Wednesday, February 27, 2008

जोडी क्‍या बनाई...

जोडी क्‍या बनाई...

वधू-वराच्या जोड्या स्वर्गातच जमतात, असं म्हटलं जातं. मात्र बॉलीवुडमधल्या जोड्या एवढ्या सहजासहजी जमत नाहीत. फक्त नायक-नायिकाच नव्हे तर दोन प्रसिद्ध नायक एका चित्रपटात येणंही इथं दुर्मीळ असतं. अशा परिस्थितीत कमल हसन आणि मोहनलाल हे दक्षिणेतले दोन सुपरस्टार एका आगामी चित्रपटात एकत्र येणं, ही खूप महत्त्वाची घटना आहे. त्या निमित्तानं बॉलीवुडमधल्या कलावंतांच्या जमलेल्या आणि काही कारणांमुळे जमू न शकलेल्या जोड्यांचा घेतलेला हा वेध...
-------------
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे दोन प्रमुख आधारस्तंभ म्हणजे कमल हसन आणि मोहनलाल. हे दोन कलाकार आता चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी एकत्रितपणे "साईन' केलेला "कंदाहार' हा चित्रपट. काही वर्षांपूर्वी झालेल्या विमान अपहरण नाट्यावर हा चित्रपट आधारलाय. मल्याळी आणि तमीळ भाषेत निर्मिल्या जाणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मेजर रवी करणार आहेत. यापूर्वी काश्‍मीर दहशतवादावरचा त्यांचा "कीर्तीचक्र' आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारलेला "मिशन नाईंटी डेज' या दोन चित्रपटांची बरीच चर्चा झाली होती. चेन्नईतील एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी मोहनलाल यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मेजर रवींनी लगोलग हा धागा पकडून या दोन दिग्गजांशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्या नवीन चित्रपटासाठी त्यांना करारबद्ध केलं.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या दोन कलाकारांनी एकत्र येण्याचा हा अपूर्व योग बऱ्याच काळानं आलाय. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावल्यास लोकप्रिय कलावंतांच्या खूप कमी वेळा जोड्या जमल्याचं निदर्शनास येतं. 1950 ते 1970 हा काळ गाजविला तो दिलीपकुमार-राज कपूर आणि देव आनंद या त्रयीनं. परंतु, हे तीन दिग्गज कलावंत एकदाही एका चित्रपटामध्ये एकत्र येऊ शकले नाहीत. राज कपूर आणि दिलीपकुमार "अंदाज' या एका चित्रपटाद्वारे एकत्र आले. पण, दिलीपकुमार-देव आनंद आणि राज कपूर-देव आनंद यांना एकत्रपणे पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना काही मिळू शकला नाही. त्या काळात या तिघांचे वेगवेगळे "कॅंप्स' तयार झाल्यामुळे कदाचित ते एकत्र आले नसावेत. मात्र, या तिघांचा काळ ओसरल्यानंतर अचानक लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या अमिताभ बच्चनबाबत सुदैवानं असा प्रकार घडला नाही. हा सुपरस्टार त्या काळातील प्रत्येक लोकप्रिय कलाकाराबरोबर झळकला. (अमिताभ-रजनीकांत ः गिरफ्तार, अंधा कानून), (अमिताभ-विनोद खन्ना ः हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर), (अमिताभ-शशी कपूर ः सुहाग, दीवार) आपल्या नंतरच्या पिढीतल्याही अनेक अभिनेत्यांबरोबर अमिताभने पडदा शेअर केला. याला अपवाद आहे तो फक्त आमीर खानचा. वास्तविक अमिताभ-आमीर आणि माधुरी दीक्षित या तिघांना एकत्र घेऊन प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी "रिश्‍ता' चित्रपटाची घोषणाही केली होती. पण, हा चित्रपट मुहूर्ताच्या पलीकडे जाऊ शकला नाही.
लोकप्रिय कलाकारांच्या जोड्या न जमण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं "स्टार स्टेटस.' ज्या दोन कलाकारांना एकत्र झळकवायचं असतं, त्यांना समान लांबीच्या, समान महत्त्वाच्या व्यक्तिरेखा मिळणं आवश्‍यक असतं. चित्रपट संपल्यानंतर आपण "लूजर' ठरलो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होण्याची भीती असते. कलाकारांच्या मनातली ही भीती आजतागायत दूर झाली नसल्यानं प्रमुख कलाकार एकत्र येण्यास नाखूश असतात. "अंदाज अपना अपना'च्या यशानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी शाहरुख खान-आमीर खानला घेऊन एका नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. पण, हा चित्रपट कधीच सुरू होऊ शकला नाही. खरं तर, या दोन्ही कलाकारांनी वेळोवेळी एकमेकांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय. परंतु, त्यांच्या "स्टार स्टेटस'ला न्याय मिळेल, असे "रोल' लिहिण्यात लेखक मंडळींना अपयश आलंय.
मोठे कलाकार एकत्र न येण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे "सोलो स्टार' म्हणून मिळवलेल्या यशाला अधिक किंमत असते. आमीर खान हा "मल्टीस्टारर' चित्रपटात झळकतो. पण, आपल्या आजूबाजूचे कलाकार "स्टार' नसल्याची तो प्रकर्षानं काळजी घेतो. प्रेक्षक आणि हिंदी चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीनं विचार केल्यास मोठे कलाकार एकत्र येणं जरूरीचं आहे. लेखक-दिग्दर्शकांनी त्या दृष्टीनं विचार केल्यास मनोरंजनाचं आणखी एक माप प्रेक्षकांच्या पदरी पडेल.

महत्प्रयासानं जमलेल्या जोड्या चित्रपट
अमिताभ बच्चन-दिलीपकुमार शक्ती
राजकुमार-दिलीपकुमार सौदागर
राजकुमार-नाना पाटेकर तिरंगा
अमिताभ बच्चन-नाना पाटेकर कोहराम

प्रेक्षकांना उत्सुकता असूनही न जमलेल्या जोड्या
शाहरुख खान-आमीर खान
अमिताभ बच्चन-आमीर खान
अक्षयकुमार-शाहरुख खान
अक्षयकुमार-हृतिक रोशन

3 comments:

Dhananjay S Kulkarni said...

Dilipkumar and Devanand were acted together in 1955 film : Insaniyat dir: S S wasan

Dhananjay S Kulkarni said...

Dilipkumar And Dev Anand acted togethet in 1955 Fim: Insaniyat Dir : S S wasan

Dhananjay S Kulkarni said...

Dilipkumar And Dev Anand acted togethet in 1955 Fim: Insaniyat Dir : S S wasan