Tuesday, February 5, 2008

बहुरूपिया : श्रेयस तळपदे मुलाखत



1995 मध्ये तू इंडस्ट्रीत पदार्पण केलंस; पण तुला खरा "ब्रेक' मिळण्यासाठी 2004 पर्यंत वाट पाहावी लागली. या काळातील तुझा स्ट्रगल कसा होता ?
- हिंदी चित्रपटांमध्ये "लीड'ची भूमिका करण्याचं माझं स्वप्न होतं; पण त्यासाठी कुणी तरी "गॉडफादर' असावा लागतो. मला तसा कोणी "गॉडफादर' नव्हता. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं होतं. त्यासाठीच मी सातत्यानं प्रामाणिकपणे मेहनत करीत होतो. या "स्ट्रगल'च्या काळात माझ्यापेक्षा जास्त त्रास झाला असेल तो माझ्या आई-वडिलांना. कॉलेज संपल्यानंतर सर्वांचा एकच प्रश्‍न असायचा की श्रेयस काय करतोय? त्यांचं उत्तर असे की, मी नाटक करतोय. या उत्तरानं समाधान न झालेले पुन्हा विचारायचे, नाटक करतोय म्हणजे नक्की काय करतोय? त्यावेळी आई-वडिलांची पंचाईत व्हायची. सुरुवातीचा काळ खूपच कठीण होता. काही दिग्दर्शक माझ्याकडे लक्षही देत नव्हते; पण आता तेच दिग्दर्शक मला दिवसातून चार-चार वेळा फोन करताहेत. तरीही मी मोठा झालोय असे मला मुळीच वाटत नाही; पण हा "स्ट्रगल' संपू नये, असं मला वाटतं. कारण एकदा का आपल्याला सारं काही येतं असं वाटू लागलं, की आपली प्रगती तिथेच थांबते.

: कोणत्याही कलाकाराच्या दृष्टीनं त्याच्या शेवटच्या चित्रपटाचा "रिझल्ट' खूप महत्त्वाचा असतो. "बॉम्बे टू बॅंकॉक'चं अपयश तू कसं पचवलंस?
- अपयशही कधी कधी आवश्‍यक असतं. त्यातून तुम्ही सक्षम होत असता. मी नाटकं-मालिका केल्या; पण योग्य संधी मिळायला तसा काळही यावा लागतो. "इक्‍बाल' व "डोर'मुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत; पण कोणत्याही चित्रपटाला मी एका पॉईंटपर्यंतच पुढं नेऊ शकतो. तो चित्रपट चांगला चालण्यासाठी स्क्रीप्ट, संगीत, दिग्दर्शन... असे सर्वच घटक मजबूत असावे लागतात. "बॉम्बे टू बॅंकॉक'ला समीक्षकांनी; तसेच प्रेक्षकांनीही नाकारलं. एका प्रेक्षकानं तर मला कॉमेडीची काहीच समज नसल्याचीही प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया मी खूप "पॉझिटिव्ह'ली घेतलीय.

: सुभाष घईंसारख्या दिग्गज दिग्दर्शकानं जेव्हा "इक्‍बाल'ची "ऑफर' दिली, तेव्हा तुझी "फर्स्ट रिऍक्‍शन' काय होती?
- सुभाष घईंनी मला "इक्‍बाल'च्या ऑडिशनसाठी बोलावलं, तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला "लीड'चा रोल मिळणार आहे. असेल छोटीशी भूमिका वाटलं. पुढं मला सांगण्यात आलं, की 50 दिवस शूटिंग करायचं आहे. तेव्हा मला ही गोष्ट उमगली.

: तुझ्या नावाचीही चित्रपटसृष्टीत बरीच चिरफाड केली जाते. त्याबद्दल काय सांगशील?
- हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर व्हायचं तर त्यासाठी नावही तसंच खणखणीत लागतं. माझ्या नावाची अनेक जण आपापल्या परीनं "वाट' लावतात. मला त्याचं मुळीच वाईट वाटत नाही. हे काही जाणूनबुजून होत नाही. सुभाष घईंनी तर मला सांगितलं होतं, की तू तुझं नाव "मानवकुमार' असं लाव; पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, ज्या नावानं मी जन्माला आलोय, त्याच नावानं मला राहायचं आहे, वावरायचं आहे.

: शाहरूख खानबरोबर "स्क्रीन शेअर' करणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. "ओम शांती ओम'च्या निर्मितीदरम्यान तुझी त्याच्याबरोबर खूप छान "केमिस्ट्री' जुळली होती. त्याबद्दल काही सांगशील का?
- फराह खाननंच मला विचारलं होतं, की शाहरूखबरोबर काम करशील का? त्यावेळी मला टेन्शन होतं. ही दोन्ही चांगली माणसं आहेत. त्यांच्यात खोटेपणा नाही... फराहनं मला स्पष्ट सांगितलं, की नागेश कुकुनूरपेक्षा अधिक आणि करण जोहरपेक्षा कमी असा मला "टेम्पो...' हवा आहे. पहिल्याच दिवशी शाहरूखला नाराज करायचं नाही असं मी ठरवलं होतं. "इस पार किंवा उस पार' असं ठरवून मी थेट शाहरूखशीच संवाद साधला. पहिल्या एक-दोन दिवसांमध्येच आम्ही अभिनयात एवढं "इम्प्रोव्हायझेशन' केलं, की शेवटी फराहला त्यात हस्तक्षेप करावा लागला. गेल्या वर्षी "ओम शांती ओम'च्या सेटवर त्यानं माझा वाढदिवस खूप अनोख्या पद्धतीनं साजरा केला होता.

: सुभाष घई, शाहरूख खान, फराह खान यांचा उल्लेख तू "गॉडफादर' असा करशील का?
- शाहरूख खानचा उल्लेख "गॉडफादर' म्हणून करावा, की चांगला "ह्यूमन बिईंग' म्हणून करावा ते मला कळत नाही, पण एक मात्र निश्‍चित, तो अतिशय चांगला मित्र आहे. मला त्या अर्थाने गॉडफादर मिळाले नाहीत; पण चांगली माणसे व मित्र पुष्कळ मिळाले.

: अमिताभ बच्चन यांना तुझा "इक्‍बाल' खूप आवडला होता. त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया तू सांगशील?
- "आयफा' पारितोषिकासाठी मी नागेश कुकुनूरबरोबर दुबईला गेलो होतो. त्यावेळी लिफ्टमधून बाहेर पडताना मला अगदी जवळून अमिताभजींना पाहण्याचा योग आला. मी किती तरी वेळ मान वर करून त्यांनाच न्याहाळत होतो. ते नागेशबरोबर बोलताना त्यांनीच मला प्रश्‍न केला, "श्रेयस, सो गुड टू सी यू. व्हेन डिड यू कम?' पण माझ्या तोंडातून त्यांच्याशी बोलायला शब्दच फुटत नव्हते. मी मात्र "आय... आय... केम... समटाईम बॅक...' असं काही तरी बडबडलो. "आय... आय...' वरच मी बराच वेळ अडखळलो होतो. "आँखे' चित्रपटात मला त्यांच्याबरोबर दोन "सीन्स' करायला मिळणार होते. माझ्यासाठी सीन किती आहेत, यापेक्षा बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळणं, ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती. दुर्दैवानं या दोनपैकी एक "सीन' "एडिटिंग'च्या वेळी कापला गेला.

: "ऍक्‍टर' म्हणून स्वतःला "एस्टॅब्लिश' करण्याची तुझी प्रक्रिया सुरू आहे. अशा स्थितीत "कांदे पोहे'चा निर्माता बनून तू थोडी "रिस्क' घेतोस, असं तुला वाटत नाही का?
- खरंय. "ऍक्‍टर' म्हणून मी अजूनही "एस्टॅब्लिश' झालेलो नाही. त्यामुळे, घईंनी "कांदे-पोहे'च्या निर्मितीचा पहिल्यांदा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तो स्वीकारण्याच्या मी मनःस्थितीत नव्हतो. निर्माता म्हणून जबाबदारी घेण्यास मी अजूनपर्यंत तयार नसल्याचं मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी आणखी किती वर्षांनी तू तयार होशील, असा प्रश्‍न विचारला. त्यांचा आग्रह आणि प्रोत्साहनामुळे मी अखेर निर्माता बनण्यास तयार झालो. निर्माता झाल्यानंतर मराठी कलाकारांचा फायदा करून देण्याचा माझा विचार आहे. मराठी कलाकारांकडे प्रचंड क्षमता आहे. आपली मुलं हिंदीतील कलाकारांपेक्षा शतपटीनं चांगली आहेत.

: अभिनेता आणि निर्माता अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तुझी कितपत ओढाताण होतेय?
- मी सेटवर गेलो तर ओढाताण होणार ना. निर्मितीची सगळी धुरा माझी पत्नी दिप्ती तळपदे पाहतेय. या चित्रपटाच्या निर्मितीचा सर्व भार तिनं तिच्या खांद्यावर घेतलाय.: भविष्यात कुठंपर्यंत मजल मारण्याची महत्त्वाकांक्षा आहे?- जगातल्या लोकांनी मला ओळखावं, जागतिक सिनेमात मला काम करायला मिळावं हे स्वप्न आहे. तशा संधीसुद्धा येताहेत. माझ्याकडं चालून येणाऱ्या प्रत्येक संधीला मी "फूल टू' भिडणार आहे.

No comments: