Saturday, April 5, 2008

एस. पी. बालसुब्रह्मण्यम


मी अजूनही "रेस'मध्ये आहे...
तब्बल 13 भाषांमध्ये पार्श्‍वगायन करणाऱ्या बालसुब्रह्मण्यम यांनी सोमवारी दुपारी मराठी भाषेत गाऊन 14 भाषांत गाण्याचा सन्मान मिळविला. पट्टम वीरूनिर्मित आणि सुभाष फडके दिग्दर्शित "बंड्या आणि बेबी' या चित्रपटासाठी त्यांनी एक मराठी गाणे गायले. संदीप खरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. गेल्या 42 वर्षांत बालसुब्रह्मण्यम यांनी सुमारे 49 हजार गाणी गायली आहेत. स्वतःची "स्टाईल' असूनही काही पार्श्‍वगायक हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी "इनिंग' खेळू शकले नाहीत. त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
ः मी मराठीत का गायलो नाही, हा खरोखरीच एक "मिलियन डॉलर' प्रश्‍न आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही मला त्याबद्दल अनेकदा विचारलंय. महम्मद रफी, किशोरकुमार, मन्नाडे यांची नावं घेऊन हा प्रश्‍न मला विचारला जातो. एक गोष्ट मी नम्रपणे सांगेन की, रफी-किशोर कुमार यांच्याबरोबर माझी तुलना करणं योग्य नाही. ते माझ्यापेक्षा हजारो मैल पुढं आहेत.

ः मराठी भाषेत गाताना शब्दांच्या उच्चारणावर खूप लक्ष द्यावं लागतं. मला ते जमेल की नाही, अशी अनेकांना शंका आहे; पण गंमत म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये जेव्हा मी गायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याबद्दल अशीच शंका घेतली जायची. सुदैवानं आतापर्यंत माझ्या हिंदी उच्चारांमध्ये कोणाला काही खटकलेलं नाही. यापुढेही खटकणार नाही, अशी मी आशा करतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये मी यशस्वी होण्यामागचं कारण म्हणजे माझा आत्मविश्‍वास. ज्या भाषेतलं गाणं गायचंय, त्या भाषेचा प्रथम मी "फील' घेतो. तेलगू, तमीळ या दोन भाषा सोडून माझ्याकडे कोणी संगीत दिग्दर्शक आला तर मी त्यांना सांगतो, "केवळ बालू गाणाराय म्हणून तुम्ही भाषेचं विद्रूपीकरण करू नका;' परंतु ते माझं काही ऐकत नाहीत.

ः माझी मातृभाषा तेलगू आहे. शाळा-कॉलेजमधील नाटकात मी भाग घ्यायचो. ही सर्व नाटकं भक्‍तिरसप्रधान असायची. एका कानडी भाषेतील वाहिनीसाठी सध्या मी मुलांसाठी कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमात धारवाड, गुलबर्गा या भागातल्या लहान मुलांचा भरणा आहे. ही मुलं अनेकदा मराठी गाणी गातात. त्यांच्या तोंडून मी बरीच गाणी ऐकलीत. मला जाणवलेली गोष्ट म्हणजे तेलगू संगीत दिग्दर्शकांनी जाणीवपूर्वक मराठीतल्या मेलडीचा आपल्या भाषेत उपयोग केला.

ः एक काळ असा होता, की मी हिंदी चित्रपटात चांगलाच "पॉप्युलर' होतो. 1990 च्या दशकात मी दररोज सकाळी मुंबईत यायचो आणि रात्री चेन्नईला परतायचो. एका दिवशी तर माझी तब्बल 16 गाणी रेकॉर्ड झाली होती. या सर्व गाण्यांना आनंद-मिलिंद या संगीतकार जोडीनं संगीत दिलं होतं. त्या दिवशी सकाळी माझं मुंबई विमानतळावर आगमन झालं. कोणत्याही हॉटेलात न जाता मी थेट रेकॉर्डिंग सुरू असलेल्या स्टुडिओत गेलो. तिथून मग मी दिवसभर अनेक स्टुडिओ फिरत राहिलो. रात्री उशिरा चेन्नईला जाणारं परतीचं विमान पकडलं.

ः पूर्वीच्या इतका मी आता हिंदीत कार्यरत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण त्याचं मला वाईट वाटत नाही. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत एखादा कलाकार ठराविक काळात यशस्वी का असतो आणि एखादा स्पर्धेतून बाहेर का फेकला जातो, या प्रश्‍नांची उत्तरं देणं कठीण आहे; परंतु गेल्या 42 वर्षांमध्ये मी जे काही मिळवलं, त्याबद्दल मी आनंदी आहे. आजही मला चाहत्यांचे ई-मेल्स, पत्रं आणि फोन येतात. दाक्षिणात्य चित्रपटात आजही मी दिवसाला दोन गाणी रेकॉर्ड करतो. अजूनही मी "रेस'मध्ये आहे. हिंदीत मी वरचेवर का गात नाही, असा प्रश्‍न मला नेहमी विचारला जातो. हा प्रश्‍न मी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या संगीत दिग्दर्शकांना विचारीन. गेल्या दशकभरात खूप चांगले गायक हिंदीत आल्यामुळं त्यांना मला चेन्नईहून मुंबईत बोलाविण्याची गरज वाटली नसावी.

ः "बंड्या आणि बेबी' या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचा मी विशेष आभारी आहे. कारण अलीकडच्या काळातील हा एकमेव संगीतकार असा आहे, की ज्यानं मी कोणत्या "रेंज'शी "कम्फर्टेबल' आहे, याबद्दल विचारणा केली. हल्लीचे इतर संगीतदिग्दर्शक स्वतःच गात असल्यामुळं ते स्वतःच गाण्याचा "पीच' ठरवतात. जो पार्श्‍वगायक या "पीच'वर गाणार आहे, त्याला ते "सूट' होईल की नाही, याचा ते विचारच करीत नाहीत.

No comments: