेक जण म्हणतात की, तू सचिनकडून खूप अपेक्षा ठेवतोस. त्यामुळे, या अपेक्षांची पूर्ती न झाल्यास तुझी निराशा होते. काही जण सांगतात, की दर वेळी सचिननंच खेळायला पाहिजे, ही जबरदस्ती का? टीममधले इतर दहा जण झोपा काढतात काय? प्रश्‍न रास्त आहेत. पण, या सवालांची सरबत्ती करणाऱ्यांनीच तुला देवाच्या जागी नेऊन बसवलंय, ही गोष्ट कशी नाकारता येईल? आणि जर तू देव असशील तर संकटाच्या वेळी तुझा तूच धावून यायला नकोस का?
आकडे तरी असे सांगतात की संकटसमयी तुझी फलंदाजी दबावाची शिकार झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावातल्या फलंदाजीला खूप महत्त्व असतं. दुर्दैवानं तुझी चौथ्या डावातील कामगिरी तुझ्या लौकिकाला साजेशी नाही. तंत्राच्या दृष्टीनं तुझ्या फलंदाजीत कोणताही दोष नाही, तुझ्याजवळ पर्वताएवढा अनुभव आहे, कोणत्याही गियरमध्ये बॅटिंग करण्याची तुझी ताकद आहे, कोणताही बोलर तुला फार काळ "बॅक फूट'वर ठेवू शकलेला नाही. मग प्रश्‍न असा उपस्थित होतो की, तुझ्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या तर त्या कोणाकडून ठेवायच्या? अपेक्षांच्या ओझ्याखाली दीर्घ काळ आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणं सोपं नाही, हे मी समजू शकतो. पण, याचीही तुला आता सवय झाली असावी.
कसोटी असो, वन डे असो की ट्‌वेंट्‌वी ट्‌वेंटी... क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात तू "फिट' आहेस. फलंदाजीतली तुझी गुणवत्ता पाहिली की कधी कधी वाटतं तू जर ठरवलंस तर कोणत्याच गोलंदाजाला तुझी विकेट जाणार नाही. क्रिकेटमधले बहुतेक सर्व विक्रम आता तुझ्या नावावर जमा आहेत. कसोटीमधील सर्वाधिक धावांचाही विक्रम लवकरच तुझ्या नावावर जमा होईल. तेव्हा माझ्यासारख्या चाहत्याला प्रश्‍न असा पडतो की, असं कोणतं "मोटिव्हेशन' आहे की, जे तुला अजूनही खेळायला भाग पाडतंय.
अलीकडच्या काळात तू अनेकदा झटपट बाद झाला असलास तरी तुझ्या विश्‍वासार्हतेला कधीच धक्का बसलेला नाही. आपली टीम बॅटिंग करीत असली की प्रत्येकाचा पहिला प्रश्‍न असतो, सचिन खेळायला आला का किंवा सचिननं किती रन्स काढले. आपली टीम संकटात असेल आणि तू क्रीजवर असलास तर "सचिन है ना!' असं प्रत्येकाचं उत्तर असतं. तुझी ही विश्‍वासार्हताच तुझं सर्वाधिक योगदान आहे. या योगदानाच्या बळावर तू आणखी काही यशोशिखरं गाठावीस अशी अपेक्षा आहे. पण, ते गाठताना तुझ्या लौकिकाला धक्का बसू नये, हीच अपेक्षा. तुझ्या फलंदाजीबाबत काही खटकलेल्या गोष्टी उपस्थित केल्या, त्याबद्दल क्षमस्व.
पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझा चाहता,
मंदार जोशी

Wednesday, April 23, 2008

भरभराट बॉलीवुडची

भारतामधील प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगाची सध्या अतिशय वेगानं भरभराट होतेय. "फिकी'च्या मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाचं सूत्र या भरभराटीभोवतीच केंद्रीत होतं. भारतात तसेच जगभरात या दोन्ही क्षेत्रात काम करणारी तज्ज्ञ मंडळी या अधिवेशनास उपस्थित होती. यावेळी झालेल्या चर्चासत्रांमध्ये या दोन्ही क्षेत्रांची भविष्यातील प्रगती आणि त्या ओघानं येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला. त्याचा घेतलेला हा आढावा.
------------
"जब वुई मेट' हा गेल्या वर्षीचा एक उत्कृष्ट सिनेमा. त्यानं "बॉक्‍स ऑफिस'वर चांगला व्यवसाय केला. पण, या यशामागं दडलेली सोनेरी किनार सर्वांच्या नजरेस आणून दिली ती "सोनी'च्या कुणाल दासगुप्ता यांनी. गेल्या काही महिन्यांमध्ये या चित्रपटाच्या 80 लाख अधिकृत डीव्हीडींची विक्री झालीय. हिंदी चित्रपटांच्या सीडी तसेच डीव्हीडी विक्रीचा हा नवीन विक्रम मानला जातोय. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीव्हीवरील आपल्या चित्रपटाच्या प्रक्षेपणाचे हक्क विकतानाही चतुराई दाखविली. त्यांनी एकाच वाहिनीला आपल्या चित्रपटाचे हक्क न विकता वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या वाहिन्यांना हे हक्क विकले. त्यामुळेच, फक्त टीव्हीवरील प्रक्षेपणाचे हक्क आणि डीव्हीडी विक्रीतूनच या चित्रपटानं निर्मितीखर्चाच्या तिप्पट रक्कम वसूल केली. नियोजनबद्ध निर्मिती केल्यास चित्रपटनिर्मितीचं क्षेत्र किती लाभदायक ठरू शकतं, याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
हल्लीच्या प्रेक्षकवर्गाची आवड खूप बदललीय, असं सगळीकडे बोललं जातं. या विषयावरच "चक दे इंडिया'फेम शिमीत अमीन, विधू विनोद चोप्रा, सुधीर मिश्रा यांनी प्रकाश टाकला. "चक दे...'सारखा विषय दोन वर्षांपूर्वी निर्मिलं जाणं शक्‍यच नव्हतं, असं अमीन यांनी सांगून टाकलं. सुधीर मिश्रा यांनी आपण प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून कधीच चित्रपटनिर्मिती करीत नसल्याचं स्पष्ट केलं. दिग्दर्शकानं आपल्याला जे काही सांगायचंय, ते ठामपणे सांगितलं तर वेगळ्या वाटेवरचा चित्रपटही चांगली होऊ शकतो. हा चित्रपट लोकप्रिय ठरला की मग प्रेक्षकाची आवड बदललीय, असं बोललं जाणं साहजिक असल्याचाही त्यांनी मुद्दा मांडला. विधू विनोद चोप्रांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अनिश्‍चिततेवर भर दिला. "मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट तयार झाला तेव्हा त्याला एकही वितरक हात लावण्यास तयार नव्हता. काहींनी तर आपणास असल्या चित्रपटाची निर्मिती करून कशाला हात पोळून घेताय ? असा प्रश्‍नही विचारल्याचं चोप्रांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला "एकलव्य-अ रॉयल गार्ड' हा चित्रपट भारतात अपयशी ठरला तर विदेशात त्यानं अतिशय चांगला व्यवसाय केला. प्रेक्षकांची आवड अशी भिन्न असताना दिग्दर्शकानं स्वतःला काय सांगायचंय, यावरच भर देणं आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले.
मनोरंजन उद्योगातील सर्वाधिक "हॅपनिंग' क्षेत्र म्हणून टीव्ही माध्यमाकडंच पाहिलं जातंय. सध्या भारतात एकूण 313 वाहिन्यांचं प्रक्षेपण सुरू असून 80 वाहिन्यांचे अर्ज केंद्र सरकारकडं पडून आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये आणखी सहाशे वाहिन्या पदार्पणाच्या तयारीत आहेत. केबलजोडणी असलेल्या घरांमधल्या सुमारे शंभर वाहिन्यांचं "सर्फिंग' करतानाच अनेकांना सध्या नाकीनऊ येतंय. तेव्हा या एक हजार वाहिन्या कोण पाहणार आणि त्यांचं भवितव्य काय ? हा एक मोठा प्रश्‍न आहे. मात्र, "आयएनएक्‍स मिडीया'च्या पीटर मुखर्जी यांच्या मतानुसार या सर्व वाहिन्या आपल्या पोटात रिचवण्याची क्षमता सध्या भारतीय दूरचित्रवाहिनी क्षेत्रात आहेत. "कॅस'च्या (कंडिशनल ऍक्‍सेस सिस्टीम) अंमलबजावणीस सुरुवात झाली असली तरी अजूनही देशभरात केबलयंत्रणेचाच प्रभाव आहे. या "ऍनॉलॉग' यंत्रणेला हद्दपार करून "डिजिटल' यंत्रणेची स्थापना केल्यास प्रत्येकाला आपणास हवी ती वाहिनी पाहण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळेच सर्व प्रकारच्या "निश' (एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या) वाहिन्यांनाही चांगला प्रेक्षकवर्ग आणि पर्यायानं उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती बघून केंद्र सरकारनं त्याबाबत एक कायमस्वरूपी धोरण निश्‍चित करण्याचा मुद्दा "रेडिओ मिर्ची'चे प्रमुख परिघी यांनी मांडला.
सध्या वृत्तवाहिन्यांची संख्या झपाट्यानं वाढतीय. भारतामधल्या टीव्हीचा चेहरामोहरा बदलण्यास वृत्तवाहिन्या जबाबदार असल्याचंही बोललं जातंय. "टीव्ही नेटवर्क टुडे'चे जी. व्ही. कृष्णन हे त्यास दुजेरा देतात. क्रिकेट, सिनेमा, कॉमेडी आणि क्राईम हे चार "सी' सध्या वृत्तवाहिन्यांवर राज्य करीत आहेत. "ट्‌वेंट्‌वी ट्‌वेंटी' स्पर्धेत भारतानं मारलेली बाजी, अभिषेक बच्चन-ऐश्‍वर्या रायचा विवाह आणि बेनझीर भुट्टो यांची हत्या... या तीन बातम्यांनी गेल्या वर्षभरात सर्वाधिक "टीआरपी' मिळविला. विशेष म्हणजे या तीनही बातम्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं प्रतिनिधीत्व करतात. सर्वसामान्यांच्या हातात भरपूर पैसा खुळखुळत असल्यानं त्यांच्या आवडीनिवडीत प्रचंड फरक पडला असल्याचे मत "सहारा समय'च्या राजीव बजाज यांनी व्यक्त केलं. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा ज्वलंत प्रश्‍न टीव्हीवर पाहण्यात प्रेक्षकांना आता रस उरलेला नाही. या विषयावरील बातम्या दाखविल्यास त्याला प्रेक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. म्हणूनच लोकांना जे हवंय, ते दाखविण्याशिवाय वाहिन्यांना पर्याय उरला नसल्याचंही तो सांगून टाकतात. मात्र, त्याविरुद्धचं मत "एनडीटीव्ही'च्या संजय अहिरराव यांनी व्यक्त केलं. "टीआरपी'च्या आकड्यांवर लक्ष ठेवून कार्यक्रम करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांशी निगडीत असलेले विषयच भविष्यात आपल्या वाहिनीवरून सादर केले जातील, असं ते म्हणाले.
मालिका, मुलांसाठीचे कार्यक्रम, बातम्या, स्पोर्टस्‌... हा आतापर्यंतचा आपल्या टीव्हीचा पॅटर्न. मात्र, "आयएनएक्‍स'च्या संगीतविषयक वाहिनीनं मोठं यश मिळवून हा "पॅटर्न' मोडून काढला. बहुतेक सर्व वाहिन्या सध्या गाजलेल्या गाण्यांचं काही सेकंदापुरते प्रक्षेपण करतात. त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन या वाहिनीवर सर्व गाणी पूर्ण रूपात दाखविली गेली. संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी अर्थातच या वाहिनीला आपला कौल दिला. "आमची वाहिनी म्हणजे टीव्हीवरचा रेडिओ आहे. मार्केटिंगवर एक पैसाही खर्च न करता यशस्वी झालेली ही एकमेव वाहिनी !' अशा शब्दांमध्ये मुखर्जी यांनी आपल्या यशामागचं गमक उलगडून दाखविलं. दूरचित्रवाहिन्या, चित्रपट, रेडिओबरोबरच सध्या "ऑनलाईन मिडीया'चाही बोलबाला आहे. भारतात सध्या वर्तमानपत्रं आणि टीव्हीचं वर्चस्व असलं तरी भविष्यकाळ हा "ऑनलाईन' माध्यमाचा असल्याचं भाकीत "एनडीटीव्ही नेटवर्क'च्या विक्रम चंद्रा यांनी वर्तविलं. भारतातल्या प्रसिद्धीमाध्यमांनी आता वेबसाईट हे माध्यम लोकाभिमुख करण्यावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. समाजात घडणाऱ्या घटनांचं केवळ वृत्तांकन करण्याऐवजी काही समस्यांची "कॅंपेन्स' राबविणं आता आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. सर्वसामान्यांना आपला आवाज इतरांपर्यंत पोचविण्याचा "प्लॅटफॉर्म' वेब माध्यमानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
मनोरंजन क्षेत्राची एकीकडे भरभराट सुरू असताना दुसरीकडे या क्षेत्राला "टॅलेण्टेड' लोकांची उणीव भासत आहे. ती दूर करण्यासाठी शासकीय तसेच खासगी पातळीवरही प्रयत्न होणं आवश्‍यक असल्याचं मत "व्हिसलिंग वूडस्‌ इंटरनॅशनल'च्या मेघना घई यांनी व्यक्त केलं. चित्रपट-टीव्ही माध्यमातलं परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी आपली संस्था प्रसिद्ध असली तरी ही संस्था संपूर्ण भारतामधल्या तरुणाईची गरज भागविण्यास अपुरी आहे. अमेरिकेत कलाक्षेत्राचं प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे दोन हजारहून अधिक संस्था कार्यरत आहे. भारतात असं काम करणाऱ्या संस्थांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या घटनांचं "कव्हरेज' करताना माध्यमांनी दाखविलेला उतावीळपणा अनेकांच्या टीकेस पात्र ठरला होता. त्यामुळेच माध्यमं आणि त्यांना सामाजिक भान आहे की नाही ? यासारखे प्रश्‍न उपस्थित झाले होते. खरं तर या विषयावर चर्चा करण्यासाठी शर्मिला टागोर, श्‍याम बेनेगल, महेश भट, प्रितीश नंदी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या सचिव जोहरा चटर्जी अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती. परंतु, यापैकी बहुतेकांनी मूळ मुद्दा सोडून सेन्सॉर बोर्डाची कार्यपद्धती आणि समाजातल्या काही घटकांनी चित्रपटांचे बंद पाडलेले प्रदर्शन यालाच "टार्गेट' केलं. "ब्रेकिंग न्यूज' हा हल्ली खेळ झालाय, हे बेनेगलांचं वक्तव्य सर्वांचा हशा घेऊन गेले.

भोजपुरीची भरारी
या अधिवेशनात प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांबद्दलचं चर्चासत्र विलक्षण रंगलं. महेश कोठारे यांनी हिरीरीनं मराठी चित्रपटसृष्टीची बाजू मांडली. भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार मनोज तिवारीनं आपल्या चित्रपटसृष्टीच्या यशाचं केलेलं विश्‍लेषण उपस्थितांना थक्क करून टाकणारं ठरलं. या कलाकाराची प्रमुख भूमिका ?सलेल्या "ससुरा बडे पैसेवाला' या चित्रपटाचं बजेट होतं 29 लाख रुपये. पण, त्यानं व्यवसाय केला 40 कोटींचा. मनोजनं षटकार मारला तो "बिना स्क्रीप्ट के यहॉं काम चलता है ।' असं वक्तव्य करून. कोणत्याही भोजपुरी चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं की तब्बल 10-12 दिवसांनी कलाकारांना पटकथा मिळते. पटकथा हातात नसताना आम्ही कसं काम करतो, ते देव जाणं, असं मनोजनं सांगितलं.

सेन्सॉरची कैची
महेश भट यांची दिग्दर्शन क्षेत्रातील शेवटची कलाकृती म्हणजे जख्म. पण, हा चित्रपट पूर्ण करताना भटना सेन्सॉर बोर्डाशी मोठी टक्कर द्यावी लागली होती. चित्रपट पूर्ण होऊनही तो सेन्सॉर बोर्डामुळे तो रखडला होता. या चित्रपटातील "क्‍लायमॅक्‍स'बाबत सेन्सॉरचा आक्षेप होता. तेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. क्‍लायमॅक्‍समधील कार्यकर्त्यांची वेशभूषा बदलण्याचा अट्टाहास सेन्सॉरने धरला होता. तेव्हा तब्बल 40 लाख रुपये खर्च करून भटनी हा पाच मिनिटांचा भाग "एडिट' केला होता. विशेष म्हणजे चित्रपटाचे एकूण बजेट होतं 3 कोटी. यावरची कडी म्हणजे त्या वर्षीचा राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार म्हणून "जख्म'ची निवड झाली. अशा परिस्थितीत आपण मनोरंजनपर चित्रपट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असा टोला भट यांनी मारला.