Tuesday, April 15, 2008

आरपार भिडणारा टिंग्या...



तमाम प्रेक्षकवर्ग "वळू'च्या जादूतून अजून पुरता बाहेर येण्याच्या अगोदरच "टिंग्या' हा चित्रपट प्रेक्षकांना आरपार भिडण्यासाठी मंगेश हाडवळे नावाचा तरुण दिग्दर्शक आपल्या "टिंग्या' या कलाकृतीद्वारे प्रेक्षकांवर गारूड घालण्यासाठी सज्ज झालाय. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वप्रथम मनात येणारी गोष्ट म्हणजे बैलांना खरंच सध्या चांगले दिवस आलेत. "वळू' चित्रपटातला बैल हा मुक्त स्वातंत्र्यावर भाष्य करून गेला. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या "टिंग्या'तला बैल हा त्याउलट आहे. सध्याच्या असंवेदनशील आणि "प्रॅक्‍टिकल' समाजाचा तो बळी ठरतो. दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी टिंग्या या सात-आठ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून या बैलाचं बळी जाणं अत्यंत संवेदनशीलपणे चित्रीत केलंय. त्यातून उभं राहतं ते सध्याचं वास्तव. हा चित्रपट पाहणाऱ्याच्या अगदी आरपार भिडतो. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे विषयातला सच्चेपणा, हाताळणीतला साधेपणा आणि मराठी भाषेचा ग्राम्य गोडवा. हा चित्रपट सुरू झाल्यानंतर पाहणाऱ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये एका अद्‌भूत दुनियेत घेऊन जातो. तिथलं जीवन कधी हसवतं, कधी डोळ्यातून पाणी आणतं तर कधी आपल्या बोथट संवेदनांवर मार्मिक भाष्य करून जातं. चित्रपट माध्यमाची विलक्षण ताकद अधोरेखित करण्याचं काम या चित्रपटानं केलंय.
ही कहाणी आहे टिंग्या आणि चितंग्याची. टिंग्या म्हणजे आठ वर्षांचा एक निरागस चुणचुणीत मुलगा आणि चितंग्या म्हणजे त्याच्यासोबतीनं जन्मानं आलेला एक बैल. टिंग्याचे वडील एक कष्टकरी शेतकरी. सावकाराचं वाढत जाणारं कर्ज, त्यावर व्याजाचा बोजा आणि लहरी हवामानामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली असते. त्यातच चितंग्या एका अपघातामुळं आपली शक्ती हरवून बसतो. तेव्हा आपलं कुटुंब चालविण्यासाठी या चितंग्याला
विकण्याशिवाय टिंग्याच्या वडिलांकडं दुसरा पर्याय नसतो. ही गोष्ट कळल्यानंतर टिंग्या संपूर्ण घर डोक्‍यावर घेतो. एवढ्यावरच न थांबता तो चितंग्यावर उपचार करण्यासाठी एका डॉक्‍टरला गावातून पाचारण करतो. पण परिस्थितीच अशी उद्‌भवते की, चितंग्याचा बळी जातो.
पदार्पणाच्या चित्रपटातच मंगेश हाडवळे यांनी कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी केलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय गेली काही वर्षं नुसता गाजतोय. दिग्दर्शकानं या विषयावर थेट भाष्य न करता एका शेतकरी कुटुंबाची ससेहोलपट दाखवलीय. या चित्रपटाचा मूळ विषय एक मुलगा आणि बैलातल्या नातेसंबंधाशी निगडीत आहे. हा विषय तर या चित्रपटात प्रभावीपणे उतरलाच आहे. त्याशिवाय ग्रामीण जीवनातल्या विविध रंगांची इथं उधळण झालीय. टिंग्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाचं केलेलं चित्रीकरणही खूप मार्मिक आहे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही काही त्रुटी राहून गेल्या आहेत. टिंग्या आणि त्याच्या मैत्रिणीबरोबरचं नातं दिग्दर्शकानं उगीचच तुटेल एवढं ताणलंय. टिंग्याला मोठं करण्याच्या प्रयत्नात त्याच्याहून काही वर्षंच मोठा असणारा त्याचा भाऊ अगदीच दुर्लक्षित राहून गेलाय. टिंग्याच्या व्यक्तिरेखेतलं महत्त्व लक्षात आल्यानं दिग्दर्शकानं त्याला काही दृश्‍यांमधून आणखी मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. फ्लॅशबॅकच्या तंत्रात नसलेली सफाई प्रकर्षानं जाणवते. पण, चित्रपटाच्या एकंदरीत परिणामच्या तुलनेत या त्रुटी अगदी क्षुल्लक आहेत.
शरद गोयेकर हा बालकलाकार आपल्या करियरच्या सुरुवातीलाच थोर कामगिरी करून गेलाय. कॅमेऱ्यासमोरची त्याची एवढी सफाईदार कामगिरी बुचकळ्यात टाकणारी आहे. सचिन देव (वडील), माधवी जुवेकर (आई), तरन्नुम पठाण (रशिदा), चित्रा नवाथे (नानी), विठ्ठल उमप (नानीचा पती) या सर्व कलाकारांनी टिंग्याला चांगली साथ दिलीय. जो आशय चार-पाच गाण्यांमधून सापडणार नाही, तो आशय "मांझं आभाळ तुला दे... तुझं आभाळ मला...' या ओळीतून सांगण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. तेव्हा या सुट्टीचं पहिलं काम म्हणजे "टिंग्या' पाहणे.

Saturday, April 12, 2008

काजोल मुलाखत



बॉलिवुड सम्राज्ञी होण्याची गुणवत्ता आणि संधी असूनही काजोलनं दशकभरापूर्वी या क्षेत्रातून काही काळासाठी दूर होण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी "फना'द्वारे तिनं केलेलं पुनरागमन चांगलंच यशस्वी ठरलं होतं. आता ती आपला पती अजय देवगणचं दिग्दर्शन पदार्पण असलेल्या "यू मी और हम' चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येतेय. त्यानिमित्तानं तिची ही दिलखुलास मुलाखत.
----------------
ग्लॅमर जगतामधली मुलाखत द्यायला न आवडणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे काजोल ! कारकिर्दीच्या सुरुवातीला तिचा "मिडीया'शी बऱ्यापैकी "रॅपो' होता. पण, कालांतरानं विविध घटनांमुळं तिनं "मिडीया'ला आपल्यापासून दूरच ठेवलं. "फना'च्या प्रदर्शनावेळीही तिनं गप्प राहणंच पसंत केलं होतं. पण, अजयच्या दिग्दर्शकीय पदार्पणामुळं तिला आपलं मौनव्रत सोडावं लागलं. याबद्दल ती म्हणते, ""खरंच मला मुलाखती द्यायला आवडत नाहीत. त्याच त्याच प्रश्‍नांना काय उत्तरं द्यायची ? आपल्याजवळ काही सांगायला असेल तर बोलायला हरकत नाही. एक तर मी खूप कमी चित्रपट करते. तेव्हा उगीचच काही तरी बडबड करायला मला आवडत नाही. त्यापेक्षा मी गप्प राहणेच पसंत करते.''
अजयमध्ये लपलेल्या दिग्दर्शकाची जाणीव काजोलला पहिल्यांदा झाली. एके दिवशी अजयनं सहजच तिला गप्पा मारता मारता एक कथानक ऐकवलं. त्यावर दोघांनी भरपूर चर्चा केली आणि काही क्षणात काजोलनं त्याला आपण या चित्रपटात काम करणार असल्याचं सांगितलं. अजयच्या दिग्दर्शनाबद्दल ती सांगते, ""वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यानं दिग्दर्शक व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आता पुरं झालंय, याचा त्याच्याबरोबर मलाही खूप आनंद वाटतो. अजयच्या दिग्दर्शनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता आहे. चित्रपट निर्मितीमधल्या प्रत्येक घटकाकडून नेमकं काय घ्यायला हवं, याची त्याला जाणीव आहे. एका चांगल्या दिग्दर्शकाची ही निशाणी आहे. "यू मी और हम' स्वीकारण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अजयनं स्वीकारलेली दिग्दर्शनाची धुरा. अजयमध्ये चांगला दिग्दर्शक दडलाय, हे मला ठाऊक होतं. पण, तो "ग्रेट डिरेक्‍टर' असल्याची खात्री मला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आली. माझ्या अपेक्षांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्यानं दिग्दर्शक म्हणून छान काम केलंय. आतापर्यंत मी अनेक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. पण, प्रत्येक वेळी मला माझ्या भूमिकेबद्दल प्रश्‍न पडायचे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे अजयनं मला माझी व्यक्तिरेखा अशापद्धतीनं ऐकविली की मला काम करताना एकही प्रश्‍न त्याला विचारावा लागला नाही.''
प्रेम या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत. त्यामुळे, अजयनं "यू मी और हम'मधून प्रेमाबद्दल वेगळं काय भाष्य केलंय, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या विषयाबद्दल ती सांगते, "" "प्यार करने के लिए एक जुनून होता है । लेकिन प्यार निभाने के लिए भी एक जुनून जरूरी है ।' हीच गोष्ट आम्ही या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा उगीचच बाऊ करतो. योग्य मार्गानं समस्य सोडविण्याचा प्रयत्न केल्यास त्यात नक्की यश येतं. हा विचार या चित्रपटातून मांडण्यात आलाय.''
हिंदी चित्रपटसृष्टीत एखाद्या नायिकेचा विवाह झाला की, तिच्या "करियर'कडं कोणी गांभीर्यानं पाहत नाही. काजोलनं विवाहानंतर "दिल क्‍या करे', "कभी खुशी कभी गम', "राजू चाचा', "फना' आणि "यू मी और हम' हे पाच चित्रपट केले. दहा वर्षांमध्ये अवघे पाच चित्रपट करण्याच्या आपल्या निर्णयाचं समर्थन करताना ती सांगते, ""मी स्वतःला खूप "लकी' मानते. गेल्या दोन दशकांमध्ये मला खूप वेगवेगळे "रोल्स' करण्याची संधी मिळाली. अशी संधी यापूर्वी खूप थोड्या नायिकांच्या वाट्याला आलीय. मी माझ्या भूमिकांबाबत खूप "चुजी' आहे. तसेच माझ्या चित्रपट निर्मितीमधल्या प्रत्येक विभागाबद्दलच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. एक तर मला कथानक खूप वेगळं लागतं, दिग्दर्शकही खूप चांगला लागतो. माझ्याशी "कम्फर्टेबल' असतील अशा कलाकारांबरोबर मला काम करायचं असते. तेव्हा एवढ्या सगळ्या अटींमुळं माझा नवीन चित्रपट यायला तीन वर्षं लागतात. मात्र, त्याची मला खंत नाही. काहीतरी सुमार भूमिका करण्यापेक्षा तीन वर्षांनी एखादी मस्त भूमिका साकारायलाच मला अधिक आवडेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे चित्रपट मला आवडतात. याचा अर्थ असा नाही की, समस्याप्रधान चित्रपट वाईटच असतात. पण, मी माझा स्वतःचा मार्ग निश्‍चित केलाय.''
गेल्या दोन दशकांमध्ये आपला अभिनय प्रगल्भ झाल्याचं काजोल अगदी ठामपणे सांगते. त्यासाठी ती शाहरुख खानचं उदाहरण देते. ती म्हणते, ""शाहरुखनं काही काळापूर्वी दिलेली एक मुलाखत माझ्या चांगली लक्षात आहे. यात तो म्हणाला होता, माझ्यासमोर एखादी गाय जरी उभी केली तरी मी तिला माझं तिच्यावर प्रेम आहे, हे पटवून देऊ शकेन. शाहरुख आणि आमिर खानच्या कामावरील निष्ठेला तोड नाही. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालंय. पण, जर कोणी मला अजय, शाहरुख आणि आमीर या तिघांपैकी एकाची सहकलाकार म्हणून निवड करायला सांगितलं तर मी तिघांनाही नकार देईन. कारण, माझ्यादृष्टीनं कथानक सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून तर करण जोहरचा नवीन चित्रपट मी अजूनपर्यंत स्वीकारलेला नाही. मी त्याला तोंडी होकार दिलाय. पण, कथानक ऐकल्यानंतरच त्याचा चित्रपट स्वीकारायचा की नाही, हे मी ठरवीन. सध्या मी आमच्या "होम प्रॉडक्‍शन'चा "टुनपूर का सुपरहीरो' हा एकमेव चित्रपट करतेय.''
गेल्या पाच वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत कमालीचा बदल झालाय. याची काजोलला कल्पना आहे. हा बदल धक्कादायक असल्याचं स्पष्ट करून ती सांगते, ""खरं तर मला हिंदी चित्रपटांमध्ये कामच करायचं नव्हतं. कारण, हे क्षेत्र खूप अस्थिर आहे. मला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगाराचा चेक हवा होता. पण, कुटुंबियांनी मला या क्षेत्रात अक्षरशः ढकलून दिलं. पण, इथं काम करायला लागल्यानंतर हे क्षेत्र आपल्याला जेवढं वाईट वाटत होतं, तेवढं वाईट नाही, याची मला खात्री पटली.''

Thursday, April 10, 2008

कागदावरचा चित्रपट पडद्यावर उतरवायचाय...


अजय देवगण मुलाखत

"स्टार' कलाकारांनी दिग्दर्शक बनण्याचा "ट्रेण्ड' सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतोय. अभिनेता आमीर खानपाठोपाठ आता अजय देवगणही "यू मी और हम'द्वारे दिग्दर्शक बनलाय. त्यानिमित्तानं त्याच्याशी मारलेल्या गप्पा.
---------------
ः अभिनयात तब्बल 17 वर्षं घालविल्यानंतर एकदम अचानक दिग्दर्शक बनण्याचा निर्णय का घेतलास ?
ः "चलो अभी मैं एक फिल्म डिरेक्‍ट करता हूँ' असा टिपीकल डायलॉग टाकण्यासाठी मी हा चित्रपट बनवलेला नाही. माझ्या मते कोणताही चित्रपट बनण्यासाठी एका चांगल्या कल्पनेची गरज असते. ही कल्पना मी तीन वर्षांपूर्वी सुचली. तिच्यावर मग मी थोडं काम केलं आणि माझ्या लक्षात आलं की आता आपण त्यावर चित्रपट करू शकतो. त्यामुळं मी अगदी ठरवून दिग्दर्शक बनलेलो नाही.
ः पण, अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत करियर करण्यापूर्वी तुला दिग्दर्शकच व्हायचं होतं ना ?
ः हो, निश्‍चितच. दिग्दर्शनाकडंच माझा अधिक कल होता. अभिनयाची सुरुवात होण्यापूर्वी मी काही व्हिडीओपटही केले होते. माझे वडिल आणि प्रसिद्ध ऍक्‍शन दिग्दर्शक वीरू देवगण यांच्याबरोबर मी अनेक चित्रपटांच्या शूटिंगला जायचो. मला अजूनही आठवतंय अवघ्या अकरा-बाराव्या वर्षी मी संकलन करायला शिकलो होतो. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हाताखाली काही काळ दिग्दर्शनाचेही धडे मी गिरवले होते. पण, त्यानंतरही मी अभिनेता व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. तेव्हा त्या दृष्टीनं प्रयत्न केला आणि थोडा फार यशस्वीही झालो.
ः "रफटफ ऍक्‍टर' अशी तुझी इमेज आहे. तरीदेखील दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करताना प्रेमाचा विषय तू का निवडलास ?
ः खरं तर मी गेल्या पंधरा वर्षांमध्ये एवढे वेगवेगळे "रोल्स' केले आहेत की, माझ्यावर "रफटफ इमेज'चा शिक्का मारणं योग्य नाही. पण, ते वास्तव आहे, हेसुद्धा मी नाकारीत नाही. दिग्दर्शक बनताना आपण "लव्हस्टोरी'च बनवायची असं मी ठरवलं नव्हतं. तो विषय मनात आला आणि मी दिग्दर्शक बनलो, एवढंच त्यामागचं सत्य आहे.
ः आजवर अनेक प्रेमकहाण्या प्रेक्षकांपर्यंत आल्यात. "यू मी और हम'मधली प्रेमकहाणी तू कशापद्धतीनं सांगितली आहेस ?
ः प्रेमाबाबत आपल्याकडे अनेक समज-गैरसमज आहे. आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो आणि समोरचीही व्यक्ती आपल्यासोबत नातं जोडते. मात्र कालांतरानं आपण आपल्या जोडीदाराला आपल्या पद्धतीनं बनविण्याचा प्रयत्न सुरू करतो. तेव्हा माझा प्रश्‍न असा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडीच तुम्हांला सुरुवातीलाच आवडत नव्हत्या तर तुम्ही तिच्याशी नातं का जोडलंत ? हा विचार मी या चित्रपटातून हलक्‍याफुलक्‍या, मनोरंजक पद्धतीतून मांडलाय.
ः काजोलची निवड कशी केलीस ?
ः तिनं मला तिची निवड करण्याची संधीच दिली नाही.
ः म्हणजे ?
ः मी तिला या चित्रपटाची "कॉन्सेप्ट' ऐकविली. तेव्हा तिनं मला हा चित्रपट करायचा असल्याचं सांगितलं. त्यामुळं, हा सिनेमा "प्लॅन' करायच्या आधीच ती माझ्या चित्रपटाची नायिका बनली होती.
ः आतापर्यंत तुम्ही दोघांनी एकूण सहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तिच्या अभिनयाबाबत तू काय सांगशील ?ः काजोल ही पहिल्यापासूनच "ग्रेट ऍक्‍ट्रेस' आहे. पण, अनुभवानं ती अधिक प्रगल्भ झालीय. सिनेमा माध्यमाची तिला आता आणखी चांगली जाण आलीय.
ः काजोलचंही तुझ्याबद्दलचं मत फारसं वेगळं नाहीय. "यू मी और हम' प्रदर्शित होण्यापूर्वीच तिनं तुझी गणना श्रेष्ठ दिग्दर्शकांमध्ये केलीय. याबद्दल तुला काय म्हणायचंय ?
ः हे खरंय की आम्हा दोघांना आमचं परस्परांचं काम खूपच चांगलं वाटतंय. पण, असं व्हायला नको की आमच्यातल्या नात्यामुळं उगाचच आम्ही एकमेकांचं स्तुती करावी. येत्या शुक्रवारपर्यंत थांबा. काय ते कळेलच.
ः तू आतापर्यंत अनेक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंस. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना तुझ्यावर कोणाचा प्रभाव होता ?
ः विजय आनंद यांना मी आदर्श मानतो. पण, दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना मी कोणालाही नजरेसमोर ठेवलं नाही. कारण, प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची एक स्टाईल असते. कथा सांगण्याची एक विशिष्ट पद्धत असते. माझ्या मते, चित्रपट हे फक्त "स्टोरी टेलिंग'चं माध्यम आहे. तुम्ही एखादं कथानक पडद्यावर किती आत्मियतेनं सांगता, यावर सर्व काही अवलंबून असतं. मला पटकथा लेखकानं जे कागदावर लिहिलंय ते पडद्यावर मांडायचं होतं. ही खूप कठीण गोष्ट असते. कारण, जगात एकही दिग्दर्शक असा नाही की जो कागदावर लिहिलेली कथा जशीच्या तशी पडद्यावर सांगू शकलाय. कागदावरचा चित्रपट पडद्यावर उतरताना काही टक्‍क्‍यांमध्ये कथानकाचं "रिसोल्युशन' कमी होतं. त्याची टक्केवारी फार घसरू न देण्याचं कसब एखाद्याला साधलं तर तो चांगला दिग्दर्शक म्हणून गणला जातो. मला हीच गोष्ट साध्य करायचीय.
ः "हल्लाबोल' का अपयशी ठरला असं तुला वाटतं ?
ः या चित्रपटाचा विषय खूप जुना झाला होता. एक तर या सिनेमाच्या चित्रीकरणास तब्बल चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. ज्यावेळी मी "ओंकारा' सुरू केला तेव्हा "हल्लाबोल'चं शूटिंग संपलं होतं. यावरून हा चित्रपट किती रेंगाळला होता, याची कल्पना येते. त्याशिवाय हल्लीचा प्रेक्षकवर्ग खूप जागरूक झालाय. तो "आऊटडेटेड' चित्रपट स्वीकारीत नाही.
ः गेल्या सतरा वर्षांमध्ये एक कलाकार म्हणून तुझी किती प्रगती झालीय ?
ः अनुभव ही अशी गोष्ट आहे की सर्वच माध्यमांमध्ये ती उपयोगाला येते. माझ्या करियरला सुरुवात झाली तेव्हा मी छायाचित्रकाराच्या खुर्चीवर बसून अप्रतिम दृश्‍यं टिपायचो. त्यावेळी तिथं हजर असणाऱ्यांना याबाबत आश्‍चर्य वाटायचं. त्यावेळी फक्त उत्कृष्ट "शॉट' घेण्याकडं माझा कल असायचा. पण, आता दिग्दर्शक बनल्यानंतर कथानक चांगलं वाटण्यासाठी उत्कृष्ट "शॉट' कोणता असेल यावर मी विचार करू लागलोय. माझ्या मते ही एका कलाकारामधली प्रगती आहे.
ः भविष्यात अभिनयावर अधिक लक्ष केंद्रीत करणार की दिग्दर्शनावर ?
ः या प्रश्‍नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण, एखादी खूप चांगला कल्पना मला स्वतःला सुचली तरच मी पुढचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ही कल्पना मला अगदी उद्याही सुचू शकते किंवा पुढील तीन वर्षंही सुचणार नाही. मात्र, दरम्यानच्या काळात माझा अभिनय सुरूच राहील. सध्या मी तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतोय. राजकुमार संतोषींच्या "लंडन ड्रीम्स'च्या चित्रीकरणास जूनमध्ये सुरुवात होईल.

Monday, April 7, 2008

राहुल बोस, के. के. "बेस्ट'


"शौर्य' या शीर्षकावरून हा युद्धपट वाटण्याची शक्‍यता आहे, पण तसं प्रत्यक्षात काही नाही. हा युद्धपट नाही की सीमेवरील एखाद्या सैनिकाची वीरोगाथा नाही. हा चित्रपट आपल्या समाज यंत्रणेतील बिघाडावर प्रभावी भाष्य करतो. एकीकडे आपला देश धर्मनिरपेक्ष प्रतिमेसाठी गौरविला जात असताना दुसरीकडे काही कट्टरपंथीय मंडळी या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिग्दर्शक समर खान यांनी लष्करी पार्श्‍वभूमीवर हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला आहे. "कोर्टमार्शल' प्रक्रियेला सामोरा जाणारा एक लष्करी अधिकारी आणि त्याच्या चौकशीतून बाहेर आलेलं एक धक्कादायक सत्य या चित्रपटाला इतरांहून वेगळं ठरवतं. सुरुवातीला संथ गतीनं जाणारा हा चित्रपट शेवटच्या वीस मिनिटांमध्ये उंची गाठण्यात यशस्वी ठरलाय. राहुल बोस आणि के. के. मेनन यांची अभिनयातील सरस कामगिरी या चित्रपटाला तारक ठरलीय.
चित्रपटाची सुरुवात होते ती एका हत्येपासून. जावेद खान (दीपक डोब्रियाल) नावाचा एक कॅप्टन आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करतो. त्यामुळं त्याच्यावर "कोर्टमार्शल'ची कारवाई सुरू होते. त्यासाठी लष्कराचा वकील म्हणून आकाशला (जावेद जाफरी) पाचारण करण्यात येते. सिद्धू (राहुल बोस) हा आकाशचा अगदी जवळचा मित्र. तोसुद्धा लष्करातच वकील असतो. आकाशबरोबर राहण्यासाठी तो जावेद खानचं वकीलपत्र घेण्यास तयार होतो; मात्र आकाश त्याला या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कसलीही ढवळाढवळ न करण्याची तसेच निकाल आपल्याच बाजूनं लागेल, अशी अट घालतो. ही अट सिद्धूला मान्य असते. कारण आयुष्याकडं त्यानं कधीच गांभीर्यानं पाहिलेलं नसतं. सुनावणीच्या निमित्तानं तो जावेद खानला भेटतो तेव्हा हा अधिकारी त्याच्याकडं एक शब्दही काढत नाही. दरम्यान श्रीनगरमध्ये एका वर्तमानपत्रात काम करणारी दिव्या (मीनिषा लांबा) सिद्धूला भेटते. तिनं जावेद खान प्रकरणात विशेष रस घेतलेला असतो. हे दोघं जावेदच्या आईला भेटतात. तसेच जावेदच्या हातून ठार मारला गेल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीलाही भेटतात. या भेटीनंतर जावेदचा खटला गांभीर्यानं लढविण्याचा सिद्धू निर्णय घेतो. त्याचा परिणाम सिद्धू आणि आकाशच्या मैत्रीवर होतो. चित्रपटाच्या "क्‍लायमॅक्‍स'मध्ये सिद्धू ब्रिगेडियर प्रताप (के. के. मेनन) यांना साक्षीसाठी बोलावतात. या साक्षीतून या खटल्याला वळण मिळतं आणि जावेद खानची निर्दोष मुक्तता होते.
परकीयांविरुद्धची लढाई हिंदी चित्रपटाला काही नवीन नाही. त्या तुलनेत स्वकीयांविरुद्धचा लढा आणि त्याला धर्मांधतेची मिळालेली पार्श्‍वभूमी आतापर्यंत हिंदी चित्रपटात खूप कमी वेळा पाहायला मिळालीय. प्रसिद्ध दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन यांच्या "सरफरोश' चित्रपटात हा मुद्दा त्रोटक स्वरूपात पाहायला मिळाला होता. "शौर्य'ची पटकथा जयदीप सरकार, अपर्णा मल्होत्रा आणि समर खान या तिघांनी लिहिलीय. कथानकातलं वेगळेपण पटकथेतून मांडताना या त्रिकुटाची बरीच त्रेधातिरपीट उडालीय. चित्रपटाच्या "क्‍लायमॅक्‍स'मधून बाहेर आलेलं जळजळीत सत्य हा खरं तर या चित्रपटाचा मूळ विषय असायला हवा होता, पण लेखक-दिग्दर्शकांनी या मूळ विषयाला "क्‍लायमॅक्‍स'पर्यंत झाकून ठेवलंय. त्यामुळे आकाश आणि सिद्धूमधील मैत्री आणि सिद्धू-काव्याच्या प्रेमकहाणीवर पटकथेचा बराच वेळ वाया गेलाय; मात्र शेवटची वीस मिनिटं खूप प्रभावी ठरल्यानं ही चूक माफ करायला हरकत नाही.
राहुल बोसनं सिद्धूची व्यक्तिरेखा साकारताना कमाल केलीय. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरावी. त्यामानानं जावेद जाफरीला फारसा "स्कोप' मिळालेला नाही. जावेद खानची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दीपक डोब्रियालच्या वाट्याला फारसे संवाद आलेले नाहीत, पण तो आपल्या चेहऱ्यातूनच सर्व काही सांगून गेलाय. भूमिका छोटी असो वा मोठी, के. के. मेननचा अभिनय सर्वोत्तमच असतो. "शौर्य'मध्येही त्यानं नेमकं असंच केलंय. मीनिषा लांबा, अमृता राव, सीमा विश्‍वास या तीन नायिकांची कामगिरीही चांगली आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये संगीताला फारसा वाव नसतो. तरीदेखील दिग्दर्शकानं अदनान सामीकडून दोन गाणी अट्टाहासानं घेतलीयत. म्हणूनच ती लक्षात राहत नाहीत.

Saturday, April 5, 2008

एस. पी. बालसुब्रह्मण्यम


मी अजूनही "रेस'मध्ये आहे...
तब्बल 13 भाषांमध्ये पार्श्‍वगायन करणाऱ्या बालसुब्रह्मण्यम यांनी सोमवारी दुपारी मराठी भाषेत गाऊन 14 भाषांत गाण्याचा सन्मान मिळविला. पट्टम वीरूनिर्मित आणि सुभाष फडके दिग्दर्शित "बंड्या आणि बेबी' या चित्रपटासाठी त्यांनी एक मराठी गाणे गायले. संदीप खरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. गेल्या 42 वर्षांत बालसुब्रह्मण्यम यांनी सुमारे 49 हजार गाणी गायली आहेत. स्वतःची "स्टाईल' असूनही काही पार्श्‍वगायक हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी "इनिंग' खेळू शकले नाहीत. त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
ः मी मराठीत का गायलो नाही, हा खरोखरीच एक "मिलियन डॉलर' प्रश्‍न आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही मला त्याबद्दल अनेकदा विचारलंय. महम्मद रफी, किशोरकुमार, मन्नाडे यांची नावं घेऊन हा प्रश्‍न मला विचारला जातो. एक गोष्ट मी नम्रपणे सांगेन की, रफी-किशोर कुमार यांच्याबरोबर माझी तुलना करणं योग्य नाही. ते माझ्यापेक्षा हजारो मैल पुढं आहेत.

ः मराठी भाषेत गाताना शब्दांच्या उच्चारणावर खूप लक्ष द्यावं लागतं. मला ते जमेल की नाही, अशी अनेकांना शंका आहे; पण गंमत म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये जेव्हा मी गायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याबद्दल अशीच शंका घेतली जायची. सुदैवानं आतापर्यंत माझ्या हिंदी उच्चारांमध्ये कोणाला काही खटकलेलं नाही. यापुढेही खटकणार नाही, अशी मी आशा करतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये मी यशस्वी होण्यामागचं कारण म्हणजे माझा आत्मविश्‍वास. ज्या भाषेतलं गाणं गायचंय, त्या भाषेचा प्रथम मी "फील' घेतो. तेलगू, तमीळ या दोन भाषा सोडून माझ्याकडे कोणी संगीत दिग्दर्शक आला तर मी त्यांना सांगतो, "केवळ बालू गाणाराय म्हणून तुम्ही भाषेचं विद्रूपीकरण करू नका;' परंतु ते माझं काही ऐकत नाहीत.

ः माझी मातृभाषा तेलगू आहे. शाळा-कॉलेजमधील नाटकात मी भाग घ्यायचो. ही सर्व नाटकं भक्‍तिरसप्रधान असायची. एका कानडी भाषेतील वाहिनीसाठी सध्या मी मुलांसाठी कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमात धारवाड, गुलबर्गा या भागातल्या लहान मुलांचा भरणा आहे. ही मुलं अनेकदा मराठी गाणी गातात. त्यांच्या तोंडून मी बरीच गाणी ऐकलीत. मला जाणवलेली गोष्ट म्हणजे तेलगू संगीत दिग्दर्शकांनी जाणीवपूर्वक मराठीतल्या मेलडीचा आपल्या भाषेत उपयोग केला.

ः एक काळ असा होता, की मी हिंदी चित्रपटात चांगलाच "पॉप्युलर' होतो. 1990 च्या दशकात मी दररोज सकाळी मुंबईत यायचो आणि रात्री चेन्नईला परतायचो. एका दिवशी तर माझी तब्बल 16 गाणी रेकॉर्ड झाली होती. या सर्व गाण्यांना आनंद-मिलिंद या संगीतकार जोडीनं संगीत दिलं होतं. त्या दिवशी सकाळी माझं मुंबई विमानतळावर आगमन झालं. कोणत्याही हॉटेलात न जाता मी थेट रेकॉर्डिंग सुरू असलेल्या स्टुडिओत गेलो. तिथून मग मी दिवसभर अनेक स्टुडिओ फिरत राहिलो. रात्री उशिरा चेन्नईला जाणारं परतीचं विमान पकडलं.

ः पूर्वीच्या इतका मी आता हिंदीत कार्यरत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण त्याचं मला वाईट वाटत नाही. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत एखादा कलाकार ठराविक काळात यशस्वी का असतो आणि एखादा स्पर्धेतून बाहेर का फेकला जातो, या प्रश्‍नांची उत्तरं देणं कठीण आहे; परंतु गेल्या 42 वर्षांमध्ये मी जे काही मिळवलं, त्याबद्दल मी आनंदी आहे. आजही मला चाहत्यांचे ई-मेल्स, पत्रं आणि फोन येतात. दाक्षिणात्य चित्रपटात आजही मी दिवसाला दोन गाणी रेकॉर्ड करतो. अजूनही मी "रेस'मध्ये आहे. हिंदीत मी वरचेवर का गात नाही, असा प्रश्‍न मला नेहमी विचारला जातो. हा प्रश्‍न मी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या संगीत दिग्दर्शकांना विचारीन. गेल्या दशकभरात खूप चांगले गायक हिंदीत आल्यामुळं त्यांना मला चेन्नईहून मुंबईत बोलाविण्याची गरज वाटली नसावी.

ः "बंड्या आणि बेबी' या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचा मी विशेष आभारी आहे. कारण अलीकडच्या काळातील हा एकमेव संगीतकार असा आहे, की ज्यानं मी कोणत्या "रेंज'शी "कम्फर्टेबल' आहे, याबद्दल विचारणा केली. हल्लीचे इतर संगीतदिग्दर्शक स्वतःच गात असल्यामुळं ते स्वतःच गाण्याचा "पीच' ठरवतात. जो पार्श्‍वगायक या "पीच'वर गाणार आहे, त्याला ते "सूट' होईल की नाही, याचा ते विचारच करीत नाहीत.

Friday, April 4, 2008

रंगतदार भाऊबंदकी


रंगतदार भाऊबंदकी

नात्यांमधली फसवणूक, खुनांची मालिका व लैंगिकतेकडे झुकणारा मालमसाला असला, की अब्बास-मस्तान ही दिग्दर्शकांची जोडी खुलते. या दिग्दर्शकद्वयीचा नवीन "रेस' चित्रपट पाहताना नेमका हाच अनुभव येतो. प्रेक्षकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरण्याचा आणि त्याला अडीच तास खिळवून ठेवण्याचा सगळा मालमसाला या चित्रपटात भरलाय. म्हणूनच हा चित्रपट डोक्‍याला फारसा ताप न देता पाहणाऱ्यांचं छान मनोरंजन करतो;
पण दिग्दर्शकद्वयीनं काही गोष्टींबाबत अधिक काळजी घेतली असती, तर ही शर्यत आणखी रोमहर्षक ठरली असती. एक तर या चित्रपटामधल्या सर्वच व्यक्तिरेखा खूपच चलाख दाखविल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचाल संशयास्पद वाटते. रहस्याचं जाळं अधिक गडद करण्यासाठी वापरलेल्या क्‍लृप्त्यांचा शेवटी शेवटी प्रचंड कंटाळा येतो. मध्यंतरालाच मुख्य हीरोचा खून दाखवून दिग्दर्शकानं धक्का देण्याचा प्रयत्न केलाय; पण हा धक्का थोडा "धीरे से'च लागतो. कारण- हा हीरो पुन्हा परतणार, याची पाहणाऱ्याला खात्री असते. प्रेक्षकांना असं वाटणं हाच रहस्यपटांमध्ये "मास्टरी' असणाऱ्या अब्बास-मस्तान यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
रणवीर (सैफ अली खान) व राजीव (अक्षय खन्ना) या दोन सावत्र भावांमधल्या भाऊबंदकीवर हा चित्रपट आधारलाय. वडिलांनी मृत्युपत्रात आपली सगळी संपत्ती रणवीरच्या नावानं केलेली असते. रणवीरचं राजीववर मनापासून प्रेम असतं; परंतु त्याचं प्रेम राजीव ओळखू शकत नाही. प्रेमाचा हा धागा त्याच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच हा धागा तोडण्याचा तो निर्णय घेतो आणि एका रंगतदार खेळाला सुरुवात होते. सोफिया (कतरिना कैफ), सोनिया (बिपाशा बसू), आरडी (अनिल कपूर) हे तिघे जण या खेळातले महत्त्वाचे खेळाडू. सोफिया ही रणवीरची सेक्रेटरी. तिचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम असतं. सोनिया ही प्रसिद्ध मॉडेल. पहिल्याच भेटीत ती रणवीरच्या नजरेत भरते; पण राजीवसाठी तो तिच्या आयुष्यातून दूर जातो. इकडे सोनियाशी विवाह करून रणवीरचा पत्ता कापण्यासाठी राजीव सज्ज होतो. या खेळात मग कोणाला कशाचंच भान उरत नाही. नाती, मूल्यं पायदळी तुडवायलाही ही मंडळी कमी करीत नाहीत.
"रेस'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचंड वेग. या चित्रपटात एकापाठोपाठ घडणाऱ्या घटना पाहणाऱ्याला विचार करायलाच अवधी देत नाहीत. चित्रपटाची गोष्ट रंगतदारपणे सांगण्यात अब्बास-मस्तान यांचा हातखंडा आहे. या चित्रपटातही त्यांनी कथानकाला मोठ्या प्रेमानं फुलवलंय. रणवीर, राजीव, सोनिया व सोफिया या चारही व्यक्तिरेखांची उभारणी लक्षणीय आहे. सोनियाचा उलगडलेला भूतकाळ रंजक आहे. रणवीर व राजीव यांच्यातील शह-काटशहाचा खेळ सुरुवातीला खूप छान होतो; पण कोणत्याही गोष्टीला एक शेवट असतो याचं दिग्दर्शकाला भान राहिलेलं नाही. रणवीर-राजीवनी एकमेकांवर केलेल्या कुरघोडीचा खेळ जास्त लांबल्यानं त्यातली गंमत हरवलीय.
रणवीर ही चित्रपटामधली सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा. त्याची मध्यंतराला हत्या झाल्याचं दाखविण्यात आलंय; पण नायकाचीच मध्यांतराला "एक्‍झिट' होणं शक्‍य नाही, याची पाहणाऱ्याला खात्री असते. दिग्दर्शकानं या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं, तर हा चित्रपट अधिक परिणामकारक ठरला असता.
सैफ अली खान, अक्षय खन्ना, बिपाशा बसू, अनिल कपूर ही कलाकार मंडळी अभिनयात निष्णात आहेत. त्यामुळेच त्यांनी आपापल्या व्यक्तिरेखा अगदी सहजतेनं साकारल्यात. सुरुवातीच्या दृश्‍यांमध्ये प्रभाव पाडू न शकणारी कतरिना मध्यंतरानंतर चांगलं "फूटेज' घेऊन गेलीय. समीरा रेड्डीला काहीच वाव नाही. "रेस'ला मारक ठरलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गाण्यांची संख्या. प्रीतमनं संगीतबद्ध केलेली फक्त दोनच गाणी चांगली आहेत. चित्रपटाचा "लूक' जबरदस्त आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात कधी पाहिलेलं नसेल एवढं थरारक "कार-रेसिंग' या चित्रपटात पाहायला मिळेल.

Tuesday, April 1, 2008

अमोल गुप्तेंच्या मराठी चित्रपटात शाहरूख खान

अमोल गुप्तेंच्या मराठी चित्रपटात शाहरूख खान

मुंबई ः "तारे जमीं पर'मध्ये मुलांच्या गतिमंदतेविषयी भाष्य करणारे प्रसिद्ध पटकथा लेखक अमोल गुप्ते आता आणखी एक सामाजिकपट हाताळण्यास सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीत बनणार असून त्यात शाहरूख खान पाहुण्या कलाकाराची व्यक्तिरेखा साकारणार आहे. "सोडी सोन्याचा पिंजरा' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.

मुले सध्या शिक्षण आणि नोकरीसाठी विदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विदेशी गेलेली मुले गलेलठ्ठ पगार आणि तिथे मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे तिकडेच स्थायिक झाल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, त्यामुळे दोन प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतामधील वृद्ध पालकांचे अंधःकारमय भविष्य आणि विदेशात जन्मलेल्या आपल्या मुलांना पाश्‍चात्त्य संस्कृती गिळणार तर नाही ना? यामुळे तरुण पिढी सध्या ग्रासली आहे. गुप्ते यांच्या चित्रपटात या समस्येवर प्रकाश टाकण्यात आलाय.

"तारे जमीं पर' चित्रपट पाहून शाहरूख प्रचंड भारावला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याने गुप्तेंची तातडीने भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची उत्सुकता दाखविली होती. शाहरूखच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाकडे प्रेक्षक गांभीर्याने पाहतील, या हेतूने गुप्तेंनी त्याला या चित्रपटात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा दिली आहे.


"शोले'चा रिमेक आता रमेश सिप्पी करणार

ंमुंबई ः प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी "शोले'च्या केलेल्या भज्याची चव अजून ताजी असतानाच आता आणखी एक "शोले' येतोय. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे "ओरिजनल शोले' दिग्दर्शित करणारे रमेश सिप्पीच "डुप्लिकेट शोले'चे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे "बजेट' आहे तब्बल ऐंशी कोटी.

गेल्या ऑगस्टमध्ये "रामगोपाल वर्मा के शोले' हा चित्रपट पाहिल्यानंतर रमेश सिप्पी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना अनेकदा "शोले'चा "रिमेक' बनविण्याची "ऑफर' देण्यात आली होती. परंतु प्रत्येक वेळी त्यांनी ती नम्रपणे नाकारली होती. "शोले दुबारा नहीं बन सकती' असे यावर त्यांचे उत्तर असे. परंतु वर्मांचा "शोले' पाहिल्यानंतर त्यांनी इतर सर्व "प्रोजेक्‍ट'वरचे काम थांबविले. हा चित्रपट आपल्या "रिमेक'ची प्रेरणा असल्याचे त्यांनी आज प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह गब्बरची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. इतर व्यक्तिरेखांची नावे व कलाकार पुढीलप्रमाणे ः- शाहरूख खान (जय), आमीर खान (वीरू), बसंती (कतरिना कैफ), सांबा (परेश रावल). पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.


सेहवाग इन, रणबीर आऊट!

ंमुंबई ः प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोनला आता मानायलाच हवं. कधीही आणि कोणत्याही क्षणी विकेट काढण्यात ती आता मुरलीधरनलाही मागं टाकू शकेल. अगदी परवा परवा तिनं रणबीर कपूरच आपला साता जन्माचा सोबती असल्याचा "बाईट' दूरचित्रवाहिन्यांना दिला होता; पण हा "बाईट' देऊन सात दिवस होण्याच्या आतच तिनं आपली मोहिनी वीरेंद्र सेहवागवर घातलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई कसोटीत त्रिशतक ठोकणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या सन्मानार्थ रविवारी रात्री प्रीतिभोजन आयोजित करण्यात आले होते. तडाखेबंद त्रिशतकी खेळी करणाऱ्या सेहवागवर उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. पण वीरूची नजर एका व्यक्तीचा शोध घेत होती. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून दीपिका पदुकोनच आहे, याचा प्रत्यय वीरूनेच करून दिला. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक "ओम शांती ओम'मधलं "आँखो में तेरी...' या गाण्याच्या तालावर दीपिकानं "एन्ट्री' घेतली. तिनं सेहवागला "शेकहॅंड' करीत त्याचं अभिनंदन केलं. यावेळी उपस्थित छायाचित्रकार या दोघांची छबी कॅमेऱ्यात टिपताना त्यांना "पोज'साठी खुणावीत होते. पण वीरूचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. दीपिकाशी काय बोलू आणि काय नको, असं त्याला झालं होतं. फोटोसेशनचा कार्यक्रम संपल्यानंतर या जोडीनं मागच्या दारानं "एक्‍झिट' घेतली.

("एप्रिल फूल्स डे'च्या निमित्ताने केलेली ही एक छोटीशी, निर्विष गंमत. गंमती-गंमतीनेच ती घ्यायची... कसं?)